– डॉ सचिन लांडगे.
प्रत्येक डॉक्टरच्या ओपीडीत असे कित्येक पेशंट येत असतात ज्यांच्याकडे जाडजूड फाईल्स, आणि त्रस्त चेहरा असतो. त्या सगळ्या फाईल्स टेबलावर ठेऊन ते (किंवा सोबत आलेले नातेवाईक) सुरू करतात – हा त्रास आहे, तो त्रास आहे, या डॉक्टरला दाखवलं, फरक नाही पडला, त्या डॉक्टरला दाखवलं गुण नाही आला, अमुक तपासण्या केल्या, तमुक उपचार केले, आयुर्वेदिक घेऊन बघितलं, होमिओपॅथीच्या गोळ्या खाल्ल्या, इतके पैसे खर्च केले, तितके डॉक्टर झाले, मग कुणीतरी अमक्या अमक्या ने तुमचे नाव सुचवले, म्हणून तुमच्याकडे आलो वगैरे वगैरे.. असं म्हणून पिशवीतील सगळी औषधं टेबलावर ओततात.
साधारणतः पाठदुखी कंबरदुखी डोकेदुखी पोटदुखी असे आजार त्यात जास्त असतात. बहुतांश वेळा सोबत vague symptoms (मोघम तक्रारी) असतात. हुशार डॉक्टर लगेच ओळखतात हा Somatiform disorder नावाचा मनोविकार आहे. मग डॉक्टर जर नवीन प्रॅक्टिस सुरू केलेला असेल तर तो पेशंटला सायकियाट्रीस्ट कडे रेफर करतो. आणि सगळं गणित चुकतं !!
तो पेशंट सायकियाट्रीस्ट कडे तर जातच नाही, पण त्या डॉक्टरकडेही कधीच परत येत नाही. त्याच्या नात्यातले देखील कुणीच त्या डॉक्टरकडे परत तपासायला येत नाहीत. कारण पाठदुखी/ पोटदुखीसाठी तुम्ही त्याला वेड्यांच्या डॉक्टरकडे (त्यांच्या लेखी) पाठवलेलं असतं. जे तुम्ही अशा प्रकारातल्या लोकांना कितीही व्यवस्थित समजावून सांगितलं तरी पटतच नाही.
ह्यांना मनोकायिक आजार (Psychosomatic disorders) म्हणतात.. (पाहिल्या कॉमेंट मध्ये याबद्दल थोडक्यात दिले आहे). हे मनोकायिक आजार प्रत्येक डॉक्टरच्या ओपीडीतले खूप मोठे परसेंटेज व्यापून आहेत. एवढंच काय पण खऱ्या आजारांसोबत देखील थोडाफार मनोकायिक लक्षणांचा देखील वाटा असतो.. असो..
माझा सांगायचा मुद्दा वेगळा आहे..
समाजात असे वाट चुकलेले अनेक लोक असतात, जे सतत मनातल्या अस्थिरतेने त्रस्त असतात. एवढंच की त्यांना शारीरिक लक्षणं नसतात किंवा ती लक्षणं तितकीशी दखलपात्र नसतात.
अशी लोकं बाहेरून येणाऱ्या Inputs चे लॉजिकल ॲनालीसिस करू शकत नसतात. मेंदूतील वायरिंग तितकं समृध्द नसतं, असं म्हणा हवं तर.. अशा लोकांना आयत्या उत्तरांची सवय लागते, कुणीतरी येऊन तयार सोल्युशन्स सांगावी लागतात, किंवा सोपे उपाय सांगावे लागतात. त्यामुळे अशा लोकांना मानसिक भावनिक आधार देणारे लोक हे देवदूतासारखे वाटतात. हे लोक डॉक्टरांच्या ओपीडीत जसे जास्त दिसतात तसे बाबा बुवांच्या दरबारात देखील जास्त दिसतात. हे लोक “सतत अनुयायी” असतात. कधी ते बैठकांना जातील, कधी पालखीत जातील, कधी स्वतःला अंबज्ञ म्हणवतील, कोण्या बाबाचा फोटो खिशात ठेवतील, अमुक जप करतील, तमुक विधी करतील. सतत काहीना काही करत राहतील. आपण त्याचं एखाद्या बाबाच्या नादी लागणं बंद केलं, किंवा त्यांच्या एका बाबाची पोलखोल झाली, की ते नादी लागण्यासाठी दुसरा बाबा शोधतात.. मार्केट मध्ये कुठला नवा बाबा आला ते त्याच्याकडं धाव घेतात. कुणी एखाद्याच्या “प्रचिती”ची महती सांगितली, की ते सहकुटंब त्याच्याकडे दर्शनाला जातात. जसं नवनवीन डॉक्टरकडे जाणारे लोक असतात, तसंच असतं हे..
कुठल्याही जिवंत अथवा मृत बाबाबुवा/स्वामी/महाराज यांच्या नादी लागलेले लोक सँपल म्हणून घ्या, ते इतरही अनेकांचे भक्त असतात, आणि सगळ्या देवांचं सगळं करून बघत असतात. आपण अशा लोकांना “खूप धार्मिक आहेत” म्हणून सोडून देतो, किंवा प्रसंगी कौतुकही करतो, पण त्यांना कुणीही सांगत नाही की त्यांचं वायरिंगच फॉल्टी आहे म्हणून !
माणूस जितका जास्त पिचलेला असतो, तितकं हे प्रमाण जास्त असतं. आर्थिक गरीबीशी याचा संबंध नाही, बौद्धिक गरिबीशी जास्त आहे. यात आनुवंशिकता ही मोठ्या प्रमाणात असते. म्हणून आपण बघू शकतो, बऱ्याचदा पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली फॉल्टी असते..
अशा लोकांना खरंतर सायकियाट्रीस्ट कडे जायची गरज असते. ब्रेन मधल्या न्युरोट्रान्स्मिटर्सचा किंवा केमिकल्सचा प्रॉब्लेम असेल तर ट्रिटमेंट ने उत्तम फरक पडू शकतो. ब्रेन मधला लॉजिकल रिझनिंगचा एरिया जर कमी डेव्हलपड असेल तर “सायकॉलॉजीकल कौंसेलिंग”नी बरीच सुधारणा होते.
बाबा बुवांकडे जाऊन अशा लोकांना जरी तात्पुरता आधार मिळत असेल, मन शांत झाल्यासारखं वाटत असेल, तरी ते ठराविक काळापुरतंच असतं. म्हणून मग त्यांना सारखा सारखा दर्शनाचा डोस वाढवावा लागतो. नाहीतर मग बाबा बदलावा लागतो. कारण मेंदूतल्या मुख्य समस्येचं निराकरण झालेलंच नसतं.
या सगळ्यांवर जेवढा वेळ आणि पैसा वाया जातो त्यापेक्षा तरी कमी पैशात खात्रीशीर मानसिक उपचार उपलब्ध आहेत.
सर्व धर्मात हा ट्रेंड असतो. इकडे नामजप असेल तर तिकडे हलेलुया असतं, इतकंच.. या असल्या धंद्यातून मतदार आणि पैसा दोन्ही निर्माण करणे सहज शक्य असल्याने अशी दुकाने सध्या खूप वाढत आहेत यात शंका नाही.
या धिरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज प्रकरणात मी बघतोय,
अनेक शिकले सावरलेले फेसबुके लोक देखील, आधी मौलविंच्याबद्दल बोला की, आधी पाद्री लोकांच्या अंधश्रद्धांबद्दल बोला की करत बसलेत. तुम्हाला आमच्याच धर्मातले बाबा बुवा दिसतात का?, हा बहुतांशांचा प्रश्न असतो.
अरे, हिंदू आहात ना तुम्ही?.. हिंदू बांधवांची काळजी आहे ना तुम्हाला?, मग हे अंगारे, तोडगे, चमत्कार, यहां से किरपा आयेगी, वो वहाँ से भाग्य खुलेगा याचं समर्थन काय करत बसलाय? स्वामींचे दृष्टांत, महाराजांची प्रचिती असल्या मोठमोठ्या गप्पा मारून आपल्याच धर्मातले धूर्त आणि ढोंगी लोक आपल्याच धर्मबांधवांना उल्लू बनवताहेत, त्यांचे आर्थिक शोषण करताहेत, त्यांची शारीरिक लैंगिक ठासताहेत, त्यावर जनजागृती करण्यापेक्षा तुम्ही उलट या पिचलेल्या मनोदुर्बल लोकांना त्यांच्या ताब्यात जाण्यासाठी फितवताय?. हे ढोंगी लोक केवळ हिंदू आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याबाबत “आपला तो बाब्या” असं वागताय?. त्यांच्या प्रत्येक कृतीवर “गार गार वाटतंय” म्हणून आत्मसंतुष्टी करून घेताय?, याला काय अर्थ आहे? ही आहे का तुमची धर्माची व्याख्या?
याला म्हणायचं का धार्मिक जगण्याची रीत?
वेदांत, योग, सांख्य, मीमांसा, यासारखी हिंदू तत्वज्ञाने भारताने जगाला दिली. यातल्या कुठल्या तत्वज्ञानात बसतात हे बाबा बुवांसारखे लोक अन् त्यांचे प्रताप, सांगा बरं? हा आहे का हिंदू धर्म? हीच आहे का ती प्राचीन हिंदू सभ्यता वगैरे?
धर्म म्हणजे, टिपिकल कपडे घालणं, माळा वगैरे घालणं, किंवा सणवार पाळणं, व्रतवैकल्य करणं, पूजाअर्चा करणं, असंच समजलं जातं, तेच प्रोजेक्ट केलं जातं.. पण ‘धार्मिक विधी/गोष्टी’ या धर्माचा फक्त एक भाग असतात.. धर्म त्याहून मोठा असतो, आणि असायला हवा खरंतर.. जर आपण हे असले बाबाबुवांचे चमत्कार, मांत्रिकांचे दावे, साधूंच्या सिध्दी, पुराणाबाबतचे अजब गजब दावे, ह्या गोष्टी डोळेझाकून जस्टीफाय करू लागलो, तर या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या जमान्यात आपल्याच धर्माचे आपणच हसे करून ठेवतोय, हे थोडंतरी भान शिल्लक असलेल्या शहाण्यासुरत्या सश्रद्ध लोकांच्या जितकं लवकर लक्षात येईल, आणि ते याविरुद्ध आवाज उठवतील, तितकी भविष्यातली त्या त्या धर्माच्या बाबतीतली हास्यास्पदता कमी होईल.. कळतंय का? नसेल कळलं तर हा पॅरेग्राफ पुन्हा वाचा..
तुम्हाला माहितीये का? धर्म ही समस्या नसते ; आपण धर्माकडे कसे पाहतो, हीच सर्वात मोठी समस्या असते !
धन्यवाद ।
– डॉ सचिन लांडगे.
**