Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

प्रेमातले गैरसमज

चपट्या नाकाची मुलगी आपल्याला सहसा आवडणार नाही, पण चीनमध्ये तिच्यावर मरणारे हजारो असतील!! पण त्या चिन्यांना चाफेकळी नाकाची मुलगी आवडणार नाही कदाचित.. असो.. सांगायचा उद्देश हा की, सौंदर्याच्या व्याख्या एकसारख्या अजिबात नसतात.. म्हणून म्हणलं जातं की, “सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं!” आपण सहज म्हणतो, ‘अर्रर्र, ही कसंकाय आवडली असेल त्याला?’ पण त्याला मात्र ती ‘परी’ वाटत असते!
आपल्या आवडीनिवडी या आपल्या मनोविश्वाच्या भाग असतात. आपण लहानपणापासून आजूबाजूला ज्या व्यक्ती बघतो, ज्यांच्यात वावरतो, ज्यांच्याबद्दल कल्पना करतो, त्या सगळ्यांतून आपल्याला इनपुट्स मिळत असतात. आपला मेंदू सतत त्या इनपुट्स चे अनॅलिसिस करून आपल्याला सुखावणाऱ्या (pleasure principle) गोष्टींना वरचे स्थान देतो, त्या पुन्हा पुन्हा मिळविण्यासाठी urge उत्पन्न करतो, आणि त्यांच्या मेमरीज बनवून ठेवतो.. हे समजायला क्लिष्ट असलं तरी, एक गोष्ट लक्षात घेता येईल ती म्हणजे, आपली आवड ही आपल्या कल्पनाविश्वाचाच भाग असते..
मुख्य मुद्दा हा की, पूर्वी आपल्या आवडीनिवडी बनवणं किंवा ‘सेट करणं’ हे बऱ्यापैकी आजूबाजूच्याच (near vicinity) भोवताल वर असायचं. पण नंतर नंतर हे काम पिक्चर, जाहिरात, मीडिया इथून होऊ लागलं. ‘ठंडा मतलब कोकाकोला’ हे तेच लोक सतत सांगू लागले.. तुमच्या चेहऱ्यावर पुरळ आहे म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स कमी होत असतो, असं तुम्हाला लहानपणापासूनच कळायला लागलं! मग लहानपणापासूनच आपण सुंदर दिसायचं आणि दुसऱ्याच्यातलीही सुंदरता निवडायचं आपल्यावर ठसवलं जाऊ लागलं..
आता यानं झालं काय? की आपले हेच क्रायटेरिया ठरवू लागले की, तुम्ही कोणाच्या प्रेमात पडायचं!!!
‘आकर्षण’ ही प्रेमाची पहिली पायरी आहे. आणि कोणाबद्दल हे आकर्षण वाटावं हे तुमच्या आवडीनिवडी ठरवतात.. म्हणजे जर आपल्या आवडीनिवडीच फॅब्रिकेटेड असतील तर आपल्याला चुकीच्या गोष्टींचंही आकर्षण वाटू शकतं.! मग या आकर्षणातून निर्माण होणारं ‘प्रेम’ कितपत पुढे टिकेल सांगता येत नाही..
प्रेमात पडणं ही सहजभावना आहे, खूप छान feeling आहे. ती उपजतवृत्ती (instinct) आहे.. पण ‘प्रेम निभावणे’ ही एक अवघड गोष्ट आहे.. आकर्षणाची आणि तीव्र ओढीची पायरी ओलांडली (किंवा ओसरली) की बांधिलकीची (commitments ची) पायरी येते.. जबाबदारीच्या या पायरीवर मात्र बहुतांश जणांना कळतं की, आपली निवड चुकली.. मग म्हणायचं की ‘प्रेम आंधळं असतं!’
प्रेम आंधळं नसतं, किंवा डोळसही नसतं.. प्रेम हे प्रेम असतं, ती केवळ एक instinct आहे, एक भावना आहे.. Adrenaline Dopamine Cortisols यासारख्या हॉर्मोन्सवर ती आधारलेली आहे. या हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे प्रेमात पडणारे आंधळे होतही असतील बऱ्याचदा, पण प्रेम मात्र आंधळं नसतं!
बॉलीवूडने आपल्या कल्पनांना (आणि म्हणून आवडींना) अशा अवास्तव पातळीवर नेऊन ठेवलं, की त्या कल्पना एखाद्याच्या प्रेमात पडायला ठीक आहेत, पण पुढे आयुष्य कंठायला त्या तितक्याच उपयुक्त ठरतील असं अजिबात नाही.. कारण आयुष्य काही ‘फिल्मी स्टाइल’ नसतं!
“त्याला पाहताच मनात फुलपाखरं उडायला हवीत, व्हायोलिन वाजायला हवेत!” असा स्वप्नातला राजकुमार शोधण्यात कित्येक मुलींनी पायावर धोंडा पाडून घेतला.. तर ‘परी हवी!’ म्हणून अडून बसलेल्या कित्येकांनी ‘परी’ पटवण्यासाठी स्वतःची करियरे बरबाद केली.. आयुष्य फिल्मी स्टाईल नसतं हे ‘न ओळखलेल्या’ मुला-मुलींच्या स्वप्नांची आणि आयुष्याची माती झाली.. ‘चंद्र-तारे आणून देतो’ म्हणणारा साधं गिरणीतून दळण देखील घेऊन येत नाही, हा धक्का पचवायला जड गेलं.. “हिरो सारखा दिसणारा नवरा हवा” म्हणणाऱ्या मुलींना, संसार करण्यासाठी तो क्रायटेरिया अजिबातच मॅटर करत नाही, हेच मुळात कळत नाही.. म्हणून मग इतर अनेक गुण असणाऱ्या मुलांना प्राथमिक चाळणीतच बाजूला सारलं जातं..
संसारासाठी लागणाऱ्या कमिटमेंट आणि रिस्पॉन्सीबिलिटी या गुणांपेक्षा ‘आकर्षण’ हाच मुख्य क्रायटेरिया ठेवणारे काही क्षण ‘इश्क में फ़ना’ झाले असतील कदाचित, पण पुढच्या पायऱ्यांवर मात्र ‘तबाह’ झाले..
फिल्मी पडद्यावरच्या या कविकल्पना सत्यात उतरवायच्या नादात कित्येकांनी आयुष्यात डिप्रेशन भरून ठेवलं.. कित्येकजणी पिक्चरमधल्या हिरोहिरॉईन च्या नात्याशी आपल्या नात्याची तुलना करू लागल्या.. “तो तिला गिफ्ट देतो, फिरायला नेतो, हॉटेलिंगला नेतो म्हणजे त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे” असा सुटसुटीत अर्थ या सगळ्या प्रकाराने काढून दिला. नवऱ्याचा संसारासाठीचा त्याग, त्याला बाहेर करावी लागणारी मरमर, त्याचं स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठीचं झटणं, या सगळ्या गोष्टी चुलीत घालत, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेत नाही, तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही मला दागिने करत नाही, यावर मूल्यमापन सुरू झालं.. बायकोचा संसारासाठीचा त्याग, तिची चिकाटी, घरातलं काम आणि करियर करता करता होणारी तिची ओढाताण या पेक्षाही, ‘तू आता बदललीये, तुझं माझ्यावर प्रेमच नाही’ असं म्हणणारी थिल्लर पिढी निर्माण झाली..
प्रेमाला define करायचा मक्ता स्वतःकडेच असल्यासारखं करत बॉलीवूडने प्रेमाला खूपच ओव्हररेटेड करून टाकलं! त्यामुळंच आपल्या मनातले (ideal) आणि आपल्याला मिळणारे (actual) यांत खूपच फरक दिसायला लागला.. मग यालाच ‘फिल्मी स्टाईल प्रेम’ असा शब्द रूढ झाला.. असो..
प्रेमासारख्या सुंदर गोष्टीच्या व्याख्या सोप्या करत आपल्यासमोर पेश करण्याच्या नादात अजून एक गोष्ट फिल्मी जगताने आपल्याला शिकवली, ती म्हणजे, पझेसिव्हनेसलाच ‘प्रेम’ समजण्याची!!
पझेसिव्हनेस हा सोन्याचा पिंजरा असतो. सोन्याचा आहे म्हणून सुरुवातीला बरं वाटत असेलही, पण शेवटी तो पिंजराच असतो..
‘तो माझ्या बाबतीत किती पजेसिव्ह आहे, म्हणजे माझ्यावर त्याचं कित्ती कित्ती प्रेम आहे’, असं ठरवलं जाऊ लागलं.. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याची काळजी वाटणं साहजिक आहे, पण मालकी हक्क (पझेसिव्हनेस) कसा जस्टीफाय करणार??
‘काळजी’ देखील एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण अति काळजी अधोगतीलाच आमंत्रण देते.. समजा, माझं माझ्या मुलावर प्रेम आहे, मला त्याची काळजी वाटते म्हणून मी त्याला पोहायला शिकवत नसेल, गाडी चालवू देत नसेल, कुठं एकटं जाऊ देत नसेल, कसल्या मोठ्या जबाबदाऱ्या देत नसेल, तर मी त्याच्या प्रगतीतली धोंडच ठरतोय, असं म्हणावं लागेल.. त्याच्या पुढच्या आयुष्यात एकट्याने जगण्यासाठी सक्षम बनविण्याऐवजी मी त्याला ‘मानसिक पंगूत्व’च देतोय, असं नाही का?
पझेसिव्हनेस तर याच्याही पुढची एक स्टेप आहे.. ‘तू याच्याशी बोलू नको, तू त्याच्याशी मैत्री करू नको, तू नोकरी करू नको, तू अमुक कपडे घालू नको, तू यात सहभाग घेऊ नको,’ अशी अनेक बंधनं घातली जातात, अन याला प्रेमाचा मुलामा दिला जातो.. ‘तुझी काळजी वाटते गं!’ अशी सारवासारव केली जाते.. पण हा सरळसरळ मालकी हक्क असतो, प्रेम नाही..!!
आधी पझेसिव्हनेसच्या मुलाम्याखाली बंधनं घातली जातात.. मग समोरच्याकडून ते बंधन पाळलं गेलं नाही, की वाद टाळण्यासाठी त्याच्याकडून खोटं बोललं जातं.. मग नात्याचा कल हळूहळू ‘सुसंवादा’ऐवजी वाद टाळण्याकडे जास्त झुकतो.. (ही पार्टनरची फसवणूक नसते.. पण, ही समोरचा दुखावला जाऊ नये म्हणून चाललेली धडपड नक्कीच असते..) मग एखादं खोटं पकडलं गेलं की त्यांच्यात अविश्वास तयार होतो.. मग गुपचूप एकमेकांचे मोबाईल चेक केले जातात, एकमेकांवर पाळत ठेवली जाते.. हा अविश्वास नंतर कुठले टोक गाठेल याचा नेम नाही!
एकमेकांवरचा अविश्वास मग त्यांच्यात बेबनाव तयार करतो.. मग शेअरींग थांबतं आणि नुसता प्रेमाचा आभास निर्माण केला जातो.. जरी समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून गिफ्ट्स दिले जात असतील, आवर्जून वाढदिवस सेलिब्रेट केले जात असतील आणि रोज दहा वेळा एकमेकांना ‘आय लव्ह यु’ म्हणलं जात असेल, पण त्यातली ‘सहजता’ मात्र संपलेली असते.. हे सगळं दोघेही एकमेकांच्या पझेसिव्हनेसच्या दडपणाखाली करत असतात..
जिथं प्रेम दाखविण्याची धडपड करावी लागते, तिथं पहिलं त्यातली सहजता संपते, आणि मग हळूहळू प्रेमच संपतं, फक्त कमिटमेंट उरते.. अशा प्रेमाचा ओलावा संपलेल्या कमिटमेंटस् निभावून नेल्या जातात.. त्या दोघांनाही कळत नाही की नक्की काय झालंय!.. हा म्हणत असतो, ‘तू बदललीये’ आणि ती म्हणत असते, ‘आता तू पूर्वीसारखा राहिला नाहीये’.
पण कोणी बदललेलं नसतं.. प्रायोरिटीज बदललेल्या असतात!
या प्रायोरिटीज ऍक्च्युअल प्रेमाकडून प्रेमाच्या आभासाकडे गेलेल्या असतात, आणि ही आपणच पार्टनरवर दाखविलेल्या मालकी हक्काची फळं असतात.. पण हे सहसा मान्य केलं जात नाही..
तो किंवा ती जसं आहे तसं स्वीकारण्याऐवजी किंवा त्याच्या/तिच्या आवडीनिवडी स्वतंत्र जोपासू देण्याऐवजी, आपण आपल्या पझेसिव्हनेसला satisfy करण्यासाठी समोरच्याला आपल्या पद्धतीने बदलवायला जातो किंवा घाईघाईने बंधनात टाकतो.. आणि हेच चुकतं! कुणीच दुसऱ्याला पाहिजे तसं शंभर टक्के नसतं, काही सवयी चुकीच्या देखील असू शकतात, पण मग त्यावर चर्चा करून, समजावून सांगून, पेशन्स ठेऊन, वाट पाहून काम होऊ शकण्याची शक्यताच धूसर केली जाते..
सुरुवातीला पझेसिव्हनेस हे कितीजरी गुडीगुडी वाटत असलं तरीपण शेवटी तो एक पिंजराच असतो..
पझेसिव्हनेस हे ‘इगो’चं अपत्य आहे.. तर प्रेमाचा विरुद्धार्थी शब्द ‘इगो’ आहे.. यातच सगळं काही आलं!
रिस्पॉन्सिबिलिटी (जबाबदारी) आणि पझेसिव्हनेस (मालकी हक्क) यात खूप फरक आहे.. प्रेम एकमेकांत रिस्पॉन्सिबिलिटी निर्माण करतं.. पण तुमच्या प्रेमातून तुम्हाला मालकीहक्कच (पझेसिव्हनेस) येत असेल तर तो तुमचा दोष आहे, प्रेमाचा नाही..
तुम्ही तुम्हाला आवडतं म्हणून स्वतःसाठी (स्वतःच्या करमणुकीसाठी) एखाद्या वेलीवरचं फुल खुडता, तिथेच त्या फुलाबद्दलचं तुमचं प्रेम संपतं आणि मालकी सुरू होते! आपलं ज्याच्यावर/जिच्यावर प्रेम आहे अशा व्यक्तीला बंधनात ठेवायचा विचार आपण कसं काय करू शकतो?
प्रेम म्हणजे स्वातंत्र्य!
आणि पझेसिव्हनेस म्हणजे स्वातंत्र्याचा संकोच..
‘मलाच हवी, माझीच झाली पाहिजे, माझीच राहिली पाहिजे’ या मालकीच्या भावना आहेत.. एकतर्फी प्रेमात हा असाच एकतर्फी पझेसिव्हनेस असतो.. “अगर वो मेरी नहीं हो सकती, तो किसी और की भी नहीं हो सकती” अशा दळभद्री डायलॉगला समाजात इज्जत मिळवून देण्याचं काम बऱ्याच बॉलिवूडपटांनी केलं.. आणि मग त्यातूनच तिला धमकावून ‘तू याच्याशी का बोललीस? त्याच्यासोबत का फिरतेस?’ असा जाब विचारण्यापासून विचित्र गोष्टी सुरू होतात अन पुढे पुढे तर शारीरिक बळजबरी पर्यंतही जातात.. आताचे हे ऍसिड हल्ले करणं, तिला धडा शिकविण्याचा चंग बांधणं, आपल्याला नकार दिलेल्या मुलीची बदनामी करणं, हे या एकतर्फी पझेसिव्हनेसचंच उग्र रूप आहे.. यात ‘प्रेम’ असं कुठंच नसतं खरंतर, पण तरीही, ‘एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ला’ अशा बातम्या का देतात काय माहिती?!! असो..
‘आकर्षण’ ही प्रेमाची पहिली पायरी आहे.. आणि हे आकर्षण हे फक्त दिसण्याचंच असतं असं नाही.. ते कशाचंही असू शकतं.. मग येते ती एकमेकांबद्दलची तीव्र ओढ किंवा आवड, मग येतात एकमेकांसोबतच्या कमिटमेंट्स आणि मग येते एकमेकांबद्दलची रिस्पॉन्सीबिलिटी..!! या प्रेमाच्या पायऱ्या आहेत.. आणि या सगळ्याच्या मागे ‘वासना’ (lust नव्हे, desire!) कार्यरत असते.. (ही जीवशास्त्रीय वासना आहे, जी मूलभूत अंतःप्रेरणा किंवा basic instinct असते, जी आपल्या जीन्स मध्येच असते..) असो.. जे पहिल्या/दुसऱ्या/तिसऱ्या पायरीवरच संपतं ते निव्वळ आकर्षण, किंवा फक्त आवड, किंवा ओढ होती, (जी नंतर ओसरली,) असं आपण म्हणू शकतो.. म्हणूनच “लव्ह ऍट फर्स्ट साईट” हे प्रेम नसतंच!! फार तर होऊ घातलेल्या प्रेमाची ती फक्त एक पायरी किंवा सुरुवात असू शकते..
अलीकडच्या पिढीबद्दल तक्रार केली जाते की त्यांच्या प्रेमाच्या व्याख्याच वेगळ्या आहेत.. आज एक तर उद्या कोणी दुसरी.. मुली पण यात मागं नाहीत.. सगळं ठरवून चालू असतं.. नो इमोशन्स, नो ऍटॅचमेंट्स.. यांना प्रेमाच्या पुढच्या पायऱ्यांपर्यत पोहोचायचं नसतं, कसलीच कमिटमेंट नको असते, रिस्पॉन्सीबिलिटी नको असते.. फक्त हवेत तरंगत राहायचं असतं.. त्यांना प्रेमाची नशा हवी असते, प्रेमातला ‘सुकून’ नको असतो!! हे चांगलं की वाईट असं आपण वर्गीकरण करू शकत नाही.. कारण ही हॉर्मोन्सची दुनिया आहे, आकर्षणाची ठिणगी पडली की ओढीचा वणवा पेटणार, आणि त्यात तुम्ही स्वतःहून पडत असाल तर तो तुम्हाला जाळत जाणारच.. ठराविक वयात Androgens उतू जाणं हे प्रेमाचं शरीरशास्त्र आहे.. या रूढी परंपरांच्या चौकटी, काळाच्या कसोट्या आणि समाजाची बंधनं ही आपण बनवलीत, ती प्रत्येकवेळी आणि प्रत्येकावर लागू होतीलच असं नाही.. असो..
“जिंदगी में प्यार एकही बार होता हैं” ही हिंदी पिक्चरनी पसरविलेली अशीच एक अंधश्रद्धा आहे!
तुम्हाला कुणाचं सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य किंवा इतर काही गोष्टी (attributes म्हणूयात यांना एकत्रितपणे) आवडून तुम्ही दुसऱ्याकडे आकर्षित होऊ शकता, कारण तुमचा मेंदू त्यासाठी तुम्हाला भाग पाडतो.. त्यात हे सारे attributes सतत बदलणारे असतात.. त्यांच्या priorities ही बदलत असतात.. मग, सध्या एकाच्या प्रेमात बांधील आहे म्हणून, अथवा कोण्या एकाशी सात फेरे घेतलेत म्हणून किंवा ‘कबूल हैं’ म्हणलंय म्हणून तुमचा मेंदू बदलत नाही.. तुमच्या आवडीचे attributes तुम्ही लग्नानंतरही किंवा कमिटमेंटमध्ये असल्यानंतरही शोधत राहता.. कारण मेंदू ते करणे जिवंतपणी थांबवू शकतच नाही. (आपल्या conscious mindला ते accept होणार नाही कदाचित, पण हे असंच आहे!) मग , त्यातल्या त्यात तुमच्या partner मध्ये जे attributes तुमच्या अपेक्षेनुरूप मिळाले नाहीत, ते जर दुसऱ्या कुणात दिसले, तर त्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याला तुम्ही थांबवू शकत नाही.. मात्र ते आकर्षण कितपत ‘पुढं’ न्यायचं, हे जो तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार ठरवतो, तो भाग वेगळा.. पण प्रेम हे एकदाच होतं, हे तर सपशेल चुकीचं आहे आणि एकाच्या प्रेमात असल्यावर दुसऱ्याशी प्रेम होतंच नाही, हे आपलं मन मान्य करत नसेल कदाचित, पण याला काहीही जीवशास्त्रीय आधार नाही..
आता पुन्हा एकदा- पहिला गैरसमज, प्रेम आंधळं असतं.. दुसरा गैरसमज, पझेसिव्हनेस म्हणजे पण प्रेम असतं.. तिसरा गैरसमज, लव्ह ऍट फर्स्ट साईट.. चौथा गैरसमज, ‘नो इमोशन्स नो ऍटॅचमेंटवालं’ पण प्रेम असतं.. पाचवा गैरसमज, प्रेम हे आयुष्यात एकदाच होतं, किंवा एका प्रेमात असल्यावर आपल्याला दुसऱ्याशी प्रेम होतच नाही.. आणि आता शेवटचा गैरसमज – लग्न झालं तरच प्रेम सफल होतं, नाहीतर नाही..
एक सांगू का, प्रेम हे मानवाच्या उत्पत्तीपासून आहे, ते लाखो वर्षांपासून आहे, अन विवाहसंस्था येऊन फक्त चार पाच हजार वर्षे झाली असतील.. म्हणून प्रेमाच्या या पायऱ्यांचा अन लग्नाचा काहीएक संबंध नाही, आणि लग्न झालं तरच प्रेम सफल होतं असंही नाही.. किंबहुना, लग्न हे प्रेमाच्या सफलतेचा निकषच नाही.. जेंव्हा दोन जीव एकमेकांकडे आकृष्ट होतात, एकमेकांच्या मनात घर करतात, एकमेकांच्या आठवणींची बांधिलकी जपतात आणि एकमेकांप्रती आदर बाळगण्याची जबाबदारी स्वीकारतात, तिथंच प्रेम सफल होतं.. त्यांच्या मनातून ते कोणीच कधीच काढू शकत नाही.. हे असे लग्न करून अजून कॉम्प्लिकेट न झालेले ‘बिना सात फेरों’वाले रिश्तेच जास्त सच्चे असतात, अन एकमेकांच्या मनात दीर्घकाळ टिकतात, असं दिसून येतं. असो..
प्रेमाबद्दल काहीही समज असोत, वा कितीही गैरसमज असोत, पण प्रेम जन्नतही दाखवू शकतं आणि तबाह पण करू शकतं!
Love is like a heaven,
but it hurts like hell..
प्रेमातल्या विरहा बद्दल लिहायला गेलं तर एक कादंबरी तरी नक्कीच होईल..
काहीही असो, पण प्रेमासारख्या अंतःप्रेरणीय अनुभूतीला काळाच्या कसोट्या लागू होऊ शकत नाहीत, रूढी परंपरांच्या चौकटी बांध घालू शकत नाहीत आणि समाजाची बंधनं बांधून ठेऊ शकत नाहीत.. आणि त्याला कोणत्या रिश्ते-नात्यात कैदही करता येत नाही..
प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं ,
एक खामोशी है, सुनती है कहा करती है ,
ना ये बुझती है, ना रुकती है, ना ठहरी है कहीं ,
नूर की बूँद है, सदियों से बहा करती है..
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो ,
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो …
हमने देखी है इन आँखों की महकती खुशबू ,
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *