दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न मिटल्यावर मग माणसांचे बाकीचे उद्योग सुरू होतात..
१. माणसाला मग आपल्यासारखी मतं असणारी (like minded) किंवा आपल्यासारखाच विचार करणारी माणसं जवळ करावीशी वाटतात..
२. मग अशा समविचारी लोकांचे गट, ग्रुप, मंच, फोरम, संघ, संघटना, सांप्रदाय, पक्ष, धर्म बनतात..
३. मग आपल्या आयडियलॉजीचे गोडवे गाणारे ग्रंथ लिहिले जातात.. त्यात ‘आपलीच लाल’ करणाऱ्या थियऱ्या मांडल्या जातात.. त्याचे आपल्याला सोयीस्कर असे दाखले दिले जातात.. आपल्या आयडियलॉजीच्या समर्थनाचे लेख लिहिले जातात.. आरत्या गायल्या जातात..
४. मग त्यांना, आपल्या आजूबाजूला पण आपल्याच विचारांची माणसं असावीत/राहावीत असं वाटायला लागतं.. मग यांची गल्ली, वस्ती, अपार्टमेंट, गाव, शहर होते.. मग चालणं-बोलणं, खाणं-पिणं, वागणं-नेसणं, याचे आपल्या आयडियोलॉजीत सांगितलेलेच नियम पाळणे सुरू होते..
हे इथपत ठीक आहे की..
५. पण मग नंतर नंतर आपलेच विचार खरे किंवा आयडियल आहेत, आणि तेच सर्वांनी पाळायला पाहिजेत असं वाटायला लागतं..
हे मात्र ठीक नाही.. पण तरी चालवून घेऊ समजा..
५. पण मग “मी म्हणतो तेच बरोबर” असं वाटण्यातून आपले विचार आणि आपली आयडियलॉजी दुसऱ्यांवर ‘संक्रमित करणं’ सुरू होतं..
आपली आयडियलॉजी ‘खतरे में’ च्या अवया उठवल्या जातात.. “इसे आग की तरह फैला दो” अशी आवाहने केली जातात.. सोशल मीडियावर पोस्टींचा पाऊस पाडला जातो, पत्रकं वाटली जातात.. मेळावे भरवले जातात, सभा घेतल्या जातात.. आवेशपूर्ण भाषणे केली जातात.. आयडियलॉजी प्रेमाने भरलेल्या कविता गाणी आरत्या सादर होतात.. आपणच आपली पाठ थोपटून घेतली जाते.. आणि प्रचंड पोलरायझेशन सुरू होतं..
समविचारींचा समूह आता ‘कळपा’कडे वाटचाल करू लागतो..
पण गोष्टी इथंच थांबत नाहीत..
संक्रमणाचं रूपांतर अतिक्रमणात कधी होतं, तेच कळत नाही..
६. त्या पोलरायझेशन मधून विरुद्ध विचारसरणीला नामोहरम करणे सुरू होते.. विरुद्ध विचारांच्या लोकांचे ‘कॅरेक्टर असॅसिनेशन’ सुरू होतं.. पुतळे पाडले जातात.. प्रतीके हायजॅक होतात.. इतिहासाचं विकृतीकरण सुरू होतं..
विरोध करणाऱ्याला ‘द्रोही’ समजलं जातं.. असहमती दर्शविणाऱ्या प्रत्येकाला ‘दुसऱ्या देशात जा’ इथपासून ते ‘काट देंगे’, इथपर्यंतच्या धमक्या दिल्या जातात.. विचारांची लढाई आता फक्त ‘वैचारिक’ राहात नाही..
आपला विचार किंवा आपली आयडियलॉजीच श्रेष्ठ आहे, आणि तीच सर्वांनी मानावी, यासाठी वैचारिक परिवर्तनापेक्षा “बौद्धिक हिंसेचा” सहारा घेणारे हे लोक ‘वैचारिक दहशतवादी’ असतात..
या लोकांना हातात शस्त्र घ्यायची हिंमत नसते, म्हणून केवळ ते छुपा मार्ग अवलंबतात.. (पण संधी मिळाली की ते जमावात हिंसक व्यक्त होतात..)
७. ही शेवटची पायरी आहे.. इथे आपल्या आयडियलॉजीच्या टोकाच्या (आणि विकृत) विचारांनी संमोहित होऊन, एखादा गट किंवा संघटना बॉम्बस्फोट करते, गोळ्या घालते, आतंक माजवते.. आणि इतरांचा जगण्याचा हक्क नाकारते..
हे लोक, जे (आपला विचार आपली आयडियलॉजीच श्रेष्ठ आहे, तीच सर्वांनी मानावी, आणि म्हणून बाकीच्यांना जगण्याचा हक्क नाही यासाठी) हिंसेचा सहारा घेतात ते प्रत्यक्ष दहशतवादी असतात..
- –
आपल्यापैकी प्रत्येकजण यातल्या कुठल्यानं कुठल्या पायरीवरती असतो..
कुठलाही धर्म पंथ संप्रदाय याच मार्गाने जातो.. पटत नसेल तर दुसऱ्याचा धर्म किंवा पंथ डोळ्यांसमोर ठेवून वरच्या सगळ्या पायऱ्या पुन्हा वाचा.. हिंदू, मुस्लिम ख्रिश्चन सगळेच धर्म याच वाटेने गेलेत/जाताहेत..
वर्षोनुवर्षे हेच होत आलंय.. याच आयडियलॉजी पायी आणि आंधळ्या अभिमानांपायी युध्दे झालीत, रक्तपात झालेत, साम्राज्ये उलथलीत.. खूप वैचारिक, राजकिय आणि सामाजिक संघर्ष झालेत..
असो..
- –
आता दुसरीकडे,
ज्यांचा पोटाच्या भूकेचा प्रश्न मिटला नाही असा वर्ग असतो.. जगण्यासाठीचा मूलभूत संघर्ष हीच ज्यांची प्राथमिकता असते अशा लोकांना ही सगळी व्यवस्थाच (सिस्टीम) अन्यायी वाटत असते..
जी सिस्टीम आपल्याला माणूस म्हणून वागवत नाही, जी सिस्टीम आपल्याला बरोबरीचा दर्जा देत नाही, जी सिस्टीम आपल्या दोन वेळच्या भाकरीची सोय करू शकत नाही, त्या सिस्टिमचे गोडवे का म्हणून गायचे? त्या सिस्टीमचे नियम का म्हणून पाळायचे? त्या सिस्टीमला आपलं रिप्रेझेंटेशन का म्हणून मानायचं? असे प्रश्न जेंव्हा उपस्थित होतात, तेंव्हा त्याला “विद्रोह” म्हणतात..
हा खरंतर ‘वर्ग संघर्ष’ (क्लास कॉन्फ्लिक्ट) असतो, पण आपल्या भारतात तो जाती संघर्षाशीही (कास्ट काँफ्लिक्ट) साधर्म्य दाखवतो.. आणि ही जातीव्यवस्था धर्म सपोर्ट करतो, म्हणून मग यांना धर्माचेही वावडे असते..
या विद्रोहाला देखील आपल्या भारतात हजारो वर्षांची परंपरा आहे.. त्यांचेही इतिहास आहेत, त्यांचीही प्रतीकं आहेत, त्यांचेही महापुरुष आहेत, त्यांचीही संस्कृती आहे, आणि कला संगीत साहित्य आहे.. त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनही आहे.. आणि ते कायदेशीर आहे.. कारण, वेगवेगळे विचार बाळगण्याचं स्वातंत्र्य आणि समविचारी व्यक्तींचं संघटन करण्याची मुभा या देशाची घटनाच आपल्याला देते..
पण मग या वर्ग संघर्षात, त्यांच्यातलाही एखादा गट हिंसेचा मार्ग अवलंबतो, बॉम्बस्फोट करतो, गोळीबार करतो, तेंव्हा त्याला ‘नक्षलवाद’ म्हणतात..
- –
हा सारा ‘क्लास आणि कास्ट कॉन्फ्लिक्ट’ हा पॉलिटिकल लेव्हलवर मोठ्या प्रमाणात खेळला जातो..
एखाद्या समाजातील पुरोगामी वृत्तींना लेबले मारून टार्गेट करणे, हा इतिहासात अनेक वेळा दिसलेला ट्रेंड आहे. अगदी इस्लाम पासून ते कम्युनिस्ट लोकांपर्यंत सगळ्यांनी अशा “लेबल अँड टार्गेट” या नीतीचा अवलंब केलेला आहे.
आणि ज्या ज्या वेळी असे करण्यात ते यशस्वी झाले आहेत त्या त्या वेळी समाजाचे नुकसानच झाले आहे,
तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा.. तुम्ही डावे असा, उजवे असा.. तुम्ही सवर्ण असा, दलित असा.. तुम्ही कोणीही असा, तुमचा सामूहिक उन्माद हा उन्नतीकडं नेणारा असो वा नाशाकडं नेणारा असो, त्याची फळं मात्र समाजातल्या सगळ्यांनाच भोगावी लागतात हे वास्तव आहे..
नक्षलवाद्यांकडे बोट दाखवून या खूप मोठ्या सहनुभूतीदार वर्गाला, पुरोगामी, आणि डाव्या बुद्धिवाद्यांना, आणि विद्रोही चळवळीला टार्गेट करणे, आणि त्यांना “अर्बन नक्षल” असं म्हणणे सर्वथा चूक आहे.. (ज्या पद्धतीने, सनातन्यांनी बॉम्बस्फोट केला तर समस्त धार्मिक लोकांना “अर्बन सनातनी” म्हणणं चूक आहे, असं आपल्याला वाटतं, अगदी तसंच आहे हे!!)
मग याच न्यायाने गांधीजी ओरिजिनल “अर्बन नक्षल” ठरतात, तर नथुराम “स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी” ठरतो..
असो..
सामाजिक जाणिवा जागृत असणाऱ्या कोणत्याही सेन्सिटिव्ह व्यक्तीला या वर्गाबद्दल कणव असतेच.. मग या (सम्यक भूमिका असणाऱ्या आणि दबलेल्या पिचलेल्या लोकांचा सहनुभूतीदार वर्ग असणाऱ्या) पुरोगामी, बुद्धिवादी, सेक्युलर या मूल्यवादी लोकांना टार्गेट करणे, हा आता काही गटांचा National अजेंडा बनला आहे.. हा Propaganda यशस्वी होतो आहे हेही खरेच. (कारण जर लोक स्वतःला पुरोगामी म्हणवायला घाबरु लागले, तर तो Propaganada यशस्वी आहे असे म्हणावे लागेल.)
- –
नक्षलवाद ही पराभूत आयडियलॉजी आहे.. त्यांचं आणि त्यांच्या हिंसेचं समर्थन अजिबातच नाही.. पण त्याआडून जे पॉलिटिकल स्कोअर सेटल केले जातात त्याचं काय?
नक्षलवादाचे उदात्तीकरण होते आहे आणि तरूण नक्षलवादी होत आहेत, हे एक तद्दन बालिश आर्ग्युमेन्ट आहे. कुणी तरूण नक्षलवादी होत नाहीयेत. उलट आताचं नॅरेटिव असं आहे की, बहुतांश तरुण धर्मांध हिंदुत्ववादीच होत आहेत..
नक्षलवादी ज्या पट्ट्यात आहेत, तिथे शासन त्यांना पकडू शकत नाही. काँग्रेसनेही हेच केलंय आणि बीजेपीही तशीच!! आणि मग ”हेच ते, हेच ते अर्बन नक्षलवादी” असं ओरडत राजकीय विरोधकांना (विशेषतः साम्यवादी/डाव्या विरोधकांना) जेरबंद करायचं. विद्रोहीना त्रास द्यायचा.. या सगळ्यांना देशद्रोही ठरवून भीतीचा प्रसार करायचा. एखादा प्रत्यक्ष नक्षलवादी पकडून बाकीच्यांना त्याच्याच साखळीत गोवून शिकार करायची. अन तिकडे मात्र निर्दोष माणसं पकडून मारून ‘नक्षलवादी मारले’ म्हणून पसरवून आनंद साजरा करायचा.
असे हे सगळे हिंदूवर्चस्ववादाच्या आयडियलॉजीला लाभदायक ठरतील असले चाळे सध्या सुरू आहेत.. तुम्ही या प्रचाराला बळी पडलात तर हा तुमचा पहिला पराभव आहे..
असले काही लेख लिहिले की आरोप करायचा, तुम्ही नक्षलवादाचं उदात्तीकरण करताय.. पण उलट साऱ्या देशपातळीवर आक्रमक, हिंसक, खूनखराब्याच्या हिंदुत्ववादाचंच उदात्तीकरण चाललंय.. त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करायची किंवा मग मुळमुळीत निषेध करायचा..
मित्रांनो, नक्षलवादी ही एक पराभूत जमात आहे. एका कोपऱ्यात लपून जमेल तेवढी वाटमारी करते. पण त्यांचं निमित्त करून इकडे राजरोस दरोडे घालणारे अधिक हिंसक आहेत. अर्बन नक्षलवाद ही धर्मांध कट्टरांनी तयार केलेली अर्बन मिथ आहे, आणि दिवसेंदिवस विरोधकांना नष्ट करण्यासाठी वापरण्याचे सोयिस्कर अस्त्र आहे..
म्हणून एखादा माणूस आपल्या टोळी मधील आहे, म्हणून त्याची प्रत्येक गोष्ट डिफेन्ड करायला धावू नका.. ह्या ‘आयडियलॉजीज’च्या वॉर मध्ये समाजातल्या शेवटच्या माणसाच्या जगण्याचा, हक्काचा आणि त्याच्या भुकेचा विचार करा..
कारण शेवटी माणसाला विचारांपेक्षा भाकरीचीच जास्त गरज असते..
- डॉ सचिन लांडगे.