Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

अलीकडे मला सिरीयसली असं वाटतंय की…

१) ISRO सारख्या संस्था राजकीय हस्तक्षेपापासून दूरच ठेवायला हव्यात.. (विचार करा चांद्रयान मोहिमेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि कोट्यावधी लोक ते पाहताहेत म्हणल्यावर किती टेन्शन आलं असेल त्या शास्त्रज्ञांना! त्यांच्या मिशनचं लाईव्ह प्रक्षेपण करायला तो काही कोणता स्पोर्टस नाही, किंवा ते स्टेज परफॉर्मर नाहीत, त्यांना याची सवय असायला!.. म्हणून) RAW , IB , RBI यांसाहित अशा अनेक संस्थांची यादी करायला हवी, आणि त्यांच्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल कडक नियम करायला हवेत.. आणि कोणताही पक्ष किंवा सरकार असो, त्यांना हे नियम पाळणं बंधनकारक करायला हवं..

२) तसंच सैन्याचंही असावं..
राष्ट्रपती सोडलं तर आर्मी/नेव्ही/एअरफोर्स च्या कुठल्याच मोहिमेबद्दल बोलायची किंवा माहिती द्यायची किंवा त्याचा वापर करायची इतर कोणाही नेत्याला अथवा सरकारला परमिशन नसली पाहिजे.. म्हणजे कोणी क्रेडीटखाऊ आत्मा आयत्या बिळात नागोबा बनून बसणार नाही..

३) एक नवीन खाते निर्माण करायचे.. “डॉक्युमेंटेशन खाते”.. कोणत्याही निवडून आलेल्या नेत्याने सभेत/मीडियात/सार्वजनिक ठिकाणी कोणतंही विधान केलं की त्याचं डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे.. व या खात्याने त्या गोष्टीचे पुरावे आणि रेफरन्स मागितले पाहिजेत.. (म्हणजे, कोणीतरी कोर्टात तक्रार करा, मग मी पुरावे देईल.. असं नको..)
प्रत्येक नेत्याला त्याच्या सार्वजनिक बोलण्यासाठी उत्तरदायी केले, म्हणजे कोणीही नौटंकी अभिनय करत वायझेड सारखं काहीही रेटून खोटं बोलणार नाही..

४) इथून पुढे संसदेने एक कायदाच करावा की निवडणूकीला उभा राहायला किमान पदवी शिक्षणाची तरी अट हवी.. आणि एखाद्याला मंत्रिपद देण्यासाठी किमान पोस्ट-ग्रॅज्युएशनची तरी अट पाहिजे.. म्हणजे कोणी अशिक्षित अनपढ गवाँर माणूस मंत्री संत्री म्हणून आपल्या बोकांडी बसणार नाही..

५) परदेशात किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कोणी भारताचा कोणी नेता जाऊन बोलणार असेल, तर त्याला तज्ज्ञांनी लिहून दिलेले भाषण वाचायचीच सक्ती हवी.. (त्यांनी बोललेल्या भाषणावर त्या नेत्यासहित त्या भाषण लिहून देणाऱ्या तज्ञ व्यक्तीवरही खटला भरण्याची सोय हवी..) म्हणजे कोणी नॉनसेन्स व्यक्ती बाहेरच्या देशात जाऊन आपल्या देशाची आणि इथल्या नागरिकांची ‘चव’ घालवणार नाही..

६) प्रत्येक खात्याने महिन्यातून किमान एक तरी पत्रकार परिषद घेतली पाहिजे, आणि संबंधित खात्याच्या कॅबिनेट/राज्यमंत्र्यांनी त्या खात्यातील घोषणा केल्या पाहिजेत, किंवा आरोपांना उत्तरे दिली पाहिजेत. म्हणजे कोणीही अतृप्त आत्मा प्रत्येक गोष्टीवर स्वतःचा ‘वन मॅन शो’ करत जाहिरातबाजी करणार नाही..

**

तळटीप –
१) हे कोणाला अंशतः अथवा पूर्णतः पटू शकतं किंवा अजिबात पटू शकत नाही. माझे विचार आपल्याला आवडावेतच ही बळजबरी नाही..
२) मी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही किंवा कोणा व्यक्तीचे अथवा पक्षाचे नाव घेतले नाही.. कारण हे नियम निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना लागू असणार आहेत..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *