Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

स्त्रियांनो, तुम्हाला कोण आनंदात ठेवतं ?

 

– डॉ सचिन लांडगे.

 

खूप साऱ्या मुलींना वाटत असतं की, आपल्या जोडीदाराने (नवरा किंवा boyfriend) आपल्याकडे लक्ष द्यावं, आपले मुड स्विंग्ज समजून आणि सांभाळून घ्यावेत, आपल्या मनातलं त्याने न सांगता ओळखावं, आपली सगळी रिस्पॉन्सिबिलिटी न सांगता घ्यावी, त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर कराव्या, खोटं तर अजिबात बोलू नये, आपल्याला सोडून बाहेर कुठे जाऊ नये, किंवा न विचारता/सांगता काही करू नये..
ही लिस्ट संपता संपत नाही..
पण यातल्या काहीच अपेक्षा पूर्ण होत नाहीत..
त्यामुळं त्यांची सगळी भांडणं या ठराविक तक्रारींच्या अवतीभवतीच असतात.

– मला क्वालिटी टाईम देत नाही.
– मी त्याच्यासाठी इतकं करते, पण तो माझ्यासाठी काहीच करत नाही. आणि केलं, तरी तो मनापासून करत नाही.
– माझ्यावर आता त्याचं पूर्वी इतकं प्रेम राहिलं नाही.

या सगळ्या तक्रारींचा सारांश एकच – “तो मला आनंदी ठेवत नाही”..

Blood relation च्या बाबतीत असं घडत नाही. बहीण, भाऊ, आई, वडील यांच्याबाबत या वरील तक्रारी नसतात. पण बॉयफ्रेंड आणि नवऱ्याबाबत मात्र हे खूप कॉमन घडतं. याचं कारण म्हणजे लहानपणापासून या ना त्या प्रकारे मुलींच्या मनात जोडीदाराला Soulmate वगैरे म्हणून म्हणून खूप ओव्हररेटेड करून टाकलेलं असतं. ‘जोडीदाराने हे असं परिपूर्ण असलं पाहिजे, तसं ideal वागलं पाहिजे’, हे बिंबवले जाते. गोष्टी/ मूव्ही/ सिरीयल्स यातून हे कळत नकळत प्रोजेक्ट केले जाते. या सगळ्यात, तो पण एक वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा, वेगळ्या आवडीनिवडीचा, आणि वेगळ्या इच्छा अपेक्षांचा स्वतंत्र प्राणी आहे, हे बहुतांश वेळा दुर्लक्षिले जाते.. असो..

हे असं का होतं?
१.
कोणतंही नातं सुरू होतं तेंव्हा त्यात “नाविन्य” हा खूप मोठा फॅक्टर असतो, जो त्या दोन व्यक्तींचा एकमेकांतला इंटरेस्ट टिकवून ठेवत असतो. कुठल्याही गोष्टीतलं नाविन्य ओसरल्यावर ते परत आपापल्या मूळ स्वभावगुणांकडे येतात. स्त्री आणि पुरुष यांच्या स्वभावात (उत्क्रांती मुळे आणि जडणघडणी मुळे) बेसिक फरक असतो. पुरुषांच्या बाबतीत हा परत येण्याचा काळ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. कुणी सेक्स मिळाला की परत आपल्या मूळ स्वभावाकडे येतो, कुणी लग्न झालं की, तर कुणी काही ठराविक काळ सरला की परत आपल्या स्वभावगुणांकडे येतो.
खरंतर, नाविन्य ओसरण्याच्या आधी नात्याबद्दल बांधिलकी वाटली पाहिजे, जबाबदाऱ्यांची जाणीव जागी झाली पाहिजे.. पण खूप कारणांनी तसं होत नाही.. यात पुरुषच दोषी असतात असं अजिबात नाही. खूप जणांना नाविन्य ओसरल्यावर कळतं की आपली निवडच चुकलीये, आपल्या दोघांत पर्सनॅलिटी डिफरन्सेस खूप आहेत, तिच्या काही सवयी खूप विचित्र आहेत, रिॲक्ट करण्याच्या पद्धती टोकाच्या आहेत.. अशा एक ना अनेक कारणांनी त्यांच्यातला दुरावा वाढत जातो. नाविन्य ओसरल्यावर कमिटमेंटच्या माध्यमातून अटॅचमेंट व्हायला पाहिजे, पण जितके personality differences जास्त आणि त्याची understanding कमी, तितकी ती शक्यता दूर दूर होत जाते..

आपल्या पर्सनॅलिटीशी खूप प्रमाणात फारकत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणीही माणूस जास्त काळ सहन करू शकत नाही.. (पुन्हा वाचा).
आणि जर कोणी दोन व्यक्तीं एकमेकांना जास्त सहन करत असतील, तर मग त्यात काहीतरी हेतू असतो किंवा मग दोघांची मजबूरी तरी असते.. अशा वेळी, अशा नात्यात मधून मधून राग उफाळून येण्याचे प्रसंग वारंवार घडणे स्वाभाविकच आहे..
आणि यात विशेष म्हणजे, दोघांनाही वाटत असतं की आपणच दुसऱ्याला सहन करतोय. पण खरंतर दोघंही एकमेकांना कमी अधिक प्रमाणात सहन करत असतात.

२.
दुसरं म्हणजे, सदासर्वकाळ आपलं आयुष्य दुसऱ्याशी ओरिएंटेड ठेवणं बहुतांश पुरुषांना जमत नाही, आणि परवडतही नाही.. (वाक्य पुन्हा वाचा). करिअरची जबाबदारी असणं, कमावण्याची नैसर्गिक गरज असणं, भावनाप्रधानता कमी असणं, भावना किंवा काळजी (Care) व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असणं, अशी अनेक कारणं त्यामागे आहेत.

इथे “कमावण्याचा” अर्थ फक्त पैसा हा नाही. कमावणं या अर्थात, चारचौघात स्थान, सामाजिक वर्तुळातील इज्जत, सत्ता, पोझिशन, नावलौकिक, या गोष्टी देखील यात येतात. समाजातल्या चार लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपली वाहवा करावी याची इच्छा पुरुषांत जास्त असते. त्यासाठी ते पार्ट्यांना जा, दुसऱ्यावर खर्च कर, इतरांना मदत कर, याच्या त्याच्या भानगडी सोडव, चकाट्या पिट, राडे कर, असले नसते उद्योग करत असतात.

त्यामानाने स्त्रीचं वर्तुळ छोटं असतं. नोकरी व्यवसायात असली तरी ऑफिस ते घर एवढंच विश्व असतं. बऱ्याच स्त्रियांचं विश्व नवरा आणि मुलं हेच असतं, आणि मोठ्यातलं मोठं विश्व हे शेजार, सोसायटी आणि नातेवाईक इतकंच असतं.
(आता स्त्रिया देखील आपलं वर्तुळ वाढवताहेत, आणि आपल्या हिमतीवर नवी शिखरं पादाक्रांत करताहेत, पण हे अपवादा इतक्या कमी प्रमाणात आहे. आणि बहुतांश वेळा त्यांना याची खूप किंमत मोजावी लागते, म्हणून देखील याचं प्रमाण कमी आहे. खरंतर हा विषय खूप मोठा आहे. मूळ मुद्द्याला विषयांतर नको.)

स्त्रियांचं वर्तुळ छोटं असल्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडूनच सगळ्या अपेक्षा केल्या जातात. त्या एका नात्यावरच सगळा भार आणि सगळं लक्ष केंद्रित केलं जातं. आणि समोरच्याला ते सुरुवातीला कितीही भारी वाटत असलं तरी नंतर नंतर ते जाचायला लागतं..

इथे “वर्तुळ”चा अर्थ केवळ व्यक्ती किंवा नाती एवढाच अपेक्षित नाही. छंद कमी असणं, वैचारिक क्षमता किंवा exposure कमी असणं, विविध कामांच्या माध्यमातून जनसंपर्क कमी असणं, आजूबाजूचे लोक नीट जपता न येणं, इंटरेस्ट घ्याव्या वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात कमी असणं, फार कशाची आवड नसणं, स्वभावात भीती किंवा बुजरेपणा असणं, या गोष्टी तुमचं वर्तुळ छोटं करत असतात.. असो..

(खरंतर गॉसिप करण्यासाठी स्त्रियाच जास्त बदनाम आहेत, पण वर्तुळ छोटं असलेले पुरुष देखील खूप गॉसिप करतात.)

तर, सांगायचं इतकंच आहे की, पुरुषांच्या प्रायोरिटी वेगळ्या आणि भरपूर असतात. संसार हा पुरुषांच्या आयुष्याचा फक्त एक भाग असतो. पण बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत मात्र संसार हेच सारं आयुष्य असतं. किंबहुना त्यांनी ते तसं करून घेतलेलं असतं! (Note it!)

आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ.
आपल्याला आनंदी कोण ठेवतं?
– –

एक छान मेसेज मी वाचला होता –

एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका स्त्रीला विचारले की, “तुमचा नवरा तुम्हांला आनंदात ठेवतो का ?”

तिने स्पष्टपणे उत्तर दिले, ” नाही, माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात !! ”

शेजारी बसलेल्या तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली , ” मी आनंदी आहे, पण ते मला माझ्या नवऱ्याने ठेवलेले नाही , मी स्वत:च आनंदात राहतेय.!! ”

“मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही . माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे. कुठल्याही परिस्थितीत , आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते . जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर , एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. माणसं , संबंध , आपलं शरीर , हवामान , आपले ऑफिसातले बॉस , सहकारी मित्र ,आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य… आणि ही यादी न संपणारी आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना ? माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय , मी आनंदीच असते.. मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय , मी आनंदीच राहीन, तक्रारी करण्यापेक्षा तिथेही काहीतरी करीतच राहीन.. आज माझं लग्न झालेलं असलं तरी लग्नाआधीही मी आनंदीच होते…!! कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे..!! इतर कुणामुळे किंवा बाह्य गोष्टींमुळे नाही..

“आणि दुसरी गोष्ट म्हणजे , माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या दुसऱ्या कुणाला मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही . त्यामुळे माझ्याशी बोलताना , वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो, त्यांना काही लपविण्याचा ताण नसतो, की माझ्याशी खोटं बोलण्याची गरज नसते….!!”

– –

तसं पाहायला गेलं तर बाहेरच्या जगात कितीतरी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात , कितीतरी घटना आपला मुड घालविणाऱ्या असतात, म्हणून काय आपण सतत दुःखी व्हावं का?
आपण जसं त्यातून मॅनेज करायला शिकतो, अगदी तसंच आपल्या नात्यांच्या बाबतीतही आपण मॅनेज करायला शिकले पाहिजे.

नात्यातलं नाविन्य संपत आलं की, त्या नात्यात आपली वेगळी स्पेस का निर्माण करता येऊ नये? जिथं जाईल तिथं आपलं वर्तुळ का वाढवता येऊ नये? आपल्याला समृध्द करणारे छंद/ व्यवसाय/ आवडी का जोपासता वाढवता येऊ नये? मग कशाला दुसऱ्याच्या स्पेसवर हक्क सांगण्याची किंवा आक्रमण करण्याची वेळ आपल्यावर येईल?

तो मला बाहेर कुठं नेतच नाही.. का न्यायला पाहिजे त्यानं तुला बाहेर.. तू स्वतःच जा की.. कुठंही फिरून ये.. नवरा restrict करत असेल किंवा संशय घेत असेल तर स्पष्ट ऐकव त्याला, ठाम भूमिका घे.. एकटं नसेलच जमत तर मैत्रिणी बनव, विशेष म्हणजे त्या टिकव, आणि जा त्यांच्यासोबत फिरायला.. पुरुष पण वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे मित्र बनवतात आणि टिकवतात देखील.. परगावी जाताना मुलांना सांभाळायला नवऱ्याकडे बिनधास्त ठेव किंवा आजीआजोबाकडे ठेव. पण मुलांना मीच लागते, हा हट्ट सोड.. “मुलं माझ्याशिवाय राहतच नाहीत”, याचा तुला अभिमान वाटावा, ही अशी गोष्टच नाहीये..

आपल्या दुसऱ्याकडून असणाऱ्या अपेक्षाच आपल्या दुःखाचं कारण बनत असतात.

सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करणारं मन समाधानी राहूच शकत नाही. आणि असमाधानी माणूस आनंदी राहू शकत नाही. तू अमुक आणि इतकं केलं तरच मी आनंदी होईल.. तू असा वागलास/वागलीस, तरच मला आवडेल.. तुझ्या ह्या ह्या गोष्टी माझा मुड घालवतात.. अशा अटीशर्ती घालणारी माणसं कधीच satisfy होत नाहीत. कारण, कोणालाही दुसऱ्यांच्या मनाप्रमाणं वागणं कठीण असतं, आणि दीर्घकाळ शक्यही नसतं.

ठीक आहे , नातं आहे म्हणजे अपेक्षा येणारच.. यायला हव्यातच.. पण अपेक्षांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम असतो. तो म्हणजे प्रत्येकाला आपली अपेक्षा ही साधी / बेसिक आणि / महत्त्वाची वाटत असते. पण समोरच्याला मात्र ती अवास्तव, अवाजवी आणि Repeatative वाटत असते.

माझं एवढं प्रचंड डोकं दुखत होतं तरी “गोळी घे” म्हणण्यापलीकडं त्यानं काही नाही केलं! मी त्याच्यासाठी इतकं तितकं करते, पण माझ्यासाठी मात्र कुणीच काही करत नाही.” अशा प्रकारच्या अनेक तक्रारी करण्यात माणसं संसाराची 20 – 25 वर्षे घालवतात, मग त्यांच्या लक्षात येतं की दुसऱ्यांकडून अपेक्षा करणंच गैर आहे, आणि त्या नादात आपलं छान जगायचं अन् आनंदी राहायचंच राहून गेलंय..
काही काहींना तर आयुष्यभर देखील हे समजत नाही की, कोणाकडून काही अपेक्षा करणं अन् त्यावर आपल्या आनंदाचा सट्टा लावणं ही सगळ्यात मोठी चूक आपल्याकडून झालेली आहे..

त्याच त्याच मुद्द्यांवर वर्षोनुवर्षे भांडल्यानंतर दहा-वीस-तीस वर्षांनी एकमेकांना दोष देत, मनात कटुता जपत, मग जोडप्यांना उपरती होते की, एखाद्याचा मूळ स्वभाव किंवा पर्सनॅलिटी बदलणं खूपच अवघड किंवा अशक्य आहे.. तोवर मग वेळ निघून गेलेली असते, सगळ्या उर्मी कमी झालेल्या असतात, स्वप्नं कोमेजलेली असतात..
त्यापेक्षा वेळीच शहाणं होऊन आपापली परिस्थिती Analyse करायला शिकलं तर ते जास्त अवघड नाहीये..

मी म्हणत नाही की समोरच्याला हवं तसं वागू द्या काहीच बोलू नका.. अजिबात नाही.. काही जबाबदारीच्या गोष्टी केल्या पाहिजेत यावर ठाम रहा, तर बऱ्याच कमी-महत्त्वाच्या गोष्टींवर स्वतःची तकतक कमी करा.. त्यासाठी आपल्या अपेक्षांचे Absolute आणि Relative असे वर्गीकरण करा.. “आपल्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे, आणि आत्ताच झालं पाहिजे”, हा हट्ट सोडा.. काही गोष्टी बदलायला वेळ द्यावा लागतो, तर काही गोष्टी अजिबात बदलणार नाहीत, हे accept करावं लागणार आहे हे, लक्षात असू द्या.. कधीकधी तर आपल्या सततच्या तकतकीने समोरचा मुद्दामहून आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी करणार आहे, याचीही तयारी असू द्या..

मी एकतर आहे ती परिस्थिती, आणि समोरच्याचा आहे तो स्वभाव accept करीन, नाहीतर समोरच्याच्या काही गोष्टी बदलविण्यासाठी परिस्थितीच्या कलाने घेत हळूहळू पण सातत्यपूर्ण प्रयत्न करीन.. काही बाबतीत हे करीन तर काही बाबतीत ते करीन.. दोन्ही पैकी काहीही करीन, पण उगीच सतत कुढत राहणार नाही.. नशिबाला दोष देत जगणार नाही.. कडवटपणा बाळगणार तर नाहीच पण आनंदी राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न देखील करीन.. स्वतःचं वर्तुळ वाढवेन, छंद जपेन, अडीअडचणींवर स्वतः मार्ग काढायचं बघेन, सारखं नवऱ्याच्या डोक्याशी भुणभुण करण्यापेक्षा स्वतःतच आनंदी रहायला शिकेन..

लेख स्त्रियांना उद्देशून लिहिलेला असला तरी, नवरा बायको दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. दोघांनीही आपल्याला संसारात “शेवटी काय महत्त्वाचं आहे?” हा प्रश्न सतत स्वतःला विचारत राहिलं पाहिजे.. आनंदी असणं हा आपला चॉईस असला पाहिजे, तोही जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक आणि सातत्यपूर्वक.. मग आपल्याला कोणी आनंदी ठेवायची गरज उरणार नाही..

True happiness lies in being content..!

– डॉ सचिन लांडगे.
भूलतज्ञ.

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *