Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?

10वी 12वी च्या विद्यार्थ्यांनो, मग त्यासाठी पहिलं टीव्ही/खेळ/छंद/टाईमपास सगळं बाजूला ठेऊन खूप खूप अभ्यास करून NEET टॉप करा, मग MBBS ला ऍडमिशन मिळवा. ऍडमिशन झाल्यावर साडेचार वर्षे पुन्हा पंचवीसेक विषयांचा अभ्यास करा.. (पहिले सहा महिने तर सगळं डोक्यावरूनच् जातं, काय चाललंय काहीच कळत नाही)..
लेक्चर्स, LCD, प्रॅक्टिकल्स, क्लिनिक्स, केसेस, एकाच विषयाचे अनेक उपविषय, प्रत्येकाची पाचसहा ‘ऑथर्स’ची पुस्तके, बरेच रेफरन्स बुक्स, जर्नल्स, ट्युटोरियल्स, सबमिशन्स, सारख्या सारख्या इंटर्नल एक्साम, त्यात Viva सारखा टॉक्सिक प्रकार.. मानसिक खच्चीकरण करणारी बोलणी अन झापझापी…
गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या हॉस्टेल्सची दयनीय अवस्था, मेसचं जेवण, आमटीच्या नावाखाली ‘सजा-ए-कालापाणी’.. मग महिनाभर चालणाऱ्या फायनल्स.. सतत जागरणं.. ऍसिडीटी.. आणि एवढं सगळं करून पण पासिंग पुरतेच मार्क्स..!!
पूर्वी फायनल परीक्षा पास झालं की हुश्श वाटायचं.. पण आता तसं नाहीये.. PG Entrance exam ची टांगती तलवार डोक्यावर असते.. त्यात मध्येच इंटर्नशीप, त्यातली काही महिने खेड्यात.. मग दोन वर्षांचा बॉण्ड करायचा.. त्या दरम्यानच्या काळात PG Entrance चा अभ्यास (वय 25-26 वर्षे).. पुन्हा साडेचार वर्षांची सगळी पुस्तके एकाच वर्षात वाचायची.. आणि लक्षात पण ठेवायची.. तुम्हाला कल्पना नसेल, पण ही जी एन्ट्रन्स असते, त्यात देखील पैकीच्या पैकी मार्क कोणाला पडू शकत नाहीत.. कारण, paper set करणाऱ्यांनी काढलेली गोल्ड स्टॅण्डर्ड answers ही कोणत्या रेफरन्स बुक मधून काढलेत, यावर बरंच अवलंबून असतं.. मेडिकलच्या विषयांमध्ये एकच टेक्स्टबुक असा प्रकार नसतो, म्हणून, एकाच प्रश्नाची दोन उत्तरे देखील बरोबर असू शकतात, आणि एखाद्या प्रश्नाचं ‘कुठलंच उत्तर नेमकं बरोबर नाही’ असं देखील असू शकतं.. वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच गोष्टी probability वर अवलंबून असतात.. म्हणून अमुक एक डॉक्टर चूकच, असं ठामपणे सांगता येत नाही.. सायन्सच्या इतर शाखांपेक्षा वैद्यकीय क्षेत्रात ‘वैविध्य’ खूप आहे, त्यामुळे एकाच वेळी एकाच situation चे खूप Permutations – Combinations संभवत असतात.. असो..
पुन्हा PG ची तीन वर्षे.. संपूर्ण आयुष्यातला सगळ्यात भयानक काळ.. अक्षरशः सक्तमजुरी.. कामाचे तास, वेळा आणि स्वरूप या तीनही गोष्टी अजिबातच निश्चित नाहीत.. पुन्हा पेशंट्स, जागरणं, इमर्जन्सीज् , काम, काम आणि काम.. त्यातून वेळ मिळाला की झोप अन् जेवण.. अंघोळ बऱ्याचदा ऑप्शनला..! आणि अजूनच् अडचणीत पडायचं असेल तर लग्नाचा विचार.. (वय वर्षे 28-29)
PG संपली.. चला, आता ‘सरकारी बॉण्ड’ कंप्लिट करा.. का? तर सरकारने तुमच्या शिक्षणावर पैसे खर्च केलेत..! मग IIT , IIM किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात सरकारचं हे बंधन का नाही? असले प्रश्न पडू न देता बॉण्ड पूर्ण करायचा.. सुपर स्पेशालिस्ट व्हायचं असेल तर अजून एक entrance exam, आणि अजून तीन वर्षे, मग पुन्हा बॉण्ड, आणि वय पस्तीस वर्षे.. पण सध्यातरी आपण ते बाजूला ठेऊ..
स्पेशालिस्ट डॉक्टर झालात..! वा.. वा.. वा.. वय वर्षे 30-31 च्या आसपास, तेही तुम्ही पूर्ण curriculum सलग पास झालात आणि पहिल्याच attempt मध्ये तुमचा entrance ला नंबर लागत गेला तरच! असो..
मग आता कुठंतरी मोठ्या हॉस्पिटलला जॉईन व्हायचं? की स्वतःचं हॉस्पिटल टाकायचं? की लग्न करायचं? कि सगळंच करायचं? ..काही कळत नाही.. आधीच लग्न केलं असेल अन बायको डॉक्टरच असेल तर ती अजून दुसरीकडेच PG करत असते, अन मुलाला तिसरीकडेच (बहुधा तिच्या आईवडिलांकडे) ठेवलेलं असतं.. काहीही सेव्हिंग नसते, आणि मोठा डॉक्टर झाल्यामुळे घरच्यांना तर वाटत असतं, बघा आता हा भाराभर पैसे कमावणार बरंका..
मग लक्षात येतं की, हॉस्पिटलसाठीच्या जागेच्या किमती आपल्या आवाक्यातल्या नाहीत.. मोक्याच्या जागेवरच्या हॉस्पिटलसाठी भाडं देखील झेपेल की नाही शंका आहे.. हॉस्पिटल चालू करण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या.. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या मशिनरींच्या किमती.. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इतर सोयींच्या किमती.. हॉस्पिटल चालू झाल्यावर त्याची मॅनेजमेंट.. हाऊसमन, नर्सिंग स्टाफ, त्यांचे पगार, त्यांची भांडणं, त्यांच्या सुट्ट्या.. अटेंडन्ट, वार्डबॉय, गेटकीपर, सेक्युरिटी, फायर कंट्रोल, पोल्युशन कंट्रोल, बायोमेडिकल वेस्ट.. इ इ.. तुम्ही हॉस्पिटल नावाची एक ‘स्मॉल स्केल इंडस्ट्री’ चालवत असता, तेही मॅनेजमेंटचा कसलाही अनुभव नसताना..
पूर्वी दीड-दोन गुंठे जागेत देखील टुमदार दवाखाना चालू करता यायचा. दोनतीन हुशार सिस्टर्स आणि दोन सफाई कर्मचारी ठेवले तरी काम भागायचं.. पण आता मात्र तसं नाहीये.. असलं काही केलं तर बॉम्बे नर्सिंगची परमिशनच मिळत नाही.. NABH च्या नियमाप्रमाणे जर बांधायला गेलं तर दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी पाच गुंठ्याच्या आसपास जागा लागते, GNM आणि ANM धरून चोवीस तासाच्या अकरा सिस्टर्स लागतात, एकतरी फुल टाइम OT असिस्टंट लागतो, सफाई/ कचरा विल्हेवाट यासाठी चोवीस तासाचे कमीतकमी सहा कर्मचारी लागतात. मॅनेजर, रिसेप्शनिस्ट आणि अकाऊंटंट लागतात आणि तुमच्याकडे MPJAY (योजना) असेल तर ते सांभाळणारा वेगळा व्यक्ती लागतो. ह्या सगळ्यांचे पगार सरकारी नियमांनुसार द्यावे लागतात, त्यांचा PF काढावा लागतो. स्टाफचे कामाचे तास, आठवड्याच्या सुट्टया, आजारपणाच्या सुट्टया, बाळंतपणाच्या सुट्टया याचा हिशोब ठेवावा लागतो. त्याचं ऑडिट करायला येणाऱ्यांना ‘व्यवस्थित’ संभाळावं लागतं! पालिकेतून विविध परवानग्या मिळविण्यासाठी हात सैल सोडावे लागतात.. (बरेच सैल सोडावे लागतात).. दरवर्षी किंवा ठराविक काळाने त्याचं नूतनीकरण करावं लागतं.. डाॅक्टरांसाठी सरकारी करात कोणतीही सवलत नाही, उपकरणं महाग, मशिनरींच्या किंमती लाखोंच्या घरात, सगळ्या mandatory मशीनरी घ्याव्याच् हे सरकारी नियमांचं बंधन.. तुमच्याकडे सोनोग्राफी मशीन असेल तर ‘तुम्ही गुन्हेगार नाहीये’ हे आधी सिद्ध करण्यासाठी अनेक फॉर्म आणि रजिस्टरे भरायची, तेही खाडाखोड न करता एकदम बिनचूक भरावी लागतात.. रजिस्टर मधली एक चूक तुम्हाला डायरेक्ट अटक करू शकते.. असो..
मग दुनियादारीचा सिलसिला सुरू होतो.. टिनपाट सरपंच/नगरसेवक खुश करावे लागतात, उपद्रवी गावगुंड ‘फ्री’ तपासावे लागतात.. ‘डॉक्टर पैसे पुढच्यावेळी देतो’ म्हणणाऱ्यांना शक्य तितक्या मधाळ आवाजात ‘चालेल चालेल’ म्हणावं लागतं. उत्सवांच्या, जयंती-पुण्यतिथीच्या वर्गण्या गपगुमान द्याव्या लागतात.. वर बत्तीस दात दाखवत तुपाळ हसावंही लागतं.. निवडणुकीसाठी खंडणी (त्याला ‘मदत’ म्हणतात) द्यावी लागते.. दादा, भाऊ, भैया यांच्या एका फोनवर पेशंट्स ची बिलं कमी करावी लागतात.. बिलं सेटलमेंट करणारा कोणीही सोम्यागोम्या आला तर त्याला शक्य तितक्या नम्र भाषेत आपण बिल अवाजवी लावलेलं नाहीये, यापेक्षाही जास्त बिल होऊ शकतं आणि याची कल्पना नातेवाईकांना आधीच दिली होती, वगैरे पोटतिडकीने सांगावं लागतं, आणि तरीसुद्धा ‘मी म्हणतोय म्हणून कमी करा की डॉक्टर’ असल्या धमकीवजा विनंतीला मान द्यावा लागतो..
तुम्ही म्हणाल, ‘व्यवसाय करायचा म्हणलं की एवढी मगजमारी तर करावीच लागणार की!, समाजात प्रत्येक व्यवसायात असं असतंच की!’ .. ते खरंय, पण लहानपणापासून खाली मान घालून अभ्यास एके अभ्यास केलेल्या ह्या नवख्या डॉक्टर मुलांना जड जातं हे.. आणि ‘समाजसेवा करायचीये’ वगैरे दिव्य स्वप्नं उराशी घेऊन आलेल्यांना तर पहिला शॉक इथंच बसतो.. अन कितीही संवेदनशील राहायचं ठरवलं तरी ‘पैसा’ हीच या जगाची भाषा आहे, हे लवकरच कळून येतं..
माझ्या दहावी बारावीच्या काळात, बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी रेडिओवर ऐकायचो. बहुतांश मुलामुलींचं “डॉक्टर व्हायचंय” हे ठरलेलं असायचं.. कारण आजूबाजूला दिसायचं की एकतर डॉक्टरला समाजात इज्जत असते.. पैसाही चांगला मिळतो.. आणि job satisfaction असते आणि वरून व्यवसायातूनच समाजसेवा करण्याचे पुण्य देखील मिळते वगैरे वगैरे..
पण आता मात्र हे चित्र बदललंय..
आणि, ते दिवसेंदिवस खूपच बदलतही चाललंय.. डॉक्टरचं आत्ता ना समाजातील स्थान अबाधित आहे, ना लोकांच्या मनातली इज्जत खात्रीशीर आहे, ना खोऱ्यानं मिळणारा पैसा आहे.. ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेंव्हा बाहेर पडतील, तेंव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..
सगळ्या डॉक्टरांनी खोऱ्यानं पैसा ओढण्याचा जमाना गेलाय.. खोऱ्या घेऊन बसलेले फक्त पाच-दहा टक्के डॉक्टर उरलेत, आणि समाजाला तेवढेच दिसतात.. अलीकडं नवीन बाहेर पडलेल्या बहुतांश डॉक्टर्स साठी खोऱ्या तर नाहीचंय, उलट पेशंट्स मिळणं मुश्किल झालंय.. त्यात तुम्ही स्पेशालिस्ट / सुपर स्पेशालिस्ट असाल तर आणखी अवघड आहे. पिताजींचा पैसा असेल तरच निभावून नेता येतं, नाहीतर मग कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन होण्याशिवाय पर्याय नाही..
सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सना तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन व्हावंच लागतं, कारण त्यांना लागणाऱ्या मशिनरीज ची कोटीतली इन्व्हेस्टमेंट ते सुरुवातीला करूच शकत नाहीत.. मग हेच कॉर्पोरेट हॉस्पिटल्स डॉक्टरांना नोकरीवर ठेऊन खोऱ्यानं ओढताहेत.. खोऱ्या आता तिकडे शिफ्ट झालाय, असं आपण म्हणू शकतो.. म्हणून तर बडे उद्योगपती आणि उद्योगसमूह आता हेल्थकेअर सेक्टर मध्ये उतरू लागलेत. फार्मा कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्यांची चलती सुरू आहे.. गेल्या दहा वर्षात हा बदल इतक्या झपाट्यानं झालाय की पुढच्या दहा वर्षात परिस्थिती काय असू शकते हे आपण इमॅजिनच नाही करू शकत!!
ह्या व्यवसायातून मिळणाऱ्या Job satisfaction चं गणित देखील देखील बिघडलंय.. ‘डॉक्टर तुमच्या हातात आमचा पेशन्ट दिलाय, तुम्ही प्रयत्न करा, बाकीचं आमचं नशीब’ असं म्हणणारे नातेवाईक आता उरले नाहीत.. एखादी केस हँडल करत असताना तुम्हाला होणारा स्ट्रेस, आणि तो पेशन्ट बरा झाल्यावर तुम्हाला मिळणारं समाधान, याचं गुणोत्तर व्यस्त झालंय. त्यातच ‘मग डॉक्टरनं काय फुकट केलं काय?’ अशा पद्धतीची सर्टिफिकेटस् तुमचा सगळा उत्साह पहिल्या एक दोन वर्षातच घालवतात..
आता, जरी वैद्यकीय तपासण्या आणि उपकरणं अद्ययावत झाली असली तरी प्रत्येक केस मधली “सोशल रिस्क” खूपच वाढलीये.. त्यामुळं कितीतरी डॉक्टर्सना कमी वयातच ब्लड प्रेशर , डायबेटीस, हृदयरोग, arthritis, spondylosis अशा आजारांचा सामना करावा लागतोय. Quality of life आणि सरासरी आयुर्मान घटतेय.. क्रिटिकल केअर मधल्या डॉक्टर्सचं morbidity आणि mortality चं प्रमाण तर लक्षणीयरित्या वाढलंय.. हे इमर्जन्सी हँडल करणारे डॉक्टर्स तर रोज खूप मानसिक थकतात.. किंवा मग लवकर त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, किंवा काही दिवसांनी क्रिटिकल पेशंट्स घेणे बंद करतात, किंवा खूप साऱ्या व्याधी स्वतःला घेऊन लवकर मरतात.. “प्रोफेशनल हझार्ड” आहे हा.. सर्वसामान्य लोकांना त्याची कल्पना येणं शक्यच नाही.. खूप प्रयत्न चालू असलेल्या पेशंटच्या साधं लॅब टेस्टस जरी आपल्या मनासारख्या आल्या नाहीत तरी मन बेचैन होतं.. बेडवर शांत झोपलेल्या पेशंटची दोन सेकंद पल्स जरी लागली नाही , तर अंगात जी भयाची वीज चमकून जाते त्याची काय किंमत पैशात होईल का? साईडरूम मध्ये गाढ झोपलेलं असतानाही मॉनिटरच्या अगदी छोट्याश्या अलार्म ने पण जाग येते, आणि दिवसभरात जो थोडा थोडा “ऍड्रेनॅलीन सर्ज” होत राहतो, आणि शरीरावर विपरीत परिणाम करत राहतो, त्याची भरपाई पैशांत होऊच शकत नाही..
डॉक्टर स्त्रिया तर जास्तच भावनिक असतात. नवरा पण डॉक्टर असेल तर तो तिचे ताण समजू तरी शकतो, पण नॉनमेडीको व्यक्तीला तिचे ऑन-कॉल त्रास देतात, इमर्जन्सीज नकोसे वाटतात, मूड स्विंगज् टॉलरेट होत नाहीत.. हॉस्पिटल मधून एक फोन आला अन हीचा मूड एवढा का गेला, हे सांगितलं तरी कळू शकत नाही.. आपली जवळची नॉनमेडीको व्यक्तीच सर्वकाळ समजून घेऊ शकत नाही, तर मग परक्या समाजाकडून तर अपेक्षाच नाही..
तुम्हाला वाटेल , ‘काय हा सगळं निगेटिव्हच बोलतोय’, पण बाहेरच्या अनेक देशांत देखील मेडिकल फिल्ड हे least preferred क्षेत्र आहे.. युरोपियन देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई सगळीकडे MBBS करण्यापेक्षा इतर कोर्सेस निवडण्याला जास्त प्राधान्य आहे.. तरी तिथं डॉक्टरला मारहाण शिवीगाळ हा भाग अजिबातच नाहीये!.. पण जिथं ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ला खूपच जपलं जातं, तिथं हे असं अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचा अभ्यासक्रम शिकण्यात आयुष्याची बारा पंधरा वर्षे घालवायची, प्रत्येक पेशन्ट ट्रीट करताना अथवा ऑपरेशन करताना मरणाचा स्ट्रेस घ्यायचा, ऑन कॉल्स इमर्जन्सीज ह्यात स्वतःचं आयुष्य बेभरवशाचं करून घ्यायचं, कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाची वाताहत करायची, आणि personal happiness बाजूला ठेवून मन मारून जगायचं, हे असलं आयुष्य कोणाला आवडणार आहे बरं? त्यामुळं बऱ्याच प्रगत देशातली मुलं MBBS घेतच नसल्यामुळं भारतातून डॉक्टर्स आणि नर्सेसना अशा ठिकाणी मागणी आहे..
असो..
हॉस्पिटलमधल्या दुःखमय आणि निगेटिव्ह वातावरणात दिवसभर वावरून देखील तिथल्या कुठल्याच स्ट्रेस चं प्रतिबिंब घरात पडू न देणं, आणि घरच्या प्रापंचिक गोष्टी हॉस्पिटलमध्ये येऊ न देणं यासाठी प्रत्येक डॉक्टर झगडत असतो… डॉक्टर हा सुद्धा एक माणूसच आहे.. एक बटन दाबलं आणि ‘मूड चेंज’ केला, असं होत नाही.. आणि ते सोपंही नाही.. मग ‘भावनिक फरफट’ होत राहते.. त्यामुळं हळव्या स्वभावाच्या माणसाचे तर अजूनच हाल होतात.. स्थितप्रज्ञता ही गोष्ट प्रत्येकालाच जमेल असं नाही आणि ती प्रत्येकवेळी जमेल असंही नाही..
असो..
समाजात ‘रिस्की जॉब्ज’ बरेच आहेत, जसं की वैमानिक, सैनिक, फायर फायटर, वगैरे.. पण आता ते बऱ्यापैकी Predictable आणि safe आहेत, आणि समाजातही त्यांच्याबद्दल इज्जत आहे.. पण डॉक्टरच्या हातात कोणाच्यातरी जीवन-मरणाचा प्रश्न रोजच असतो.. एखाद्याचा जीव वाचवणे यासारखे ‘नोबल’ काम आणि त्यातून मिळणारा आनंद कुठलाच नाही.. पण कॉम्प्लिकेशन्स झाले तर मात्र तुमचं काही खरं नाही, अशी परिस्थिती असेल, तर यासारखं discouraging ही काही नाही.. तुम्हाला भयमुक्त वातावरणात काम करता येत नसेल, तर त्या job satisfaction ला ही काहीच अर्थ उरत नाही.. फुटबॉल मॅच मध्ये जसं गोलकीपर ने किती गोल वाचवले ह्यापेक्षा त्या मॅच मध्ये किती गोल झाले हेच लक्षात राहतं, तसंच एखाद्या डॉक्टरच्या हातून किती लोक मरणाच्या दारातून बरे होऊन गेले यापेक्षा, दगवलेला एखादा रुग्ण डॉक्टरची आतापर्यंतची सगळी प्रॅक्टिस, मेहनत आणि नाव पाण्यात घालवू शकते.. आणि तेही, ज्या गोष्टी डॉक्टरच्या हातात नाहीत त्यासाठी!!
कॉम्प्लिकेशन्स हे कधीही होऊ शकतात, बऱ्याचदा ते डॉक्टरच्याही हातात नसते. फारतर त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे एवढंच ते करू शकतात.. याची समज हळूहळू कमी होत चालली आहे.. कितीही मेहनत घेऊन देखील रुग्णाला काही कमीजास्त झालं तर, डॉक्टरांना बोलणी ऐकून घ्यावी लागतात, बदनामी सहन करावी लागते, प्रसंगी तोडफोड आणि मारहाणीलाही सामोरं जावं लागतं.. आणि कुठल्याही डॉक्टरसाठी ते खूपच humiliating आहे.. असो..
एकीकडे हॉस्पिटल टाकण्यासाठी लागणारी प्रचंड इन्व्हेस्टमेंट, सरकारी परवानग्या व अटी, इन्श्युरन्स कंपन्यांचे Eligibility criteria, ग्राहक सुरक्षा कायद्याचा (CPA चा) जाच, हे असतानाच वर समाजात वाढत असलेली असुरक्षा, सरकारी अनास्था, मारहाणीची किंवा बदनामीची सतत टांगती तलवार, रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष, समाजाचा असंतोष, त्यात पुढाऱ्यांचा अन् गुंडांचा उपद्रव.. आणि वर हॉस्पिटल मधले वाढते ताणतणाव, यातून स्वतःच्या कौटुंबिक सुखाची वाताहत, अशा निराशाजनक वातावरणात आयुष्याची ऐन तारुण्यातली बारा पंधरा वर्षे होळी करून डॉक्टर नेमकं कशासाठी व्हायचंय? याचा विचार इथून पुढे MBBS ला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी नक्कीच करावा.. सध्याची परिस्थिती थोडीतरी बरी आहे, आणि अजूनही हे क्षेत्र डिमांड मध्ये आहे.. आणि आमच्या पिढीपर्यंत तरी आम्हाला नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून डॉक्टर असल्याचा ‘Proud’ वाटावा अशी परिस्थिती होती.. पण पंधरा वीस वर्षांनंतरचा काळ देखील असाच ‘Proud’ वाटावा असा असेल, की हे क्षेत्र फक्त कॉर्पोरेट जॉब सारखंच फक्त एक प्रोफेशन उरलेलं असेल, ते सांगता येत नाही.. टिकून राहण्यासाठीचा संघर्ष तर समाजात सगळ्यांनाच करावा लागतोय, मग तो शेतकरी असो की इंजिनिअर.. मला तेच म्हणायचंय की डॉक्टर झाल्यावर आपलं लाईफ सेट होईल, पैशांचा पाऊस वगैरे पडेल अशा विचारातून जर कोणी इकडं येणार असेल तर मात्र परिस्थिती आता पूर्वीइतकी गालिचामय उरलेली नाहीये.. बाहेरून कदाचित लक्षात नाही येणार, पण इथंही तुम्हाला संघर्ष अटळ आहे..
कोणीही एखादा जर Highly educated आणि Well qualified असून देखील एक सुखी समाधानी आयुष्य जगू शकणारच नसेल, तर त्याला, “हा एवढा अट्टाहास आपण कशासाठी केला?”, हा प्रश्न आयुष्याच्या शेवटी पडण्यापेक्षा सुरुवातीलाच त्याचा विचार केलेला बरा!
शेवटी एकच सांगतो, मुलं खूप संघर्ष करून डॉक्टर होतात खरं.. पण नंतर त्यांना कळतं की खरा संघर्ष तर डॉक्टर झाल्यावरच करावा लागतोय..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *