Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

आपण घरी गणपती का बसवतो?

आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात गणपती असतोच, त्याशिवाय घरात गणपतीचे फोटो ही असतात, किंवा गणपतीचे चित्र असलेले कॅलेंडर तरी असते.. तरीही या दहा पाच दिवसांसाठी आपण बाहेरून गणपती विकत आणून बसवतो आणि नंतर विसर्जीतही करतो..

का?

कोणत्या पोथीत हे लिहिलेय?
कोणत्या पुराणात हे सांगितलंय?
कोणत्या धार्मिक परंपरेत हे लिहिलेय?

टिळकांनी ही प्रथा सुरू केली हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे.. आणि टिळक म्हणजे कोणी देवाचे अवतार वगैरे नव्हते.. प्रखर राष्ट्राभिमानी असलेल्या टिळकांनी मराठी मनातील गणपतीचे असलेले स्थान ओळखून इंग्रजांविरुद्ध स्फुल्लिंग चेतविण्यासाठी आणि समाजात एकीची भावना वाढीस लागावी म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक केला, हे सुर्यप्रकाशाईतके स्वच्छ आहे..

पण आता तशी परिस्थिती नाहीये.. अलीकडे तर परिस्थिती खूपच बदलली आहे.. प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे गणपती आणि त्यांचे विसर्जन पर्यावरणाला त्रासदायक ठरू लागले आहेत. मंडळं सतराशे साठ वाढली आहेत.. त्यांचे मंडप रस्त्याच्या रहदारीला अडथळा ठरू लागले आहेत.. सामाजिक एकोपा या मूळ उद्देशाऐवजी मंडळा मंडळात तेढ अथवा चढाओढच जास्त अधोरेखित होत आहे.. डीजे स्पीकर आणि वाद्यांच्या नावाखाली गोंगाटच वाढत आहे.. वर्गण्यांची दांडगाई, मंडप उभारणीत मनमानीपणा, कायदा नियम परवाणग्यांचे सर्रास उल्लंघन, आजारांना आमंत्रण देणारी गर्दी, महिलांची मुलींची असुरक्षितता याबद्दल तर बोलायलाच नको.. उत्सव कमी नि हुल्लडबाजीच जास्त… आणि मंडपात सामाजिक विषयांचा फक्त ‘देखावा’..!!

मग अशा परिस्थितीत (अजिबात धार्मिक आधार नसलेली) ही सांस्कृतिक परंपरा आपण किती दिवस आणि का चालू ठेवायची हा प्रश्न सुजाण व्यक्तींना तरी पडला पाहिजे..

तुमची भक्तीच आहे ना, तर देव्हाऱ्यातलाच पितळेचा गणपती पानाफुलांची सजावट करून वेगळा बसवा, पाचेक दिवस मनोभावे पूजा करा आणि विधिवत पुन्हा देव्हाऱ्यात प्रतिष्ठापित करा.. बस झालं! दरवर्षी गणपतीची वेगळी मूर्तीच विकत आणावी लागते आणि तिचं विसर्जनच करावं लागतं असं कुठल्या पुराणात किंवा धर्मग्रंथात लिहिलेय ते दाखवा बरं मला? आणि परंपरेनुसार नाही गणपती बसवला आणि विसर्जित तर काय वाकडं होईल सांगा बरं? उगी कुणीतरी सांगितलं विसर्जन करा म्हणून आपणही लगेच आपण कोट्यवधी टन प्लॅस्टर ऑफ पॅरिस ने नद्या, नाले, तळी, विहिरी भरून टाकतो याला काही अर्थ आहे का?
का नाही आपण ‘एक गाव एक गणपती’ करू शकत? भारताबाहेरच्या जगातले 99% लोक गणपती बसवत नाहीत, आणि खुद्द भारतातले 75%लोक गणपती बसवत नाहीत. मग आपण गणपती नाही बसवला तर काहीतरी अनर्थ होईल ही भीती अगदी अनाठायी आहे..

हौस मौजेच्या गोंडस नावाखाली प्रत्येक गल्लीत, प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक रस्त्यावर दहा दिवस जो सांस्कृतिक धांगडधिंगा आपण घालतो यात फक्त आणि फक्त अध्यात्मिक भक्तीचाच भाग असतो हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल काय? सार्वजनिक उत्सवांमधली मजा, मस्ती सगळं मला मान्य आहे. ते सगळं हवंहवंसं वाटणं हेही मला मान्य आहे. पण हौसेच्या नावाखाली ‘हैदोस’ आणि श्रद्धेच्या नावाखाली ‘स्वार्थीपणा’ मला बिलकुल मान्य नाही..

मी दहा वर्षे झालं वेगळा गणपती बसवतही नाही आणि विसर्जनही करत नाही. पर्यावरणाला धोका, शांतताभंग आणि दुसऱ्याच्या वैयक्तिक स्पेसमध्ये आक्रमण यांपैकी काय होईल असं न वागण्याच्या पुरेपूर प्रयत्न करतो, आणि याचा मला अभिमान आहे.. या काळात आमच्या घरचे संपूर्ण देव्हाऱ्यालाच आरास करतात आणि कौटुंबिक सलोखा वाढवतात..
आणि हेच अपेक्षित आहे..

हे वाचलेलं बऱ्याच जणांना पटतं, सांगितलेलं कळतं.. पण तरीही लोक गर्दीचाच भाग बनणं पसंत करतात.. आजूबाजूला काय चाललंय हे अजिबात पटत नसलं तरी मूग गिळून गप्प बसतात, आणि जे चाललंय ते चालू देतात..

मी म्हणतो, आपण बाहेर तर काही बदलू शकत नाहीत, निदान आपल्या घरात तरी आपण बदल घडवायचा की नाही, हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे.. सामाजिक दडपणाखाली जर आपण थोडाही वेगळा विचार करायला धजावत नसू तर बुद्धीच्या देवतेची कितीही भक्ती केली तरीही ते पालथ्या घड्यावर पाणीच असेल..

-डॉ सचिन लांडगे.

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *