Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

प्रिय जी ए –

आज जी एं चा स्मृतिदिन.

1923 ते 1987 पर्यंतचे आयुष्य आणि 50 ते 70च्या दशकातले ते लेखक आहेत.

 

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ “जीए” नावाचं वादळ माझ्या “वाचन आयुष्यात” जरा लवकरच आलं.. लवकरच आलं यासाठी की, मी नुकतीच मृत्युंजय, स्वामी, पानिपत अशी ऐतिहासिक पुस्तकांची इयत्ता पार केली होती, आणि फडके, खांडेकर, पुलं, वपु वगैरे भेटायच्या आधीच मला अचानक जीए भेटले.

 

एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्षाला गेल्यावर “आता थोडं अभ्यासातून रिलॅक्स व्हायला मिळतं” असा प्रवाद असल्याने मी लायब्ररी लावली. तिथं पुलं, वपु वगैरे लेखकांची पुस्तकं वशिला असलेल्या भाग्यवंतांनाच भेटत. मग चुकून एखादं extra पुस्तक शोधताना काही सापडलं तर “पुढच्या वेळेस घेऊ” म्हणून मी ते तत्वज्ञानाच्या पुस्तकांच्या कपाटात लपवून ठेवत असे. लवकरच माझ्या लक्षात आलं की इतरही काही लोक तिथं पुस्तकं लपवून ठेवतात. मग मी तत्वज्ञान, इतिहास, समिक्षा या कपाटातच मला हवी असलेली पुस्तकं शोधू लागलो. तिथं मला जी ए कुलकर्णी नावाच्या लेखकाचं “सांजशकुन” दिसलं. त्यांचा “भेट” नावाचा धडा आम्हाला आठवीला मराठीला असल्याने लाडेलाडे मी ते घेतलं. भेट सोडून केवळ “सर्प” ही कथा मला आवडली. बाकी सगळ्या कथा डोक्यावरून गेल्या. कोणतंही पुस्तक वाचल्यावर मी माझ्या डायरीत त्याची थोडक्यात नोंद करून ठेवत असे. “दोनच कथा चांगल्या आहेत, बाकी वाचण्यात वेळ घालवू नये” अशी सांजशकुन ची नोंद होती.

 

त्यानंतर माझा मित्र संतोष पाटील याने “मी म्हणतो म्हणून वाच” असं गळ घालून मला “हिरवे रावे” वाचायला दिलं. ते मला आवडलं. आणि त्यातल्या बहुतांश कथा समजल्या देखील.. मग जीएं ची मिळतील ती पुस्तके वाचली. आणि जीए नावाचं गारूडच माझ्या मनावर झालं. समविचारी वाचनवेड्या मित्रांना पकडून मी जीएंच्या कथांबद्दल भरभरून बोलत असे. त्यांची बरीच पुस्तके तेंव्हा Out of Print होती. पुढचे चार पाच वर्षे मी प्रकाशनाशी पत्रव्यवहार करून करून पुस्तकं मिळवत असे.

 

सांगायचं तात्पर्य एवढंच की, ज्या कथा मला तेंव्हा आवडल्या नव्हत्या, त्या खरंतर मला समजल्याच नव्हत्या. त्या समजायला “त्या पातळीवर” तरी जावं लागतं किंवा त्यातल्या अनुभवांशी तादात्म्य तरी पावता यावं लागतं.. म्हणून वाचनविश्वाची अन् अनुभवाची वरची इयत्ता पार केल्यावरच मला काही कथा समजल्या. तर काही जुन्या समजलेल्या कथा पुन्हा “नव्याने” समजल्या.

 

त्यांची “विदूषक” नावाची कथा तर मी 2nd yr, Internship आणि PG झाल्यावर अशी तीन वेळेस वाचली. आणि तीनही वेळेस मला ती वेगळी वेगळी उमगली.. त्यांच्या हिरवेरावे कथासंग्रहातील “माणूस नावाचा बेटा” असं विचित्र नाव असलेली कथा माझी आवडती कथा आहे. त्या कथेत दत्तू नावाच्या शिक्षकाचे शाळा सुटायला दहा मिनिटे कमी असल्यापासूनचे ते, तो रात्री झोपेपर्यंतचे, त्याच्या आयुष्याचे वर्णन केले आहे. आणि दरवेळी मला ते रडायला लावते..

 

त्यांच्या कथांत संदर्भ ५०-६० च्या दशकातलेच आहेत, त्यातले बरेच शब्द /गोष्टी/संदर्भ आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या असल्याने आपल्याला लवकर समजत नाहीत . पण जेवढं समजतं तेवढं खूपच भावतं.. त्यांच्यावर गडकरींचा (’एकच प्याला’ वाले) प्रभाव असल्याने त्यांच्या पुस्तकांची नावे पंचाक्षरी आहेत. सांजशकून, हिरवे रावे, निळासावळा, कुसुमगुंजा, काजळमाया, रक्तचंदन, रमलखुणा, पैलपाखरे, पिंगळावेळ इत्यादी. त्यांची अनुवादित पुस्तके देखील भरपूर आहेत. “वैऱ्याची एक रात्र” हे नाझी कॉन्सस्ट्रेशन कॅम्पचं अनुभव वर्णन तर अंगावर काटा आणते.

 

“डोहकाळीमा” हे त्यांच्या कथासंग्रहाचं हातकणंगलेकर यांनी केलेलं संकलन आहे. बालकवींची ” औदुंबर ” ही कविता जी ए ना खूप आवडायची. (त्यांच्या “माणसे – अरभाट आणि चिल्लर” या आत्मकथनपर पुस्तकात हा उल्लेख आहे).. त्यात डोहाकडेच्या औदुंबर वृक्षाचे वर्णन अत्यंत कमीत कमी शब्दांत केले आहे. त्यातलं शेवटचे वाक्य आहे, “झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर”.. त्यावरून “त्यांच्या त्या संकलनाला डोहकाळीमा नाव दिलं गेलं आहे. असो.

 

विदूषक, सर्प, काली, राधे, तुती, कैरी (यावर एक मराठी चित्रपट देखील आहे), अखेरचा दिवस, बाधा, प्रवासी, इस्कीलार, भेट, प्रदक्षिणा, अंजन, स्वप्न, दूत, वंश, ठिपका, दीपस्तंभ, भिंत, बळी, चंद्रावळ, वस्त्र, राक्षस, पारधी, एका देवाचा मृत्यू, ऑर्फियस, मुक्ती, घर, साधू, गोरिला.. अशा कितीतरी कथा आहेत ज्यांनी माझं भावविश्व व्यापून टाकलं आहे. असो..

 

त्यांच्या एकेका कथेवर भरभरून बोलता येईल.

पण ते एक आणखी असो..

 

जी एं ना ३५व्या स्मृतिदिनाची श्रद्धांजली..

 

– डॉ सचिन लांडगे.

भुलतज्ञ , अहमदनगर.

 

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *