Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

स्त्रीला काय हवं असतं?

 

– डॉ सचिन लांडगे.

 

पैसा, प्रेम, संसारसुख, मुलंबाळं, ऐशोआराम, सत्ता की आणखी काय?

पतीपैशावर मजा मारणाऱ्या अन बघत दिवसभर लोळत पडणाऱ्या स्त्रियांबद्दल बोलत नाहीये मी..
केवळ चांगलं स्थळ मिळविण्यासाठीच डिग्री घेतलेल्या अन लग्नानंतर पतीसेवेत लीन होत स्वत्व हरवलेल्या स्त्रियांबद्दलही बोलत नाहीये मी..

जिला थोडीतरी सजग जाणीव आहे, चांगल्या वाईटाचं तारतम्य आहे आणि जिच्यात थोडातरी आत्मसम्मान शिल्लक आहे, अशा प्रत्येक स्त्रीला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा सगळ्यात प्रिय असते ते म्हणजे स्वतःचं ‘निर्णय स्वातंत्र्य’!

आधी वडिलांच्या आधीन मग पतीच्या आधीन अन नंतर मुलांच्या आधीन राहण्याची परंपरा असलेल्या आपल्या देशात स्त्रीला ‘निर्णयाचं स्वातंत्र्य’ असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे बहुतांश स्त्रियांनाही कळत देखील नाही.. आणि एकदा का त्यागमूर्ती वगैरे असल्याचा मुकुट कोणी तिच्यावर चढवला की मग तर झालंच!

स्वतःबद्दलचे वैयक्तीक निर्णय स्वतः घेता येणं, स्वतःच्या कमाईबद्दलचा विनियोग स्वतः ठरवता येणं, संसाराबद्दलच्या निर्णयप्रक्रियेत आपल्याला सामील करून घेतलं जाणं आणि आपल्याला सतत गृहीत न धरता आपल्या वेगळ्या मताचा पण घरात आदर असणं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत..

आपल्याला कसलीही किंमत न देणारा नवरा, कामापूरते गोड बोलणारं कुटुंब आणि ज्यात आपल्याला कसलंच स्वातंत्र्य नाही, असा बळजबरीचा संसार, केवळ मुलाबाळांसाठी म्हणून मनातल्या मनात कुढत पुढंपुढं रेटणाऱ्या असंख्य स्त्रिया आहेत. पुढं तर मुलं देखील याची काहीच किंमत ठेवत नाहीत. ‘आम्ही म्हणलो होतो का तुला सहन कर म्हणून’ हा एक शेरा तिचं आयुष्यभराचं सहन करणं शून्य करून टाकतो.

अगदीच शारीरिक हिंसा जरी होत नसेल तरी अपमान, टोमणे, अन सततचा पाणउतारा हे असंख्य स्त्रियांची हकीकत आहे.. विवाहसंस्थेतून सहजासहजी बाहेर पडता न येणं आणि धीर करून बाहेर पडलं तरी नंतरची परिस्थिती तितकीशी सुलभ न असणं या एकाच गोष्टीमुळे कित्येक बायका (आणि नवरे देखील) आहे तोच संसार कसाबसा पुढं रेटत आहेत..

पण यांतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या आयुष्याबद्दलचा निर्णय स्वतः घेत, मुलाबाळांसाठी ब्लॅकमेल न होता, आणि समाजाच्या टीकेला भीड न घालता वेगळा मार्ग स्वीकारणाऱ्या स्त्रीला मात्र इतर स्त्रियांकडून घृणेची नजर झेलावी लागते, प्रसंगी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ‘वाळीत टाकणं’ देखील सहन करावं लागतं ही देखील आपल्याकडची दुसऱ्या बाजूची हकीकत आहे.. आणि तीच स्त्री सबलीकरणाच्या मार्गातली सगळ्यात मोठी शोकांतिका देखील आहे..

कारण , ‘एक आई असून देखील आपल्या मुलांचा जरा सुद्धा विचार न करता घटस्फोट घेतला!’ या एका टोमण्याच्या भीतीपोटी कितीतरी स्त्रिया आपल्या स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा, आपल्या समाधानी आयुष्य जगायच्या शक्यतेचा बळी देत असतील, आणि प्रसंगी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी देखील करून घेत असतील..
असो..

प्रत्येक स्त्रीची त्रास सोसायची ताकद, संसाराकडूनच्या तिच्या अपेक्षा आणि आयुष्यातल्या तिच्या प्रायोरिटीज वेगळ्या असू शकतात, त्यामुळं जर एखाद्या स्त्रीनं तिच्या वैयक्तिक कारणांनी तिच्या त्रासदायक संसारातून बाहेर पडायचा निर्णय घेतला तर तिला आजूबाजूच्या स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या चष्म्यातून जज करू नये.. ही इतकी साधी अपेक्षा देखील आपल्याकडे पूर्ण होत नाही. अशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित आणि उचभ्रू समजल्या जाणाऱ्या स्त्रिया पण हे समजून घेऊ शकत नाहीत.. ज्या स्त्रियांच्यात स्वतःबद्दलचे देखील निर्णय घ्यायची कवडीची हिम्मत नाही, अन म्हणून त्या संसारात आहे, अन म्हणून त्यांचे संसार समाजाने सफल मानावेत, अन म्हणून त्यांना दुसऱ्या एखाद्या त्यांच्या गटात ‘न बसणाऱ्या’ स्त्रीवर टीका करायचा किंवा तोंडसुख घ्यायचा अधिकार आपसूकच मिळतो वगैरे, हे सारे अजबच आहे..

आज या महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक स्त्री ने (अन पुरुषानेही) स्वतःच्या मनाशी एक ठरवूया, की जर एखाद्या स्त्रीनं तिच्या वैयक्तिक कारणांनी तिच्या त्रासदायक संसारातून बाहेर पडायचा निर्णय घेतला असेल तर तिच्याकडे आपल्या स्वतःच्या मानसिक चष्म्यातून बघणार नाही, तिच्यावर स्वतःच्या मतांच्या अपेक्षा लादनार नाही, आणि तिला दोषी वाटेल असं कृत्य तर अजाणतेपणातून देखील अजिबातच करणार नाही..

– डॉ सचिन लांडगे.

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *