Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

ट्रॅडिशन

मी MBBS ला असताना, ‘ट्रॅडिशनल डे’ च्या दिवशी माझा एक मित्र पोतराजाचा पोशाख घालून आला होता.. समोर येऊन प्रत्येकाने दोन शब्द बोलायचे होते.. तेंव्हा तो मित्र म्हणाला, “हे पोतराज, कडकलक्ष्मी, वासुदेव, ही आपली संस्कृती आहे.. ती टिकली पाहिजे, म्हणून मी हा वेष निवडला”.. मी त्याला नंतर म्हणालो, “एवढीच तुला काळजी आहे, तर मग तुझ्या मुलाला पोतराज करणार आहेस का!”.. तर तो चिडलाच माझ्यावर.. एवढं काय रिऍक्ट होतोय म्हणाला.. संस्कृती टिकली पाहिजे असं वाटणं यात काय गैर आहे?

मी त्याला म्हणालो, “पोतराज, कडकलक्ष्मी, वासुदेव, देवदासी ही आपल्या संस्कृती ची काळी अंगे आहेत, ते जीवन भोगणाऱ्या लोकांच्या दुःखाची आपण कल्पनाही करू शकत नाही. या त्यांच्या मजबुरी आहेत. म्हणून या प्रथा बंद झाल्या पाहिजेत.. संस्कृती टिकवण्याची नावाखाली आपण काय ग्लोरिफाय करतोय किंवा काय पुढच्या पिढीच्या मनात ‘प्रोजेक्ट’ करतोय हे जास्त महत्त्वाचे आहे”..

केवळ आपल्या लहानपणीच्या काही रम्य आठवणी म्हणून आपण अशा संस्कृती जतनाच्या गोष्टी करत असू, तर ते चूक आहे.. लहानपणी (हौस म्हणून का असेना) केलेल्या गोष्टींबद्दल आपण बरेच नॉस्टॅल्जिक असतो.. म्हणून पालकांनी पण आपण आपल्या पाल्यापुढे कोणत्या व्यक्तिरेखा आदर्श म्हणून ठेवतोय, किंवा कोणती प्रतीके त्यांच्या मनावर इम्पोज करतोय याचे भान ठेवले पाहिजे.. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशन मध्ये एखाद्याने गब्बरसिंगची वेषभूषा केली तर तो मौजेचा भाग असू शकतो, (कारण त्या मुलालाही माहिती असते की ही इतिहासातली कोणी आदर्श वगैरे व्यक्तिरेखा नाही!) पण जेंव्हा या गोष्टी सणांचा किंवा संस्कृतीचा भाग म्हणून आपल्यासमोर येतात, तेंव्हा “जाऊ दे, पोरांची हौस आहे” म्हणत एवढ्या लाईटली घेऊ नयेत..

संस्कृतीतल्या अथवा इतिहासातल्या ज्या गोष्टी अडचणीच्या आहेत, त्या इग्नोर करणे, बाजूला टाकणे किंवा निदान ‘प्रोजेक्ट’ तरी न करणे, हे आपण केले पाहिजे..

दोन तीन दिवसांपूर्वी मी पोस्ट टाकली होती की, माझ्या मुलीच्या शाळेने जन्माष्टमीच्या निमित्ताने तिला ‘राधा’ बनवून पाठविण्याबद्दल आम्हाला नोट पाठवली.. त्यावर मी नाराजी व्यक्त करणारी पोस्ट टाकली होती.. त्यावर बरीच चर्चा झाली, बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया आल्या..
आता प्रश्न हा उरतो, की “शाळांनी जन्माष्टमीच्या निमित्ताने लहान मुलींना ‘राधा’ बनून या, म्हणून सांगितले तर काय बिघडले? राधेच्या बाबतीत तुम्हाला अडचण काय आहे?”

एकतर, जन्माष्टमी हा कृष्ण जन्माचा सोहळा आहे, त्यात राधेचा काही संबंध नाही.. दुसरी गोष्ट, राधेचा विवाह ‘अनय’शी झाला होता, आणि त्या विवाहित राधेचे त्या नगरातील राजाच्या मुलाशी (म्हणजे कृष्णाशी) प्रेमसंबंध होते.. विचार करा, अनय साठी त्याची बायको इथल्या राजपुत्रासोबत दिवसभर फिरते (किंवा रासलीला करते), हे किती लज्जास्पद असेल! ‘अनय’साठी तर ते तोंड दाबून बुक्क्यांचा मार च असणार आहे..

त्या दोघांचं प्रेम प्लेटोनिक होतं, की व्यभिचार या व्याख्येत येत होतं, हा माझा मुद्दाच नाही.. उलट निवडीची वेळ आल्यास मी प्रेमविष्काराचीच बाजू घेईन.. कोणत्याही दोन व्यक्तींच्या एकमेकांकडे आकर्षित होण्यास अनेक घटक कारणीभूत असतात, त्या सर्वांना नजरंदाज करत त्याला (समाजाच्या नजरेतून बघत) व्यभिचार ‘लेबल’ करणे मला पटत नाही.. सामाजिक चाकोरीतून आलेलंच प्रेमच केवळ प्रेम असतं आणि बाकी सारा व्यभिचार असतो, असंही अजिबात नाही.. असो..

म्हणून, ते प्रेम ‘शारीर’ होते की फक्त इमोशनल पातळीवर होते, हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवून, जर समजा, पुढे एखाद्या विवाहित मुलीने एखाद्या परपुरुषाशी संबंध ठेवले, आणि जाब विचारणाऱ्या पालकांना म्हणले की, “राधा कृष्णाचं उदाहरण लहानपणीच तुम्ही माझ्यावर ठसवलं असताना आता का विरोध करता? तर आपली रिऍक्शन काय असेल? ऍक्सेप्ट करू आपण ते? जरी या दोघांच्यात काही रासलीला नसतील, तरी नुसतं इमोशनल लेव्हलवरचं प्रेम सर्रास मान्यता पावेल का?

जुन्या पिढीनं राधा-कृष्णाच्या प्रेमाचं द्वैतअद्वैत समजून घेतलं आणि ते प्रेम पवित्रही माणलं.. पण “मैं करू तो साला कॅरेक्टर ढिला हैं” म्हणणारी ही पिढी किंवा पुढच्या पिढ्याही ते समजून घेतील हे कशावरून? मग कशाला राधाकृष्णाच्या या गोष्टी सामाजिक पातळीवर आणायच्या, त्या दैवी असलेल्याच सगळ्यांच्या सोयीचं आहे.. असं मला वाटतं..

संस्कृतीतल्या, पुराणातल्या अथवा इतिहासातल्या ज्या गोष्टी अडचणीच्या आहेत, त्या इग्नोर करणे, बाजूला टाकणे किंवा निदान ‘प्रोजेक्ट’ तरी न करणे, हे आपल्या हातात आहे.. आणि याने संस्कृती वर घाला वैगरे काही येत नसतो.. कारण संस्कृती ही ‘प्रवाही’ असते.. जुनं कालबाह्य होत असतं, नवीन ऍड होत असतं.. त्यामुळं “अमुकच एक गोष्ट” आपली संस्कृती रिप्रेझेंट करते असं समजणंही तितकंसं बरोबर नाही..

संस्कृतीतल्या खूप लाडक्या अथवा पाळल्या जाणाऱ्या गोष्टी सुद्धा जर “कालबाह्य वाटत असतील” तर त्या आपण टाकून देणे, हे संस्कृतीच्या भल्यासाठीच असते..

आता दुसरा भाग,

धर्म म्हणजे, टिपिकल कपडे घालणं, माळा/क्रॉस वगैरे घालणं, किंवा सणवार पाळणं, व्रतवैकल्य करणं, पूजाअर्चा, नमाज, प्रेअर, करणं, असंच समजलं जातं, तेच प्रोजेक्ट केलं जातं.. पण ‘धार्मिक विधी/गोष्टी’ या धर्माचा फक्त एक भाग असतात.. धर्म त्याहून मोठा असतो, आणि असायला हवा खरंतर..

आणि ते लहान मुलांचं वय “धर्म” शिकायचं नसतंच.. तेवढं त्यांचं आकलनही नसतं.. पण आपण त्यांना धर्म कळू लागण्याच्या अगोदरच त्यांना ‘धार्मिकता’ शिकवतो.. धर्मातली फक्त धार्मिकताच त्यांच्यापर्यंत प्रोजेक्ट करतो..

मग अशी मुलं मोठं झाल्यावर त्या रूढी परंपरांची कारणमीमांसा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.. नुसती प्रतीकंच आधी शिकवल्यावर, ती मुलं पुढं डीजे लावून गणपतीपुढं नाचणंही जस्टीफाय करू लागतात.. त्यालाही संस्कृती जतनाचाच भाग समजतात.. शाळांत सण साजरे करणारी मुलं समाजात (आणि रस्त्यावरही) सण साजरे करणे, आपला हक्क समजू लागतात.. म्हणून शाळेने फक्त ‘शालेय शिक्षण’ द्यावे.. नसत्या भानगडीत पडू नये..

  • डॉ सचिन लांडगे.
मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *