Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

प्यार का पंचनामा भाग ५

समारोप –
प्रेमाची सुरुवात मैत्रीतून होवो, मोहातून होवो किंवा अरेंज मॅरेज मधून होवो, कुठल्याही परिस्थितीत प्रेमात “Intimacy” असणं जास्त महत्वाचं असतं.. एकमेकांची मनं जुळणं, एकमेकांचा सहवास, त्यांच्यात इमोशनल शेअरिंग असणं आणि त्यातून एकमेकांना आत्मिक समाधान मिळणं हा भाग प्रेमासाठी त्यामुळंच खूप महत्त्वाचा मानला गेलाय..
पण आपल्याकडे लग्नं ही ‘मनं जुळलीत’ म्हणून करतच नाहीत.. लग्नं ही बऱ्याचदा तडजोडच असते. आणि ‘लग्न झाल्यावर आपोआपच मनं पण जुळतीलच की’ या गृहितकावर ते अवलंबून असतं. आणि नाही मनं जुळली, तरी फार काही बिघडत नाही, असाही छुपा विचारही त्यापाठी असतो.. संततीसंवर्धन आणि तहहयात शोषण यावरच विवाहसंस्था टिकलीये आणि यांसाठीच टिकवलीही गेलीये..
आपल्याकडे प्रेमापेक्षा ‘नातं’ महत्वाचं मानलंय, म्हणून मग नात्यातलं प्रेम संपून ते कोरडेठाक झालं तरी ते नातं टिकवण्याकडंच समाजाचा कल असतो..
खरंतर प्रेम असताना लग्न न करता एकत्र राहिलं तर हरकत नाही, पण प्रेम नसताना लग्न करून एकत्र राहायचं हे जास्त अन्यायी आहे..
जातपात /पैसाप्रतिष्ठा /कुंडली /सोयरीक असलं काहीबाही बघून त्या दोघांना एकमेकांना बोलायला मोकळं सोडलं जातं. त्यात ते एकमेकांतलं काय बघतात आणि आपल्यातलंही काय दाखवतात, हे खूपच subjective आहे.. आणि बरीच जोडपी तर यात चक्क एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं देखील स्वतःला वाटून घेतात! असो.. हे झालं अरेंज मॅरेजमध्ये..
लव्ह मॅरेज मध्ये देखील कधीकधी आपल्या आणि समोरच्याच्या आवडीनिवडी, स्वभाव यांचा फारसा खोलात विचार न करता प्रेमातली कमिटमेंट long term करण्यासाठी लग्नाचा विचार केला जातो.. मग लग्नानंतर एकमेकांना आपल्या अनुरूप बदलण्याचा ‘प्रयोग’ सुरू होतो. आपल्या मनाप्रमाणेच समोरच्याने वागावं, आपल्याला खुश ठेवण्यासाठी झटावं अशा एकतर्फी अपेक्षा ठेवल्या जातात.. पण प्रेमात समोरची व्यक्ती ही गुणदोषांसकट स्वीकारावी लागते. तिच्यातील आपल्याला वाटणारे दोष बदलायला वेळ द्यावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो, तसंच तिला आपल्यालातले वाटणारे दोष बदलण्यासाठी स्वतःही प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात, आणि काही गुणदोषांचा जसा आहे तसा स्वीकार करण्याची तयारीही ठेवावी लागते, हेच विसरलं जातं.. मग पहिलं त्यांच्यातल्या प्रेमातली ‘सहजता’ संपते, आणि मग हळूहळू प्रेमच संपतं, फक्त कमिटमेंट उरते.. अशा प्रेमाचा ओलावा संपलेल्या कमिटमेंटस् केवळ निभावून नेल्या जातात, किंवा घटस्फोट होतो.. आणि मग वर प्रेमालाच दोष दिला जातो.. सो कॉल्ड संस्कृतीरक्षक तर ‘लव्ह मॅरेज केलं की असंच होणार ना!!’ असे निष्कर्ष काढतात..
असो..
भारतात भलेही प्रेमावर हजारो चित्रपट तयार होतात, शेकडो कथा-कादंबऱ्या कविता लिहिल्या जातात, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ‘प्रेम’ करायचं की नाही, आणि केलं तर कुणावर करायचं हे आई-वडील आणि इथला समाज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ठरवत असतात. ‘आमची लव्ह मॅरेजला हरकत नाही, पण जोडीदार वरच्या जातीतला हवा’ अशी प्रेमळ सुचनावजा धमकी दिली जाते..
पण प्रेमासारख्या अंतःप्रेरणीय अनुभूतीला रूढी परंपरांच्या चौकटी बांध घालू शकत नाहीत, काळाच्या कसोट्या लागू होऊ शकत नाहीत आणि समाजाची बंधनं बांधूनही ठेऊ शकत नाहीत..
जेंव्हा दोन जीव एकमेकांकडे आकृष्ट होतात, एकमेकांच्या मनात घर करतात, एकमेकांच्या सुख-दुःखांशी समरस होतात आणि एकमेकांच्या वेगळेपणाबद्दल आदर बाळगण्याची जबाबदारी स्वीकारतात, तिथंच ते प्रेम सफल होतं.. लग्न होवो न होवो, त्यांच्या मनातून ते कोणीच कधीच काढू शकत नाही..
हमने देखी है, इन ऑंखोंकी महकती खुशबू..
हाथ से छू के इसे, रिश्तों का इल्ज़ाम न दो..
सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो..
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो..
( समाप्त )

  • डॉ सचिन लांडगे.
    भूलतज्ञ, अहमदनगर
मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *