– डॉ सचिन लांडगे.
तारीख ३ एप्रिल १९९४.. मी नववीत होतो.. तेंव्हा आमच्याकडं ‘तरुण भारत’ यायचा.. त्याच्या रविवारच्या पुरवणीत लेख वाचला – ‘आता परमेश्वरालाच रिटायर्ड करा’.. लेखक होते श्रीराम लागू!
एवढा मोठा लेख पूर्ण वाचला.. माझी बौध्दिक पातळी चौदा वर्षांइतकीच! त्यात मन पूर्ण आस्तिक.. घरातल्या देवपूजेसाहित सगळे सोपस्कार मन लावून जिव्हाळ्याने करण्याचं वय.. देवात मन गुंतलेलं.. आरत्या सगळ्या तोंडपाठ.. रात्रीच्या अंधारातून घराकडं जाताना ‘संकटमोचन हनुमानाष्टक’ म्हणलं की काही आपत्ती येणारच नाही याची खात्री असायची.. आणि खरंच काही आपत्ती आली नाही, की मग देवावरचा विश्वास आणखीच दृढ व्हायचा.. बेचाळीस ओव्या म्हणताना ‘ज्याच्या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको’ या वाक्याला स्वरात काळीज पिळवटणारी आर्तता यायची.. त्या वयात, त्या संस्कारात, त्या काळात श्रीराम लागू नावाचा कोणीतरी प्रसिद्ध नट ‘परमेश्वरालाच रिटायर्ड करा’ अशी फुशारकी मारतो, हे काही पटले नव्हते.. येत्या काही काळातच शंकर त्यांचे भस्म करून टाकेल किंवा निदान मारुती तरी गप्प बसणार नाही, असं मी मित्रांत म्हटलो देखील होतो..
त्या लेखाचे कात्रण मी पेपरमधून काढून घेतले.. चांगल्या चांगल्या लेखांची कात्रणे गोळा करून संग्रही ठेवायचो मी.. अजूनही माझ्याकडं बरीच कात्रणे आहेत.. अर्थातच तेंव्हाचे विषय ‘आई- एक दैवत!’, ‘युवकांनो जागे व्हा’, ‘सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती’ वगैरे असे असायचे.. ‘आता परमेश्वरालाच रिटायर्ड करा’ हे मी जमवलेलं गटात न बसणारं पहिलं कात्रण!
(या लेखावरून तेंव्हा खूप वादंग माजलेलं, सार्वत्रिक टीका झालेली आणि माफी मागण्यासाठी त्यांच्यावर खूप दबाव आलेला मला आठवतंय..)
दहावीच्या सुट्टीत मी एका जैन लायब्ररीत जायचो.. तिथं शाकाहार, परिग्रह, असली खूप पुस्तकं होती, त्यात ओशो चे एक पुस्तक हाती लागले.. आधी ओशोंची काही कॅसेट्स ओझरती ऐकलेली असल्याने ते पुस्तक घेतले आणि वाचले.. मेंदूत काही खळबळ झाली.. पुस्तक कोणते होते आता आठवत नाही, पण प्रचलित समजुतीला बराच धक्का बसला होता.. मग पोहायला जायचं टाळून मी आणखी काळ लायब्ररीत घालवायचे ठरवले.. कारण तिथं पुस्तकं घरी न्यायला मिळत नसत..
मग ओशोनं अधिकच मेंदूला त्रास दिल्यावर मी ‘आता परमेश्वराला रिटायर्ड करा’ पुन्हा वाचला, आणि ‘लेखकानं अगदीच चुकीचं लिहिलं नाहीये!’ या निष्कर्षाप्रत आलो..
चिकित्सक वृत्ती आधीचीच होती.. फक्त ती देवाधर्माबाबत वापरायची नसते, असं आईनं सांगितलं असल्यानं ती गुंडाळून ठेवली होती.. पण ओशोनं आणि लागुंनी ठिणगी टाकल्यावर मग आग पेटलीच! मग त्यातूनच ‘अंधारातून प्रकाशाकडे’ नावाचा एक लेख मी लिहिला आणि स्वतःजवळच ठेवला. (आता तो जर कोणी वाचला तर फारच उथळ वाटेल, पण) तेंव्हा तो ठिणगीची आग होण्याच्या माझ्या काळाचा छोटासा का होईना आविष्कार होता..
पुढं 2nd yr ला असताना डॉ श्रीराम लागुंच ‘सूर्य पाहिलेला माणूस’ नाटक पाहिलं. आणि लायब्ररीतुन सॉक्रेटिस आणून वाचला.. नंतर त्यांचं ‘मित्र’ पाहिलं.. मग त्यानंतर काही वैचारिक संपर्क राहिला नाही..
दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर मार्च २०१४ मध्ये झालेल्या पहिल्या नास्तिक मेळाव्याला आवर्जून गेलो होतो. तेंव्हा अध्यक्षस्थानी डॉ. लागू होते. तिथं त्यांना जवळून बघण्याचा योग आला..
एवढ्यात त्यांना भेटायची इच्छा होती, पण प्रकृतीअस्वास्थ्यामुळे गेले काही महिने ते कोणाला वेळ देऊ शकत नव्हते.. म्हणून माझं त्यांना भेटणं राहूनच गेलं..
पण हे केवळ शारीरिक भेटणंच राहिलं, तशी आमची भेट तर पंचवीस वर्षांपूर्वीच झालीये.. आणि तीच महत्वाची आहे!
माझं विचारविश्व समृद्ध करणारा गुरू.. विवेकवादी चळवळींची प्रेरणा असणारा आणखी एक डॉक्टर.. समाजमानसातील अन्यायीपणाचा ‘पिंजरा’ तोडून, प्रतिगामी विचारांचा वेळोवेळी ‘सामना’ करत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या हृदय’सिंहासना’वर राज्य करणारा ‘नटसम्राट’.. ठोस वैचारिक भूमिका घेऊन ताठ मानेनं जगलेला ‘सूर्य पाहिलेला माणूस’.. आज आम्हा सगळ्या विवेकसाथींना पोरकं करून गेला..
त्यांची विचारमाया आम्ही वाया जाऊ देणार नाही..
– डॉ सचिन लांडगे.
**