Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

नास्तिकता

23 मार्च हा दिवस ‘जागतिक नास्तिकता दिन’ म्हणून यावर्षीपासून सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने जगभरातले सगळे नास्तिक (Atheist) लोक come out करणार आहेत.. रस्त्यावर रॅली, सभा, मेळावे घेण्यापासून ते प्रिंट मीडिया, सोशल मीडियावर निर्भयपणे आपली मतं मांडण्यात येणार आहेत.. ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकसंख्येपाठोपाठ जगात तीन नंबरची लोकसंख्या ही नास्तिकांची आहे..
या नास्तिक दिनाच्या निमित्ताने नास्तिकतेचा परिचय व्हावा म्हणून हा लेखनप्रपंच –
कट्टर आस्तिकता ते परिपूर्ण नास्तिकता यात खूप मोठा स्पेक्ट्रम आहे.. फक्त ब्लॅक किंवा व्हाईट अशा स्वरूपात हे नसून खूप मोठा ‘ग्रे’ भाग आहे.. याचं तंतोतंत असं वर्गीकरण करता येणार नाही, पण साधारण गुणवर्णन सांगता येईल..
१. बरेच कट्टर आस्तिक लोक जगाचा निर्माता देव आहे असं मानतात, धर्माने सांगितलेल्या स्वर्गनरक पुनर्जन्म ह्यासहित अनेक कल्पनाही मानतात, आणि आपल्या आयुष्यात जे काही चांगलं चाललंय ते देवामुळेच, आणि वाईट चाललंय ते नाशिबाच्या भोगामुळे असं त्यांना वाटतं.. यातील बरेच लोक चमत्कारांची किंवा अघटित घडण्याची अपेक्षा ठेऊन असतात, अशी माणसं मानसिक दृष्ट्या हरलेली आणि हतबल असतात. देवाच्या वा धर्माच्या नावावर सुरू असणारे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करण्याकडे अशांचा कल असतो..
२. बहुतेक लोकांचा देवावर विश्वास असतो, पण जळीस्थळी, काष्ठीपाषाणी देव आहे आणि तो आपल्याला पाहात असतो, अशी धारणा फार कमी लोकांची असते. (नाहीतर लोकांकडून भीषण गुन्हे किंवा पापकर्म घडलेच नसते.)
३. काही लोक हे केवळ परंपरेमुळे (तसं सगळे म्हणतात म्हणून) देव आहे असं मानतात. ते देवाचं विशेष काही करत नाहीत पण अडचणीत आल्यावर मात्र त्यांना स्वतःला देवाची आठवण होते, मग असे लोक गिल्ट मधून तात्पुरते नवससायास पूजाअर्चा करतात.
४. जवळजवळ सगळेच लोक काहिनाकाही मागण्यासाठीच देवाची पूजाप्रार्थना करतात.. असे लोक भक्तीतून कमी अन भीतीतून जास्त देव जवळ करतात. भवसागर तरुन जावा, किंवा मुक्ती मिळावी इतपत का होईना स्वार्थ त्यांच्या मनात असतो. जगण्यातल्या अनिश्चितता, मानसिक दौर्बल्य, आणि अनामिकाची भीती ही या लोकांची आस्तिकता वाढवत नेते.
५. काही लोकांना देव नसावा अशी शंका येत असते, पण असलाच तर काय घ्या, उगीच लफडा नको.. म्हणून ते देव मानतात.. चार घास सुखासुखी खावेत, उगीच नसत्या फंदात पडून वैचारिक गोंधळ वाढवून घेऊ नये, असे यांना वाटते.
६. देवाच्या नावावर सुरू असलेल्या अनेक गोष्टी, (उदा. प्राणीबळी, धांगडधिंगा, मंदिरांतली लूट वगैरे), काहींना मान्य नसतात. पण त्याला आव्हान देण्याच्या फंदात ते पडत नाहीत.
७. चमत्कार करणारे लोक बदमाष आहेत अशी अनेकांची खात्री असते. पण किती बदमाषांना अंगावर घेणार म्हणून ते गप्प बसतात. लोकांचा चमत्कारावर विश्वास नसतो, पण ते आपल्या बाबतीत मात्र व्हावेत असं बऱ्याच जणांना मनापासून वाटत असतं..
८. देवावर विश्वास 100% आहे, पण अंधश्रद्धांवर नाही.. असे म्हणणारेही खूप लोक असतात. हे लोक बहुधा सुखवस्तू कुटुंबातले असतात. आणि “देव हीच एक अंधश्रद्धा आहे” असं म्हणल्यावर मात्र ते चिडतात. (‘आपली ती श्रद्धा आणि दुसऱ्याची ती फालतूगिरी’ असं खूप लोक करतात..) या प्रकारातले लोक आपल्या म्हणण्याला ‘सायंटिफिक आधार’ कसा आहे हे तुम्हाला पटवून देतात.. हे लोक ‘स्युडो सायन्स’ जास्त पसरवतात. कॉर्पोरेट गुरूंच्या जाळ्यात असे लोक जास्त फसतात.. ‘इंटेलिजन्ट डिझाईन’वाले लोक याच कॅटेगरीत येतात.
९. देव, धर्म, श्रद्धा, परंपरा ह्या व्यक्तीच्या/समूहाच्या अस्मितेशी जोडलेल्या असतात.. या अस्मिता म्हणजे व्यक्तीची/समूहाची ओळख असते/बनते.. ती ठेवण्याइतपत कर्मकांडं करण्याने समाजाचं वा व्यक्तीचं फारसं नुकसान होत नाही.. पण अनेकदा ह्या अस्मितेसाठीच इतर धर्माच्या/जातीच्या व्यक्तीवर अन्याय, अत्याचार करण्याचं बळ त्यांना याच श्रद्धेतून मिळतं.. आणि याला ते अस्तित्वाची लढाई अथवा धर्मरक्षण/जिहाद वगैरे समजतात..
१०. धर्म आणि धार्मिक समजुती (स्वर्गनरक पापपुण्य पुनर्जन्म इ.) मान्य नसलेले काही जण असतात, ते बहुधा ‘बुद्धिवादी’ असतात, पण ‘युनिव्हर्स चालवणारी अज्ञात शक्ती’ अथवा ‘देअर इज समथिंग’ वगैरे असं म्हणत ते वैचारिक समुद्रात तरंगत राहतात.. यांच्याकडे ‘परिपूर्ण नास्तिकते’कडे पोहोचण्यासाठी लागणारी तर्कनिष्ठा थोडी कमी असते.. आज्ञेयवादी नास्तिक इथं कुठंतरी असतात.. योग्य पुस्तकांचे मार्गदर्शन किंवा बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांचा सहवास त्यांना वैचारिक स्थैर्य देऊ शकतो..
पण जर व्यावहारिक जीवनात ते प्रतिकात्मक म्हणून ‘मूर्तिपूजा’, आणि सामाजिक मनोरंजन म्हणून ‘उत्सव’ यांत रमले, तर त्यासाठीच्या बौद्धिक हेलपाट्यांनीच त्यांचं शिंगरू घायाळ होतं..
असो..
‘बाबावाक्य प्रमाणं’ च्या संस्कृतीत आणि तयार उत्तरे पुरविणाऱ्या घोकंपट्टीच्या जमान्यात आजूबाजूच्या गोष्टींबद्दल ‘प्रश्न पडू लागणे’ हीच एक दुर्मिळ गोष्ट आहे..
त्यासाठी चिकित्सक वृत्ती (Analytical mind) असणं महत्त्वाचं आहे.. ‘हे असं का?’ ‘ते असं कसं?’ या बेसिक प्रश्नांपासून ते ‘हे खरं असेल तर ते खोटं असायला हवं’ असं अनॅलिसिस जमायला हवं.. आणि मग ‘हे असं पण असतंय अन ते पण खरं असतंय’ अशी सबगोलांकरी भूमिका मी घेणार नाही, असा ठामपणा यायला हवा..
म्हणजे ‘चिकित्सक बुद्धी’ आणि ‘ठामपणा’ हे दोन्ही महत्त्वाचे असतात.. आपल्याकडे १. एकतर बरेच लोक चिकित्सक (तीक्ष्ण आणि चाणाक्ष बुद्धीचे) नसतात.. २. दुसरं म्हणजे, जे चिकित्सक असतात ते त्यांची चिकित्सक बुद्धी देवाधर्माच्या बाबतीत मात्र वापरत नाहीत.. ३. तिसरं म्हणजे, जे थोडंथोडकी का होईना चिकित्सा करतात त्यांच्यात निष्कर्ष स्वीकारायचा ‘ठामपणा’ असेलच असे नाही. ४. आणि चौथं म्हणजे, चिकित्सक आहे, निष्कर्ष स्वीकारायचा ठामपणाही आहे, मात्र समाजाच्या/व्यवसायाच्या/नौकरीच्या भीतीने स्वतःचे विचार स्वतःजवळच ठेवले आहेत, या प्रकारात काही जण असतात..
मग एवढे सगळे फिल्टर ओलांडून, “चिकित्सा+ तर्कनिष्ठा + ठामपणा + निर्भयता” यांच्या जोरावर जे स्वतःला नास्तिक म्हणून घोषित करतात ते अगदी नगण्य उरतात..
शास्त्रज्ञांकडे वरीलपैकी फक्त चिकित्सक बुद्धी असते.. ते त्यांच्या लॅबमधल्या शोधप्रयोगात अथवा थिसिस मध्ये एकदम चिकित्सक असतात, पण देवाधर्माची (आणि आपल्या लहानपणापासूनच्या समजुतींची) चिकित्सा करण्याच्या फंदात मात्र बरेच जण पडत नाहीत, कारण तेवढी ‘निर्भयता’ त्यांच्याकडे नसते. म्हणून ते सायंटिस्ट असले तरी नास्तिक असतील असे नाही.. असो..
‘नास्तिकता’ ही आपल्याकडे सहज (Obvious) नाही किंवा तो ‘समज’ (Belief) नाही.. नास्तिकता आपल्यासमोर एक ‘निष्कर्ष’ (Conclusion) म्हणून येतो.. आणि तो निष्कर्ष एखाद्याला विचार करून कमवावा/काढावा लागतो..
थोडं स्पष्ट करून सांगतो..
आपण जेव्हा जन्माला येतो तेंव्हा आपण फक्त ‘होमो सेपियन’ एवढंच असतो.. पुढं मग आपल्याला आपले पालक त्यांचा धर्म, जात, नाव आपल्याला देतात..
मग आपल्याला थोडं कळायला लागलं की आपल्या आजूबाजूचे आपल्याशी खोटं बोलायला सुरुवात करतात.. बाप्पा बाप्पा कर, हरे हरे कर, इथपासून ते ‘हे करू नको, देवबाप्पा कान कापेल’, ‘ते करू नको देवबाप्पा शिक्षा देईल’ इथपर्यंत.. लहानपणीच्या या वाक्यांपासून ते पुढे पापपुण्य, स्वर्गनरक, जन्नत हूर, हे सगळं त्याला शिकवलं आणि समाजाकडून बिंबवलं जातं.. आणि यालाच संस्कार म्हणायचं असतं असा समजही आपल्याकडे आहे..
मग या सगळ्या देवाधर्माबद्दलच्या गोष्टींचं त्या लहानग्यांच्या मनात विश्व तयार होतं, त्या गोष्टींशी त्याच्या भावना जुळतात, आणि मग तो सगळ्या त्या कृती (देवपूजा, रितीरिवाज, नमाज वगैरे) करू लागतो ज्या त्याच्या आसपासचे सगळे करत असतात.. लहानपणीच्या या भावनांच्या/प्रसंगाच्या/सणांच्या त्याच्या मनात आठवणी बनतात.. आणि आपल्या मनातल्या त्या गोष्टीविषयीच्या पवित्र भावनांनी आणि रम्य आठवणींनी, त्या गोष्टी पुन्हा पुन्हा केल्यावर त्याला ‘बरं वाटायला’ लागतं किंवा मानसिक आधार मिळायला लागतो..
मंदिरात गेल्यावर हिंदूंना जसं प्रसन्न वाटतं तसंच मशिदीत मुस्लिमांना पवित्र आणि चर्चमध्ये ख्रिश्चनांना अजून काहीतरी अलौकिक वगैरे वाटतं.. हे ‘वाटणं’ आपल्या विचारांचा/समजुतींचा आणि नॉस्टॅल्जियाचा भाग असतो.. म्हणून उगीच ‘तिथं सकारात्मक ऊर्जेचा वावर असतो’ वगैरे बडबडणारे एकतर अज्ञानी असतात किंवा छद्मी असतात..
असो..
समजा, अशी एक कल्पना करा की आपण एका बेटावर एका व्यक्तीला लहानपणापासून देव-धर्म विरहित वातावरणात वाढवले आहे.. म्हणजे देव ह्या गोष्टीचा आपण ‘संकल्पना म्हणून देखील’ उल्लेख केला नाही.. त्याच्या सर्व जिज्ञासू प्रश्नांना सायंटिफिक उत्तरे दिली, आणि ज्या गोष्टींची उत्तरे अजून मानवाला माहिती नाहीत, तिथे ‘अजून शास्त्रज्ञांना शोधायचेय’ असेच उत्तर दिले.. म्हणजे त्याला देवधर्म सोडून माणसाचे सगळे बरेवाईट गुणधर्म शिकवले, तर काय होईल?
तो मोठा होईल तेंव्हा ‘नास्तिकता’ हे त्याच्यासाठी ‘मूल्य’ वगैरे काही नसेल, ती एक सहजता (obviousness) असेल..

  • आपण तिथे गेलो आणि ‘तू नास्तिक आहेस का?’ असं विचारलं, तर तो ‘देव म्हणजे काय प्रकार असतो?’ हे उलटप्रश्नी आपल्यालाच विचारेल, आणि आपण त्याला नास्तिक म्हणू..
  • आपण त्याला देव आणि देवाच्या पुराणकथा चमत्कारांबद्दल सांगितले, तर तो म्हणेल, ‘हा तर सुपरमॅन स्पायडरमॅन सारखा भाग झाला, हे तुम्ही सांगताय ते कॅरेक्टर मला अशाच अद्भुत कथांचा भाग वाटतेय’ असं म्हणून तो आपल्या सगळ्या पुराणकथांची आणि समजुतींची खिल्ली उडवेल..
  • आपण त्याला देवाची पूजाअर्चा वगैरे दाखवू, तेंव्हा तो म्हणेल, ‘ही तर मोठ्या माणसांची भातुकली झाली, त्यात वेगळं काय आहे?.. लहान मूल जसं आपल्या बाहुलीला झोपू घालतं, न्हाऊ घालतं, जेवू घालतं, तिच्याशी बोलतं, आपलेच सगळे गुणविशेष त्या ‘टॉय’ला चिटकवतं, तसंच काहीसं आहे हे!’ असं म्हणून तो आपल्यालाच ‘तुम्ही तुमच्याच मानसिक आधारासाठी एक टॉय कॅरेक्टर निर्माण केलंय असं तुम्हाला वाटत नाही का?’ असं विचारेल..
  • आपण जेव्हा त्याला देवाच्या प्रार्थनेबद्दल सांगू तेंव्हा तो म्हणेल, ‘तुमची प्रार्थना ही हस्तमैथुनासारखी आहे, त्यानं तुम्हाला समाधान मिळत असेलही, पण ज्या गोष्टीला मनात ठेवून तुम्ही हे करता, त्याला/तिला घंटा काही फरक पडत नाहीये.. कारण ती गोष्ट केवळ तुमच्या कल्पनेतच आहे..
    अशा व्यक्तीसाठी नास्तिकता हे ‘मूल्य’ नसल्यामुळं किंवा त्यानं ते बुद्धिप्रामाण्याने कमावलं वगैरे नसल्यामुळं, वैयक्तिक आयुष्यात तो कसाही असेल. चांगला असेल – कपटी असेल, शांत असेल – हिंसक असेल, सुहृदयी असेल – क्रूर असेल.. काहीही असेल.. माणसाचे बरेवाईट असे कोणतेही गुणधर्म त्याच्याकडं असतील.. तो एक सामान्य माणूस असेल, पण आपल्या दृष्टीने मात्र तो नास्तिक माणूस असेल..
    पण आता काय होतं.. नास्तिकता ही आपल्याला निष्कर्ष म्हणून कमवावी लागते.. ती बुद्धिप्रामाण्याचे ‘बायप्रोडक्ट’ म्हणून आपल्या समोर येते.. म्हणून मग “नास्तिक लोक जास्त विचारी आणि जास्त संयमी असतात असं मानलं/म्हणलं जातं”.. हे जरी बऱ्याच अंशी खरं असलं तरी, जर ‘नास्तिकता’ हे मूल्य नसेल, तर नास्तिक माणूस त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसाही असू शकतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं..
    याच्याच पुढं जाऊन मी असं म्हणेन, कोणताही नास्तिक माणूस त्याची चिकित्सक बुद्धी फक्त देवाधर्माबाबतच वापरून इतर मानवतावादी बाबतीत मात्र सोयीची/विसंगत भूमिका घेऊ शकतो. म्हणून तो कोणत्याही स्वभावविशेषाचा असू शकतो.
    अजून पुढचा मुद्दा म्हणजे, कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास तेंव्हाच देऊ शकते जेंव्हा आपण त्याचा त्रास करून घेतो, असं सायकॉलॉजीस्ट अल्बर्ट एलिस म्हणतो.. म्हणजे थोडक्यात, कोणतीही गोष्ट हा प्रॉब्लेम नसतो, तर त्या गोष्टीकडे पाहायचा आपला दृष्टिकोन हा खरा प्रॉब्लेम असतो, हे REBT चं प्रिन्सिपल आहे.. मग हेच देवाधर्माबद्दलही म्हणता येईल.. देवधर्म ही समस्या नसून, आपण त्याकडे कसे पाहतो? हीच एक मोठी समस्या आहे.. म्हणजे, ती बेटावर वाढवलेली व्यक्ती देवाधर्माकडे अगदी ‘शून्य भावनेने’ पाहिल.. पण आपण मात्र आपल्या मनातल्या पक्क्या विचारांनी आणि नॉस्टॅल्जियानी त्याकडे अत्यंत जिव्हाळ्याने पाहू.. आणि तोच तर प्रॉब्लेम आहे.. जितका जिव्हाळा किंवा आसक्ती जास्त तितकं धार्मिकता जास्त..
    यावर उपाय म्हणजे वैचारिकता वाढीस लावणे.. बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे..
    बुद्धिप्रामाण्यवाद (म्हणजेच रॅशनॅलिझम).. आपल्या सगळ्यांना एक माणूस म्हणून आणि एक समाज म्हणून तिकडे जायचे आहे.. तिकडे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादाकडे!
    ..आणि ‘चिकित्सक बुद्धी’ हे त्यासाठीचे साधन आहे.. तर्कनिष्ठा (वैचारिक ठामपणा) आणि सारसारविवेकबुद्धी (तारतम्य) ही बुद्धिप्रामाण्याची दोन अंगे आहेत.. आणि हे सगळं वागण्यात उतरवायचे असेल तर ‘निर्भयता’ आवश्यक आहे..
    म्हणजे ज्याच्याकडे चिकित्सक बुद्धी, तर्कनिष्ठा, सारासारविवेक आणि निर्भयता आहे तोच व्यक्ती “बुद्धिप्रामाण्यवादी” बनतो, अन जाताजाता नास्तिक बनतो..
    यात ‘सारासारविवेकबुद्धी’ जोडण्याचं कारण म्हणजे नास्तिकाची तर्कनिष्ठा आणि बाह्य समाज यांच्यात ताळमेळ राखण्याचं काम ही ‘सारसारविवेकबुद्धी’ (किंवा तारतम्य) करते.. ‘मी नास्तिक आहे’ असं सौदी अरेबियात म्हणून काही उपयोग नाही हे मला माझी सारसारविवेकबुद्धी समजावते, म्हाताऱ्या आस्तिक आईवडिलांशी कितपत वाद घालायचा हेही ती सांगते, आणि आपल्या छोट्याशा मुलीने तिच्या लुटुपुटूच्या खेळात आपल्याला प्रसाद दिला तर खायचा असतो अन शाप दिला तर मरून पडायचे असते हेही शिकवते.. ही सारसारविवेकबुद्धी माझ्यापासून आजूबाजूची माणसं तुटू देत नाही आणि माझे जीवन निरस होऊ देत नाही..
    असो..
    लेखाचा समारोप करताना एवढंच सांगेन की, आजूबाजूच्या गोष्टींबद्दल नेहमी स्वतःला प्रश्न विचारत रहा, चिकित्सा करत राहा, त्यातून आलेले निष्कर्ष ठामपणे मान्य करा, आणि आपल्या वागण्यात आणि कृतीत ते निर्भयपणे उतरवा..
    हा प्रवास सोपा नाही, चारदोन दिवसांइतका छोटा नाही, याला कुठला शॉर्टकट नाही.. मात्र मिळणारं ठिकाण तुम्हाला भय, शोषण आणि मानसिक दौर्बल्य यापासून मुक्ती देऊन मोकळ्या मनानं जगायचं बळ देतं..!
    सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
    मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
    मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
    हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।
मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *