Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

पालकत्वाच्या नोंदी भाग २

मुक्ता अगदी एक वर्षाची असल्यापासून मला आठवतंय तसं आम्ही तिला तिचा हट्ट पुरवून घेण्यासाठी “रडणं” ही गोष्ट वापरू दिलेली नाही.. तिनं एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा हट्ट धरला आणि त्यासाठी ती रडू लागली, तर “आधी रडणं थांबव, तरच आम्ही तुला ती वस्तू (किंवा खेळणं) देऊ”, किंवा “तरच तुला उचलून कडेवर घेऊ” , असंच म्हणत सवय लावायचा प्रयत्न केलाय..
अजून थोडं कळतं झाल्यावर मग “कुठलीही गोष्ट व्यवस्थित माग तरच मिळेल, रडलीस तर आम्ही अजिबात देणार नाही” , अशीच आमची भूमिका कायम असायची.. आणि मग ती त्यासाठी कितीही रडो, पडो, भोकाड पसरो, आजीआजोबांकडे जावो, आम्ही ती गोष्ट नाही म्हणजे नाहीच करायचो किंवा द्यायचो..
“तू जर आमचं ऐकलं नाहीस, तर आम्ही पण तुझं ऐकणार नाही”.. असा सरळ हिशोब असायचा.. बहुतांश मुलं ही हट्टीच असतात, पण त्यांचे हट्ट पुरविण्याची आपली पॉलिसी निश्चित पाहिजे आणि त्यात एकसमानता पाहिजे.. “तू हट्ट करू शकतेस, पण त्यासाठी रडणं किंवा इतर मार्गांनी ब्लॅकमेल करणं मात्र अजिबातच खपवून घेतलं जाणार नाही” इतकं क्लिअरकट मेसेज तिच्यापर्यंत आम्ही पोहोचवत होतो, आणि स्वतःही त्या आखलेल्या नियमांवर चालत होतो..
समजा, एकदा जरी तुम्ही पाघळले तरी तिथून पुढं मुलं आपलं ब्लॅकमेलिंग वाढवत नेतात.. त्यांना लक्षात येतं, की कोणकोणत्या विशिष्ट वेळी आईवडील आपल्याला लवकर बधतात (म्हणजे, नाविलाजने आपलं ऐकतात).. उदा. आजीआजोबांकडे तक्रार घेऊन गेल्यावर आपल्या म्हणण्याप्रमाणे होतं, किंवा खूपच जास्त तमाशा केल्यावर, किंवा काहीतरी विशिष्ट धमकी दिल्यावर, किंवा मग घरी पाहुणे आलेले असल्यावर.. असे विविध क्लुप्त्या मुलं अजमावून बघत असतात.. एरवी कधीतरी वागण्यात मुलांना सूट दिली तर चालेल, पण ती क्लुप्त्या वापरू लागली किंवा ती ब्लॅकमेलिंग करू लागली तर मात्र अजिबातच ऐकायचं नाही..
घरी पाहुणे आलेले असल्यावर त्यांच्यासमोर उगीच तमाशा नको म्हणून आपण मुलांना आपल्या नियमांत सूट देतो, त्याला बोलत रागावत नाही.. त्याचा गैरफायदा काही मुलं बरोबर उचलतात.. मग त्यांच्यासमोर जास्तच बिथरल्यासारखं करतात कधीकधी.. आपण सारवासारव करत म्हणतो, ‘एरवी असं नाही वागत हो, पण आज काय झालंय काय माहिती!’ ..
(मी तर विनोदाने म्हणेन, जगात असं एकही मूल नसेल ज्याने आईवडिलांच्या ऑकवर्ड सिच्युएशनचा फायदा उचलण्याचा एकदाही प्रयत्न नसेल केला..) असो..
ऍक्च्युअली, मुलं पोथी ओळखायला खूपच लहान वयापासून शिकत येतात, आणि आपण मात्र शिस्त लावायला उशिरा सुरुवात करतो!
‘लहान आहे तो, त्याला काय कळतंय अजून’ असं काहीतरी आपलं एक्सक्युज असतं त्यासाठी.. तोपर्यंत आपण भरपूर लाडवून ठेवतो, आणि मग वळण लावणं जड जातं.. फक्त आपल्यालाच नाही, तर मुलांना देखील त्रास होतो याचा..
सांगायचा मुद्दा हा की , शिस्त लावायला सुरुवात करायचं विशिष्ट वय वगैरे नसतं.. मुलांना कळायला लागायच्या आधीपासूनच सुरुवात करावी लागते, तीही वेगवेगळ्या प्रकारे अथवा वेगवेगळ्या मार्गांनी.. शिस्त लावणे म्हणजे त्यांना मारणं किंवा रागावणं असाच आपल्याकडे कन्सेप्ट आहे.. पण ते तसं अजिबातच नाही..
“शिस्त म्हणजे ठामपणा”.. आपल्याला त्यांनी कसं वागलेलं हवंय याबद्दलचा आपल्या वागण्यातून, आपल्या मतांतून, आणि आपल्या देहबोलीतून मुलांपर्यंत पोहोचणारा ठामपणा..
लहान मुलं इतकी क्युट असतात की आपल्याला त्यांचं मन मोडवत नाही, त्यांचं रडणं तर आपलं काळीज पिळवटून टाकतं.. एकीकडे ही इतकी इमोशनल बॉंडिंग आणि दुसरीकडे त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी, त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्यावाईट प्रसंगांना सामोरं जायला तयार करण्यासाठी लागणारी निश्चयकठोरता.. अशी तारेवरची कसरत करावी लागते.. इथं त्यांच्या कोणत्याही मागणीत त्यांच्याबद्दलच्या ममत्वाची बॉण्डरी कुठंपर्यंत ठेवायची आणि कुठंपासून त्यांच्या हट्टाला इमोशनल ब्लॅकमेलिंग समजायचं हे प्रत्येकाला आपलं आपलं ठरवलंच पाहिजे.. मुलांचं कौतुक करावं, त्यांना खूप प्रेम द्यावं, अगदी माफक लाड पण पुरवावेत, पण फाजील लाड करू नयेत.. (‘लाड’ आणि ‘फाजील लाड’ यात खूप पुसट सीमारेषा असते लक्षात ठेवा!)..
जितकं तुम्ही मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडत जाता, तितके तुम्ही मूर्ख असता.. म्हणून, “मुलं आमचं ऐकतच नाहीत”, असं म्हणणाऱ्या पालकांची मला कीव येते. याचा सरळ अर्थ असतो की तितकं ते मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगमध्ये फसलेले असतात.. असो..
आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची असते.. शिस्त म्हणजे फक्त वक्तशीरपणा किंवा काटेकोरपणा नव्हे.. शुष्क किंवा साचेबद्ध वागणं तर अजिबातच नव्हे.. तर, शिस्त म्हणजे कोणतीही ठरविलेली गोष्ट मनापासून करण्याची वृत्ती..
एक बेसिक शिस्त अंगी हवीच.. लहानपणीचा अभ्यास असू देत, किंवा मोठ्यापणीचे मोठे मोठे प्रोजेक्ट/व्यवसाय असू देत, ही Sincerity कधीच वाया जात नाही..
एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी काय काय लागणार आहे, किती वेळ द्यावा लागणार आहे , त्यासाठी कशाप्रकारे आखणी करावी लागणार आहे, याची सवय जे पालक लहानपणापासून लावत नाहीत, ते एका अर्थाने मुलांचं नुकसानच करत असतात.. कित्येकदा आपण पालकांकडून अशी कम्प्लेन्ट ऐकतो की, ‘खूप हुशार आहे हो तो, पण एका जागी बसतच नाही, अभ्यास कर म्हणलं की कंटाळा करतो’.. म्हणजे याचा अर्थ त्या मुलाला अभ्यास नाही, तर आधी शिस्त शिकवायची गरज आहे.. बुद्धिमत्ता असलेली कितीतरी मुलं केवळ अंगी शिस्त नसल्याने वाया जातात किंवा पुढं फार काही करू शकत नाहीत..
खूप पालकांना हे पटतं, पण करता काहीच येत नाही.. कारण त्यांच्याच अंगी तेवढी शिस्त नसते, किंवा पेशन्स नसतो, किंवा मग वेळ नसतो.. मग मध्येच कधीतरी फ्रस्ट्रेशन मध्ये मुलांना बदडून काढ किंवा उपाशी ठेव, वगैरे अशा अघोरी शिक्षा केल्या जातात.. आणि पुढं पुढं तर मुलं याला देखील सरावतात.. निर्ढावतात, कोडगी बनतात..
‘शिस्त’ ही अव्याहतपणे चालणारी प्रोसेस आहे, ती लटकेच रागावून किंवा मारून लागत नसते.. मुलांना कोणत्याही गोष्टीमागचं कारण पटविण्यात आपण यशस्वी झालो पाहिजे, तरच ते ऐकतात.. आणि जरुरी नाही की ते कारण आपण एकदा सांगितलं की मुलांनी लगेच ते ऐकावं!
आणि महत्त्वाचं म्हणजे, याबाबतीत नवराबायकोत एकवाक्यता हवी.. एकजण रागवत असताना दुसऱ्याने मुलांच्या साईडने रदबदली नाही केली पाहिजे.. नाही म्हणजे नाहीच.. असो..
आपल्या माराच्या धाकाने नव्हे, तर त्यांच्याच विचारांच्या धाकाने मुलांनी बदलले पाहिजे असा आपला सतत प्रयत्न राहिला पाहिजे.. आणि अशी स्वयंशिस्तच लॉंग टर्म राहते.. उद्या मुलं मोठी झाली तर आपण मारू/रागावू शकत तर नाहीच, पण त्यांच्यावर सतत नजरही ठेऊ शकत नाही (आणि ते बरोबरही नाही!) , आणि शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी होस्टेलवर ठेवली तर तिथं आपला धाकही राहत नाही.. अशा वेळी, मैत्रीत किती वाहवत जायचं आणि कुठं थांबायचं, अभ्यास कसा/किती करायचा, आणि टाईमपास किती, हे त्यांना स्वतःलाच समजले पाहिजे..
क्रमशः

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *