Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

“मानसिक आधारासाठी ईश्वर”..??

माझ्यासभोवती कित्येक श्रद्धावान लोक आहेत ज्यांच्याकडे तर्कावर जगण्याइतकी विचारक्षमता आणि त्याद्वारे तयार होणारी सारासार विवेकबुद्धी नाही.. जीवन व्यतीत करण्यासाठी कशावर तरी ‘श्रद्धा’ ठेवणे ही त्यांची मानसिक गरज आहे.. अशा लोकांचा ईश्वररूपी आधार काढून घेतला तर त्यांचं जगणं असह्य होईल, असं मला नेहमी सुचवलं जातं..
ईश्वर अस्तित्वात आहे की नाही हे एकवेळ बाजूला ठेऊयात.. पण लोकांच्या मनात तर ईश्वर आहे ना! , आणि तो ईश्वर जर त्यांना मानसिक आधार देत असेल, तर त्यांच्या मनातून ईश्वर काढून टाकून तुम्ही त्यांचे नुकसान करत आहात असे तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न प्रत्येक नास्तिकाला नेहमी विचारला जातो.. आणि ‘लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे’ म्हणलं की विवेकवाद्यांना नेहमी हात टेकावे लागतात..
या लेखात या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे.. खरंतर याचं उत्तर व्यक्तीच्या जडणघडणीच्या पद्धतीत आहे, आणि ते मानसिक पातळीवरून शोधावे लागेल.. आणि ते उत्तर कळण्यासाठी त्या आधी खूप समजून पण घ्यावं लागेल.. लेख मोठा आहे, यथावकाश वाचावा..
विवेकबुद्धी म्हणजे, सारासार विचार करण्याची पद्धत.. तर्काच्या आधारावर आपल्याला समजणाऱ्या गोष्टी पारखून घेण्याची पद्धत.. ही एक Thought process असते जी आपले पालक आणि समाज आपण लहान असल्यापासून नकळतपणे शिकवत असतात, आणि आपणही ती बनवत असतो.. ती ‘उपजत’ नसते.. उपजत असतात त्या प्रेरणा! त्यातल्याच एका ‘भीती’ या प्रेरणेचा वापर विवेकबुद्धीला आकार देण्यासाठी होतो.. “भीती” ही एक उपजत प्रेरणा (Basic Instinct) आहे, आणि माणसाच्या सुरक्षित जगण्यासाठी ही खूपच मोठा सहभाग देते.. लहान बाळ भितीतूनच शिकते. आगीची भीती, वेदनेची भीती, उंचीची भीती, अशा अनेक भीतीतून लहान बाळ स्वतःचं संरक्षण करायला शिकत असते.. वेदनेची भीती ही नैसर्गिक भीती असते. कधीतरी कुत्रा चावला असेल तर इतर कुत्र्यांचीही भीती वाटणे हे आपल्या अनुभवातून आलेले घाबरणे असते.. हे झालं शारीरिक बचावाच्या बाबतीत..
पण काही गोष्टींना ‘घाबरायचं असतं’ असे आपल्यावर संस्कार केले जातात.. ही असते ‘शिकवलेली’ भीती.. देवधर्म आणि भुतंखेतं वगैरे गोष्टींची भीती ही शिकवलेली भीती असते, यासाठी काही घडावेच/दिसावे असं जरुरी नाही. आपण आपल्या कल्पनेला बळी पडून काहीही झालेलं नसतानाही घाबरु शकतो. Imagination is misuse of our thinking ability.. मनात एकदा का या गोष्टींच्या भीतीची कल्पना केली आणि वाढवली, की तसतशी त्याबद्दलची भीती वाढत जाते..
याच भित्यांचा वापर करत आपल्याला लहानपणापासून वळण/संस्कार शिकवले जातात.. ‘चांगलं काम का करायचं’ तर, त्याने पुण्य लागतं आणि स्वर्ग मिळतो.. आणि वाईट कृत्य केल्यावर नरकात जावं लागतं, असं मनात रुजवलं जातं.. आपल्या समाजातला आजूबाजूचं वातावरण पण अशाच प्रकारची मांडणी सगळीकडून ठसवतं.. पौराणिक कथा, धर्मग्रंथ, सप्ताह, प्रवचन, कीर्तनं, पोथ्यापुराणांचं पठण, आणि टीव्ही सिरियल्स, पिक्चर्स यांतून याचा सतत माराच केला जातो.. देवाला नावं ठेवणारा नास्तिक पिक्चरमध्ये एकतर पश्चाताप होऊन आस्तिक बनतो, नाहीतर शेवटी तो मरतो, हे नकळतपणे आपल्या मनात ठसते.. पोथ्यापुराणात तर अशा भाकडकथा खूप आहेत.. (मी हिंदू धर्माची उदाहरणे देत असलो, तरी प्रत्येक धर्मात तेच आहे)..
