रफू केलेल्या भावना, उसवलेली नाती,
आणि अल्टर झालेल्या जाणिवा घेऊन,
कुठवर हे तडजोडिंची ठिगळं लावलेलं आयुष्य जगायचं?
विदीर्ण झालेला परिस्थितीचा सदरा,
उसवलेल्या टिपांसाहित घालायचा..
कधी लाज झाकण्यासाठी वापरायचा,
कधी सुखांची एम्ब्रॉयडरी करून मिरवायचा..
मग, तुटलेल्या गुंड्या, उसवलेल्या काज्या,
आणि मळलेली कॉलर घेऊन,
कुठवर हे चुरगळलेलं आयुष्य जगायचं?
आयुष्याला सुखाच्या पिको-फॉलची हौस झेपत नाही..
रोजच्या जगण्याला मौजेची झालर लावायची ऐपत नाही..
कितीही टिपा मारल्या तरी,
नवीन ठिकाणी उसवायचं काही थांबत नाही..
अन खर्चाला कितीही कात्री लावली तरी,
थोडीही चैन करता येत नाही..
मग, भोकं पडलेली बनियन, फाटलेली लुंगी
आणि रिकामा खिसा घेऊन,
कुठवर हे विरलेलं आयुष्य जगायचं?
अपमानाच्या अगणित सुया टोचत राहतात,
आपल्या गळ्यातला दोरा आपल्यालाच काचत राहतो,
चारदोन धुण्यातच आयुष्यातले रंग फिके पडतात,
धागा धागा आयुष्यभर विणून शेवटी स्वतःसाठी
थोडंही कोरं कापड उरत नाही..
मग उरलेली रीळं, रिकामी बॉबीन,
आणि गरगरणारं काळाचं चाक बघत,
कुठवर हे मळलेलं आयुष्य जगायचं?
- By Dr Sachin Landge – द फिलॉसॉफी टेलर 🤔☺️