आज 02 एप्रिल.. माझ्या मुलीच्या पहिल्या इयत्तेचा पहिला दिवस..
मी स्वतःच निधर्मी असल्याने मी तिच्याही शाळेच्या फॉर्ममध्ये जात आणि धर्म दोन्हीही लिहिले नाही.. आधी धर्म मानवता (ह्यूमॅनिटी) आणि जात भारतीय लिहायचा विचार केला होता.. पण नंतर ते कॉलम रिकामे ठेवण्याचं ठरवलं.. धर्म आणि जात हे कन्सेप्टच नकोत असं वाटलं..
शाळेत हे सांगितल्यावर त्यांनी परस्परात चर्चा करून त्यासाठी मला एक अफिडेव्हीट मागितले.. ते दिले.. आणि त्यात स्पष्ट लिहिलेय, “माझ्या मुलीला कोणतीही जात अथवा धर्म नसून, यापुढे तिच्याकडे वारसा-परंपरेने आलेल्या जाती-धर्माशी निगडित कोणत्याही फायद्या-तोट्यावर तिचा क्लेम नसेल”..
खरंतर, आडनावाच्या उल्लेखातून पण जात आपल्यासोबत नांदत असते, म्हणून अलीकडे बरेच जण आडनाव लावत नाहीत.. पण हा बदल कागदोपत्री पण व्हायला पाहिजे.. मला मान्य आहे की आपली आयडेंटिटी आणि ऍटॅचमेन्ट आपल्या चालू नावासोबत असते.. पण मुलांच्या बाबतीत मात्र आपण हा बदल पहिल्यापासून करू शकतो.. म्हणून मी गॅझेट मधून (राजपत्रातून) मुलीचे आडनाव देखील बदलले आहे.. ती आता “मुक्ता भारती” या नावाने ओळखली जाईल..
केरळ मध्ये एक लाख चोवीस हजार म्हणजे जवळपास 3 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जात नाही (no caste) असं रजिस्टर केलंय.. (लिंक खाली दिली आहे)
आपल्याकडे उच्चजातीचे लोक जात सोडत नाहीत.. आरक्षण मिळत नसलं तरी, जातीअनुषंगाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणि कळत नकळत मिळणारे ‘सामाजिक’ फायदे कोणाला नको असतील बरं? (‘आम्ही जात मानत नाही’ असं कितीही म्हणलं तरी आपल्या आडनावाच्या उल्लेखातून जात डोके वर काढतेच..) मी मराठा किंवा मी ब्राह्मण म्हणून समोरच्याला सांगताना (गर्व जरी वाटत नसला तरी) लाज किंवा वाईटही बिलकुल वाटत नसतं ..
‘आरक्षणाचा फायदा सोडा’ म्हणणारे किती अनारक्षित लोक कुलकर्णी किंवा पाटील या आडनावांतून (अप्रत्यक्षपणे) मिळणारी सामाजिक/राजकीय ‘सुपिरियोरिटी’ सोडतील?
(ही आडनावे फक्त उदाहरणादाखल दिली आहेत).. असो..
दुसरीकडे बॅकवर्ड प्रवर्गातील लोक आरक्षणाच्या फायद्यामुळे जात सोडण्यास तयार नसतात..
एवढी मोठी संधी किंवा फायदा कोणीच सोडणार नाही.. म्हणून पिढ्यांपिढ्या तीच तीच कुटुंबे आरक्षण घेत असलेली आपण पाहतो.. मग आरक्षण तळागाळापर्यंत झिरपायला हवं तसं ते झिरपत नाही..
पण ‘एकदा आरक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या पुढच्या पिढीला आरक्षण घेता येणार नाही’ अशी तरतूद केली तर पहा कितीतरी लोक पटापटा जात सोडतील (आणि जातीनिर्देशक आडनावेही बदलतील).. स्वतःला पुरोगामी किंवा बुद्धिप्रामाण्यवादी समजणाऱ्या व्यक्तींनी तरी जात आणि आरक्षणाचा मोह पिढ्यानपिढ्या धरण्यात काय अर्थ आहे?
म्हणजे एक गट सामाजिक फायद्यांमुळे ‘जात’ सोडू इच्छित नाही.. आणि दुसरा गट आरक्षणाच्या फायद्यांमुळे जात सोडायला धजावत नाहीत..
म्हणूनच ‘जात’ ही जाता जात नाही..
पण चित्र अगदीच निराशादायक नाहीये.. फक्त सुरुवात मनापासून झाली पाहिजे.. माझ्यासारखे असे जातीअंताचे एकेकटे प्रयत्न आणि त्याचा प्रसार मोठं वादळ निर्माण करण्यास पुरेसे आहेत..
जातीअंताची (मनातून, वागण्यातून, लग्नातून आणि कागदोपत्री देखील!) उशिरा का होईना छोटीशी सुरुवात करायला हवी.. जातीसोबतच आडनावं लावणं सुद्धा बंद करायला हवं.. खरंतर डिकास्ट, डिजेंडर आणि डिक्लास होऊन केवळ ‘माणूस’ म्हणून जगणं अवघड आहे, पण त्याकडे जाणीवपूर्वक किमान एक पाऊल तरी टाकायला हवं.. त्यासाठी तुमचा प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न लागणार आहे.
