Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

स्पेशालिस्ट डॉक्टर खेड्यात प्रॅक्टिसला जायला तयार का होत नाहीत?

आपल्याला किती सहज प्रश्न पडतो, “स्पेशालिस्ट डॉक्टर खेड्यात प्रॅक्टिसला जायला तयार का होत नाहीत बरं?” काय ठेवलंय शहरातच सगळ्यांचं असं? यांना समाजाचं काही घेणंदेणं नाही, जरासुद्धा रुग्णसेवा करायला नको!! यांना ना, सक्तीच् केली पाहिजे खेडोपाड्यात प्रॅक्टिसला जायची.. हो ना?पण एखाद्या डॉक्टरांचं एखाद्या ठिकाणी प्रॅक्टिस करणं आजूबाजूच्या वैद्यकीय आणि अ-वैद्यकीय अशा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं, हे आपल्याला माहितीच नसतं..जरा बऱ्यापैकी सुधारित तालुके सोडले तर अजूनही काही तालुक्यांच्या ठिकाणी परिस्थिती बिकट आहे.. खेडोपाड्यात तर बोलायलाच नको..एकतर स्टाफ मिळत नाही आणि मिळणारा स्टाफ ट्रेनड् नसतो, दळणवळणाची साधनं नसतात, सगळी औषधं उपलब्ध होऊ शकत नाहीत, ब्लडबँक नसते, थायरॉईड(TFT) 2D इको सारख्या वेगळ्या तपासण्यांची सोय नसते, भुलतज्ञ किंवा इतर कन्सल्टंट मिळत नाहीत, त्यात चौदा सोळा तास होणारं लोडशेडिंग, अशा एक ना अनेक अडचणीतून मार्ग काढत प्रॅक्टिस करणं कठीण असतं… ह्याची सामान्य लोकांना अजिबात जाणीव नसते..*एक उदाहरण सांगतो..*माझा एक गायनाकॉलॉजिस्ट मित्र 2004 साली एका तालुक्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करायला गेला..त्याला सुरुवातीला GNM किंवा ANM झालेल्या नर्स उपलब्ध नव्हत्या.. वॉर्डबॉय किंवा हॉस्पिटल मधली इतर कामं करायला कोणी तयार होत नसत.. हॉस्पिटलमध्ये काम करणं ग्रामीण भागात (विचित्र समजुतींमुळं) हलक्या दर्जाचं समजलं जातं.. मग काय, भरपूर पगाराचं आमिष देऊन कसंबसं स्टाफ सांभाळावा लागायचा.. त्यांना ट्रेन करावं लागायचं.. त्यात पुन्हा शेतीची कामं सुरू झाली की अर्धेअधिक जण काम सोडून जायचे..डिलिव्हरी साठी किंवा नाईट ड्युटी करायला फिमेल स्टाफ मिळत नसायचा.. मग आहे त्यात सांभाळून घ्यावं लागायचं.. स्वतः रात्र रात्र जगावं लागायचं.. दुसऱ्या दिवशी रुटीनसाठी पुन्हा फ्रेश राहावं लागायचं..भुलतज्ञ उपलब्ध होत नव्हते.. बाळांचे डॉक्टर (पेडियाट्रीशियन) व्हिजिटला येत नव्हते..तिथं ब्लड बँक नव्हती.. मग रक्त लागलं तर शहरातून आणावं लागायचं.. आणि खूप अर्जंट असलं तर पेशन्टच् शहरात पाठवून द्यावं लागायचं.. तेही सोपं नव्हतं.. गाडी मिळत नव्हती म्हणून नंतर त्याने स्वतःच एक अँबुलन्स घेतली.. सारखी लाईट जायची म्हणून जनरेटर पण घेतला.. बऱ्याच लॅब तपासण्यांसाठीच्या मशिनरी स्वतःच् घेतल्या..हॉस्पिटल मॅनेज करताना अनंत छोट्यामोठ्या अडचणी निर्माण व्हायच्या, पण तो त्यातून काहितरी मार्ग काढायचा.. तसा तो खूप उत्साही होता..भुलतज्ञ आणि पेडियाट्रीशियन तो व्हिजिट साठी बोलवायचा.. तेवढ्यात सगळे ऑपरेशन्स करून घ्यायचा.. पण एकदा ते गेले की पेशन्टला पुढे शहरात पाठविण्यावाचून पर्यायच् नसायचा.. काही डिलिव्हरीज् बॉर्डरलाईन असायच्या, ऐनवेळी सिझेरियन करावं लागण्याची परिस्थिती निर्माण व्हायची.. मग त्याची खूप गोची व्हायची.. पेशंटच्या नातेवाईकांची बोलणी खावी लागायची, प्रसंगी ते हमरीतुमरीवर पण यायचे..पण हा खूप दक्ष राहून काम करायचा.. पण कधी कधी वेळ काही सांगून यायची नाही.. पेशंट्सचं बरं वाईट पहावं लागायचं.. बऱ्याचदा पेशंटला गाडीत घालून न्यावं लागायचं.. हे सगळं तो प्रॅक्टिसचाच एक भाग म्हणून करतच् होता..लोकांचं बिलं कमी देणं, पैसे बुडविणं हे नित्याचंच होतं.. वर “आम्ही काय पळून चाललोत का?” किंवा, “गावात राहायचंय का नाही डॉक्टर?” अशी उर्मट भाषा असायची.. दुष्काळी परिस्थिती किंवा गारपीट अशा वेळी तर डॉक्टरचे बिल बुडविणे हा आपला हक्कच् आहे असंच लोकांना वाटायचं.. गावगुंडांचा उपद्रव असायचा.. जातीपातींच्या राजकारणाचाही खूप त्रास व्हायचा.. सतत नमतं घेऊन राहावं लागायचं.. पण त्याने अशा गोष्टींना पण जुळवून घेतलं होतं..काही चांगले तर काही वाईट अनुभव यायचे.. पण तो खुश होता.. थोडक्यात समाधान मानणारा होता..त्या गावी चांगल्या शाळा नाहीत म्हणून त्यानं मुलांना पाचवीपासून शहरात शाळेत ठेवलं.. मग मुलांसोबत मॅडम राहायला गेल्या.. सोबत आपली बायकोपोरं नाहीत याचं त्याला खूप वाईट वाटायचं.. सुरुवातीला खूप एकटं एकटं वाटायचं.. एखाद्या शनिवार रविवारी ते इकडं यायचे एखाद्या रविवारी तो तिकडं जायचा.. असं वर्षभर चाललं.. तो हॉस्पिटलला नसताना एकदा एका रविवारी रात्री एक बाई जवळच्या खेड्यातून अवघडलेल्या स्थितीतच् डिलिव्हरीला आली होती, पण डॉक्टर नाहीत म्हणल्यावर ते नातेवाईक इतके चिडले की त्यांनी बराच धिंगाणा घातला आणि हॉस्पिटलच्या काचा फोडल्या..आयुष्यात पहिल्यांदाच त्याला खेड्यात प्रॅक्टिसला आल्याचा पश्चाताप झाला.. काळ बदलत चालल्याची जाणीव त्याला अगोदरपासून होतंच होती, पण तरीही लोकांच्या चांगुलपणावर त्याचा अजून विश्वास होता..कालांतराने तो ती घटना विसरूनही गेला..त्यानंतर पाचसहा महिन्यांनी डिलिव्हरीला आलेल्या एका पेशन्टच बाळ दगावलं.. यावेळी मात्र त्या पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली.. त्यांचा घराण्याचा वारस असलेलं बाळ (मुलगा) डॉक्टरला डिलिव्हरी न जमल्यामुळंच् गेला, असा त्यांचा आरोप होता.. भुलतज्ञ, पेडियाट्रीशियन आणि आयसीयु नसल्याने याआगोदर पण अशा दुर्घटना (त्याने शर्थीचे प्रयत्न करून पण) झाल्या होत्या.. पण यावेळी मात्र त्याला बेदम मारहाण झाली…प्रॅक्टिसमध्ये पहिल्यांदाच तो घरात एकटा बसून ढसाढसा रडला.. त्याला लहानपणापासूनचे दिवस आठवले.. ‘मेडिकल’ला जाण्यासाठी रात्र रात्र जागून केलेला अभ्यास आठवला.. मेडिकलला ऍडमिशन मिळाल्याचा क्षण आठवला.. त्यावेळी शाळेने केलेल्या सत्कारात, “मी खेड्यात जाऊन रुग्णसेवा देणार” असं विश्वासानं केलेलं भाषण आठवलं.. पेशन्टसाठी जागून काढलेल्या रात्री आठवल्या.. भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोरून तरळून गेला…. आणि ‘हा’ क्षण पाहायलाच झालोय का आपण डॉक्टर, ह्याचा त्याला खूप पश्चाताप झाला.. “मार खाणं” ही गोष्टच् डॉक्टरसाठी खूप ह्युमिलीयेटिंग असते, त्यात चूक नसताना मार खाल्ला याचं त्याला प्रचंड डिप्रेशन आलं.. हळवा होता तो स्वभावाने..गावातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी हात वर केले.. त्यानं ज्या गावाची 12 वर्षे सेवा केली, पुढाऱ्यांना फुकट तपासलं, गावगुंडांना फुकट तपासलं, अडल्या नडलेल्यांना फुकट तपासलं, कोणाला स्वतःजवळची औषधं फुकट दिली, तर कोणाला स्वतःच्या गाडीत टाकून अर्जंट पुढं घेऊन गेला.. पण लोक सारं विसरले.. यातलं कोणी कोणीही त्याच्या मदतीस आलं नाही.. शहरापेक्षा कितीतरी कमी पैशात तो सेवा द्यायचा, पण लोकांना त्याचं मोल नव्हतं..कोणाला त्यानं बांधलेलं दोन मजली घर बोचत होतं, कोणाला घेतलेली चार चाकी गाडी बोचत होती, तर कोणाला तो त्या गावात उपरा असल्याचा साक्षात्कार झाला होता..कोरडी सहानुभूती बरेच जण द्यायचे, पण हॉस्पिटलच्या झालेल्या प्रचंड नुकसानीच्या भरपाईसाठी कोणी त्या नातेवाईकांशी बोलत नव्हतं किंवा मध्यस्थी करायला तयार नव्हतं.. आणि पोलिसांत जाऊन परिस्थिती आणखीन चिघळू द्यायची नव्हती त्याला.. आणि पोलिसांवर विश्वासही नव्हता..मग त्याला प्रचंड एकटं एकटं वाटलं.. त्यानं स्वतःला पुन्हा प्रॅक्टिसमध्ये गुंतवून घेतलं खरं, पण त्यात त्याचं पूर्वीसारखं मन काही लागेना.. आला दिवस निराशेनं कसाबसा तो ढकलायचा..मग पुढच्या चार पाच महिन्यातच् तो सगळं गुंडाळून शहरात प्रॅक्टिसला आला..आता पुन्हा नव्याने सुरुवात करतोय..*नुकसान त्याचं झालं की गावाचं झालं हे आता काळच् ठरवील..!!*

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *