Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो…

प्रेमाची सुरुवात मैत्रीतून होवो, केवळ मोहातून होवो किंवा अरेंज मॅरेज मधून होवो, कुठल्याही परिस्थितीत प्रेमात “Intimacy” असणं जास्त महत्वाचं आहे..
एकमेकांची मनं जुळणं, एकमेकांचा सहवास, त्यांच्यात इमोशनल शेअरिंग असणं आणि त्यातून एकमेकांना आत्मिक समाधान मिळणं हा भाग प्रेमासाठी खूप महत्त्वाचा असतो..
पण आपल्याकडे लग्नं ही ‘मनं जुळलीत’ म्हणून करतच नाहीत.. लग्नं ही बऱ्याचदा तडजोडच असते. आणि ‘लग्न झाल्यावर आपोआपच मनं पण जुळतीलच की’ या गृहितकावर ते अवलंबून असतं. आणि नाही मनं जुळली, तरी आपल्याकडे फार काही आभाळ कोसळत नाही. संततीसंवर्धन आणि तहहयात मानसिक शोषण यावरच विवाहसंस्था टिकलीये आणि टिकवलीही गेलीये..
आपल्याकडे प्रेमापेक्षा ‘नातं’ महत्वाचं मानलंय. म्हणून लग्न हे आपल्याकडे ‘दोन कुटुंबातील संबंध’ असते.. तिथं पाव्हणे-रावळे, पैसा-अडका, मान-मरातब, घराण्याची रीत हेच जास्त महत्वाचं ठरतं!!
मग भलेही त्या नवराबायकोतल्या प्रेमाचा ओलावा संपून ते कोरडेठाक झालं तरीही, ते कुटुंबातील ‘नातं’ टिकवण्याकडंच समाजाचा कल कायम असतो.. प्रेम करायचं की नाही, आणि केलं तर कुणावर करायचं हे आई-वडील आणि इथला समाज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ठरवत असतो.. जातपात, सामाजिक पत, शिक्षण, श्रीमंती हेच क्रायटेरिया महत्त्वाचे ठरतात.. त्यातूनच ‘आमची लव्ह मॅरेजला हरकत नाही, पण जोडीदार आपल्या (निदान वरच्या) जातीतला हवा’ अशी प्रेमळ सुचनावजा धमकीही दिली जाते..
खरंतर प्रेम असताना लग्न न करता एकत्र राहिलं तर हरकत नाही, पण प्रेम नसताना लग्न करून एकत्र राहायचं हे जास्त अन्यायी आहे..
जातपात /पैसाप्रतिष्ठा /कुंडली /सोयरीक असलं काहीबाही बघून त्या दोघांना एकमेकांना बोलायला मोकळं सोडलं जातं. त्यात ते एकमेकांतलं काय बघतात आणि आपल्यातलंही काय दाखवतात, हे खूपच subjective आहे.. आणि बरीच जोडपी तर यात चक्क एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं देखील स्वतःला वाटून घेतात!
लव्ह मॅरेज मध्ये देखील कधीकधी आपल्या आणि समोरच्याच्या आवडीनिवडी, स्वभाव यांचा फारसा खोलात विचार न करताच लग्नाचा विचार केला जातो.. मग लग्नानंतर एकमेकांना आपल्या इच्छेप्रमाणे बदलण्याचा ‘प्रयोग’ सुरू होतो. आपल्या मनाप्रमाणेच समोरच्याने वागावं, आपल्याला खुश ठेवण्यासाठी झटावं अशा एकतर्फी अपेक्षा ठेवल्या जातात..
पण प्रेमात समोरची व्यक्ती ही गुणदोषांसकट स्वीकारावी लागते. तिच्यातील आपल्याला वाटणारे दोष बदलायला वेळ द्यावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो, तसंच तिला आपल्यालातले वाटणारे दोष बदलण्यासाठी स्वतःही प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात, आणि काही गुणदोषांचा जसा आहे तसा स्वीकार करण्याची तयारीही ठेवावी लागते, हेच विसरलं जातं..
मग पहिलं त्यांच्यातल्या प्रेमातली ‘सहजता’ संपते, आणि मग हळूहळू प्रेमच संपतं, फक्त नातं उरतं.. अशी प्रेमाचा ओलावा संपलेली नाती समाजासाठी अन पोराबाळांसाठी केवळ निभावून नेली जातात, नाहीतर घटस्फोट तरी होतो.. आणि मग वर प्रेमालाच दोष दिला जातो..
भारतात तर ‘प्रेम’ या एकाच विषयावर 99 टक्के चित्रपट बनतात. देशभक्तीपर पिक्चर असला तरी त्यात एकतरी लव्ह स्टोरी घुसवलीच जाते. प्रेमावर शेकडो कथा-कादंबऱ्या कविता लिहिल्या जातात, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ‘प्रेम’ किती जण मनापासून निभावतात काय माहिती?
प्रेम ही भावना मानवाच्या उत्पत्तीपासून आहे. प्रेम लाखो वर्षांपासून आहे.. अन विवाहसंस्था येऊन फक्त चारपाच हजार वर्षे झाली असतील.. म्हणून लग्न हा प्रेमाच्या सफलतेचा क्रायटेरियाच नाही.. तर लग्न ही प्रेमातली एकमेव commitment नसून, लग्न हा कमिटमेंट ‘long term’ करण्याचा केवळ एक मार्ग आहे..
आपलं प्रेम असलेल्या व्यक्तीशी ‘लग्न’ करून आपण नक्कीच आपल्या प्रेमाप्रतिची आपली commitment ही long term करण्यास मदत करतो, पण ती मनातून देखील तशीच राहिली पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे..
आणि दुसरी गोष्ट, कमिटमेंट लॉंग टर्म करण्याचा लग्न हा सध्याच्या परिस्थितीतला आणि समाजमान्य मार्ग जरी असला तरी कुठल्या इतर कारणांनी तो मार्ग अवलंबिता नाही आला, तर ते प्रेमच चूक ठरत नाही.. कारण प्रेम झालंय म्हणून लग्न व्हावंच हे गृहीतकच चूक आहे, आणि लग्न होऊ शकणार नाही म्हणून प्रेम नाकारणंही चूक आहे.. आपलं त्याला आपले समाजनीतीचे नियम लावणेच चूक आहे.. ह्या साच्यात बसलं तरंच तुमचं खरं प्रेम! आणि लग्न केलं तरंच तुम्ही खरे प्रेमी! असं काही नसतं..
प्रेमासारख्या अंतःप्रेरणीय अनुभूतीला आपल्या रूढी परंपरांच्या चौकटी बांध घालू शकत नाहीत, काळाच्या कसोट्या लागू होऊ शकत नाहीत आणि इथून पुढे तर समाजाची बंधनं फार काळ बांधूनही ठेऊ शकणार नाहीत.. जेंव्हा दोन जीव एकमेकांकडे आकृष्ट होतात, एकमेकांच्या मनात घर करतात, एकमेकांच्या सुख-दुःखांशी समरस होतात आणि एकमेकांच्या वेगळेपणाबद्दल आदर बाळगण्याची जबाबदारी स्वीकारतात, तिथंच ते प्रेम सफल होतं..
हमने देखी है, इन ऑंखोंकी महकती खुशबू..
हाथ से छू के इसे, रिश्तों का इल्ज़ाम न दो..
सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो..
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *