प्रत्येक पक्षाचं जसं ‘पक्ष कार्यालय’ जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, आणि इतरत्र संपर्क कार्यालये असतात, तसं प्रत्येक पक्षाने स्वतःचं हॉस्पिटल काढायला आणि ओपीडी सुरु करायला काय हरकत आहे?
भाजप हॉस्पिटल, काँग्रेस हॉस्पिटल, राष्ट्रवादी काँग्रेस हॉस्पिटल, शिवसेना हॉस्पिटल, मनसे हॉस्पिटल, वंचित हॉस्पिटल वगैरे..
वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर किंवा दिखाव्यापुरते आरोग्य शिबीर घेतलं म्हणजे समाजाच्या आरोग्याप्रतिची आपली जबाबदारी संपली का?
हॉस्पिटल्स खाजगी असतात, सरकारी असतात, ठराविक कंपन्यांची असतात, मिलिटरीची असतात, ट्रस्टची असतात, धर्मादाय असतात, तसे ‘पक्षीय’ हॉस्पिटल काढायला काहीच हरकत नाही.. सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत इलाज आपल्याच हॉस्पिटलमध्ये करावेत.. मग खाजगी हॉस्पिटल लुटतात म्हणून उगी ओरडच नको..
डॉक्टरांना फोन करून कार्यकर्त्यांची बिलं कमी करायला लावायची, धमकावून बिलं बुडवायची, ट्रिटमेंट साठी अरेरावी करायची, हॉस्पिटलमध्ये तोडफोड करायची, असली झंझटच नको करायला.. त्यापेक्षा आपल्याच पक्षाच्या हॉस्पिटलमध्येच सगळी ट्रिटमेंट करायची.. सोय पण होईल, स्वस्तात पण होईल, आणि समाजसेवा पण होईल!!
प्रत्येक कार्यकर्त्याने सतरंज्या उचलण्यासोबतच आपल्या सायबाकडे हॉस्पिटलसाठी पण तगादा लावावा.. म्हणजे पुढं पक्षासाठी दिवसरात्र खस्ता खाऊन देखील ऐनवेळी ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी मरमर करायची वेळ येणार नाही..
काय म्हणता?