जी माणसे धर्माच्या नावाखाली चुकीचं वागत आहेत, ती माणसं चुकीची असतात. कारण त्यांना खरा धर्मच समजलेला नसतो”*, असं बहुसंख्य हिंदूंचं म्हणणं आहे..
मग खरा हिंदू धर्म काय आहे हे आम्हाला “कोण” शिकवणार?
धर्माच्या खऱ्या मालकीची पताका आणि संस्कृती जतानाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, असे ऊर बडवून सांगणारे विहिंप, बजरंग दल, आरएसएस आम्हाला शिकविणार? की जगण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेत तडजोडी करणारे सहिष्णू हिंदू शिकविणार?
कोण सांगणार आम्हाला “खरा” हिंदू धर्म?
आमचा खरा धर्म यांना समजलेलाच नाही, असं तर प्रत्येक धर्मातले लोक म्हणत असतात.. आपल्या गल्लीत राहणारा मुस्लिमही म्हणतो की खरा धर्म आम्हालाच कळलाय आणि तालिबानी दहशतवादी पण म्हणतात की खरा धर्म आम्ही सांगतोय तोच आहे.. मग कोणाचे खरे मानायचे?
गाईवरून हत्या करणारे, जातींवरून दंगली भडकविणारे, राममंदिरावरून राजकारण करणारे लोक हे धर्माचे स्वयंघोषित मालक “खरे” आहेत, की ह्यांना खरा हिंदू धर्मच समजला नाही असं म्हणत हिंदूंच्या सहिष्णुतेचे दाखले देणारे लोक “खरे” आहेत? नेमकं कोण खरं आहे?
इग्लंड मधल्या एका रेल्वे गाडीत दोन प्रवासी सामोरा समोर बसले होते . पेपर वाचत होते. दोघे स्कोटिश होते . पहिल्या पानावर एका तरुणीच्या खून आणि बलात्काराची बातमी होती. बातमीचा मथळा पाहताच दोन्ही स्कोटिशानी नाके मुरडली. असले रानटी काम कोणताच स्कोटिश करू शकत नाही हे त्यांच्या मनात क्षणात चमकून गेले . बातमी पुढे वाचतात… तो हि घटना स्कोटलन्ड मध्येच घडलेली असते. दोन्ही स्कोटिशाना आश्चर्याचा धक्का बसतो. पुढे वाचतात तर तो खुनी आणि बलात्कारी माणुस चक्क एक स्कॉटिश निघतो ! दोघे स्कोटिश मान हलवत म्हणतात …. मग तो ” खरा ” स्कोटिश नसणार !
अशा प्रकारे विचार करण्याला तर्कदोष (fallacy) असे म्हणतात..
इथे आपले स्कोटीश जातभाई वाईट कृत्य करूच शकत नाहीत असे गृहीत धरलेले आहे. पण नवा अनुभव आल्यानंतर जुने निष्कर्ष बदलले पाहिजेत. पण तसे न करता त्यांनी “स्कोटीश असण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे” . स्कोटीशच्या आधी “खरा” हा शब्द जोडून आपल्या निष्कर्षात बसतील तेव्हढेच स्कोटीश ” खरे ” म्हणायचे असतात !
हा तर्कदोष “खरा” हिंदू दहशतवादी नसतो किंवा “खरा” मुसलमान शांतताप्रिय असतो असाही वापरता येईल.. आणि इथे जो शांतातप्रिय नसेल त्याला “खोटा” म्हटले कि आपला तर्कदुष्ट युक्तीवाद पूर्ण होतो.
एकदा का बलात्कार करणारे “खरे” हिंदू नसतात, असे मानले की आपली जबाबदारीच संपते, असं बहुसंख्य हिंदूंना वाटतं..
सामान्य हिंदू लोक इतक्या कॉन्फिडेंटली म्हणातात की “असल्या” गोष्टींना हिंदू धर्मात थारा नाही, मग पतीनिष्ठ अहिल्येवर बलात्कार करणार इंद्र, कित्येक ऋषींच्या स्त्रीयांना भ्रष्ट करणारा दुर्वास, मेनकेसारख्या नर्तकीवर भाळणारा विश्वामित्र, नाना भानगडी (त्याला “लीला” म्हणायचे) करणाऱ्या गोपी व त्यांचे गोविंदा, अशी एक ना शेकडो उदाहरणे देता येतील की, ज्यामध्ये स्वैराचाराचे, व्यभिचाराचे, बलात्काराचे खुलेआम समर्थन करण्यात आलेले आहे.. –
मग मला सांगा, हे हिंदू धर्माच्या बाहेरचे आहे का?
की तर्कदोष प्रमाणे, तुम्हाला म्हणायचेच की तो ‘खरा’ हिंदू धर्मच नाही!!
भारताविरुद्ध पुकारलेला जिहाद असो कि अल कायदाच्या धमक्या असो, दहशतवाद हे कसे इस्लामला नामंजूर आहे याबद्दलही दाखले काढले जातात आणि इस्लाम हा किती शांततामय धर्म आहे हे पटवून सांगितले जाते, कुराणातल्या भाइचाऱ्याच्या काही मोजक्या आयतीही प्रसृत केल्या जातात… ठीक आहे ।
पण, इसिस ला हे पटत नाही ना.. तालिबानलाही हे पटत नाही.. आणि धर्मद्रोही/ काफिरांची कत्तल करायची प्रेरणा कुराणातुनच मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे. तालिबानच्या छापील पत्रकातून कुराणातल्या काफिर कत्तलीच्या आयातीही येतात…
मग कोणाचे खरे मानायचे ?
*मुळात इहलोकात आचरण कसे असावे यासाठी कुराणाचे अथवा पोथ्या पुरणांचे दाखले काढायची गरजच काय?* हा मूळ प्रश्न आहे..
जर धर्म आणि धर्मग्रंथच प्रमाण मानायचे असतील तर मग कुणाचे “कुराण इण्टर्प्रिटेशन” योग्य, याची आम्ही वाट पहात बसायची काय? “इस्लाम इज पीस” होईल, कि “इस्लाम इज जिहाद” होईल, त्यावर आम्ही आमच्या मुलाबाळाचे भविष्य अवलंबून ठेवायचे का?
की खेडुताच्या ‘रामराम’ मधला राम खरा मानायचा, की तुमच्या ‘जय श्रीराम’ घोषणेमधला राम खरा मानायचा?
खूप उद्वेगजनक आहे हे..
__
इथं असिफा मुस्लिम असल्याने सोयीस्कर भूमिका (कधी उघड, कधी आडूनआडून) घेणाऱ्यांनी काश्मीर पंडित प्रकरण आणि “तेव्हा कुठे होता?” असले दर्जाहीन मानसिकतेचे प्रश्न उपस्थित करणे, चालू केले आहे..
किंवा मग ती मुस्लिम आहे म्हणूनच दंगा चालूय म्हणणे, काँग्रेस राजकारण करत आहे म्हणणे, काळा नको भगवा डीपी ठेवा असली अक्कल पाजळणे, ह्याही गोष्टी चालू आहेत.. घडीघडीला नवनव्या कहाण्या आयटी सेलकडून प्रसूत केल्या जाताहेत.. पण मला एक कळत नाही की मंदिरात मांस टाकले की दुखावणाऱ्या यांच्या भावना, मंदिरात बलात्कार झाला की का दुखावत नसतील बरं?!!
बलात्कार करणं हा गुन्हा तर आहेच, पण त्यानंतर निर्घृण हत्या करणं (तेही हे सारं मंदिरात करणं), हे अत्यंत पाशवी आहे.. आणि बलात्काऱ्याला समर्थन देणं, त्याला धार्मिक रंग देणं आणि बलात्काऱ्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढणं हा तर निव्वळ निर्लज्जपणा आहे.. या गोष्टींची जगभरात छि-थू होणार आहे..
मला इतकेच सांगायचंय की, या असल्या धार्मिक पुळक्यांना आपण वेळीच ठेचले पाहिजे.. इथं “ते आणि आपण” असले वादच नको आहेत.. ते खड्डयात जावोत (आणि सुधारणांना आडकाठी केली तर जातीलही), पण मग आपल्यालाही तसेच खड्डयातच जायचे आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे..
धर्म आणि ज्या काही तुमच्या अस्मिता आहेत त्या साऱ्या तुमच्या घराच्या आत.. तुमच्या उंबऱ्याबाहेर फक्त आणि फक्त कायद्याचे राज्य चालेल..
मग कोणी बलात्कारी हिंदू समाजाचा आहे म्हणून त्याला वाचविण्यासाठी मोर्चे काढणं नको किंवा “खतरे में” चे फतवे निघाल्यावर दंगली भडकवणे नको..
आपण विशिष्ट धर्मात जन्मल्याने त्या धर्माची जोखड आपल्या मानगुटीवर वाहण्याची मला तरी गरज वाटत नाही. जात धर्म इ. गोष्टी केवळ रँडमली जन्म घेतल्याने मिळतात, त्यात आपलं स्वतःचं कर्तृत्व ते काय असतं, असा प्रश्न आपल्याला पडायला हवा खरंतर.. मग त्याबद्दल फुकाचा अभिमान वगैरे बाळगण्यात धन्यता ती काय वाटून घ्यायचीय.?
एकीकडे “हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनपद्धती आहे” असं म्हणायचं आणि हिंदू हा सहजीवनावर विश्वास असणारा सहिष्णू धर्म आहे असं मानायचं, आणि दुसरीकडे, हिंदू धर्माची पताका तुमच्या हातून हिसकावून घेऊन तिला नाचवत आपल्या सैतानी वर्तनाने तिला रक्तरंजित करणार्यांच्या नंगानाचाला मूक (किंवा उघड) समर्थन द्यायचं, याला काय अर्थ आहे?
धार्मिक हिंदूंनो, आता केवळ “मग ते ‘खरे’ हिंदू नाहीत”, अशी मुळमुळीत भूमिका घेऊन भागणार नाहीये.. रस्त्यावर उतरून विरोध करावा लागेल.. वृत्तपत्र, टीव्ही, सोशल मीडिया असं सगळीकडून धारधार निषेधाचे सूर उमटवावे लागतील.. आंदोलने करावी लागतील, आणि “धर्माच्या नावाखाली आम्ही काहीही खपवून घेणार नाही” हे ही ठासून सांगावे लागेल.. उठसुठ भावना भडकावून घ्यायला आम्ही काय मूर्ख नाही, याची प्रचिती द्यावी लागेल.. नाहीतर आपलाही सीरिया व्हायला वेळ लागणार नाही..
स्वत:ला हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणवणारे प्रत्यक्षात हिंदू धर्माची लाज काढत असताना बहुसंख्य हिंदूंना आता आपली बाजू निश्चित करण्याची वेळ आली आहे… तटस्थ राहणे परवडण्यासारखे नाही..
ज्या चुकांची फळे इस्लामी देश (आणि पर्यायाने इस्लाम समाज) भोगत आहे, त्या चुका आपल्या बाबतीत तरी सुधारून घ्यायला काय हरकत आहे..?