संकट येवो न येवो, सतत देवाचं स्मरण केलं पाहिजे, उपासतापास केलेच पाहिजेत, व्रतवैकल्ये केली पाहिजेत, आणि अशा धार्मिक व्यक्तीचं देव चांगलंच करतो, त्यांच्यावरच्या संकटांची काळजी तोच वाहतो, अशी ‘मेन्टल रेस्क्यू सिस्टीम’ आपल्याही नकळत आपल्यात तयार केली जाते.. ‘ईश्वराला शरण गेलेल्यांना तो कधी दूर लोटत नाही, त्यांना कधी नाराज करत नाही’ वगैरे वाक्यांतून देवशरण भावनेचं बीज पेरलं जातं.. यातलं काही एक न करणाऱ्या एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, तर तो देवाधर्माचं काही करत नव्हता म्हणून झाला, असे कार्यकारणभावाचा काहीएक आधार नसलेले अजब तर्क दिले जातात..
अशा रीतीने लहान मुलांच्या मनोविकासाच्या काळात त्याची मानसिक प्रतिकारशक्ती ही ‘विवेकबुद्धी’ने डेव्हलप न करता ती आपण देवाधर्माच्या आणि भुताखेतांच्या भीतीच्या आधाराने (किंवा देवशरण भावनेने) डेव्हलप करतो..
खरंतर लहान असल्यापासून मुलांना कसं शिकवायला हवं? मुलांच्या मनात एका ‘आदर्श मुलाची’ प्रतिमा तयार करून त्याच्याशी त्याला स्वतःला कम्पेअर करायला लावून त्याला नैतिक भीतीतून आपण शिस्त लावू शकतो.. ‘आम्ही म्हणतो तसं छान वागलास तर तू आम्हाला आवडतोस, नाहीतर आम्ही कट्टी करू’, अशा reward and punishment पद्धतीने शिकवायला हवं.. कारण मुलांना ‘पालकांचं प्रेम न मिळण्याची भीती, वेगळं पडण्याची भीती, नाकारलं जाण्याची भीती’ अशा गोष्टींची भीती लहानपणी जास्त असते.. पुढं थोडं कळत्या वयाचं झाल्यावर, त्याच्या कोणत्याही अशोभनीय वागण्याचं analysis करायला लावून ‘तुझ्या बाबतीत असं कोणी केलं तर तुला ते चालेल का?’ अशा सोप्या तर्कातून विचार करायला लावण्याची सुरुवात करून देऊ शकतो.. चांगल्या वागण्याचं कौतुक तर वाईट वागण्याची निंदा (म्हणजेच, Reward and punishment theory) याद्वारे त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो.. मनमोकळ्या गप्पा, मित्रमैत्रिणी, शेअरिंग, REBT मध्ये सांगितल्या प्रमाणे भावनांचं अनॅलिसिस, भावनांचं नियमन, कौंसिलिंग, वगैरे हे मानसिक प्रतिकारशक्ती वाढविण्याचे जास्त आश्वासक (प्रॉमिसिंग) असणारे मार्ग आपण मुलांना शिकवू शकतो..
पण तेवढं करण्यासाठी पालकांना वेळ नसतो किंवा तेवढी त्यांची मानसिक कुवत देखील नसते.. म्हणून मग होतं काय? तर, ‘असं नको करू देवबाप्पा शिक्षा देईल, तसं नको करू देवबाप्पा कान कापेल, पटकन एवढं खाऊन टाक नाहीतर राक्षस येईल, तिकडे अंधारात नको जाऊ नाहीतर भूत धरेल’ , अशा पद्धतीच्या भित्या आपण त्याच्या मनात पेरतो.. मग पुढं ते अशा गोष्टींना आपसूकच आणि साहजिकच बळी पडत जातात.. आणि मग पुढे त्यांना आयुष्यभर कशासाठीही ईश्वरच लागतो..
शिक्षणातून माणसाची सारासार विचारशक्ती विकसित व्हावी असं अपेक्षित असतं, पण तसं होत नाही.. शिक्षण आपल्याला knowledge तर देतं, पण wisdom मात्र आपल्याला स्वतःलाच मिळवावं लागतं.. त्यातच माणसाला कोणत्याही गोष्टीची तयार आणि सोपी उत्तरं नेहमीच आकर्षित करत आलेली आहेत. कारण मानवाचा इतिहास हा कष्ट वाचवण्याच्या धडपडीतूनच साकारलेला आहे. नवनवीन शोधांचा वापर देखील माणसाने कष्ट वाचवण्याच्या धडपडीसाठीच केला आहे. कष्ट हे जसं शारीरिक असतात, तसंच ते बौद्धिक देखील असतात.. पण कोणत्याही उत्तरांसाठी तेवढी वैचारिक मेहनत घेण्याची तयारी नसली की सोप्या आणि तयार उत्तरांचा ‘साचा’ घेऊन बसलेले लोक तुमचं “मानसिक अपहरण” करतात.. तुम्हाला रेडिमेड उत्तरं आणि साचेबद्ध विचार पुरवतात.. अशा वैचारिक/मानसिक अपहरणांपासून आपल्याला आपला तर्क अथवा विवेकबुद्धीच वाचवत असते.. जसं शरीराच्या रक्षणासाठी ‘इम्युनिटी’ असते तसं मनाच्या रक्षणासाठी आपली विवेकबुद्धी असते..
बरेच लोक जेंव्हा संकटांना सामोरं जातात, किंवा मानसिक अस्थिरतेच्या गर्तेत जातात तेंव्हा सारासार विवेकबुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा देवघरात डोकं टेकवणं त्यांना गरजेचं वाटतं, आणि जास्त सुखावूनही जातं.. मंदिरात गेल्यावर त्यांना हलकं वाटतं, कठीण परिस्थितीवरच्या उपायांसाठी त्यांना ईश्वराच्या एजंटांकडे जावे वाटते आणि अंगारा/धूप/नवस/जप/यज्ञ अशा सोप्या आणि तयार उत्तरांनी त्यांचं मन हलकं होतं..
संकटावर मात करण्याच्या ठोस उपायांपेक्षा (किंवा उपायांसोबत) हे असे मन हलकं करणारे उपाय कित्येक लोक आजमावतात.. आपली नोकरी गेली, तर आपलं काही देवाधर्माचं करायचं काही राहिलंय का, चुकलंय का? अशा अतार्किक विचारांचं प्राबल्य त्यांच्यावर असतं.. मग असे लोक देवाच्या एजंटांच्या आणि धर्माच्या दुकानदारांच्या हातात अलगद सापडतात.. पण हे उपाय तात्पुरते आणि उसने असतात आणि परत परत त्याला त्यांची गरज पडत राहते.. दुःख हलकं करण्यासाठी दारू पिणे आणि मनाच्या अस्थिरतेच्या काळात विवेकबुद्धीला डावलून इतर उपायांत ‘मानसिक शांती’ शोधणे हे दोन्ही प्रकार तौलनिक दृष्ट्या सारखेच आहेत.. त्यांच्यामुळं मिळणाऱ्या बधिरतेलाच आपण ‘मानसिक शांती’ समजतोय हे त्यांच्या ध्यानात येत नाही..
धर्म ही नशा आहे असं म्हटलं जातं, कारण तो ठोस उपाय देत नाही, तर तो केवळ दुःख हलकं करायला मदत करतो.. आणि इतर नशील्या पदार्थांचं सारखं माणसाला त्याच्यावर डिपेंडंट बनवतो.. या बधिरतेच्या अंमलाखाली लोक आपल्यावर ओढावलेल्या परिस्थितीचा कार्यकारणभाव हा तर्काच्या आधारे न शोधता, त्याला नशिबाचे भोग, किस्मत, पूर्वजन्मीच्या पापांचे फळ ही असली लेबले लावून मोकळा होतो.. मग एकदा का आपल्या परिस्थितीसाठी ‘नशिबाचे भोग’ किंवा आपल्या हातात नसलेलं दुसरं काहीतरी ‘अतर्क्य’ कारणीभूत आहे, असं मानलं तर मग त्यातून बाहेर पडायची धडपड करायच्या नैतिक जबाबदारीतुन आपली सुटका होते.. मग “ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान” हे तत्वज्ञान आवडू लागतं..
पिढ्यानपिढ्या कित्येक शोषितांना आणि पिचलेल्या वर्गाला धर्माने आहे त्या परिस्थितीतच सुख मानून घेत सडत राहण्याचं ‘कारणबळ’ दिलं आणि आपण मात्र त्याला ‘मानसिक उभारी’ समजण्याची गल्लत करून बसलोय, हे आपल्याला समजतच नाहीये.. “मानसिक आधारासाठी ईश्वर” हे आपल्या कमकुवत (under developed) विवेकबुद्धीचं लक्षण आहे, हे आपल्याला पटतंच नाही.. हळव्या माणसांना आणि हळवेपणाला आपल्याकडे सहानुभूती जास्त असते.. हळवं असण्याला चांगलं म्हणलं जातं, तर हळवं नसण्याला कोडगं किंवा निर्दयी समजलं जातं.. विवेकबुद्धीला नाकारून भावनांच्या आधारावर निर्णय घेण्याला आपल्या कथा-कादंबर्‍या आणि सिनेमांमधून जास्तच ग्लोरीफाय केलं गेलंय, पण चित्र दरवेळेसच सुबक असेल असं नाही.. भावना या प्रत्येकालाच असतात, पण भावनाप्रधान असणं आणि भावना आवेगात वाहवत जाणं, यात फरक करायला शिकायला हवा..
मानसिक आधाराच्या पलीकडे जाऊन, लोक देवाकडून काही चमत्कार घडेल, किंवा आपल्या उत्कर्षांला तो गती देईल, अशी अपेक्षा बाळगू लागतात. ‘उपाययोजना करणाराही तोच आहे’, असा विश्वास मनामध्ये घर करू लागला, आणि एकदा का या ‘देवशरण’ भावनेनं देवाच्या घरात प्रवेश झाला, की मग उमेदच संपते.
मग जरा काही विरोधात बोललं की यांच्या भावना दुखावू लागतात, श्रध्दा डळमळीत होतात.. अशा लोकांच्या भावना भडकावणं जास्त सोपं आणि कमी कष्टाचं असतं.. सध्या जो उठसूट ‘धार्मिक भावना दुखावल्याचा’ रोग समाजाला जडलाय त्याचं मूळ या “मानसिक आधारासाठी ईश्वर” या गोष्टीत आहे.. लोकांच्या नेमक्या याच मानसिक भावनेचं अवडंबर माजवून (श्रद्धेचा फायदा घेऊन) काहींनी त्याचा धंदा मांडला, तर काहींनी त्याच्या भीतीनं इतरांचं शोषण, आणि लुबाडणूकच सुरू केली.. लोकांच्या हळव्या धार्मिक भावनांचा वापर करत राजकीय पोळी भाजून घेणे हा तर नित्याचा उद्योग आहे.. प्रत्येक धर्म ते करत आला आहे.. धर्मांध मूलतत्ववाद्यांकडून लोकांच्या धार्मिक हळवेपणाचा वापर ‘रॉ मटेरियल’ म्हणून केला जातो, हे जास्त चिंताजनक आहे..
म्हणून ‘मानसिक आधारासाठी ईश्वर’ ही कल्पना वरवर जरी भोळीभाबडी आणि आश्वासक वाटत असली तरी ती ‘परिपूर्ण’ (ideal) नाही, आणि सायंटिफिक तर नाहीच नाही.. उलट लोकांना ती ‘मानसिक दौर्बल्य’ बहाल करते आणि कमीअधिक प्रमाणात (त्या माणसासाठी आणि समाजासाठीही) ती घातक पोटेन्शियल बाळगून असते.. ती कल्पना नाकारून विवेकपूर्ण जगणारा माणूस कोणत्याही मानसिक अपहरणाला बळी न पडता उलट जास्त स्थिर, जास्त संयमी आणि पुर्णतः शोषणमुक्त आयुष्य जगू शकतो..
प्रत्येक सुज्ञांनी यावर विचार करावा..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *