प्रजननक्षम स्त्रियांनी आयप्पाचं दर्शन घेऊ नये ही तिथली ‘परंपरा’ आहे आणि त्यात तुम्ही ढवळाढवळ करून वातावरण का बिघडवता.? इतर मंदिरं नाहीयेत का तुम्हाला?
किंवा तुम्ही स्वतः तर नास्तिक आहात, खरंतर तुम्हाला काहीच फरक पडायला नको..! पण तुम्हीही मंदिरात सर्व महिलांना दर्शन घेऊ द्या, याबाबत आग्रही का?
आंदोलन किंवा प्रसंग कोणताही असो, त्याला छेद देणारे हे असे भ्रामक युक्तिवाद वारंवार केले जातात..
पण इथे प्रश्न श्रद्धा-अंधश्रद्धेचा किंवा परंपरेचा दोन्हींचा नाहीच आहे..
महाडच्या चवदार तळ्याचं पाणी जेंव्हा आंबेडकरांनी पिलं, तेंव्हा प्रश्न “पाणी पिण्याचा” नव्हताच.. त्या तळ्याचं पाणी काही पवित्र वगैरे काही नव्हतं.. किंवा आंबेडकरांना कुठं पाणी प्यायला मिळत नव्हतं असंही नाही.. किंवा महाडमध्ये दलितांसाठी दुसरं तळंच् नव्हतं असंही नाही..
*पण प्रश्न ‘डावलले जाण्याचा” होता.. तेथे प्रश्न समानतेचा होता.. प्रश्न भेदाभेद करण्याचा होता..*
‘दांडी’ला जाऊन गांधीजींनी मूठभर मीठ उचलले, ते काय त्यांना मीठ खायला मिळत नव्हते म्हणून नव्हे.. पण तो एक इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्धचा एल्गार होता.. प्रश्न “मिठावर अन्यायी कर” लावण्याचा होता..
सानेगुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या दलितांच्या प्रवेशासाठी केलेल्या आंदोलनात सानेगुरुजींना असेच प्रश्न विचारले गेले होते..
१.”मनात भक्ती असली म्हणजे झाले, त्यासाठी विठ्लाचे चरणस्पर्श करण्याची गरज काय?, या आंदोलनातून तुम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे?”
२. “ही इथली हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे, त्यात ढवळाढवळ करून इतरांच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला काय अधिकार?”
हे असे फसवे युक्तिवाद वारंवार केले जातात, आणि विशेष म्हणजे पद्धतशीर बुद्धिभेद करणारांकडून तयार होऊन, सामान्यांमार्फत ते सगळीकडे पसरवले जातात..
सबरीमला मंदिरात जावे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न..
– पण श्रद्धा-अंधश्रद्धेपेक्षा येथे प्रश्न सामाजिक न्यायाचा आहे..
– लैंगिक मुद्द्यावर केल्या जाणाऱ्या भेदभावाचा आहे..
– विटाळासारख्या भ्रामक समजूतींना धडा शिकवण्याचा आहे…
– प्रश्न विटाळाचं निमित्त साधून स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या मानसिकतेला लगाम घालण्याचा आहे…
– प्रश्न स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा आहे…
– प्रश्न धर्माआडून चालवलेल्या भंपकगिरीचा आहे..
पुरातन काळात लोकांचं स्त्रियांच्या मासिक पाळीबाबत अज्ञान होतं, पण आज या विज्ञानयुगातही आपण ते केवळ परंपरेच्या नावाखाली पाळावं, असा जर तुमचा आग्रह असेल तर ते चुकीचं आहे.. किंवा अय्यपाची पोथी लिहिणाराने तसं लिहिलं आहे, म्हणून आपण ते पाळावं अशी जर तुमची सक्ती असेल, तर आम्ही त्याला आम्ही जुमानत नाही..
सरस्वतीची पूजा करणाऱ्या धर्मात शेकडो वर्षे स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता..
लक्ष्मीची पूजा करणाऱ्या धर्मात हजारो वर्षे स्त्रियांना संपत्तीत वाटा नव्हता..
शक्तीचं रूप म्हणून दुर्गेची पूजा करणाऱ्या धर्मात स्त्रीला साधं घरातल्या निर्णयप्रक्रियेतही स्थान नव्हते..
परंपरांच्या नावाखाली बसलो असतो ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून तर आजही स्त्रिया चितेवर सती जातच राहिल्या असत्या..
एकीकडे स्त्री म्हणजे “शक्तीचं रूप” म्हणायचं, “निर्मितीचे वरदान” वगैरे थापा मारायच्या, आणि मग ‘अमुक वयोगटाच्या बायका आमच्या स्वामीना चालत नाहीत हं’ म्हणायचं, हा शुद्ध भंपकपणा आहे..
आणि अशा थोतांड परंपरांना जस्टिफाय करणं म्हणजे, जिहादी धर्मांधांच्याच् मार्गावर जाणं आहे…
जो देव आणि धर्म आपल्याला आपल्या जन्मावरून अपवित्र मानतो, आपल्या नैसर्गिक/शारीरिक गोष्टींसाठी अपवित्र मानतो, तो देव आणि धर्मच नाकारावा.. या मताचा मी आहे खरंतर.. पण सगळ्याच लोकांच्यात तेवढी हिम्मत नसते.. म्हणूनच या धर्ममार्तंडांचं फावतं..
धर्म हे गुलामांना त्यांची गुलामी ‘साजरी’ करायला लावण्यातही यशस्वी होतात, आणि हेच त्यांच्या यशाचं गमक आहे..
– डॉ सचिन लांडगे.
**