Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

‘सण’सणीत

लहानपणी दोन दोन रुपये वर्गणी काढून गल्लीत साधासा गणपती बसवायचो.. पण सध्या मात्र या सण उत्सवांनी आपले स्वरूप आणि प्रायोरिटी दोन्ही पूर्णपणे बदलली आहे..

गणपती दहीहंडी हे केवळ आता धार्मिक उत्सव राहिले नाहीत.. त्याला प्रचंड राजकीय मुल्य आहे.. गल्लोगल्लीतल्या रिकामटेकड्यांसाठी तर राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून घ्यायची संधीच आहे.. मग एखादा भावी नेताही यातून उगम पावतो.. अगदीच नेता नाही होता आलं, तरी उपद्रवमूल्य तरी नक्कीच कमविता येतं..

कोणत्याही धार्मिक किंवा जयंती पुण्यतिथीच्या मिरवणुकीतल्या डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या गर्दीला आपण अंडरएस्टीमेंट नाही करू शकत..
टाचणीच्या टोकावर मावण्याइतकीच बौद्धिक कुवत असणारे आणि कुठल्याही प्रश्नाला सोपी उत्तरे शोधणारे, किंबहुना डोक्यात कोणते प्रश्नच पडू न देणारे लाखो निर्बुद्ध आजूबाजूला खचाखच भरलेले आहेत.. त्यांच्या अंगातली सगळ्या प्रकारची उर्मी, मस्ती, रग, किंवा एनर्जी बाहेर काढण्याची सोय असतात मिरवणुका.. आपण फक्त डेसीबल मोजत बसायचे अन आपापल्या खिडक्या लावून घ्यायच्या.. कान, डोळे, आणि तोंडे बंद ठेवायची..

प्रत्येक सणामागं प्रचंड मोठं अर्थकारण वेग घेतंय.. आता नुसतं दिवा आणि अगरबत्ती लावून भागत नाही.. मग सजावट हवी, देखावे हवे, आरास हवी, रोषणाई हवी.. आपली प्रायोरिटी ही भक्तीपेक्षा “प्रतिकां”कडे गेली की असं होतं.. मग ‘तुझा गणपती मोठा की माझा मोठा’ यावर चढाओढ लागते.. खडे, रत्ने, ताईत, प्रसाद यालाच अवाजवी किंमत येते.. घरी मातीचे बैल, नागाची चित्रे आणि वडाच्या फांद्या आणून पुजल्या जातात.. आणि प्रबोधनाचे मेसेज केवळ व्हाट्सएप फॉरवर्ड पुरतेच राहतात..

या सणांच्या प्रकटिकरणाचे डायमेंशन्स इतके बदलले आहेत की आता आपण हे थांबवू नाही शकत.. त्याविरुद्धचे प्रबोधन अगदीच क्षीण आहे..
ज्या समाजात दर्जाहीन सिरीयल आणि गल्लाभरू चित्रपट जिथं कोट्यवधी लोकांची वैचारिक बैठक निश्चित करतात तिथं प्रबोधन हीच एक अंधश्रद्धा ठरते.. “आम्हीच का?” आणि “आत्ताच का?” या दोन प्रश्नातच गुंतवून पुरोगामी लोकांची राजनैतिक कत्तल केली जाते..

आणि चाळीस वर्षांच्या साधनेचे फलित म्हणून तुम्हाला शेवटी एक “गोळी” मिळते.. पुढे ही मालिका सुरूच राहते..
“गोळीने विचार मारता येत नाहीत, विचार अमर असतात” असं कुठवर आपणच एकमेकांना समजावून समाधान करत राहायचं सांगा..?

मूर्तिपूजकांचा देश आहे आपला.. जगण्यातल्या साऱ्या uncertainties आणि insecurities चे भांडवल करत सतत कुठल्यातरी प्रतिकांवर इम्पोज करत आलो आहोत आपण.. सतत एका दिव्य आणि अदृश्य नायकाच्या शोधात असतो आपण..
मानसिक गुलामी, चमत्कारांची ओढ आणि पारलौकिक आकर्षण आपल्या जीन्स मधेच एनकॉर्पोरेट झालंय की काय, अशी शंका येते कधी कधी..

निर्बुद्धी ही आपल्यात बाय डिफॉल्टच आहे.. बुद्धी मात्र कमवावी लागते.. आणि त्यासाठी बुद्धीच्या देवतेसमोर तुम्ही कितीही डोके आपटा, पण शष्प ही फरक पडणार नाही.. आणि पडतही नसतो..

  • डॉ सचिन लांडगे.
मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *