संक्रांतीनंतर या हळदीकुंकू कार्यक्रमांचं घरोघरी अन गल्लीबोळात पेव फुटतं.. आता तर नगरसेवक अथवा भावी नेते आपापल्या वार्डात याचं घाऊक आयोजन करताना दिसतात..
“नवरा असणे” हाच केंदबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करण्याच्या उठाठेवीचं, ते वरवर निरुपदवी वाटणारं, पण ‘कुरूप’ रूप आहे. एरवी बायामाणसांना कवडीइतकं मोल नसणाऱ्या आपल्या समाजात, ‘नवरा असलेल्या बाईला’ (त्यातल्या-त्यात) जी थोडीफार किंमत दिली जाते त्याचाच हा आविष्कार आहे.
खरंतर जास्तीत जास्त प्रोटेक्शन ची गरज समाजात एकटे पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवे. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेव्हा त्याचं फक्त आयुष्य संपतं, तर मागे राहिलेल्या स्त्री चा संसार संपतो.. म्हणूनच अशा तऱ्हेचे जे सामाजिक, सांस्कृतिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतात, मनोरंजनाचे सोहळे असतात, त्याची गरज जी स्त्री दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त असते खरंतर, याचा विचार आपण रूढी परंपरांच्या पुढे जाउन कधी करणार?..
बुद्धिमत्ता, माया, धडाडी आणि हिंमत या आणि अशा महत्वाच्या गुणांपेक्षा “नवरा असणं” जास्त महत्त्वाचं असंच सूचित करणाऱ्या या प्रथा/प्रतीकं अजून किती काळ चालू ठेवायच्या.? कर्मकांडाच्या आणि धार्मिक श्रध्दांच्या नावाखाली असले सरळ सरळ ‘विषमतेला’ खतपाणी घालणारे रिवाज किती वर्षं पाळायचे सांगा?
आणि यावर बोललं लिहिलं की स्त्रियाच जास्त डिफेन्ड करायला पुढे येतात.. त्यातल्या त्यात उच्चशिक्षित स्त्रिया!
“घरच्यांना बरं वाटावं म्हणून पाळते मी प्रथा”.. इथपासून ते “छान वाटतं ना हे केल्यावर, मग जास्त विचार करायचा नसतो ओ” इथपर्यंत लॉजिक लावलं जातं.. आणि, “मला स्वतःच आवडतं ते, कोणी बळजबरी नाही करत!” इथपासून ते “हे केल्याने तोटा काय आहे मला सांगा!” इथपर्यंत अकलेचे तारे तोडले जातात..
पाया पडणाऱ्या स्त्रीला फक्त ‘सौभाग्यवती भवः’ असा आशीर्वाद देणे, ही तिच्या आत्मसन्मानाची कुचेष्टाच आहे, हे जोपर्यंत स्त्रीला समजत नाही, तोपर्यंत ती संस्कृतीच्या मानसिक गुलामगिरीतच राहणार!
उपासतापास स्त्रीने करायचे; नवरा, भाऊ, मुलंबाळं यांच्यासाठी व्रतवैकल्ये स्त्रीने करायची, कुंकू मंगळसुत्रासहित अंगभर तिने नवरा दाखवायचा, आणि नवरा गेल्यावर त्याच समाजाने तिला (सांस्कृतिक) वाळीत टाकायचं.. आणि अशा विविधतेने नटलेल्या परंपरांचा आपण मात्र अभिमान बाळगायचा..!! कुठवर चालायचं हे..? जर एखाद्या स्त्रीने विचारपूर्वक कुंकू मंगळसूत्र नाकारले, तर तिची पहिली शत्रू तिची सासूच असते..!!
सिनेमा आणि सिरियल्स मधून अशाच निरर्थक गोष्टीना प्रोजेक्ट केलं जातं. ‘भले मेरी जान ही क्यों न चली जाए, पर मैं मेरा मंगलसूत्र नहीं दूँगी’, हा डायलॉग ऐकल्यावर जर तुमचाही ऊर अभिमानानं भरून येत असेल, तर तुमच्या डोक्यातच फॉल्ट आहे हे नक्की! कुंकू पुसणं, दिवा विझणं, मालीकांमधल्या स्त्री पात्रांचे कुंकू लावून, दागदागिने मंगळसूत्र घालून मिरवणं, आणि त्यावरूनच्या सण समारंभातल्या उखाळ्यापाखाळ्या, हे काय दर्शवते..?
स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय..? पाहिजे तेव्हा माहेरी जाता येणं, जीन्स घालता येणं, आणि हवी तितकी शॉपिंग करता येणं आणि दिवसभर लोळता येणं, म्हणजे स्त्रीस्वातंत्र्य आहे का..?
मग युगेनुयुगे चालत आलेल्या मानसिक गुलामगिरीचं काय..? परंपरांच्या नावाखाली राजरोस चालत असलेल्या सांस्कृतिक गुलामगिरीचं काय..?
निदान आपल्या आई-बहिणी, मुलीबाळी आणि जन्मभर घराला घरपण देणारी पत्नी, यांच्याप्रति आदर व्यक्त करायला, एवढी वर्षं केलेली चूक सुधारायला काय हरकत आहे..? साधा धक्का लागला तरी’ सॉरी ‘ म्हणणारे आपण जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा मूग गिळून गप्प का बसतो..? आपलं हे वागणं सुसंस्कृत म्हणायचं की संधिसाधू..?
ज्यांना हे पटतय, आणि ज्यांची हे सगळं बदलायची तयारी आहे त्यांनी यावर काय केलं पाहिजे..?
- पुरुषांनी आपल्या पत्नीला कुंकू, मंगळसूत्र, हळदीकुंकू, सवाष्णी, व्रते, उपासतापास यापैकी कशाचीच बळजबरी करू नये. आणि आपल्या मुलीला या गोष्टी (अगदी हौसेने सुद्धा) करायला लावू नये..
- स्त्रिया, ज्यांना हि पारंपारिक गुलामगिरी मान्य नाही, त्यांनी अशा प्रथा वैयक्तिक वागण्यातून सरळसरळ बंद कराव्यात. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांना ‘गेट टुगेदर’ किंवा ‘तिळगुळ समारंभ’ म्हणायला हरकत नाही. अशा प्रसंगी सवाष्ण-विधवा असा भेदभाव न करता, सर्व स्त्रियांना बोलवावे व योग्य तो सन्मान करावा.. आणि आपल्या मुला मुलीवर पण हेच (समानतेचे) संस्कार करावेत..
- ज्या स्त्रियांना नवऱ्यामुळे/सासूमुळे किंवा इतर कौटुंबिक दडपणामुळे गुलामगिरी झुगारता येत नसेल, त्यांनी स्वतःशी एक शपथ घ्यावी की – “मी माझ्या मुलीवर गुलामगिरी नाकारण्याचेच संस्कार करेन, आणि माझ्या मुलामध्ये स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवण्याचे गुण रुजवेन, आणि सुनेला सुद्धा वैचारिक मोकळीक देईन आणि तिने परंपरांतून बाहेर येण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना सासू म्हणून माझी खंबीर साथ असेल..
आणि मला विश्वास आहे कि बदल आता लगेच नाही घडला तरी भविष्यात नक्कीच फरक पडेल