Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

मनोगत

मी एक मध्यमवर्गीय घरात वाढलेला माणूस आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या सर्वसामान्य धार्मिक रूढी-परंपरा, व्रतंवैकल्यं यांच्या संस्कारांत मी लहानाचा मोठा झालो. एवढंच नाही तर जवळपास निम्मंअधिक आयुष्य या सगळ्याचं मी पालन आणि जतन करत राहिलो. त्यानंतर मात्र माझ्यात काहीतरी बदलवणारी प्रक्रिया सुरू झाली. त्यातून मी आज इथवर पोहचलो आहे की, आता मी देव मानत नाही, धर्म मानत नाही. विषमता आणि अंधश्रद्धा जोपासणाऱ्या कर्मकांडांपैकी मी काहीही करत नाही. आणि मला बाबा, महाराज, देवी यांच्या बोलण्यातून किंवा भक्तीतून, मन:शांती किंवा दिलासा मिळवण्याची गरजही आजवर वाटलेली नाही. (याचा अर्थ अशी गरज वाटावी अशा कसोटी बघणाऱ्या घटना माझ्या जीवनात आल्याच नाहीत असं नाही. पण अशा जीवघेण्या प्रसंगी देवाचा धावा करून त्याला साकडं घालून काही मिळतं, यावर माझा अजिबात विश्वास नाही.)
मी जसजसा अधिक विचार करायला लागलो, आज्ञाधारकपणा सोडून प्रश्न विचारायला लागलो, तसतसा या “देव” संकल्पनेतला, धर्मातला, आणि कर्मकांडातला फोलपणा मला समजायला लागला.. ‘देव’ ही संकल्पना माणसानं आपल्या एकटेपणावर, अचानक कोसळणाऱ्या संकटांवर मात करण्याचं बळ मिळावं, आपलं दु:ख हलकं करण्यासाठी एक मानसिक आधार हवा म्हणून निर्माण केली. त्याला तितपतच महत्त्व देणं ठीक.
संकटसमयी देवाचा धावा करून त्याद्वारे त्या संकटाशी सामना करायची शक्ती मिळवणं ठीक असेल; परंतु त्याचं परावलंबित्व पत्करून, त्याच्या नसलेल्या अस्तित्वावर भार टाकून आपलं भवितव्य त्याच्या स्वाधीन करणं कितपत योग्य आहे? (आणि नेमकं याच मानसिक भावनेचं अवडंबर माजवून काहींनी त्याचा धंदा मांडला, काहींनी तर त्याच्या भीतीनं इतरांचं शोषण, लुबाडणूकच सुरू केली.)
आपल्या घरातल्या देवपूजेत देवाला एखादा मित्र समजून जिवाभावाच्या गोष्टी, मनातल्या दुखावणाऱ्या किंवा सुखावणाऱ्या भावना बोलत त्याच्याशी केलेला केवळ संवाद हीसुद्धा एक छान गोष्ट असेल. अशी काहीहि अपेक्षा मनात ‘न’ ठेवता जर देवाशी असा संवाद होत राहिला तर कोणत्याही औषधोपचारांच्या बरोबरीने तो मनःस्वास्थ्यासाठी एक परिणामकारक उपचार ठरू शकेल, मन मोकळं करण्यासाठीची ती एक स्वत:ची स्वाधीन जागा असेल… पण याच्या पलीकडे जाऊन, देवाकडून बऱ्या-वाईट घटनांबाबत काही चमत्कार घडेल, किंवा आपल्या उत्कर्षांला तो गती देईल, अशी अपेक्षा बाळगणं सर्वथा चूक आहे. ( म्हणून देवपूजा करण्याबाबतचा मला वाटणारा धोका एवढाच आहे की, देव आपलं बोलणं ऐकून घेतो, याचा अर्थ त्यावर उपाययोजना करणाराही तोच आहे, असा एक विश्वास मनामध्ये घर करू लागतो. आणि एकदा का या ‘देवशरण’ भावनेनं देवाच्या घरात प्रवेश झाला, की मग सगळं संपलंच)..
तुम्ही “मनात देव” ठेऊ शकता: पण एकदा का “देवात मन” गुंतलं, कि मग अवघड होतं सगळं…
**
मला आठवतंय, शेंबूड पुसायचीही अक्कल नव्हती तेव्हापासून हात जोडून घेत, ‘बाप्पा-बाप्पा’ करणं भिनवत आलो होतो मी स्वत:त.. आजही आठवतेय ती कावीळ, जेव्हा आजीनं गळ्यात ताईत बांधला होता, तरीही दीड महिना अंथरूणावरच खिळून राहायला लागलं.. दहावीला मी बोर्डात यावं म्हणून आईनं वर्षभर केलेली दर सोमवारची निरंकार पारायणे आठवली.. नाईट ट्रेकसाठी नेमकी हीच रात्र का मिळाली म्हणून अमावसेच्या रात्री आईचा खाल्लेला ओरडा आठवला… यावेळी तरी नोकरी लागावी म्हणून दरवेळी कुठल्यातरी वेगळ्याच बाबाकडून अंगारा आणणारा, आणि बोटात पाचसात रत्नाचे खडे घालणारा, गल्लीतला सोमा आठवला…
मग जशीजशी समज येईल तसेतसे मी स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
आई, आजी आणि आजूबाजूचा सारा समाज वर्षानुवर्षे माझ्यावर जे बिंबवत थोपवत आले आहेत ते असं Rational Questioning नं झुगारून देऊ शकतो का मी..?
अमावास्येच्या रात्री प्रवास करायची हिंमत दाखवू शकतो का मी..? दारात युगानुयुगं लटकत असलेली काळी बाहुली फेकून देऊ शकतो का मी..? माझ्या वैयक्तिक आयुष्यावर पडत असलेला पत्रिकेतल्या ग्रहांचा थोतांड प्रभाव झुगारून देऊ शकतो का मी..? घर बांधताना स्वतःच्या सोयीपेक्षा वास्तुशास्त्राच्या थोतांड नियमांमुळे होणारी गैरसोय नाकारू शकतो का मी..? गर्भसंस्कार क्लासेसच्या भावनिक आवाहनाला बळी पडणं नाकारू शकतो का मी..? देवाच्या नावावर चाललेली निरर्थक कर्मकांडे स्वतःपुरती तरी थांबवू शकतो का मी..? माझं जगणं आणि त्याचा स्कोप लिमिटेड आहे.. हे स्वीकारून, निदान माझ्यापुरतं माझं जग थोडं बदलायला नको का मी.? पुण्य, स्वर्ग, मोक्ष, असल्या श्रद्धीय व्यसनांच्या आहारी जाऊन, सतत कसल्या न कसल्या दहशतीला बळी पडत जाणं मला माझ्या एकट्यापुरतं तरी टाळता यायला काय हरकत आहे.?
जगण्याच्या वाटेवरच्या सगळ्या insecurities चं सतत भांडवल करत, “त्या” न दिसू वा सिद्ध होऊ शकणार्‍या, एलिमेण्टवर ‘इम्पोज’ करत राहणं, आता आपण कमी करायला हवं, आणि आपल्या समाजाचे आणि स्वतःचे Bases, आपण रॅशनली Question करायला हवेत..
“जे घडतंय ते असं का घडतंय, याचं झेपेल असं उत्तर मिळालं नाही, कि लगेच त्याची नाळ थेट कर्म, देव, दानव, आत्मे आणि नशिबाशी जोडून टाकून मोकळं व्हायचं” या सामाजिक वृत्तीला प्रश्न विचारायला हवेत.. नाहीतरी तसं केल्यानं मला मिळणारी त्या क्षणापुरती मन:शांती आणि एखादं चॉकलेट चघळताना रडक्या पोराला दोन मिनिटांसाठी होणारा आनंद यात कितपत गुणात्मक फरक आहे सांगा.?
**
हे ‘जग कुठून आलं’ ? आणि या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही म्हणून ‘अज्ञात शक्ती’, वगैरे प्रकार सुरु होतात. कारण या लोकांना प्रश्न ‘तसेच’ अनुत्तरीत ठेवता येत नाही. त्यांच्याकडे ‘पेशन्स’ नसतात. त्यांना आपल्या प्रश्नाचं काहीही करून निरसन करायचं असतं. आणि मग उत्तर न मिळाल्यामुळे, शेवटी थकून भागून त्यांना ‘अज्ञात शक्ती’ सारखं काहीतरी शोधून, उत्तर बनवून आपल्या मनाचं समाधान करावं लागतं.
‘प्रश्न’ तसेच अनुत्तरीत ठेवता यायला हवेत. कारण काही प्रश्नांची उत्तरं हे काळानेच सापडतात. आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही, म्हणून त्याचा संबध कुठेही जोडणं योग्य नाही. २०० वर्षापूर्वी जे प्रश्न अनुत्तरीत होते, ज्याची तेव्हा उत्तरं सापडली नाहीत, ती आज ‘संदर्भासहित’ आपण पटवू शकतो, सिद्ध करू शकतो.
चंद्र कुठून आला ? सुर्य कसा तयार झाला ? विश्वाची निर्मिती कशी झाली ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत. आणि ज्या प्रश्नांची उत्तरं नाहीत, ती आपण शोधत आहोत.
कुणी सांगितलेलं की आपण आकाशात उडू शकू.
कुणी विचार केला की एका देशातून दुसऱ्या देशातल्या व्यक्तीशी बोलू शकू, त्याला पाहू शकू.
आज बिग बँग पर्यंत पोहोचलोय, कदाचित शंभर-हजार वर्षांनी, आपल्याला आज न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं सापडतीलही.
पण विज्ञानानेच जर < कुणीतरी अज्ञात शक्ती आहे >, < ती हे सर्व जग चालवते > असं काहीबाही मानलं असतं, तर आपल्याला ‘गूढ शोधण्याची आसच’ लागली असती का कधी ?
प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, म्हणून आपण लगेच हार मानून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा का ? हा माझा मुख्य मुद्दा आहे..
**
“श्रद्धा” हा खूप मोठा प्रांत आहे. तो एकट्या आस्तिकांचा प्रांत नाही. पण समाजानं असं घाबरून त्यांचा ‘प्रांत’ करून दिलंय. कारण ते मग लहान मुलासारखं चिडून-रडून हिंसक होतात.
धाकटा नाही ऐकत, म्हणून थोरल्याला वारंवार गप्प बसवण्यासारखं असतं ते…!!
का म्हणून आपण अशा श्रद्धांना कुरवाळतोय ?
‘कुणामुळेही तुमच्या श्रद्धा दुखायला नकोयत’, हे का म्हणून आपण त्यांना ठणकावून सांगत नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं उन्मादीच् असतं, सतत कानावर स्पीकर अन् डीजेचा ध्वनीमैथुन होत असतो, गल्ली बोळं रस्ता काही काही म्हणून सोडत नाहीत.. आणि यावर बोलावं तर भावना दुखावतात म्हणे…
ज्या श्रद्धा कुणामुळे डगमळतात, त्या श्रद्धा “कुठल्या आधारावर” उभ्या आहेत ?
साला, श्रद्धा म्हणजे पार्श्वभागावरचा फोड झालाय यांच्या, कुणीही येवून दुखावू शकतो.
ज्या धर्मात हिंसा होते, जो धर्म तुम्हाला हिंसा करण्यास प्रवृत्त करतो, ते तुमचे सर्व धर्म ‘कचऱ्याच्याही लायकीचे नाहीत’.. एकतर तुमच्या धर्माची शिकवण तरी चुकीची आहे, नाहीतर तुम्ही चुकीचा धर्म तरी शिकलेला आहात. तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ. माझी नास्तिकता माझ्याजवळ. तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि मी माझं. मी तुमच्यासारखा भावना दुखावून घेणार नाही. तुम्हाला धमक्या देणार नाही. तुमची डोकी फोडायला येणार नाही.
…पण एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही गांधी नाही आणि तशी व्हायची बिलकुलही इच्छा नाही. इट का जवाब पत्थरसेही मिलेगा. धर्मांध गाढवांशी वैचारिक समागम करण्यात मला अजिबात रस नाही.
**
धर्म आणि त्यातून निपजलेले वेडाचार पश्चिमेकडेही आहेत. पण ते इथल्यासारखे अंगावर येत नाहीत. इथे रोज उठून अजानच्या बांगेपासून झांजेपर्यंत, पूजेपासून धांगडधिंग्यापर्यंत सारेच लाऊडस्पीकरवर असते. इथे कुणीही कुणाची वेडगळ श्रध्दा दुखवायची नाही म्हणून सार्वजनिक अवकाशात चाललेला गोंधळही थांबवू पाहात नाहीत. उलट “ते” करतात तर आम्ही का नाही? अशी सर्वच समाजाची मानसिकता दिसते.. “त्यांनी लावला तेव्हा तुम्हाला त्रास झाला नाही, तेव्हा का नाही बोललात”.? असा युक्तिवाद..
या साऱ्या प्रकाराला स्वातंत्र्यानंतर कोणीही राज्यकर्त्यांनी पायबंद घातला नाही.. ना थांबवल्या सार्वजनिक पूजा, ना थांबवले मशिदींवरचे भोंगे. ना थांबवली कुंभमेळ्यांवरची अमाप उधळपट्टी, ना रोखले हाजयात्रेवरचे व्यर्थ खर्च. गेली साठ वर्षे या देशातल्या राज्यकर्त्यांनी केवळ धार्मिक श्रध्दांचे नको इतके लाड पुरवले. धार्मिक आधाराने वाढणाऱ्या, आक्रस्ताळी बोलणाऱ्या सर्वच संघटनांनाही अमका तमका समाज दुखावला जाऊ नये म्हणून वाढू दिले. थोडक्यात राज्यकर्त्यांनीच् हिंदू-मुस्लिमांच्या उग्र संघटनांना स्वतःच्या नाकर्तेपणाची ऊब दिली. आणि यथावकाश उग्र अशा संघटनाचा रेटा वाढत गेला.
लोकानुनयाच्या राजकारणात हिंसक उन्माद तर अनुयायांच्या शब्दांशब्दांतून सांडत चालला आहे. शस्त्र धरा, तयारी करा, यांना धडा शिकवा असे सांगणाऱ्या अनेक हिंदू मुस्लिम वेबसाइट्स सुरू आहेत. मुस्लिम धर्माच्या दहशतवाद्यांनी मूर्खपणाच्या, क्रौर्याच्या सर्व सीमा पार करायला केव्हाच सुरुवात केली आहे. त्या दहशतवादाला खणखणीत विरोध न करणारे इस्लामचे रूढीप्रिय पाईक यां मूर्खांच्या आगीत भरच घालतात.
एकूणात सारीकडचे धर्मवेडे मानवजातीतला गोंधळ अधिकच माजवत चालले आहेत.
यात विवेकाचे थोडेथोडे आवाज, त्यांना वाटणारी व्याकुळता, याचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी, ‘भूमिका न घेणारी’ अधली मधली बोटचेपी माणसेही अधिक घाण करीत आहेत.
त्यात आता तुम्ही नास्तिकांना पण सांगा- टोकाची भूमिका घेऊ नका, ज्याला जे हवंय त्याला ते करू द्या, कोणाच्या धार्मिक भावनांना दुखवू नका. नास्तिकांनी जर सबुरीने नाही घेतलं तर अराजक माजेल…
मग मी म्हणतो, आता अजून काय अराजक माजायचं राहिलंय?
कुठवर एक भाऊ वेडेपणा करतोय आणि जास्तीच करेल, म्हणून दुसऱ्यालाच् सबुरीचा आणि शहाणपणाचा सल्ला देणार आहोत आपण?
**
अध्यात्म’, ‘पीस ऑफ माईंड’ हे खरंतर वरवरचे बहाणे झाले.. खरंतर लोकांना ‘त्यांच्या पद्धतीचा’ आनंद हवा असतो.. बहुजन समाजाला तर शिक्षणात आंबेडकर पाहिजे असतो अन नाचायला गणपतीची मिरवणूकपण चालते.. त्यात ‘श्रद्धा’ ही त्याच्या मनानेच बनवलेली असते.. शेवटी हा सगळा विरंगुळाच् राहतो..!!
एकंदर भारतातली डायवर्सिटी लक्षात घेता, इथ शासकीय योजना पण एका पठडीत राबवून यशस्वी होत नाहीत.. हा एक देश आहे पण त्यात छप्पन प्रांत, बाराशे भाषा अन सतराशे साठ अस्मिता..!
अन् मग कोणाकोणाच्या अस्मिता आपण संभाळायच्या?, कोणाकोणाची हुळहुळणारी धार्मिक खरूज खाजवत राहायची?
‘आस्तिक लोकांच्या भावना’ हा मोठा गहन प्रश्न आहे. गहन अशासाठी की, ‘आस्तिक’ या एकाच संकल्पनेत मोडणा-यांचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे.. अगदी भाबड्या अस्तिकांपासून ते अगदी लबाड अस्तिकांपर्यंत असे सर्व या सदरात मोडतात..
जे लबाड आस्तिक असतात, ते ‘देव’ म्हणून जे काही मानतात, त्याला त्यांनी पार ‘पचवलेले’ असते. त्यामुळे ते लोक आस्तिकतेच्या आवरणाखाली जर वावरतात, तर मग त्यांच्या ‘भावनां’ची ‘कदर’ कशासाठी करायची? …कारण या लबाडांमुळेच धर्म उंबऱ्यातून बाहेर रस्त्यावर आलेला आहे. व त्याचा सर्वांनाच् उपद्रव होतो…
या तथाकथित श्रद्धाभावनांमधूनच नको त्या अंधश्रद्धा पसरतात. त्यात या लबाडांबरोबरच “भाबडे आस्तिक”ही बरोबरीने कळत-नकळत सहभागी असतात आणि ओढले जातात..
वरचे दोन paragraphs कळण्यासाठी एक उदाहरण सांगतो…
“साई” नावाच्या चांगल्या व्यक्तीचा अवास्तव आणि चमत्कारी स्तोम लबाड आस्तीकांनी पद्धतशीर पसरविला आणि वाढवला.. त्यासोबत आता भाबडे अस्तिकही ‘बाबा बाबा’ म्हणत त्याच्यात ओढले गेलेत, अथवा सहभागी झालेत.. आणि आता याविरुद्ध ब्र जरी काढला तर हे लबाडआस्तिक त्यांच्या भावना दुखावल्याचं नाटक करतात (खरंतर साई यांनीच बनवलेला आणि वाढवलेला असतो बरं का!).. आणि मग हे लबाड लोक, भाबड्या अस्तिक लोकांना, विवेकी बोलणाऱ्याच्या विरोधात चिथावुन देतात… आणि वर हेच भाबडे आस्तिक लोक आपल्या कानी कपाळी सांगत राहतात- ते देवस्थान किती समाजसेवा करतं ते बघ, किती जेवण देतं ते बघ, अरे ते काय तुला बोलवायला येतात का? तुला पटत नसलं तर तू जाऊ नको ना तिथं, पण उगीच दुसऱ्याला कशाला शहाणपणा शिकवतो.. ईतर कितीतरी सामाजिक प्रश्न आहेत त्यात लक्ष घाल.. वगैरे वगैरे…
…. मग असंच हि एका जागी हुळहुळणारी धार्मिकभावनेची खरूज सगळ्या अंगभर पसरते.. आणि मग इच्छा असो वा नसो, प्रत्येकाला ती थोडी थोडी खाजवावीच लागते… नाविलाजाने पावत्या फाडाव्या लागतात… नाविलाजाने मिरवणुका सहन कराव्या लागतात… नाविलाजाने बोकडं कापावी लागतात… नाविलाजाने सत्यनारायण घालावे लागतात…
असंच आपल्या आधीच्या कुणीतरी खाजवून खाजवून मोठ्या केलेल्या खरुजांचे नाविलाज आपल्याला कायम भोगावे लागतात.. इच्छा असो वा नसो…!! म्हणून असला धर्म उंबरठ्या बाहेर येण्यामुळे सगळ्यात जास्त सात्विक संताप जर कुणाला होत असेल तर ‘नास्तिकाला’.!!. मला रस्त्यावर जाताना रस्त्यात मधोमध ठोकलेल्या शेडचा होणारा त्रास यावर अवलंबून नसतो की ते शेड गणेशोत्सवाचे आहे अथवा मोहरमचे अथवा आंबेडकर जयंतीचे किंवा अजून कुणाच्या अस्मितेच्या बेगडी प्रदर्शनाचे. या गोष्टींचा त्रास सगळ्यांनाच होतो, पण “सात्विक संताप” होतो तो फक्त नास्तिकाचा..!!
**
मी नास्तिक आहे. परीक्षेत जसा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असतो, त्याच्या उत्तरात शेवटचा पर्याय असतो – ‘वरील पैकी कोणताही नाही (None of Above)’. तसाच माझ्या पुढे प्रश्न होता- ‘तुझा धर्म कोणता?’ त्याला माझ्याकडे तो शेवटचा पर्याय होता – ‘वरील पैकी कोणताही नाही’. भारतीय घटनेने मला तो पर्याय निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. या शेवटच्या पर्यायाचे प्रचिलित नाव ‘नास्तिक’ असे आहे.
दुःख, संकट, आजार ही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा देव-धर्म, पाप-पुण्य, आत्मा-पुनर्जन्म याच्याशी काहीही संबध नाही. वैज्ञानिक प्रगतीने यातील बऱ्याच गोष्टी कमी केल्या आहेत व पुढेही कमी होत जातील. परंतू माणूस स्वतःच्या अविवेकीपणामुळे त्यात वेगाने भर घालत आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुता, न्याय या व अशा मुल्यांची जपणूक करून “विवेकी समाजा”कडे वाटचाल करणे, हा नास्तिकत्वाचा गाभा आहे. म्हणून सामाजिक जीवनात मी “धर्मनिरपेक्ष विवेकवादी” आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल अधिकार आहेत. परंतू त्याने इतरांच्या अधिकारांवर आक्रमण होता कामा नये, ही मूलभूत अट आहे. म्हणून जेव्हा एखादा समूह वायू, जल, ध्वनी, विचार, आचार प्रदूषण करतो. सामाजिक स्वास्थ बिघडेल अशी कृती करतो, तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. परंतू अशा परिस्थितीत माझा प्रतिवादी तो समूह नसून शासन, पोलिस व न्याय व्यवस्था आहे, असे मी मानतो कारण अशा गोष्टी रोखण्याची जबाबदारी त्यांची आहे व तेच त्याला उत्तरदायी आहेत.
**
देवाला आणि संस्थात्मक धर्माला विरोध न करता अंधश्रद्धेचे निर्मूलन होणे शक्य नाही. कारण अंधश्रद्धेचा मूलाधार ‘देव’कल्पना आणि देवकल्पनेचे संगोपन करणारी संस्थात्मक ‘धर्म’संकल्पना आहे. माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. पण देव आणि धर्म यावर विश्वास असणारे लाखो लोक माझ्या भोवती आहेत त्यांच्यापासून ‘तुटून पडण्यावरही’ माझा विश्वास नाही… त्यांना माझ्या बरोबर खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे, पण विचारात मात्र करणार नाही… म्हणून वैयक्तिक जीवनात मी ‘नास्तिक’ असलो तरी, मित्रांना व माझ्या वर्तुळातील लोकांना सामोरे जाताना मात्र मी ‘विवेकवादी’ आहे, आणि समाजकारणात मी ‘धर्मनिरपेक्ष’ आहे…
आत्ताच्या नव्या विज्ञान युगात ‘धर्म’ ही गोष्ट सामाजिक ( व म्हणूनच नियंत्रक) न राहता ती व्यक्तिगत झाली पाहिजे. पाश्चात्य देशांच्या रुपाने आपल्यापुढे मोठे उदाहरण आहे की कसे त्यांनी योग्य वेळेस [धर्म आणि समाज] व [धर्म आणि राज्य] या गोष्टी वेगळ्या ठेवून, लोकशाही व विज्ञान या गोष्टींची कास धरून समाजाचा विकास साधला. आपल्या सामाजिक राजकारणात देखील अशी धर्मनिरपेक्षता मला अभिप्रेत आहे. आपल्याकडे जोपर्यंत या गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत आपल्या लोकशाहीला सुद्धा अर्थ नाही.
असो,
हा माझा व्यक्तिगत प्रवास आहे. माझ्यापेक्षा वेगळ्या विचाराने आयुष्य जगणाऱ्या माणसांपर्यंत मला पोहचायचं आहे. देव, धर्म, अंधश्रद्धा यामुळे होणारी दिशाभूल, फसवणूक, शोषण, विवेकबुद्धीचा ऱ्हास आणि त्यापायी उद्ध्वस्त होणारी माणसांची आयुष्यं याची मला काळजी वाटते. त्यासाठी त्यांना समजावून घेत, त्यांच्याशी संवाद होण्याची मला गरज वाटते.
धन्यवाद..
(आभार- विद्या बाळ, मंगेश सपकाळ, मुग्धा कर्णिक, इ.)

मित्रांसोबत शेअर करा.

2 thoughts on “मनोगत”

  1. सचिन लांडगे, विनय काटे, आनंद शितोळे, तुमचे लेख वाचून वाचून मी अजून प्रखर नास्तिक झालोय.
    खूप शिकतो मी तुमच्या कडून.
    लिहीत रहा 👍🏼 शुभेच्छा 🌹

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *