Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

आहे मनोहर तरी…

नुकतीच मी एक पोस्ट टाकली होती, ज्यात उठसूट कोणीही लोक कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करतात आणि मीडिया ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज म्हणून वेड्यासारखं करतं, त्यां सगळ्या लोकांना त्यांच्या औषधांच्या परिणामकारकतेची जबाबदारी पण स्वीकारायला लावायला हवी, असा माझ्या पोस्टचा रोख होता.. ज्यांच्याकडं उपचारांसाठी मान्यताप्राप्त डिग्री नाही (ज्यांना आपल्याकडं भोंदू म्हणतात) त्यांना “तुम्ही डॉक्टर नसले (म्हणजे तुमच्याकडे आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यताप्राप्त डिग्री नसली) तरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये हेल्पर म्हणूनही काम करू शकता”, असं मी त्यात म्हणलं होतं.. बऱ्याच डिग्री होल्डर लोकांना पण ते स्वतःलाच म्हणल्यासारखं का वाटलं हे मलाच कळलं नाही.. म्हणजे आपणच आपल्याला डॉक्टर समजत नसलो, तर त्यात माझी काय चूक आहे? असो..
कोरोनावर अमुक औषध गुणकारी तमुक औषध गुणकारी अशा स्वयंघोषित व्हिडीओज चा सध्या सुळसुळाट झालाय.. आजच मी प्राथमिक शिक्षक असलेल्या एका माणसाने कोरोना बरा होण्याबद्दल केलेला दावा बघितला.. कॅमेरून नावाच्या छोट्या देशात तर जवळपास 800 हर्बलिस्ट लोकांनी सरकारकडे कोरोनावर उपाय शोधल्याचा दावा केला आहे.. पण एक लक्षात घ्या, दावा कोणीही करू शकते, त्याला कुठंच बंदी नाहीये.. पण सिद्ध करायची जबाबदारी घेऊन सिद्ध करून दाखविले, तरच ते ‘औषध’ म्हणून वापरता येते..
मी तर म्हणतो, एखाद्याने “माती” जरी कोरोनावर उपाय म्हणून शोधली, तरी काही हरकत नाही.. त्या मातीच्या ingredients चे molecule standardization करणे, त्याची आधी animals मध्ये Randomized control trial घेणे, मग human volunteers मध्ये Double blind study करून Placebo इफेक्ट rule out करणे, आणि मग large scale वर त्याच्या human trials घेणे, आणि मग FDA approval घेणे.. अशी चाचण्यांची जगमान्य पद्धत आहे, ती पार केली पाहिजे.. रोगावरचे कोणतेही उपाय हे औषध नसतात, ते फक्त उपाय असतात.. उपयुक्तता चाचणीतून गेल्याशिवाय आणि FDA approval असल्याशिवाय कोणताही उपाय ‘औषध’ होत नाही.. केवळ आमच्या पुस्तकांत लिहिलंय ही गोष्ट ‘सबब’ म्हणून चालून जाईल, पण ते scientific होत नाही..
उपाय आणि उपचार यात पण फरक आहे.. डोकेदुखी वर अमृतांजन लावणे या ‘उपाय’ झाला, ‘उपचार’ नाही.. ती डोकेदुखी ताणतणाव किंवा इतर तात्पुरत्या कारणांनी असेल तर उपायांवर भागतं, पण तसं नसेल तर मात्र MRI सारख्या तपासण्या करून योग्य निदान आणि त्याचे उपचार केलेच पाहिजेत.. पण जर समजा कोणी अमृतांजन हाच डोकेदुखीचा उपचार आहे, असा प्रसार करू लागला तर ते शास्त्रीय दृष्टिकोनातून तितकंसं बरोबर ठरत नाही.. तसाच फरक Prevention आणि Treatment मध्ये असतो..
रोग आणि विकार हे देखील वेगवेगळे आहे. रोग म्हणजे disease, तर विकार म्हणजे disorder.. ‘Order’ बिघडल्याने होणारे आजार ते disorder.. डायबेटीस हा विकार आहे, तो रोग नाही.. तसेच काही आजार हे मनोकायिक असतात.. मनोकायिक म्हणजे Psychosomatic.. (याबद्दल गुगल करा, तुम्हाला अधिक माहिती मिळेल).. आपल्याला जालीम औषध मिळालंय, किंवा आपल्याला चांगला डॉक्टर भेटलाय या विचारांनी सुद्धा रुग्णाच्या लक्षणांमध्ये फरक पडायला लागतो.. ‘डॉक्टरने दोन शब्द गोड बोलले तरी निम्मा आजार पळून जातो’ हे आपल्याकडे म्हणलं जातं ते यामुळेच.. पण याचाच फायदा बऱ्याच पॅथी घेतात.. पॅथीचं सोडा, याचा फायदा बाबा बुवा हकीम यांना देखील होतो.. मंत्रतंत्र गंडादोरा यांनी होणाऱ्या काहीशा मनोकायिक परिणामांमुळे त्यांचं फावतं, अन त्याचीच प्रसिद्धी जास्त होते.. पण ज्यांना काही फरक पडला नाही ते लोक मात्र गुपचूप मार्ग बदलतात..
असो..
उत्क्रांतीत प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रात बदल होत असतात. पूर्वी पिकांवर अत्यंत गुणकारी ठरलेल्या DDT ला आज तितकासा प्रतिसाद मिळत नाही.. पिढ्या दर पिढ्या रोगप्रतिकार शक्तीत बदल घडतो, एकाच वेळेसचीही herd imunity वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते.. काही औषधे एका human race मध्ये जास्त तर दुसऱ्यात कमी प्रभाव दाखवू शकतात.. इतकंच काय पण प्रत्येक व्यक्तीगणीही प्रभाव कमीजास्त होऊ शकतो.. प्रत्येकाचं जेनेटिक मेकअप वेगळं असल्याने औषधाचं pharmacodynamics बदलतं.. (दारू प्रत्येकाला वेगळी चढते, तसं काहीसं..) Environmental, occupational, आणि socioeconomic factors ही औषधांच्या pharmacodynamics वर प्रभाव टाकत असतात.. रोगांच्या किंवा bacteria /viruses यांच्यात पण mutation होतात.. अशी खूप क्लिष्टता असते.. ‘सब घोडे बारा टक्के’ असं सायन्स मध्ये नसतं..
मॉडर्न मेडिसिन मधली पूर्वी शोधलेली कितीतरी औषधं आज outdated आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक परिणामकारक औषधांचा शोध लागलाय आणि अजून तो सुरूच आहे. एखादं औषध FDA approved झालं, पुस्तकांत छापलं म्हणजे ‘ते आता कायमचं झालं’ असं होतं नसतं.. त्याचे फीडबॅक घेणं चालूच असतं.. म्हणून 200 किंवा 2000 वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात दिलंय म्हणून आपण त्याच त्या औषधांची भलामण करत असू, (आणि त्यामुळं ते औषध authentic trials ना सामोरे जात नसेल), तर त्याच्या परिणामकारकतेची विश्वासार्हता कमी होते, जे आपल्याच उपचारपद्धती साठी घातक असते.. समजा, आज जर कोणी डॉक्टरला म्हणाले की, ‘पेनिसिलिनचा वापर अलीकडे अजिबात योग्य नाही’, तर बोलणाऱ्याच्या अंगावर धावून जाणारा अलोपॅथीक डॉक्टर मी तरी अजून पाहिलेला नाही.. एकेकाळच्या लाडक्या Nimesulide वर बंदी घातल्यावर USFDA ला कोणी शिवीगाळ केल्याचंही ऐकिवात नाही.. किंवा अनेस्थेशीया मध्ये एकेकाळी एक शतक गाजवलेलं आणि मी पण वापरलेलं Thiopental sodium हे भुलीचे औषध “ते unsafe आहे त्यापेक्षा Propofol वापर” असा सल्ला देणाऱ्याची मी तरी कधी लायकी काढलेली नाही..
मला सांगा, औषधं आपल्यासाठी असतात की आपण औषधांसाठी असतो?
उपचारपद्धती आपल्यासाठी असतात की आपण उपचारपद्धती साठी असतो?
मग कुठल्याही औषधावर किंवा एखाद्या उपचारपद्धतीवर कोणी शंका उपस्थित केली तर आपल्याला राग का येतो?
जर औषधं आपल्यासाठीच असतात तर त्यांच्या परिणामकारकतेवर कोणी शंका घेतली, तर त्याला authenticated studies दाखविणे, नसतील तर त्या कशा होतात (किंवा होतील) त्याचा पाठपुरावा करणे, हे करण्यापेक्षा आपण जर समोरच्याला दूषणं देत असू, त्याची लायकी काढत असू तर मग आपण ‘सायन्स’ चे विद्यार्थी कसे?
मी नेहमीच गुळमुळीत लिहीत नाही. माझी मतं पटणारा जसा मोठा वर्ग आहे तसं न पटणाराही मोठा वर्ग आहे.. सगळ्या कॉमेंट्स वाचायला आणि त्यावर सविस्तर उत्तरं द्यायला मला बहुधा वेळ नसतो, पण नंतर जसा वेळ मिळेल तसं मी कॉमेंट्स वाचतो, आणि Genuine प्रश्नांना त्या त्या व्यक्तीच्या मेसेंजर मध्ये उत्तरेही देतो.. तरीपण एखाद्या व्यक्तीला माझं सर्वच सर्वकाळ पटावं असं नाही.. (मलाही माझं पटत नाही तर कधीकधी!) असो..
मला इतकंच म्हणायचंय, की आपली बहुतांश मतं जुळत असलेल्या व्यक्तीचा एखादा मुद्दा आपल्याला पटत नसेल तर विरोध दर्शविण्याची पण एक पद्धत असते.. एकतर आपण ‘असहमती’ दर्शवू शकतो, किंवा आवश्यक पुरावे देत मुद्दा खोडून काढू शकतो, किंवा वेळ आणि इच्छा नसल्यास गप्प बसू शकतो.. पण इतर लोक करतात तसं लायकी काढणे, वैयक्तिक पातळीवर घसरणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे असं आपण डॉक्टर लोकही करत असू तर त्यांच्यात अन आपल्यात शिक्षणाने काहीच फरक घडविलेला नाही का?
सतत प्रश्न उपस्थित करत राहणे, आणि कुठल्याही नव्या बदलाची तयारी ठेवणे, हे ‘सायन्स’च्या विद्यार्थ्यांचं पहिलं लक्षण आहे.. एकदा का तुमच्यात पोथीनिष्ठता किंवा ग्रंथप्रामाण्य आलं, की तुमची प्रगती खुंटलीच म्हणून समजा.. आज मॉडर्न मेडिसिननं जी प्रगती केलीये त्याचं कारण त्याची विश्वासार्ह परिणामकारकता हेच आहे.. “आपली स्वतःचीच चूक सुधारायची संधी जिथं असते” ती गोष्ट जास्तीत जास्त परफेक्शन कडे जात असते.. (ही गोष्ट व्यवहारात देखील लागू पडते).. उदाहरण सांगायचं झालं तर, सोलापूरच्या डॉ सरदेसाई मॅडम यांनी Pre Eclampsia साठीच्या अगोदर वापरात असलेल्या Magsulf regime ला चॅलेंज केले, आणि Low socioeconomic Indian women साठी नवी Magsulf regime शोधून काढली. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या, स्टडी केले, त्याचे फीडबॅक घेतले, त्याचे पेपर्स international platform वर प्रेझेंट केले, तिथून approval घेतलं. आणि त्याला ‘Solapur regime’ असं नावही दिलं. मग ते टेक्स्टबुक्स मध्येही आलं… आता हे टेक्स्टबुक्समध्ये किती दिवस राहणार? जोपर्यंत त्याला पुन्हा कोणी चॅलेंज देऊन नवीन स्टडी प्रेझेंट करत नाही तोपर्यंत! अजून पन्नास शंभर वर्षांनी समजा राहणीमानातले बदल, पर्यावरण, आहार, प्रतिकारक्षमता, यातल्या बदलामुळे कोणीतरी नवीन स्टडी करून दाखवून देईल की Solapur regime तितकीशी effective उरली नाहीये.. मग डॉ सरदेसाई मॅडमचे फॅन त्याच्या डोक्यात दगड घालणार नाहीत.. तर ते त्याचे results check करतील, authentication तपासतील आणि त्या नवीन स्टडीला accept करतील.. मॉडर्न मेडिसिनचं Evidence based होत जाणंच त्याला विश्वासार्हता देतं..
आपली पॅथी टिकवायची असेल तर ती जास्तीत परिणामकारक आणि विश्वासार्ह होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.. औषधांच्या सत्यासत्यतेवर कोणी शंका घेतली की नाराज न होता, त्यांनी काय रेफरन्स घेतलेत, त्यांचा डेटा बेस काय आहे, सॅम्पल साईझ किती आहे, बायस रुलआऊट केलेत का, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत.. तरंच आपण सायन्स चे विद्यार्थी.. आपण ‘औषध की तरफ से, नाही तर ‘सायन्स की तरफ से’ असलं पाहिजे..
आपल्याला आयुर्वेद अलोपॅथी आणि होमिओपॅथी माहिती असते, पण जगात मान्यता असलेल्या नसलेल्या मिळून शंभरेक तरी उपचारपद्धती असतील.. एखाद्या उपचारपद्धतीच्या परिणामकारकते विषयी बोललं की “तुम्हाला ज्यातलं ज्ञान नाही त्याविषयी बोलता कशाला” असं प्रत्येकजणच म्हणतो.. वास्तविक हा तर्कदोष (Fallacy) आहे.. प्रत्येकवेळी अनुभव घेतल्याशिवाय बोलूच नये असं नसतं.. त्या त्या विषयी संबंधित असलेल्या international platform वर असलेल्या स्टडीज चर्चा यावरूनही आपल्याला निष्कर्ष काढता येतो..
एखाद्या औषधाविषयी किंवा पॅथी विषयी बोललं की त्या पॅथीचे लोक ते स्वतःवरच का घेतात? समजा, ‘आपल्या पॅथीवर खूप प्रेम आहे म्हणून!’ असं गृहीत धरलं तर त्या पॅथीच्या उन्नयनासाठी आपण काय प्रयत्न करतो? त्या पॅथीची आपली निवड ऐच्छिक होती का? आताही त्या पॅथीचेच उपचार देण्यासाठी आपण किती कटिबद्ध आहोत किंवा स्वतःसाठी घेण्यासाठी किती प्रयत्नशील आहोत? आपल्या पुढच्या पिढीला पण त्या पॅथीचेच शिक्षण घेण्यासाठी आपण किती आग्रही असू? या प्रश्नांची उत्तरे ज्याची त्यांनीच शोधायची आहेत..
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, प्रत्येक जडिबुटीवाल्याला आपण आयुर्वेदाचार्य समजून त्याची बाजू का घेतो? आयुर्वेदाची कुठलीही पदवी नसलेल्या लोकांनी इथं आयुर्वेदिक औषधे सरसकट विकणे योग्य आहे का ? वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना एकाच रोगासाठी देश, काळ, आहार विहाराचा विचार करून वेगवेगळी औषधे द्यावी लागतात. तर इथे ते कोणीही सरळ टीव्ही वर येउन, ‘इसे सुबह शाम खाने से हृदयरोग, ब्लड प्रेशर जैसी बिमारीया दूर होती है’ असे सांगत असतात . कुठंही तंबू लाऊन डायबेटीस, स्थौल्य इ.ची आयुर्वेदिक औषधे विकली जातात. मग त्यांच्या जडीबुटीवर केलेल्या टीकेला आपल्या आयुर्वेदशास्त्रावरच टीका आहे, असं कसं समजतो आपण? आयुर्वेद यांच्यामुळे बदनाम होतोय असे कोणाला वाटत नाही का? सरकारकडून अपेक्षाच नाही, पण आयुर्वेदिक डॉक्टर्सच्या संघटना पण याविरुध्द आवाज का उठवत नाहीत.? आयुर्वेद एवढा सोपा आहे का हो, की कुणीही उठावं आणि दुकान टाकावं..?
कोणत्याही औषधांबद्दल किंवा उपायांबद्दल अवास्तव दावे करताहेत तर करू देत की, ज्यांना घ्यायचंय ते घेतील ज्यांचा विश्वास नाही, ते नाहीत घेणार.. असं आपल्याकडं सर्रास म्हणलं जातं.. त्यात ह्या कोव्हीडच्या भीतीच्या काळात तर जास्तच..
पण आपल्या या “काही तोटा तर नाही ना, मग करून बघायला काय हरकत आहे” अशा मानसिकतेचाच फायदा उठवतात लोक.. आपल्या विश्वासावर आणि भावनांवर त्यांचा बाजार मांडतात, आणि कसलेही safety , efficacy, standardization चे प्रोटोकॉल न पाळलेले उपाय ‘औषध’ म्हणून आपल्या माथी मारू शकतात.. (याबाबत नुकताच एक व्हिडिओही व्हायरल झाला होता).. ही फसवणूक नव्हे तर काय आहे? बरं, याचा दुसरा तोटा असा की, अशी औषधं घेणाराने उगीच over confidence मध्ये जाऊन mask, sanitization, physical distancing चे नियम पाळले नाहीत, तर त्याची सजा सगळ्यांनाच भोगावी लागणार आहे..
असो..
समारोप करताना अजून एक सांगतो, ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळं चर्चेत आलेलं Hydroxychloroquine हे औषध मलेरियात effective आहे, पण Covid19 साठीच्या स्टडीज मध्ये त्याची efficacy अपेक्षेइतकी आढळून न आल्याने आता त्याचा वापर थांबवला आहे.
खाली एका यु ट्यूब वरच्या लिंकचा एक व्हिडिओ मी शेअर केला आहे. त्यातल्या बहुतांश वाक्यांशी मी सहमत आहे.. सोळा मिनिटांचा व्हिडीओ आहे, तो अवश्य पाहावा..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *