“भावना” हा खूप मोठा प्रांत आहे. तो एकट्या आस्तिकांचा प्रांत नाही. पण समाजानं असं घाबरून त्यांचा ‘प्रांत’ करून दिलाय. कारण ते मग लहान मुलासारखं चिडून-रडून हिंसक होतात.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं उन्मादीच् असतं, सतत कानावर स्पीकर अन् डीजेचा ध्वनीमैथुन होत असतो, गल्ली बोळं रस्ता काही काही म्हणून सोडत नाहीत.. आणि यावर बोलावं तर भावना दुखावतात म्हणे… का म्हणून कोणी कोणाच्या श्रद्धांना कुरवाळायचं ? ‘कुणामुळेही तुमच्या भावना दुखायला नकोयत’, हे का म्हणून आपण त्यांना ठणकावून सांगत नाही?
ज्या श्रद्धा कुणामुळे डगमळतात, त्या श्रद्धा “कुठल्या आधारावर” उभ्या आहेत ? आणि साला, या श्रद्धा म्हणजे पार्श्वभागावरचा फोड झालाय यांच्या, कुणीही येवून दुखावू शकतो.
ज्या धर्मात हिंसा होते, जो धर्म तुम्हाला हिंसा करण्यास प्रवृत्त करतो, ते तुमचे सर्व धर्म ‘कचऱ्याच्याही लायकीचे नाहीत’.. एकतर तुमच्या धर्माची शिकवण तरी चुकीची आहे, नाहीतर तुम्ही चुकीचा धर्म तरी शिकलेला आहात. तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ. माझी नास्तिकता माझ्याजवळ. तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि मी माझं. मी तुमच्यासारखा भावना दुखावून घेणार नाही. तुम्हाला धमक्या देणार नाही. तुमची डोकी फोडायला येणार नाही.
…पण एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही गांधी नाही आणि तशी व्हायची बिलकुलही इच्छा नाही. इट का जवाब पत्थरसेही मिलेगा. धर्मांध गाढवांशी वैचारिक समागम करण्यात मला अजिबात रस नाही.
इथे कुणीही कुणाची वेडगळ श्रध्दा दुखवायची नाही म्हणून सार्वजनिक अवकाशात चाललेला गोंधळही थांबवू पाहात नाहीत. उलट “ते” करतात तर आम्ही का नाही? अशी सर्वच समाजाची मानसिकता दिसते.. “त्यांनी लावला तेव्हा तुम्हाला त्रास झाला नाही, तेव्हा का नाही बोललात”.? असा युक्तिवाद..
लोकानुनयाच्या राजकारणात हिंसक उन्माद तर अनुयायांच्या शब्दांशब्दांतून सांडत चालला आहे. शस्त्र धरा, तयारी करा, यांना धडा शिकवा असे सांगणाऱ्या अनेक हिंदू मुस्लिम वेबसाइट्स सुरू आहेत. मुस्लिम धर्माच्या दहशतवाद्यांनी मूर्खपणाच्या, क्रौर्याच्या सर्व सीमा पार करायला केव्हाच सुरुवात केली आहे. त्या दहशतवादाला खणखणीत विरोध न करणारे इस्लामचे रूढीप्रिय पाईक यां मूर्खांच्या आगीत भरच घालतात.
एकूणात सारीकडचे धर्मवेडे मानवजातीतला गोंधळ अधिकच माजवत चालले आहेत.
यात विवेकाचे थोडेथोडे आवाज, त्यांना वाटणारी व्याकुळता, याचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी, ‘भूमिका न घेणारी’ अधली मधली बोटचेपी माणसेच अधिक घाण करीत आहेत.. सम्यक भूमिका घ्या कारण भावना दुखावून उलटंच होत असते, म्हणे!
हेच नास्तिकांना सांगतात – टोकाची भूमिका घेऊ नका, ज्याला जे हवंय त्याला ते करू द्या, कोणाच्या धार्मिक भावनांना दुखवू नका. नास्तिकांनी जर सबुरीने नाही घेतलं तर अराजक माजेल…
मग मी म्हणतो, आता अजून काय अराजक माजायचं राहिलंय?
कुठवर एक भाऊ वेडेपणा करतोय आणि जास्तीच करेल, म्हणून दुसऱ्यालाच् सबुरीचा आणि शहाणपणाचा सल्ला देणार आहोत आपण?
भारत देश खूपच डायव्हर्सिटी असणारा देश आहे. त्यात छप्पन प्रांत, बाराशे भाषा अन सतराशे साठ अस्मिता..!
अन् मग कोणाकोणाच्या अस्मिता आपण संभाळायच्या?, कोणाकोणाची हुळहुळणारी धार्मिक खरूज खाजवत राहायची?
‘आस्तिक लोकांच्या भावना’ हा मोठा गहन प्रश्न आहे. गहन अशासाठी की, ‘आस्तिक’ या एकाच संकल्पनेत मोडणा-यांचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे.. अगदी भाबड्या अस्तिकांपासून ते अगदी लबाड अस्तिकांपर्यंत असे सर्व या सदरात मोडतात..
जे लबाड आस्तिक असतात, ते ‘देव’ म्हणून जे काही मानतात, त्याला त्यांनी पार ‘पचवलेले’ असते. त्यामुळे ते लोक आस्तिकतेच्या आवरणाखाली जर वावरतात, तर मग त्यांच्या ‘भावनां’ची ‘कदर’ कशासाठी करायची? …कारण या लबाडांमुळेच धर्म उंबऱ्यातून बाहेर रस्त्यावर आलेला आहे. व त्याचा सर्वांनाच् उपद्रव होतो…
या तथाकथित श्रद्धाभावनांमधूनच नको त्या अंधश्रद्धा पसरतात. त्यात या लबाडांबरोबरच “भाबडे आस्तिक”ही बरोबरीने कळत-नकळत सहभागी असतात आणि ओढले जातात..
वरचे दोन paragraphs कळण्यासाठी एक उदाहरण सांगतो…
“साई” नावाच्या चांगल्या व्यक्तीचा अवास्तव आणि चमत्कारी स्तोम लबाड आस्तीकांनी पद्धतशीर पसरविला आणि वाढवला.. त्यासोबत आता भाबडे अस्तिकही ‘बाबा बाबा’ म्हणत त्याच्यात ओढले गेलेत, अथवा सहभागी झालेत.. आणि आता याविरुद्ध ब्र जरी काढला तर हे लबाडआस्तिक त्यांच्या भावना दुखावल्याचं नाटक करतात (खरंतर साई यांनीच बनवलेला आणि वाढवलेला असतो बरं का!).. आणि मग हे लबाड लोक, भाबड्या अस्तिक लोकांना, विवेकी बोलणाऱ्याच्या विरोधात चिथावुन देतात… आणि वर हेच भाबडे आस्तिक लोक आपल्या कानी कपाळी सांगत राहतात- ते देवस्थान किती समाजसेवा करतं ते बघ, किती जेवण देतं ते बघ, अरे ते काय तुला बोलवायला येतात का? तुला पटत नसलं तर तू जाऊ नको ना तिथं, पण उगीच दुसऱ्याला कशाला शहाणपणा शिकवतो.. ईतर कितीतरी सामाजिक प्रश्न आहेत त्यात लक्ष घाल.. वगैरे वगैरे…
…. मग असंच हि एका जागी हुळहुळणारी धार्मिकभावनेची खरूज सगळ्या अंगभर पसरते.. आणि मग इच्छा असो वा नसो, प्रत्येकाला ती थोडी थोडी खाजवावीच लागते… नाविलाजाने पावत्या फाडाव्या लागतात… नाविलाजाने मिरवणुका सहन कराव्या लागतात… नाविलाजाने बोकडं कापावी लागतात… नाविलाजाने सत्यनारायण घालावे लागतात…
असंच आपल्या आधीच्या कुणीतरी खाजवून खाजवून मोठ्या केलेल्या खरुजांचे नाविलाज आपल्याला कायम भोगावे लागतात.. इच्छा असो वा नसो…!! म्हणून असला धर्म उंबरठ्या बाहेर येण्यामुळे सगळ्यात जास्त सात्विक संताप जर कुणाला होत असेल तर ‘नास्तिकाला’.!!. मला रस्त्यावर जाताना रस्त्यात मधोमध ठोकलेल्या शेडचा होणारा त्रास यावर अवलंबून नसतो की ते शेड गणेशोत्सवाचे आहे अथवा मोहरमचे अथवा आंबेडकर जयंतीचे किंवा अजून कुणाच्या अस्मितेच्या बेगडी प्रदर्शनाचे. या गोष्टींचा त्रास सगळ्यांनाच होतो, पण “सात्विक संताप” होतो तो फक्त नास्तिकाचा..!!