Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

ऊरोगामी…

प्रतिगामी आणि पुरोगामी अशा दोन जाती माहीत होत्या. आता तिसरी एक जात तयार झाली आहे, तिचं नाव आहे, “ऊरोगामी”!

हे कोणत्या एका जात, धर्म, लिंगाचे नसतात.. ह्या केवळ प्रवृत्ती आहेत… या “ऊरावर बसणाऱ्या प्रवृत्ती” आहेत…

या प्रवृत्तीला तुमच्याकडून ‘उत्तरे’ नको असतात… यांना चर्चेमधून ज्ञान वाढविण्यात किंवा तुमचं ऐकून घेण्यात interest नसतो…
यांना फक्त तुमच्या “ऊरावर” बसायचे असते.. आणि कलकल करायची असते…

या ऊरावर बसणाऱ्यांना तुम्ही काहीही उत्तर द्या, यांचे प्रश्न ठरलेले असतात..

  • तू का बोलला? तुला बोलायचा काय अधिकार?
  • तू याबद्दल बोलला, पण त्याबद्दल का नाही बोलला?
  • इथे सगळे हुशार आहेत, ज्यांच्यासमोर बोलायचेय तिथे बोल कि..
  • तू आत्ताच का बोलला..? तेंव्हा का नाही बोलला?
    वगैरे वगैरे…

हा हा हा… बसा ऊरावर…

**

किती सोपं आहे..
समजा,

  • एखादा मेसेज/पोस्ट/लेख आला तर वेळ असेल तर तो वाचावा…
  • त्यावर विचार करावा…
  • जमलं (वेळ असेल, इच्छा असेल, इतकं टायपिंग जमत असेल) तर त्यावर चर्चा करावी… त्यातील चूक मुद्दे दाखवून द्यावे..
  • इंटरेस्ट नसेल, किंवा त्यातलं कळत नसेल तर इग्नोर करावं… (हवं तर ‘जाऊ दे खड्डयात’ म्हणावं, मनातल्या मनात)…

किती सोप्प आहे…

पण नाही…. आम्हाला मात्र ऊरावर बसण्यातच फुशारकी वाटते…!!

हे ऊठसूठ कोणाच्याही “ऊरावर” बसून असंबद्ध बडबड करतात… आणि कशानेच यांचं समाधान होत नाही..

प्रश्न विचारला तर उत्तर न देता प्रतिप्रश्न विचारतात, उत्तर दिलं तर त्यावरही प्रश्न विचारतात..
आणि उगाच सहज साधं काही लिहिलं तरी ऊरावर बसून पुन्हा ‘प्रश्न’च विचारत राहतात..!

यावर विश्वंभर चौधरी एक उदाहरण देतात.. समजा, एखादी सरळ साधी पोस्ट लिहीली की, उदाहरणार्थ –

“मी रामनवमीसाठी तुळशीबागेतल्या मंदीरात गेलो होतो. तिथं आज फारच उकडत होतं” अशी पोस्ट आपण लिहीली की लगेच हे ऊरोगामी आपल्या ऊरावर बसून विचारतात –

  1. ‘पुरोगामी ना तुम्ही? देवळात कसे गेलात? ते ही रामाच्या? जय श्रीराम!’
  2. अकबराच्या काळात यापेक्षा जास्त उकडत होतं, तेंव्हा का गप्प बसून राहिलात?’
  3. ‘मंदीरात उकडलं की लगेच लिहीता, मशीदीतल्या उकडण्यावर का बोलत नाही?’
  4. ‘एसी’त राहणारे तुम्ही.. तुम्हाला उकाड्याबद्दल बोलायचा काय अधिकार..?
  5. तुम्ही निगेटिव्ह गोष्टीबद्दलच बोलता, तिथं ‘गुलाबाचं फुल’ फुललं होतं त्याबद्दल नाही बोलला.. जरा सकारात्मक गोष्टींकडे पहा की आयुष्यात..
  6. हे असं इकडंतिकडं फिरण्यापेक्षा आणि त्याच्या पोस्टी टाकण्यापेक्षा काहीतरी constructive करा की आयुष्यात..
  7. सध्या उकाडा हा महत्वाचा प्रश्न नाहीचेय, जरा शेतकऱ्यांवर बोला की.. दांभिक कुठले!!

हा हा हा…

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *