मांसाहार करणं अजिबात वाईट नाही, पण देवाधर्माच्या नावाखाली बळी किंवा कुर्बानी देणं हे मात्र निश्चित चूक आहे.. देवासाठी कोंबडा बळी देण्याची प्रथा जशी मला मंजूर नाही तसे बकरी ईदच्या निमित्ताने अल्लाहला बोकडाची कुर्बानी द्यायचा प्रकार मला अजिबात मंजूर नाही, आणि याचा सरळ सरळ विरोध आपल्यासहित सर्वच् समाजाने करायला हवा.. पण त्याला उगीच धार्मिक चढाओढीचा रंग देणे हे मात्र आपल्यातल्या धर्मांधतेचेच् लक्षण आहे..
अंनिस’नेच् अश्या अनिष्ट गोष्टींना विरोध करावा असा हक्क वगैरे काही त्यांनी घेतलेला नाही.. किंवा तो फक्त त्यांचाच प्रांत आहे असे पेटंटही त्यांना कोणी दिलेले नाही.. खरंतर, सुधारणांचा वसा साऱ्या समाजानेच घ्यायला हवा..
**
आता पहिला मुद्दा प्राणिहत्येचा –
या देशात मांसाहारी लोकांच्या आहारासाठी रोजच्या रोज लाखो बोकड, कोंबड्या, म्हशी मारले जात आहेत. आणि त्यांचे मांस ख्रिस्ती, मुसलमानांप्रमाणे हिंदूही मिटक्या मारत खात आहेत.
काही अपवाद वगळता जवळजवळ सर्व धर्म मानवी आणि पशुहत्येला कारणीभूत झाले आहेत. धार्मिक लढायात आजवर लाखो माणसे प्राण गमावून बसली आहेत. पशुबळी बद्दल बोलायचे झाले तर… हिंदू देखील कोंबडी वगैरे देवाला अर्पण करतात. वेदकाळात यज्ञात पशुबळी देण्याची प्रथा होती.
अतिथी देवो भव — हे तत्त्व समजावण्यासाठी ज्यांनी मुलांच्या मनावर चिलया बाळाची कथा बिंबवली, आणि ‘बालकाला ठेचून त्याचे मांस अतिथीला अर्पण करणे’ हे अतिथीसाठी केलेल्या असीम त्यागाचे उदाहरण म्हणून पेश केले.. गणपतीवर हत्तीचे मुंडके बसवून बुद्धीचे दैवत मानल्या गेलेल्या गणपतीची जन्मकथा ज्या समाजाने अभिमानाने मिरवली.. त्या समाजाला विशिष्ट दिवशीच “प्राणीहत्या” विरोधाचा पुळका येणे अत्यंत हास्यास्पद आहे..
बकरी ईद ला होणारी हत्त्या म्हणजे “निरपराध” जीवांचा बळी असेल तर रोज होणा-या कत्तलखान्यातल्या हत्या या “अपराधी” जीवांच्या असतात का?
जेवढा बकरी किंवा कोंबडीला जीव असतो तेवढाच एखाद्या माशी किंवा डासालाही आपला जीव प्यारा असतो… आपल्या घरात एका रात्रीत ‘ऑल आऊट’ लावून आपण किती हत्या करतो किंवा शेतातल्या एका फवारणीत आपण किती जीव मारतो, याची गिणती नाकारायची का? त्यांना जीव नसतो का? झाडांना, रोपांना, भाज्यांना जीव नसतो का?
एका माणसाच्या शरीरात जगाच्या एकून लोकसंख्येइतके अफाट सूक्ष्मजीव सुखाने नांदत असतात. मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटि) दर मिनिटाला हजारो जीवाणू आणि विषाणुं आपोआप मारत असते ! अगदी खोलात जाउन सांगायचे तर आपल्या डोळ्याच्या पापणीच्या एका उघडझापेत काही शेकडा सूक्ष्मजीव त्यातील एंझाईम्समुळे मरतात.. वातावरणातून अन्नातून लाखो सूक्ष्मजीव शरीरात प्रवेशत असतात. केवळ ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्वच नाकारायचे का.?
समजा आपण रोज जरी मटण खाल्लं तरी आपण आपल्या आयुष्यात इतक्या बकऱ्या मारणार नाही, तितके जीव आपण रोज मारतो किंवा तितकी रोपे आपण रोज कापतो..!!
मग हा टोकाचा सिलेक्टिव्ह अतिरेक कशासाठी..?
**
आता दुसरा मुद्दा ‘इको फ्रेंडली’चा –
इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याबद्दलचा एक खवचट मेसेज सोशल मीडियात फिरतो आहे, पण हा मेसेज ‘फसवा’ आहे..
बकरी ईद हि ‘इकोफ्रेंडली’च् असते.. बकरीसहित सगळं biodegradable असते.. “पर्यावरणाला धोकादायक” काहीही नसते.. (‘इको फ्रेंडली’ची व्याख्या गुगलवर वाचा हवी तर!)
**
बकरी ईद मधल्या कुर्बानीचा विरोध नक्की करावा, पण तो ‘प्राणिहत्येचे पाप’ किंवा ‘इको फ्रेंडली’ या लेबलखाली नव्हे तर, देवाधर्माच्या नावाखाली बळी किंवा कुर्बानी देणं हे चूक आहे आणि बळी देण्याची प्रथा जशी मला मंजूर नाही तसे बकरी ईदच्या निमित्ताने अल्लाहला बोकडाची कुर्बानी द्यायचा प्रकार मला अजिबात मंजूर नाही, अशी सरळ सरळ भूमिका घेऊन…
पण या मुद्द्याला “ते आणि आम्ही” असा उगीच धार्मिक चढाओढीचा रंग देणे, किंवा ‘इको फ्रेंडली’ सारखी फसवी लेबलं लावणे, हे आपल्यातल्या धर्मांधतेचे लक्षण आहे.. मग आपलेही ‘तालिबानीकरण’ व्हायला वेळ लागणार नाही…