डॉक्टर काय लागतील ते उपचार करा, आम्ही पैसे देऊ.. पण सध्या आमच्याकडे नाहीत.. आम्ही काय पळून चाललोय का?!!
- हे डायलॉग डॉक्टरांसाठी नेहमीचेच असतात..
कारण, आपल्या देशात “आरोग्यासाठी” पैसे बाजूला काढून ठेवण्याची पद्धतच नाही.. जेणेकरून कधीही लागल्यास लगेच ATM मधून काढता येतील.. मग विमा (मेडिक्लेम) असणं तर दूरची गोष्ट आहे..
अचानक काही उद्भवलं की लगेच पळापळ सुरू होते..
बरं.. स्वतःचं ‘क्रेडिट’ तर असं की, जवळचे नातेवाईक पण पैशाची मदत करायला टाळतात.. मग डॉक्टरांकडूनच अपेक्षा केली जाते की त्यांनी डिपॉझिट न घेता उपचार चालू ठेवावेत.. माणुसकी काही आहे की नाही डॉक्टरला.!!
तुमच्यावर वेळ आली आहे म्हणून डॉक्टरांनी ती समजून घ्यावी अशी अपेक्षा केली जाते.. पण डॉक्टरांसाठी तर हे रोजचेच असते.. त्यांना अनेक नमुन्यांची माणसे रोजच भेटत असतात.. अनेक प्रकारचे अनुभव आलेले असतात.. आणि तुमच्यावरची धोक्याची वेळ निघून गेल्यावर तुम्ही तुमची नियत बदलणार नाही कशावरून?? पैसे बुडवणार नाही कशावरून? किंवा कमी भरणार नाही कशावरून? आणि बिल बुडवून गेलेला पेशंट काही पुन्हा त्या डॉक्टरकडे येत नाही.. म्हणजे पेशंटही तुटला आणि पैसेही गेले..
लोकांची पैसे बुडवाबुडवीची वृत्ती वाढली म्हणून तर डॉक्टरांची डिपॉझिट भरून घ्यायची पद्धत सुरू झाली.. नाहीतर पूर्वी असं नव्हतं.. डॉक्टरांचा लोकांवर विश्वास असायचा.. आता विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिली नाहीये..
बिल भरायच्या वेळी लोक सरपंच नगरसेवकापासून ते आमदार किंवा गुंडांपर्यंत कोणाचेही फोन घेऊन येतात.. निर्लज्जपणा आहे हा.. पेशंटसाठी ही क्वचित वेळ असेल तरी डॉक्टरांसाठी मात्र हे रोजच घडतंय.. मग डॉक्टरांनी आधीच काही पैसे भरून घेतले तर चूक काय आहे त्यात.? कोणाची नियत बदलणार नाही आणि कोणाची बदलेल हे डॉक्टरने कसे ओळखायचे..??
आणि पैशाचा प्रश्न असला की लोक बापाला भावाला पण धोका देतात, मग डॉक्टर काय चीज आहे.? आणि डॉक्टरनं का म्हणून लोकांना फुकटात सेवा द्यायची? तुमच्या उपचारासाठी लागणारी कोणती गोष्ट डॉक्टरला फुकट मिळते म्हणून त्यांनी तुम्हाला फुकट उपचार द्यावेत? माफ करा, तुम्हाला हे लिहिलेलं उद्धट वाटेल, पण वस्तुस्थिती अशीच आहे.. तुमच्याकडे पैसे नसताना दुसरं कोणतं क्षेत्र तुम्हाला एंटरटेन करतं सांगा??
कोर्ट पण मोठया ऐटीत व्हर्डीक्ट देतं की, “पैशांच्या कारणास्तव रुग्णालये पेशंटचा डिस्चार्ज किंवा बॉडी ताब्यात देणं रोखू शकत नाहीत”.. छान.. मग वसुली कशी करायची ते पण सांगा..! आपला कामधंदा सोडून डॉक्टरांनी वसुलीच्या पाठीमागे लागावे का?
सध्या डॉक्टरांकडून बिलं कमी करून देणे किंवा पैसे उकळवून देणे (Extortion), हा कित्येक गुंडांचा आणि राजकीय पुढाऱ्यांचा साईड बिझनेसच झाला आहे.. प्रत्येक गल्लीत एक सेटलमेंट करणारा दादा असतो.. आणि डॉक्टर हे समाजाचे सॉफ्ट टार्गेट आहे.. आपलं खरं असलं तरी, पेपरबाजी आणि बदनामीला घाबरतात डॉक्टर.. कारण कुठल्याही कुटाण्यासाठी डॉक्टरकडे ‘वेळ’ नसतो आणि ‘इच्छा’ही नसते म्हणून डॉक्टर प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रमाईज करतात, किंवा “जाऊ दे” म्हणून सोडून देतात.. आणि याचाच गैरफायदा हे गुंड उचलतात..
प्रत्येक डॉक्टर नेहमी अशा प्रकाराला सामोरं जातच असतात.. पण याउलट कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये असतं.. तिथं वरचे दोन रुपये पण सोडत नाही हॉस्पिटलचे मॅनेजमेंट.!! त्यांची वसुली सिस्टीम समर्थ असते.. वकील दिमतीला असतात.. लुटले गेले तरी तिथं नाही आवाज करता येत लोकांना.. मग त्याचा राग इकडे छोट्या हॉस्पिटल्सवर काढत बसतात.. कॉर्पोरेट हॉस्पिटल्स ही मोठ्या उद्योग समूहांची असतात, तिथं डॉक्टर्स नोकरीवर असतात, तिथलं बिलिंग डॉक्टरच्या हातात नसते हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं.. असो..
मूळ मुद्दा काय आहे, समजा ऍक्सिडेंट झालाय किंवा इतर इमर्जन्सी आहे आणि नातेवाईक जमा होईपर्यंत किंवा पैसे जमा होईपर्यंत उपचार थांबायला नको हे कोणीही मान्य करेल.. आणि कोणताही डॉक्टर अशावेळी इमर्जन्सी उपचार टाळत किंवा थांबवत वगैरे नाहीत.. असं फक्त टुकार आणि गल्लाभरू पिक्चरमध्येच दाखवत असतात.. “पेशंट अगर मर रहा हो तो भी पहले फ़ॉर्म भरो, या पैसे भरो फिर तुम्हारे पेशंट को हम देखते हैं” असं अजिबात अजिबात नसतं.. डॉक्टरसोबत कॅज्युअल्टीत एक दिवस घालवून पहा मग कळेल.. ह्या पिक्चरनी तर डॉक्टरांची इमेज खूपच भडक दाखविली आहे.. मेडिकल सायन्स विषयी असलेल्या अतिअज्ञानाचा कळस म्हणजे भारतीय चित्रपट!!
असो..
पण अशा प्रकारच्या अति इमर्जन्सी केसेस किती असतात..? 99 टक्के वेळा तर असं नसतं ना..! मग लोक गाफील का राहतात..? अशा प्रकारच्या इमर्जन्सीसाठी पैसे ठेवायला लोकांनी शिकायला हवं ना..! दवाखान्यात जाताना डिपॉझिटसाठी पैसे घेऊन जावे किंवा डेबिट कार्ड सोबत न्यावे, हे प्रत्येकाला कळायला हवं.. डॉक्टरांनीच कुठवर समाजावर एकतर्फी विश्वास ठेवावा.. समाजाने पण बदलत्या काळाची परिमाणे अंगीकारली तर बरं होईल..
डिपॉझिट किंवा ऍडव्हान्स म्हणून एक किंवा दोन दिवसांच्या उपचाराचेच पैसे भरून घेतले जातात, किंवा ऑपरेशन असेल तर खर्चाच्या ठराविक टक्के रक्कम भरून घेतली जाते.. पूर्ण बिल आधीच भरून कोणी घेत नाही.. वेळोवेळी बिलाची पूर्वकल्पना देऊन पण शेवटी नातेवाईक तोंडं वाकडी करतातच.. लग्नाच्या बस्त्यासाठी पैसे असतात, मल्टिप्लेक्स साठी पैसे असतात, बर्थडे पार्टी किंवा डिनर साठी पैसे असतात.. पण आरोग्यासाठी मात्र उदासीनता असते.. याचं कारण लोकांनी प्रॉपर प्लॅनिंगच केलेलं नसतं कधी.. आपल्या इन्कमचा ठराविक हिस्सा आरोग्याच्या तरतुदीसाठी वेगळा शिल्लक ठेवायचा असतो, किंवा आरोग्याचा वेगळा विमा असतो.. तो काढायचा असतो, हे बहुतांश जणांच्या गावीही नसते..
बऱ्याच सुशिक्षितांना पण मेडिक्लेमचे हप्ते भरणं म्हणजे पैसे वाया घालवणं असंच वाटतं..! सांगितलेल्या रक्ताच्या टेस्टस नॉर्मल आल्या की खुश होण्याऐवजी पैसे वाया गेल्याचे वाईट वाटणारा भारत हा एकमेव देश असावा!!
पाश्चात्य देशात प्रत्येकजण इन्श्युअर्ड असतो.. प्रत्येकाचा आरोग्यविमा असतो.. आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकजण जागरूक असतो.. आणि आपण बसलोय इकडं डॉक्टरने डिपॉझिट घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे यावर वाद घालत..
कुठलीही वस्तू किंवा सेवा फुकट मिळत नाही, तर त्यासाठी मोबदला द्यावा लागतो, म्हणून खाजगी वैद्यकीय सेवा देखील फुकट मिळणार नाही हे समाजाला अजून पटतच नाहीये.. वैद्यक व्यवसाय हा अर्थव्यवस्थेच्या ‘सेवा क्षेत्रातील’ एक ‘व्यवसाय’आहे. कायद्याच्या आणि सरकारच्या दृष्टीने तो व्यवसायच आहे, पण समाज अजूनही “सेवा” शब्दाचा स्वतःच्या सोयीचा अर्थ काढून गैरसमजात आहे.. समाज डॉक्टरांना व्यावसायिक म्हणून जितक्या लवकर स्वीकारेल तितकं दोघांसाठीही चांगलं आहे..