Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

स्त्रीला मुक्ती नेमकी कशापासून हवीय..?

आपल्याकडे लहानपणापासूनच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मुलींचं ब्रेनवॉश केलं जातं. मुलीच्या जातीनं ‘हे’ नाही करायचं, मुलीच्या जातीनं ‘ते’ नाही करायचं.. असं वागायचं, तसं वागायचं.. चांगलं शिक्षण का घ्यायचं, तर चांगलं स्थळ मिळेल, चांगला जॉब का करायचा, तर श्रीमंत नवरा भेटेल.!! मग लग्न करायचं, मग लगेच मुलं, मग त्यांना वाढवायचं… म्हणजेच काय?.. तर आदर्श संसार करायचा… सार्थक झालं मग जीवनाचं.!! (समाज पण मग आदर्श माता, आदर्श गृहिणी पुरस्कार देऊन तुम्हाला कृतकृत करणार!) भलेही मग तिच्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षा आणि स्वप्नांचा तिला कितीही बळी द्यायला लागो..
मुलीचं लग्न हा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा टप्पा असतो.. वडिलांची श्रीमंती, जात, खानदान, सुंदरता असे अनेक घटक त्या मुलीचं नशीबच बदलवतात.. शिक्षणापेक्षाही हेच ऍसेट महत्वाचे ठरतात.. पालकांनापण मुलीचं लग्न म्हटलं की काहीतरी ‘अवजड’ ताण असल्यासारखं वाटत असतं. मग त्यातूनच, ‘बेटी तो पराया धन होती है’ , वगैरे सारखे दळभद्री डायलॉग जन्म घेतात. काही पालक मुलींच्या शिक्षणाहूनही ‘त्यांच्या लग्नाला’ जास्त किंमत देतात.. फी परवडत नाही म्हणून शिक्षण थांबवतील पण लग्नाच्या धामधुमीत मात्र कर्ज काढून लाखो रुपये उधळतील..
पुरुषांच्या आयुष्यात शिक्षण, जॉब, करियर आणि लग्न हे मोठे टप्पे असतात.. पण स्त्रियांच्या आयुष्यात मात्र शेवटी ‘लग्न’ हाच एकमेव मोठा टप्पा ठरतो.. लग्नच त्यांचं भविष्य आणि नशीब ठरवतं आणि सगळं काही त्याच्याभोवतीच फिरत असतं..
वर्षेनुवर्षं तेच तेच बिंबवल्यामुळं आणि आजूबाजूच्या सामाजिक मानसिकतेमुळं बायकांनाही यात वेगळा विचार करण्यात फारसा इंटरेस्ट नसतो… जेवढी समाजाने ही मानसिकता लादली, तेवढीच स्त्रियांनी पण ती चुपचाप स्वीकारलेली आहे.. मान्य आहे की, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. स्त्रीशिक्षण आणि त्यांचं करियर वगैरे अशा गोष्टी अस्तित्वात नव्हत्या.. त्याकाळात समाजाची ती अपरिहार्यता होती.. पण ह्या विज्ञानयुगातही तेच सुरू आहे.. स्त्रियांची ऐहिक प्रगती झाली, पण मानसिक स्वातंत्र्य मात्र अजिबात मिळाले नाही, आणि बऱ्याच जणी त्यासाठी स्वतः प्रयत्नही करत नाहीत.. आजही अल्टीमेटली “चूल अन मूल” हेच आयुष्य असतं स्त्रियांसाठी.. शेवटी घरही तिच्या नावावर नसतं, पैसा तर नाहीच नाही, तिने जन्माला घातलेली पोरं देखील तिचे नाव लावत नाहीत, स्वत:च्या शरीराबद्दलचे निर्णयही ती घेऊ शकत नाही! आपली आई, आपली बहीण, आपली बायको यांच्याबद्दल समाज म्हणून आपण इतके संवेदनाहीन होऊ शकतो?
स्त्रियांच्या बाबतीत बहुतांश पुरुषांची मानसिकता प्रतिगामी आणि पुरुषसत्ताक असते यात काही वादच नाही.. वर्चस्ववादातून आणि परंपरांतून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मिळणारे फायदे कोणाला नको असतील.?! संस्कृतीनेच पिढीजात लाभार्थी बनण्याची केलेली सोय सहजासहजी कोण पुरुष नाकारेल? पण स्त्रियाही याला स्वतःच मनापासून ‘फॉर’ असतात..
बऱ्याचदा पुरुष घरात छळ करतात, तेंव्हा घरातल्या इतर जेष्ठ स्त्रिया मूग गिळून गप्प बसतात.. घरातले जेष्ठ पुरुष जेंव्हा रितींच्या नावाखाली सुनांवर बंधनं लादतात तेंव्हा सासूही त्याला सामील का असते..? नवरा जेंव्हा बायकोला मारहाण करतो तेव्हा त्याची आई ‘माझ्या सुनेच्या अंगाला हात लावशील तर याद राख’ अशी खमकी भूमिका का घेऊ शकत नाही..?
कितीतरी आया मुलांना गावभर उंडारायला सोडतात आणि मुलीला मात्र अगदी बंधनात वाढवतात.. मला सांगा, अगदी शहरातही किती आया त्यांच्या मुलींना, मुलां इतक्याच समान ‘संधी’ देतात..? किंवा किती सासवा आपल्या सुनेला आपल्या मुलाप्रमाणे (कमीतकमी मुलीप्रमाणे तरी) वागवतात.? मग कुठल्या तोंडाने स्त्रीमुक्तीच्या गप्पा करतो आपण.!!
बरं.. किती मुलीना त्यांच्यापेक्षा कमी शिकलेला मुलगा नवरा म्हणून चालेल? किती मुलीना त्यांचा नवरा खालच्या आर्थिक स्तरावरचा असला तरी चालेल? स्वतः कसंही असलं तरी लग्नासाठी मोठं घराणं पाहिजे, श्रीमंती पाहिजे, उच्चशिक्षित नवरा पाहिजे, अशाच अपेक्षा असतात ना.. मग आपणच लग्न ठरविताना अशा “स्वत्व गहाण टाकणाऱ्या” अपेक्षा आणि तडजोडी करायच्या आणि पुन्हा समानतेसाठी बोंबलायचे..!
लग्न झाल्यावर पण बायका स्वतःच आवडीने जपतात सगळं… वटसावित्री काय, हळदी-कुंकू काय, आणि काय काय असतं… (कुठल्याही स्त्रीला विचारा,.. ती हेच् म्हणते – मलाच आवड आहे म्हणून मी करते!!) .. आणि या दळभद्री आवडीला ‘संस्कृती’ म्हणतात… थोर संस्कृती..! ‘घराण्याची रीत’ वगैरेच्या नावाखाली नव्या नवरीची शुद्ध फसवणूक असते.. ‘घराण्याच्या इज्जती’खाली दाबून टाकतात तिच्या इच्छा-आकांक्षा..
‘स्वत:च्या फायद्यासाठी समाजानं बायकांवर लादलेली बंधनं’ म्हणजे संस्कृती.!! अशीच खरी आतली व्याख्या आहे आपल्याकडे..
मंगळसूत्र … संस्कृती ….
हळदीकुंकू … संस्कृती ….
नाव बदलणं … संस्कृती ….
पती के लंबी उमर के लिये व्रत.. संस्कृती..
सगळ्या संस्कृत्या बायकांभोवतीच का फिरतात बरं? पुरुषांनी पाळावयाची असली कुठली ‘संस्कृती’ आहे का ?
…मला तर वाटतं, ‘सगळे रीतीरिवाज आणि परंपरा चुपचापपणे पाळणारी एखादी बकरी शोधणं’, एवढीच पुरुषांची संस्कृती आहे..!!
अजूनही कित्येक घरांत, ‘पत्नी की जगह तो पती के पैरो मे होती है’, म्हणून कित्येक मुलींची मनं नासवली जातात. ज्या वयात मुलींना लग्न म्हणजे काय माहित नसतं, त्या वयात कित्येक ‘आया’ आपल्या मुलींना घेऊन “हळदी-कुंकू” वगैरे सारखे गुलामगिरीचे धडे गिरवताना दिसतात.. वटसवित्री हरतालिका हे तर थोरच आहेत..!! टेक्नॉलॉजी येऊनही काहीही फरक पडला नाही, उलट त्याच रूढी परंपरांचे फोटो नटूनथटून अपलोड करतात, आणि ‘हौस’ या गोंडस नावाखाली अभिमानानं गुलामीची प्रतीकं मिरवतात..
ज्या सुनेनं ह्या सगळ्याचा जाच भोगलाय ती स्वतः सासू झाल्यावर पण तेच करते.. मला किती सासुरवास होता, आणि हिला एवढं पण नको सहन करायला? ही वृत्ती..!
ज्या नणंदेला त्रास होतोय ती भावजयीच्या बाबतीत मात्र तेच रिपीट करते.. यातून बाहेर पडायची, सोबतच्या स्त्रीला माणूस म्हणून वागवायची लक्षणंच नाहीत वर्षेनुवर्षं..
.. त्या तद्दन फालतू टीव्ही मालिकातलं बघून तसंच करायचं बघतात… चार जणी भेटल्या की त्याच त्याच चर्चा.. अय्या, कुठून घेतलीस ग ही साडी? अगं तिनं केलेला बॉबकट बघितला, काहीतरी नसती थेरं मेलीची!!
साऱ्या चर्चा, एकतर सणावारांच्या किंवा मुलाबाळांच्या नाहीतर मग नवरे लोकांच्या..!!
आयुष्य म्हणजे फक्त संसार आणि उखाळ्यापाखाळ्या च आहे का ? आयुष्यात काय महत्वाचं आहे जास्त? गृहशोभीका आणि मधुरा वाचण्यासाठी शिक्षण घेतलंय का तुम्ही?
शिक्षण हे “आत्मसम्मान उंचावण्यासाठी” असतं.. शिक्षण हे तारतम्य ओळखण्यासाठी असतं.. स्वतंत्र विचार करण्यासाठी असतं.. शिक्षण फक्त चांगलं स्थळ मिळण्यापूरतं नसतं..
शिक्षण हे मानसिक स्वातंत्र्य देतं.. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर घरातल्या छोट्या मोठ्या निर्णयात आपलंही मत विचारात घेतलं जात असावं.. कुठलीही मतं आपल्यावर कोणी एकतर्फी लादण्याऐवजी त्याचे फायदेतोटे समजावून सांगावेत आणि आपल्याला अजिबात न पटणाऱ्या गोष्टी आपल्या घरात कोणी मुद्दाम करू नयेत किंवा आपल्याला करायलाही लावू नयेत, अशी परिस्थिती असणे याला स्वातंत्र्य म्हणायचं..
नुसतं दिवसभर लोळता येणं, डेलीसोप्स पाहता येणं, हवं तेंव्हा माहेरी जाता येणं, बेफाम हॉटेलिंग करता येणं, म्हणजेच स्वातंत्र्य वाटतं काहींना.. आणि त्यावर त्यांना कोणी काही बोललं की लगेच स्वातंत्र्यावरच घाला घातल्यासारखं तांडव करतात..
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.. किंवा स्वतंत्र विचार म्हणजे मनमानी नव्हे.. स्वातंत्र्यासोबत जबाबदाऱ्याही येतात, त्याचं काय?? स्त्री असो वा पुरुष, तुम्ही जबाबदारीनं वागणार असाल तरंच त्या स्वातंत्र्यालाही अर्थ आहे..
स्त्रियांनी स्वतःच्या शिक्षणाप्रमाणे जॉब करावा, परिस्थितीमुळे जॉब शक्य नसेल तर व्यवसाय करावा, क्लासेस घ्या, कोणताही घरगुती व्यवसाय करा, समाजात मिसळा.. आणि शिक्षणामुळं आलेल्या हुषारीचा स्वतःला प्रगल्भ बनविण्यासाठी वापर करा.. रोज दुपारी नुसतं ‘दमले बाई’ म्हणून लोळत पडण्यापेक्षा पुस्तकं वाचा, रोजचे पेपर वाचा, काहीही नवीन नवीन शिका, स्वतःचा आयक्यु वाढवा.. प्रत्येक गोष्टीवर स्वतंत्रपणे विचार करायला शिका.. तरंच त्या शिक्षणाचा उपयोग..!!
मुलींनो, आई म्हणून मुलांचं योग्य संगोपन जरूर करा, पण त्यातच खितपत न पडता आत्मनिर्भर बना.. नवरा-मुलं हे म्हणजेच सगळं आयुष्य नाही.. ते फक्त आयुष्याचा एक भाग आहेत.. त्याच्यासोबत कितीतरी अनेक गोष्टी करण्यासारख्या, शिकण्यासारख्या आहेत..
शिक्षणाने तुम्हाला आत्मनिर्भर बनण्याची संधी दिली आहे.. त्यातूनच तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे.. गुलामगिरीचे विचार, समाजमान्य चौकटी आणि रीती-रिवाजांच्या अर्थहीन बेड्या नाकारा..
मुलींनी – बायकांनी हे बदलायला हवं… स्वत:हून स्वत:ला ‘घडवायला’ हवं…. किमान जी हे करतीये, झगडतीये, बदल घडवतीये, तिच्याबद्दल टोमणे आणि उखाळ्यापाखाळ्या तरी बंद करायला हव्यात..
आत्मनिर्भर झाल्याशिवाय तुम्हाला ‘आदर’ आणि ‘समानता’ मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.. स्त्रियांनो, मुक्ती तुम्हाला स्वतःच्याच न्यूनगंडापासून आणि दुय्यमतेच्या विचारांपासून हवी आहे..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *