– डॉ सचिन लांडगे.
प्रेम म्हणजे शरीरसंबंधच असतील असं नव्हे..
शरीरसंबंध आले म्हणजे प्रेम असतंच असं नव्हे..
शरीरसंबंधासाठीच प्रेम असतं असंही नव्हे..
प्रेम असलं म्हणजे लग्न व्हावच असं नव्हे..
लग्न झालंय म्हणजे प्रेम असतंच असं नव्हे..
शरीरसंबंध आले म्हणजे लग्न कराच असं नव्हे..
आणि लग्न म्हणजे केवळ शरीरसंबंधच असे नव्हे..
असे अनेक अर्थ असतात मानवाच्या भावभावनांचे, इच्छांचे आणि त्यावर आधारित नातेसंबंधांचे..
यावरच्या विविध पैलूंना विचारात घेणारा प्रागतिक अर्थ आहे कोर्टाच्या कालच्या निकालाचा..
नुसतं , “४९७ कलम रद्द, आता विवाहबाह्य संबंध ठेवणारांना झाले रान मोकळे” अशी ठरकी पत्रकारिता करणाऱ्यांना समजेल, एवढं सोप्प नाहीये ते!!
कोर्ट म्हणतेय, “विवाह झाला म्हणजे पार्टनरच्या शरीरावर मालकी हक्क मिळाला असं नव्हे”..
हे आपल्याला म्हणायला फार सोपे वाटतेय, पण त्यानुसार वागायला मात्र खूपच अवघड आहे..
विवाह म्हणजे, एकमेकातल्या शरीरसंबंधाच्या (सामाजिक आणि कायदेशीर) परवानगी सोबतच, आपल्या पार्टनरची जबाबदारी, मुलाबाळांप्रती एकमेकांची जबाबदारी, त्याच्या/तिच्यासोबतची मानसिक, भावनिक गुंतवणूक, एकमेकांचा आदर, परस्परांच्या निर्णयाचा आदर वगैरे, या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या असतात.. उलट याच गोष्टी जास्त महत्वाच्या असतात..
मग,
जर एखाद्या पुरुषाने विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवले तर त्याच्यात असलेले इतर सगळे सद्गुण दुय्यम ठरवत जर त्याची पत्नी, ‘शरीरसंबंध’ या एकाच गोष्टीचे भांडवल करत पुढचे सगळे निर्णय घेणार असेल, तर ती त्याच्यावर शारीरिक मालकीहक्काचाच अप्रत्यक्ष दावा करत असते..
आणि,
जर एखाद्याच्या बायकोने विवाहबाह्य संबंध ठेवले तर तिचे बाकी अंगभूत गुण, धडाडी, किंवा संसाराबाबतचा तिचा त्याग, या सगळ्या गोष्टी नजरंदाज करत केवळ ‘त्या’ गोष्टीवरून तिचे मुल्यमापन होणार असेल, अथवा घटस्फोट होणार असेल, तर तो पतीही तिच्या शरीरावरच्या (लग्नामुळे मिळालेल्या) मालकी हक्काचा दावाच करत असतो..
म्हणून मी माझ्या पार्टनरच्या शरीरावर मालकी हक्क दाखवत नाही असं म्हणणे, प्रत्यक्षात तितके सोपे नाही..
कारण लग्न म्हणजे केवळ शरीरसंबंध नव्हे!! त्याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी लग्नासाठी महत्वाच्या असतात.. पण ‘शरीरसंबंध’ या एकाच गोष्टीला आपण “टॉप प्रायोरिटी” देत असू, तर आपल्याला आपल्या ‘धारणा’ तपासून घ्यायची जास्त गरज आहे..
विवाह म्हणजे एक करार आहे.. एकमेकांत असलेली कमिटमेंट आहे.. जशी ती शारीरिक पातळीवर आहे तशीच ती मानसिक भावनिक आणि सामाजिक पातळीवर ही आहे.. यातल्या कुठल्याही पातळीवरची कमिटमेंट एका पार्टनर ने तोडली तर दुसऱ्याला त्याच्यापासून घटस्फोट घ्यायचा अधिकार तर केंव्हाही आहेच.. पण जशी भावनिक मानसिक आणि सामाजिक पातळीवर ची कमिटमेंट तोडणं कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा नाहीये, तसं शारीरिक पातळीवरची कमिटमेंट तोडणं इथून पुढं गुन्हा नसणार आहे.. (आधी तो एकतर्फी गुन्हा होता).. इतकंच..
असो… लग्न आणि त्यासोबतच्या असणाऱ्या (शारीरिक व्यतिरिक्त इतरही) कमिटमेंटस महत्वाच्या मानायला आणि त्यांना जास्त रिस्पेक्ट द्यायला शिकणे, याबाबतीत मात्र खूप लांबचा पल्ला गाठायचाय अजून आपल्याला..
– डॉ सचिन लांडगे.
**