खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका मालकाला वाटलं आपल्या गुलामाच्या गळ्यात एक पट्टा बांधावा, जेणेकरून इतरांना समजेल की हा गुलाम “पाळीव” आहे..
त्याने बांधला पट्टा..
पट्टा बांधताना त्याने गुलामाला त्याचे फायदे तोटे सांगितले का, किंवा गुलामाचे मत विचारात घेतले का, वगैरे प्रश्न येथे गौण आहेत.. कारण, गुलामांना स्वतःचे मत असायचा काळच् नव्हता तो..
पण नंतर नंतर हे लोण पसरत गेलं.. आणि जसा जसा काळ जाऊ लागला तसं तसं गुलामांना पण त्या पट्टयाचा भलताच अभिमान वाटू लागला.. पट्ट्याची महत्ता वाढली.. पट्टा मिळविण्यातच जन्माचं सार्थक आहे असंही मालकांकडून शिकवलं जाऊ लागलं.. आणि जुने जाणते गुलामही तसंच सांगू लागले.. अशिक्षित गुलाम म्हणाले, हे शिकलेले तितके हुकलेले असतात, प्रथा पाळत नाहीत काही नाही.. संस्कृतीबुडवे कुठले.!
शिकलेल्या गुलांमांनी जरा डोकं वापरलं; पण एक्सक्युजेस देण्यासाठी.. ते म्हणाले, पट्टयांकडे केवळ एक दागिना म्हणून पहा.. फॅशन म्हणून पहा.. काही म्हणाले, त्याच्याकडे केवळ एक प्रेमाचं प्रतीक म्हणून पहा.. काही अतिशहाण्या गुलांमांनी मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला, म्हणाले, पट्टयापेक्षा गुलामांचे इतर प्रश्न महत्वाचे आहेत, त्याकडं आधी पहा.. तर काहींनी कांगावा केला की, आम्हाला मालकाचं किंवा कोणाचं कंपल्शन कुठंय, आम्हाला आवडतो म्हणून आम्ही स्वतःच घालतो पट्टा.. ते एक ‘सेन्स ऑफ बिलॉंगिंग’ आहे.. ते आपल्या माणसाच्या प्रेमाचं प्रतीक आहे वगैरे वगैरे..
पण कंपल्शन केवळ मालकाचं किंवा मालकाच्या घरच्यांचंच नसतं , तर पट्टा घालणं हा एक “सामाजिक दबाव” असतो, आणि तो तुमच्याही कळत नकळत हजारो वर्षांच्या रूढी परंपरांतून झिरपत येऊन तुमच्यावर नैतिकदृष्ट्या हावी होत असतो, हे त्यांच्या गावीही नव्हतं..
‘पट्टा न घालणे’ हा पर्याय जरी सध्या उपलब्ध असला तरी पट्टा गळ्यात नसेल तर समाजातल्या भुभुक्षित नजरांचे आपण शिकार होतो, हे काहींना समजत नव्हते असे नाही, पण तिथे त्यांची मजबुरी होती.. सावित्रीबाई जन्माव्या, पण दुसऱ्याच्या घरात! असाच बहुतांश कल होता..
मध्यंतरी जरी काळ भराभर सरकत गेला.. जग बदललं, परिमाणे बदलली, संकल्पना बदलल्या.. मालकीची भावना आणि पाळीवपणा याचा नव्याने विचार सुरू झाला.. जरी पट्टामुक्तीच्या संघटनाही आल्या, पण त्याने फारसा फरक पडला नाही.. पिक्चर आणि टीव्ही मालिकांमधूनही पट्टयाची महानता ठसवणं सुरूच राहिलं.. पट्यासोबत इतरही “पाळीवपणाच्या गोष्टी” पूर्वीपासून जोडल्या गेल्या होत्याच.. त्यांच्याशी शकुन अपशकुनही जोडले गेले होतेच.. आणि आता तर त्या सगळ्यांचच् उदात्तीकरणही जोरदार होऊ लागलं.. अगदी दारूसाठी मालक सगळे दागिने ओरबाडून घेऊ लागला तरी गळ्यातला पट्टा घेऊ न देण्यात गुलाम धन्यता मानू लागले.. “भलेही आप मुझे मार डालो, पर यें पट्टा मैं तुमको नहीं दूँगी” वगैरे डायलॉग ऐकले की समस्त समाजाचे ऊर भरून येऊ लागले.. पट्टयाला शिवून घेतलेल्या शपथांना किंमत मिळू लागली, वगैरे.. कारण त्यात कोणाला काही वावगं वाटतंच नव्हतं.. पट्टयासोबत जी “सोशल स्युडोसेक्युरिटी” मिळते त्याचं मोल मालक गुलाम सगळेच् जाणत होते.. मग भलेही तो विधिपूर्वक घातलेला असो, वा दोन तासांसाठी लॉजवर जाण्यासाठी नकली का घातलेला असेना..
इथे मालकीहक्काच्या या सर्व गोष्टींसोबत संस्कृतिरक्षणाचा मुलामा तर होताच, पण नंतर नंतर त्यात मार्केटिंगचा छुपा पर्पजही ऍड झाला..
मग पट्टयाचे सुंदर सुंदर प्रकार आले.. मण्यांचे पट्टे आले.. सोन्याचे पट्टे आले, त्याची नवनवीन डिझाइन्स आली.. पट्टयांचे सेल लागू लागले.. तशा जहिरातीही होऊ लागल्या.. काही सोनारांनी पट्टयांचे महोत्सव भरवले, भरगोस डिस्काऊंट जाहीर केले.. आणि I wear it with pride च्या जाहिराती झळकविल्या..
मग काय, गुलामही स्वतः छान छान पट्टे सिलेक्ट करू लागले.. आणि पट्यासाठी हट्टही धरू लागले.. सन्मानच् जणू तो!!
असो..
पण दागिना असो, फॅशन असो, संस्कृती असो, कमिटमेंट असो वा मजबुरी असो.. पाळीवपणा घालवायचा असेल तर पट्टामुक्ती पण अपरिहार्य आहे, हे जोपर्यंत गुलामांना समजणार नाही, तोपर्यंत हे एक्सक्युजेस देणं चालूच राहणार आहे..
चला तर मग गुलामांनो, आधुनिकतेनं आणि शिक्षणानं मिळालेली बुद्धी वापरून तुम्ही फक्त स्वतःसाठी एक्सक्युजेसच् शोधत रहा, आणि डिफेन्ड करत रहा.. पण समाजाच्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला स्वतःपासून सुरुवात काही करू नका..
स्वतःला बदल करता येत नसेल तर एकवेळ ठीक आहे, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन किंवा उदात्तीकरण तरी करू नका, किंवा ज्या कोणी समाजाच्या नाकावर टिच्चून गोष्टी स्वतःपुरत्या बदलतात, त्यांना कमी तरी लेखू नका..