Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

नुसता येड्यांचा बाजार अन खुळ्यांची जत्रा..

डार्वीनचा सिद्धान्त चुकीचा आहे व तो शालेय पुस्तकातून बदलला पाहिजे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी आज केले.
अंधश्रद्धा माणसाला गायीचे मूत्र प्यायला आणि शेण खायला प्रवृत्त करू शकते.. म्हणून तर आपल्या देशात वैज्ञानिकांची नाही तर बुआ, बापू, अम्मा, टम्मा, योगी, साध्वी, महाराज, महंत, फादर, उलेमा, सुलेमा यांची राजरोस पैदास सुरु आहे.
इथे शनीच्या दगडातुन ‘फक्त स्त्रियांसाठी घातक’ किरणे उत्सर्जित होतात म्हणे..!!
गौमाता, भारतमाता, शनिमंदिर, देशद्रोही, फतवे, स्त्रियांनी किती केस वाढवायचे, कुणी कोणते कपडे घालायचे, काय खायचे काय प्यायचे यातच आपला मेंदू कित्ती खर्ची होतो माहिती आहे..!!
मग या शिणलेल्या मेंदूतून हे असले शोध लागतात.. गाईचे शेण किरणोत्सार रोधक असते.. गोमूत्र प्यायल्याने आणि शेणाने सारवल्याने तब्बेत सुधारते.. यासारखी अशी छद्मविज्ञानाची (स्युडोसायन्सची) असंख्य उदाहरणे सांगता येतात..
जानवे घातल्याने रोगांपासून बचाव होतो. चरणस्पर्श केल्याने पाठीचा कणा निरोगी रहातो. दारावर तोरण लावल्याने वातावरण शुध्द होते. दिवा लावल्याने पॉझिटीव्ह ऊर्जा वाढते. कान टोचल्याने अस्थमा बरा होतो. कुंकू लावल्याने वशीकरणापासून बचाव होतो. मंगळसूत्राचे काळे मणी निगेटिव्ह एनर्जी जवळ येऊ देत नाहीत म्हणे!! टिळा लावल्याने कपाळावरील अतिरिक्त पाणी शोषले जाते. शंख ध्वनी केल्याने डासांचा नाश होऊन मलेरीयापासून बचाव होतो.. वगैरे वगैरे..
…. यासारख्या गोष्टीत हास्यास्पद व चुकीचे विज्ञान सांगून ते वैज्ञानिक असल्याचा आभास निर्माण करण्यात येतो. यातील एकही मुद्दा कुठेही authentically सिध्द झालेला नसतो, पण हे सगळे आपल्या पूर्वजांना आधीच माहीती होते या अभिनिवेशाने लिहीले आणि पसरविले जाते. आणि आपल्याला पण ते फ़क्त लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीमुळे खरे वाटायला लागते. म्हणून या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी ठरतात. ती फ़क्त वैयक्तीक अनुभूती ठरते. सार्वत्रिक नव्हे. आणि तिला वैज्ञानिक अधिष्ठान तर नसतेच नसते..
बरं, कोणतेही धर्मवादी लोक त्यांच्या मुद्दयाना वैज्ञानिक संबंध दाखवण्याचा अट्टाहास का करतात? त्यांनी ‘ही वैयक्तीक अनुभूती आहे’ असे स्पष्ट करावे, म्हणजे वादच मिटतो.. पण खरी मखलाशी अशी असते की, ‘ते विज्ञानाला अनुसरून आहे’ असे म्हटले की, सुशिक्षित टाळकी पण सहज त्याला बळी पडतात, हे त्यांना पक्के ठाऊक असते.. ह्याला बनवेगिरी म्हणतात.. दुर्दैवाने आजचे सुशिक्षित (की फ़क्त साक्षर) धार्मिक अस्मितेचे आणि उन्मादाचे बळी ठरत आहेत..
ज्यांना घड्याळ, सायकल, बॅटरी, चष्मा, रबर, ईलॅस्टीक, कपड्याची झिप हे साधेसाधे शोध पण लावता आले नाहीत, ते स्वतःला फार ज्ञानी म्हणवून घेतात म्हणजे, नुसता पोकळ अहंकार पोसायची वृती आहे.. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या समाजाला वावडे.. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे, आणि इतरांनी तो आपण पाहिल्यासारखे वागायचे.. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे आहेत..
ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे.. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही.. सारा हवाला एक तर “देवा”वर नाही तर “दैवा”वर…
त्या अंजनीने वायूचे वीर्य गिळले आणि तिच्या पोटी मारुती जन्माला आले यावर सहज विश्वास ठेवायचा!! कारण तेंव्हा आपण पुढारलेले होतो ना.. म्हणूनच ते शुक्राणू “वरच्या तोंडाने” गिळले तरी अपत्यसंभव व्हायचा म्हणे.. अवघड आहे.!! मारुतीच्या घामाचा थेंब (!!) एका सुसरीने गिळला आणि त्याला मकरध्वज नावाचा पुत्र झाला… क्रॉस ब्रीडचा कळस आहे ना हा!! असो.. कौरवांच्या उदाहरणातुन Test Tube baby व सरोगेट माता हे सर्व आधुनिक वैद्यक सहज वापरात होते हे आपण बिनधास्त खरे मानायचे..
पूर्वी आमचे देव आणि साधू संत विमानात फिरायचे म्हणे!! जगातले सर्व शोध आपण भारतीयांनी आधीच लावून झालेत, असा पोकळ अभिमान बाळगायचा.. न्युटनने ग्राव्हीटीचा शोध पण आपलाच चोरलाय.. हो ना..!!
बारा ज्योतिर्लिंग ही शिवलिंगाची ठिकाणे ह्या प्राचीन भारतातील (सॉरी, हिन्दुस्तानातील) अणुभट्या आहेत असं मनाशी कल्पायचं… ब्रम्हास्त्र वैगरे हे पूर्वीचे आपण शोधलेलीच क्षेपणास्त्रे आहेत असं मानायचं..
मोहिनी-ब्रुह्ननडा हा लिंगबदल वैदकशास्त्र त्यावेळी किती प्रगत होते हे दर्शविते.. आणि ज्या काळात दरवाजाला कडी लावायची सोय नव्हती त्याकाळी मनुष्याला हत्तीचे तोंड बसविण्याची अवयवरोपण शस्त्रक्रिया अस्तित्वात होती, याचा आपण अभिमान वाटून घ्यायचा..!
कुंडलिनी, ज्योतिष, वास्तुशास्त्र, गर्भसंस्कार यापासून ते अनेक अंधश्रद्धापर्यंत, आणि अनेक पोकळ दाव्यांपर्यंत आपल्या डोक्यात फक्त जुन्यापान्या गोष्टींबद्दलचे ‘जस्टिफिकेशन्सच्’ भरलेले आहेत..
आम्ही हजारो वर्षे फक्त लोकांना उल्लू बनवत आलो आहोत, आणि आताही एकमेकांना उल्लूच् बनवत जगत आहोत..
इतर कुठल्याही कारणापेक्षा धर्म (आणि जातीच्या) दुराभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे…
पूर्वीही आणि आताही..!!
नुसता येड्यांचा बाजार अन खुळ्यांची जत्रा..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *