आजच्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबरला बरोबर पंधरा वर्षांपूर्वी स्वदेस रिलीज झाला होता.
मला आवडलेल्या अनेक चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. आणि रेल्वेतला जो सिन आहे, तो आतापर्यंतच्या अनेक काळजाला भिडणाऱ्या दृश्यांपैकी एक आहे.. हा सिनेमा पाहताना या सिन च्या वेळी टचकन डोळ्यात पाणी येतं.. आजही.. कितीदाही..
जमिनीचे पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्याला भेटून त्याच्याकडे एक दिवस राहून परत येतानाची मोहनची पडद्यावरची स्तब्धता आपल्याला भिडते, आपल्यातही उतरते आणि पडदा व्यापून उरते, आपल्याला अंर्तमुख करून जाते..
मोहन भार्गव, ज्याने खूप काळापूर्वीच देश सोडलाय, जो अमेरिकेत खुश आहे, आणि केवळ लहानपणीची आठवण म्हणून आपल्याला आजीचं प्रेम दिलेल्या कावेरी अम्माला सोबत नेण्यासाठी येतो.. तो कारव्हॅन मध्येच राहत असतो, केवळ फिल्टर पाणीच पीत असतो, तो मोहन भार्गव जसजसा भारत त्याला कळू लागतो तसतसा बदलत जातो.. जमिनीचे पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्यालाच जवळचे पैसे देऊन येतो.. स्वतःजवळ फिल्टर वॉटर असताना देखील रेल्वेस्टेशन वरच्या त्या गरीब मुलाला मदत करण्याच्या हेतूने त्याच्याकडचं कुल्हडमधलं पाणी पितो.. आजीला आणि गीताला मदत करण्याच्या वाटेत त्याला इथल्या खऱ्या समस्या कळू लागतात.. एका समस्येतून दुसऱ्यात, दुसरीतून तिसऱ्यात असं तो गुंतत जातो.. पूर्ण सिनेमात तो कुठंही आक्रस्ताळेपणा करत नाही.. कुठंही अवजड संवाद बोलत नाही, कुठंही घसा ताणून भाषणबाजी करत नाही.. पण त्याला जे त्याला उमगलंय ते स्पष्ट शब्दांत पण विनयशीलतेनं समोरच्यांना सांगायची हिम्मत दाखवतो.. तो कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही, किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचार करत नाही.. शाहरुख कडून अशी acting करून घेण्याचं काम आशुतोष गोवारीकरनं अप्रतिम केलंय, त्याबद्दल त्याला हॅट्स ऑफ..
रिलीजच्या दिवशीच मी हा सिनेमा पाहिला होता, जसजसा सिनेमा आवडू लागला, तसतसा त्याच्या शेवटाबद्दल मला काळजी वाटू लागली होती.. अतिरंजित किंवा un-realistic शेवट करून एवढ्या चांगल्या सिनेमाचं मातेरं करू नये असं तीव्रतेनं वाटून गेलं होतं.. आणि शेवटी, NASA सोडून आलेला नायक खेड्यात शिक्षक झालेला किंवा सरपंच झालेला दाखविण्यापेक्षा त्याला ISRO जॉईन केलेलं दाखवून आशुतोषनं खरा सिक्सर मारला..
मी पोस्टग्रॅज्युएशन झाल्यावर बाबा आमटेंना भेटायला आनंदवनला गेलो होतो. विकास आमटेंना म्हटलं, ‘मी अनॅस्थेटिस्ट आहे आणि मला इथं वर्षभरतरी राहून सेवा द्यायचिये’.. ते मला म्हणाले, ‘इथं फुलटाईम भूलतज्ञाची गरज नाही. जेव्हा ऑपरेशन्स असतात तेंव्हा नागपूरवरून भुलतज्ञ येतात. आणि दुसरी गोष्ट, तू भुलतज्ञ असताना तुझ्याकडून कुष्ठरोगाचे किंवा थंडीतापाचे पेशंट तपासून घेणे हे तुझ्या योग्यतेचं devaluation केल्यासारखं होईल. त्यापेक्षा तू अशा ठिकाणी जा, जिथं तुझी appropriate गरज आहे, आणि तिथं अडल्यानडल्यांना सेवा दे.. ती पण समाजसेवाच आहे, त्यासाठी तू इथंच राहावं असं काही नाही..” मी अंतर्मुख झालो..
समाजसेवा किंवा देशसेवा म्हणजे तरी काय असतं? आपण आपलं काम आपल्यातलं बेस्ट देऊन नेटानं करत राहणं, हीच खरी देशसेवा असते.. त्यासाठी तुम्ही उच्चशिक्षण घेतलेलं असलं तरी तुम्ही झाडू हातात घेऊन गल्ल्या झाडल्या पाहिजेत असं नाही, किंवा चार गरीब मुलं गोळा करून शिकवलं तरंच तुमची कळकळ खरी आहे अन्यथा नाही, असं नव्हे.. ज्या कामात ज्या गोष्टीत तुम्ही निपुण आहात ते काम कळकळीने आणि प्रामाणिकपणे करत राहणे ही एक देशसेवाच आहे.. आणि ‘इतिहासातल्या फुशारक्या मारत जगण्यापेक्षा कसलाही भेदभाव न करता आपल्या सगळ्या देशबांधवांप्रति प्रेम (किमान सौजन्य तरी) बाळगणे’ हेच देशप्रेम आहे.. आणि त्यासाठी दरवर्षी बेगडी रावण जाळण्यापेक्षा ‘मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं’ इतका नितांतसुंदर संदेश हा सिनेमा देतो..
Patriotism is your conviction that your country is superior to all other countries, just because you were born in it.. हे जॉर्ज बर्नोड शॉचं वाक्य आहे. त्याचं अमूर्त रूप सिनेमाच्या पडद्यावर सतत अदृश्यपणे वावरताना दिसतं..
गरिबी, अशिक्षितता, उच्चनीचता, जातीयवाद आणि अडमुठेपणा याचं जळजळीत दर्शन झालेला मोहन भार्गव जेव्हा सगळ्या लोकांसमोर म्हणतो, “मला नाही वाटत आपला देश जगातला सगळ्यात महान देश आहे.” तेंव्हा क्षणभर स्तब्ध व्हायला होतं.. हा देशभक्तीपर सिनेमा असूनदेखील नायकाच्या तोंडी असे डायलॉग देणं हे मोठं आव्हान होतं.. आणि आशुतोषनं ते पेललं.. खरं करून दाखवलं..
खेड्यातला संथपणा, त्यांच्या आयुष्यातलं मानसिक साचलेपण, कथानकातले अर्थपूर्ण संवाद, हुशार आणि साधी गीता, अवीट गाणी, जावेद अख्तरचे लिरिक्स, ए आर रेहमानचं म्युझिक, आशुतोषचं डायरेक्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच ‘स्वदेस’!!
राम ही तो करुणा में है, शांति में राम हैं..
राम ही है एकता में, प्रगति में राम हैं..
राम बस भक्त और ही शत्रु के भी चिंतन में हैं..
देख त्यज के पाप रावण, राम तेरे मन में है..
राम मेरे मन में है, राम तेरे मन में है..
राम तो घर घर में है, राम हर आँगन में है..
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं..
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है..