कालच्या दोन बातम्या – एक हैदराबाद गॅंगरेप प्रकरणातील आरोपींचे पहाटे एन्काऊंटर आणि दुसरी उन्नाव गॅंगरेप प्रकरणातील जामिनावर सुटलेल्या आरोपींनी कोर्टात केसच्या सुनावणीसाठी जाणाऱ्या बलात्कार पीडितेला रस्त्यात जाळून मारलं..
आपल्या भारतात दोनच जाती आहेत – आतले आणि बाहेरचे!!
जे व्यवस्थेच्या आतले आहेत, किंवा ‘आहे रे’ वर्गातले आहेत, ते आतले! मग त्यांच्यासाठी कायदे वेगळे, कायद्यांचे अर्थ वेगळे, नियमही वेगळे.. आणि जे व्यवस्थेच्या बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी मात्र नियम वेगळे!
पहिल्यापासून हेच चालत आले आहे. आतल्यांनी ही सामाजिक व्यवस्था आपल्या सोयीसाठी लावली आहे, वापरली आहे, आणि वाकवलीही आहे.. प्रियांका भोतमांगे पासून ते आसिफा उन्नाव पर्यंत.. गुन्हेगार जेव्हा आतले असतात, तेव्हा व्यवस्था त्यांच्यासाठी राबते.. मग तपासात ढिलाई दाखवली जाते, संशयाचा फायदा दिला जातो, जामीन मिळतात, आदर्श गाव पुरस्कार मिळतात, समर्थनाचे मोर्चे निघतात, सोशल मीडियावर पोष्टीवर पोष्टी पाडल्या जातात..
पण गुन्हेगार जेव्हा बाहेरचे असतात तेव्हा मात्र त्यांचं एन्काऊंटर सहज होतं.. कधी निर्भयासारखी ताकत त्यांच्याविरोधात एकवटते तर कधी कोपर्डी सारखी त्यावर राजकीय पोळीही भाजून घेतली जाते..
तुम्ही कोणत्याही जातीचे असा किंवा कोणत्याही धर्माचे असा, तुम्ही आतले आहात की बाहेरचे आहात, यावरच बऱ्याच गोष्टी ठरतात.. ज्यांच्याकडे पैसा, सत्ता आणि संधी आहेत ते आतले… मग ते सत्तेत असोत अथवा नसोत, किंवा कोणत्याही जातीधर्माचे असोत, ते सगळे आतलेच.. आणि आतल्यांसाठी नियम वेगळे..! मग हैद्राबाद च्या चार विकृतांचे एन्काऊंटर करणारे पॅरलल व्यवस्थेचे हात उन्नावच्या त्या चार जणांना जामीन देण्यासाठी झटतात..
व्यवस्थेच्या आत सध्या एका धर्माचे आणि ठराविक जातींचे वर्चस्व आहे म्हणून आपल्याला हा “कास्ट काँफ्लिक्ट” वाटतो, पण निट पाहिलं तर हा कास्ट ऐवजी “क्लास काँफ्लिक्ट” जास्त आहे.. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तो व्यवस्थित पाळला, खेळला आणि जपला जातो..
तुम्ही साधे कारकून असाल आणि तुम्ही शंभर रुपयांची लाच घेऊन भ्रष्टाचार केला तर तुम्हाला शिक्षा होते, कारण तुम्ही बाहेरचे असता! पण तुम्ही नेते असाल तर नियम वेगळा असतो.. त्यातल्या त्यात अजूनच आतले असाल तर क्लीन चिट देखील मिळते..
तुम्ही रस्त्याने गाडी चालवताना एखाद्याला अधू केले तरी तुम्हाला शिक्षा होते, पण तुम्ही सलमान खान असाल किंवा अंबानीपुत्र असाल तर तुमच्यासाठी ही व्यवस्था वाकते आणि विकते..
कायदा बनविताना तो सर्वांसाठी समान राहावा असा प्रयत्न केलेला असला तरीही ही सामाजिक व्यवस्था कायद्यालाही आपल्या सोयीने आपल्यासाठी राबवते/वाकवते/वापरते..
अधिकारी हे कायद्यांच्या नियमांना बांधलेले असतात. त्यांना त्यांचे अधिकार कायद्याने मिळालेले असतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांची कक्षा कुठल्याही कारणांमुळे स्वतःच्या मर्जीने वाढवून घेतली, आणि त्याला लोकभावनेला बळी पडून नेत्यांनी/मीडियाने/समाजाने मान्यता दिली तर ती अंतिमतः दुधारी तलवार ठरते.
हातात बंदूक असली की त्याची नळी कोणावर रोखायची ते कायदा नाही ठरवत, मग ते पॅरलल व्यवस्था ठरवू लागते.. अशावेळी मग ‘बरोबर ते आपलं’ असं उरत नाही, तिथं ‘आपलं तेच बरोबर’ ही वृत्ती वाढीस लागते..
आणि आपणही कायद्याच्या नियमांऐवजी, सामाजिक व्यवस्थेच्या भावनातिरेकाला बळी पडून आज क्लिनचिट देत असू, तर आपणही क्लिन चिटर असतो! व्यवस्थेकडून व्यवस्थितपणे गंडलेले असतो! आणि ही क्लिनचिट भविष्यात आपल्याला महागात पडू शकते..
विचार करा..
– डॉ सचिन लांडगे.
**