Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

विविधतेतून एकता –

 

“आर्याबाग सांस्कृतिक परिवार” या समाजभान असलेल्या कलास्पर्शी व्यक्तींच्या ग्रुप तर्फे काढण्यात आलेल्या “आर्याबाग” या वर्षारंभ विशेषांकात प्रकाशित झालेला माझा एक लेख –

 

– डॉ सचिन लांडगे.

आज भारताची लोकसंख्या दिडशे कोटी च्या जवळपास जात आहे. जगात एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात इतकी विविधता (Diversity) देखील इतकी आहे की सर्वसामान्यांना याची कल्पना देखील करता येत नाही.

आपल्याकडे एकीकडे अति पावसाचे प्रदेश आहेत तर दुसरीकडे वाळवंटे आहेत. एकीकडे बर्फ आहे तर त्याच वेळी दुसऱ्या प्रदेशात प्रचंड ऊन आहे. एकीकडे घनदाट जंगले आहेत, तर दुसरीकडे दुष्काळी प्रदेश आहेत.
म्हणून, त्या त्या भौगोलिक परिस्थिती नुसार लोकांचे कपडे घालायचे प्रकार, वागण्या बोलण्याच्या चालीरीती, खाण्यापिण्याच्या पद्धती सगळ्याच वेगळ्या वेगळ्या आहेत.

इथे जगातल्या दहाच्या आसपास मोठ्या धर्मांचे लोक राहतात.. लोकांच्या 3000 च्या आसपास जाती आहेत, ज्यांच्यात पुन्हा जातीच्या आधारावर प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. इथे तब्बल सोळाशे वेगवेगळ्या भाषा आहेत. नुसत्या मराठी भाषेचेच तब्बल 105 बोलीभाषा प्रकार अस्तित्वात आहेत.

हजारो वर्षांपासून इथल्या वेगवेगळ्या प्रदेशावर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राजघराण्यानी (dynasties) शेकडो वर्षे राज्य केले आहे. त्यामुळं त्या त्या प्रांताच्या वेगळ्या चालीरीती आणि परंपरा याबद्दल तर बोलायलाच नको. नुसतं लग्नविधीच्या रीती दर जाती आणि प्रांतागणिक बदलतात. आताच्या एकाच राज्यात राहणाऱ्या लोकांच्या देखील पूजेच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत, दहनाच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत, सणावारांच्या चालीरीती देखील वेगवेगळ्या आहेत. अणि त्यांच्यावर वेळोवेळी झालेल्या परकीय आक्रमणांचा देखील प्रभाव पडला आहे.

बरं, ही विविधता फक्त जैवभौगोलिक किंवा लोकांच्या राहणीमानातलीच आहे असं नाही.. तर, विचारसरणीत परस्पर विरोधाभास असलेले लोक देखील इथं पुरातन काळापासून गुण्यागोविंदाने नांदताहेत. स्वातंत्र्यानंतरच्या आधुनिक भारताचा केवळ विचार केला तर इथे कॅपिटॅलिस्ट, कम्युनिस्ट, सोशलिस्ट, लिबरल, अथेईस्ट, अगोनिस्ट अशा अनेक विचारधारांचे (Ideologies) लोक राहताहेत.

प्रत्येक बाबतीत अशी इतकी विविधता (Diversity) असताना, मला सांगा, केवळ बहुसंख्येच्या जोरावर कोणी एक धर्म/पक्ष/जात/विचारधारा किंवा गट दुसऱ्या अनेकांवर बळजबरी कशी करू शकतो? केवळ सत्तेत आपल्या जातियांचं वर्चस्व आहे, म्हणून कोणाला इतरांवर अन्याय करायचा अधिकार कसा प्राप्त होतो? किंवा अमुक क्षेत्रात आपलं आर्थिक वर्चस्व आहे म्हणून आपण आपल्या सोयीने नियम वाकवू शकतो?

इथं इतकी डायव्हर्सिटी असताना, आपलाच धर्म/आपलाच पंथ/आपलीच भाषा कसं कोणावर आपण थोपवू शकतो? मराठी भाषेचा केवळ पुणेरी लहेजा(बाज) ‘ प्रमाण ‘ मानून मराठीच्या उरलेल्या तब्बल 104 बोलीभाषांना कोणी कसं काय तुच्छ लेखू शकतो? आपलीच अस्मिता मोठी, आपलाच इतिहास खरा, आपलीच मिथकं श्रेष्ठ, असं कसं आपण म्हणू शकतो?

बरं, तुम्ही स्वतःला हवं तेवढं श्रेष्ठ म्हणा की.. पण त्या गोष्टींवरून इतरांना तुच्छ कसं काय कोणी लेखू शकतो? आपलीच संस्कृती, आपल्याच परंपरा, आणि खाण्यापिण्याच्या अन् राहणीमानाच्या आपल्याच चालीरीती अन नियम दुसऱ्याच्या माथी कोणी कसं मारू शकतो?

लोकांनी मांसाहारी पदार्थांच्या जाहिराती देखील दाखवायच्या नाहीत, तुमच्या भावना दुखावतात म्हणून तुमच्या गल्लीत, सोसायटीत, आणि सणाच्या काळात लोकांनी त्यांचे पोटापाण्याचे व्यवसाय देखील बंद ठेवायचे, हे कुठलं लॉजिक आहे? तुमच्या धर्मात सांगितलंय म्हणून आणि सत्तेतल्या लोकांवर तुमचं वर्चस्व आहे म्हणून तुम्हाला अशा गोष्टी सुचत असतील, आणि त्यावरून तुम्ही सारखं हिंसक होत असाल, तर तुमच्याच धर्मातल्या अहिंसा तत्वाच्या विरुद्ध तुम्ही वागताहेत हे तरी तुमच्या लक्षात येतंय का?

करोडो करोडो वर्षांच्या पृथ्वीच्या इतिहासात या सगळ्या धर्मांचं स्थान फक्त काही हजार वर्षांचं, त्यात आपल्या या संस्कृती आणि चालीरीतींचं स्थान केवळ काही पिढ्यांचं, त्यात आपलं स्थान केवळ काही दशकांचं, अन् बौद्धिक वय तर त्याहून कमी! मग केवळ योगायोगाने त्या धर्मात, जातीत, प्रदेशात, किंवा त्या अमुक एका क्लास मध्ये तुम्ही जन्माला आले, यात तुमचं वैयक्तिक कर्तृत्व काय? तरीदेखील अशा फुटकळ गोष्टीत कसला माज बाळगतात लोक काय माहिती?

अर्धवट विचार, कुपोषित बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक शीघ्रपतनातून आलेली नपुंसकता लपविण्यासाठी ही असली “माजा”ची स्वप्ने दाखवली जातात.. आणि ‘ वैचारिक षंढ ‘ लोक त्याला बळी पडतात..

दुसऱ्याच्या वेगळेपणाला का मान देऊ शकत नाही आपण? ‘मान’ देण्याचं सोडा, निदान त्याला त्याचे स्वतःचे विचार बाळगण्याचा हक्क आहे, हे निदान मान्य तरी का करू शकत नाही? जोपर्यंत कोणी कोणावर अन्याय करत नाही, किंवा वैयक्तिक अथवा सामाजिक परिघात त्रासदायक ठरत नाही, तोपर्यंत त्यालाही स्वातंत्र्य (Freedom) आहे, तोही समानतेच्या (Equality) आणि न्याय्य वागणुकीचा हकदार आहे हे आपण का मान्य करू शकत नाही?

मला वाटतं की, कुठला एकच असा संस्कार असेल, जो पुढच्या पिढीवर करण्याच्या बाबतीत आपला समाज कमी पडतोय, तर तो आहे समानतेचा संस्कार!
लहानपणापासून आपल्याला differentiate करायला शिकवलं जातं. तो अमुक आहे त्याच्याशी नको बोलू, तो तमुक आहे त्याच्याशी नको खेळू, इथपासून सुरुवात होते.. मग पुढे अमके आपल्या खालचे असतात, तमके स्वतःला खूप शहाणे समजतात, यांच्याशीच लग्न करायचं, त्यांच्याशी तेवढेच संबंध ठेवायचे, असं सतत चालू असतं.. Inequality (असमानता) आपल्या क्लास, कास्ट आणि जेंडर मध्ये इतकी ठासून
भरलीये की ती जेनेटिकच आहे की काय अशी शंका यावी! ‘स्त्रियांना काय करायचीयेत असली थेरं!’ असे विचार बाळगताना किंवा आपल्या बायकोला ‘गप तुला काय कळतंय’ असं म्हणताना आपल्या हेच लक्षात येत नाही की आपण तिचा Equalityचा बेसिक राईटच नाकारतोय!

जी समानतेची वागणूक आपण घरात देऊ शकत नाही, ती आपण दुसऱ्या समाजाला/वर्गाला/जातीला/धर्माला काय देणार?

अमेरिकेत कुणी आपल्याला ब्राऊन/ब्लॅक म्हणून किंवा एशियन म्हणून हिणवलं की आपल्याला equality आणि justice आठवणार, अन इथं आपण सहज दुसऱ्याला अछूत म्हणणार! स्वतःचे हक्क आणि जाणिवांबद्दल आग्रही असणारे आपण दुसऱ्यांच्या बाबतीत मात्र सहज सोयीची दुटप्पी भूमिका कधी जाणूनबुजून तर कधी स्वतःच्याही नकळत घेतो..

गोष्ट आपल्यावर आली की च लोकांना freedom, equality आणि justice आठवतो.. माझ्यावर/आमच्यावर अन्याय झालाय म्हणत अन्यायाला वाचा फोडण्याची धडपड होते.. पण दुसऱ्यावर अन्याय होत असताना मात्र आपली वाचा का बसते?

बिनडोक लोक जेंव्हा आपलं श्रेष्ठत्व इतरांवर लादण्यासाठी दुसऱ्यांवर अन्याय करतात, inequality आणि injustice ची ठिणगी टाकतात, आणि दुसऱ्याचे freedom हिरावून घेतात, तेंव्हा समाजात लागलेली ही आग कधी वणव्याचं रूप घेऊन तुमचंही घर जाळेल याचा नेम नाही.. जर आपल्याला आपल्या बाबतीत ही मूल्यं इतकी महत्वाची वाटतात, तर आपण ती दुसऱ्याला मिळण्याबाबतही आग्रही असणं किंवा देणं हा प्रागतिक विचार आहे, अन यालाच पुरोगामीत्व म्हणतात.. (पण हे होऊ नये म्हणून ‘पुरोगामी’ शब्दलाच बदनाम करण्याचं नॅरेटिव्ह पद्धतशीरपणे सेट केलं जात आहे..)

बऱ्याच लोकांना असलं काही ज्ञान नसतं.. एकतर आपण सोशल सायन्स (समाजशास्त्र) शिकलेलो नसतो. दुसरं म्हणजे, व्यावसायिक शिक्षणालाच प्राथमिकता द्यायचा किंवा त्यालाच खरं आणि परिपुर्ण शिक्षण मानायचा आपल्याकडं प्रघात असल्याने डॉक्टर इंजिनिअर एमबीए आहे म्हणजे सुसंस्कृत आहे असं समजलं जातं.. म्हणूनच आपल्याकडं उच्चशिक्षित असण्याचा आणि समाजभान असण्याचा संबंध राहत नाही..

खूप साऱ्या लोकांना इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वगैरे मानव्यशास्त्रे शिकण्याचा दुसरा मार्ग नसतो, त्यात स्वतःचे असे अवांतर वाचनही नसते, त्यामुळे बरेच जण केवळ व्हाट्सएप युनिव्हर्सिटी वरच पोसले जातात.. आजूबाजूच्या पोलराईज्ड बातम्यांतूनच आपलं मत बनवतात.. आपल्या सभोवतालच्या समाजालाच “पूर्ण भारत” समजायची चूक करतात.. आपल्यावरूनच जग ओळखतात.. आपली मतं हीच सगळ्यांची मतं असणार आहेत असा समज करून घेतात.. आपली संस्कृती आपला इतिहास आपलं ज्ञान हेच महान आहे, अशा भ्रमात असतात.. आणि अशा कंपूत तळ्यातल्या बेडकाप्रमाणे मश्गुल जगतात.. हे इथलं वास्तव आहे..

दुसऱ्याचे कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य घालवणारे विचार, ‘सुप्रिमसी’चे बाधा झालेले विचार किंवा दुसऱ्यावरच्या अन्यायाचे समर्थन करणारे विचार, हे जरी प्राथमिक अवस्थेतीलच असतील तरीही त्यांना तेथेच अटकाव केला पाहिजे.. असे पोटेन्शियल असलेल्या संघटना/ग्रुप/पक्ष/धर्म यांच्याविरुद्ध “क्लिअर आणि लाऊड” भूमिका घेतली पाहिजे. कारण आज अगर खामोश रहे, तो कल सन्नाटा छा जाएगा ।

आणि हे कुणावर उपकार म्हणून नाही करायचंय.. हे आपल्याच ‘माणूस’ म्हणून व्हायच्या उन्नती साठी करायचंय.. उद्या जेंव्हा आपली मुलं आपल्याला विचारतील, हा वणवा सभोवताली तांडव घालत होता तेंव्हा तुम्ही कुठं होतात बाबा? तेंव्हा तुम्हाला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देता यावं – मी माझ्याकडचं ओंजळभर का होईना पाणी घेऊन आग विझविणाऱ्यांच्या बाजूनं उभा होतो बेटा!!
इतकेच..

– डॉ सचिन लांडगे.
भुलतज्ञ, अहमदनगर.
drsachinlandge@gmail.com
ब्लॉग –

Home

..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *