– डॉ सचिन लांडगे.
पुरुषदिनानिमित्त लिहिलेल्या लेखमालिकेतल्या ह्या दुसऱ्या भागात “नवऱ्याला छळणाऱ्या बायका” याविषयावर सविस्तर चर्चा केली आहे. लेखाचा स्कोप तेवढाच आहे.
कित्येक स्त्रिया पुरुषसत्ताकतेच्या बळी असतात यावर कोणाचंही दुमत नसेलच, पण कित्येक पुरुष देखील स्त्रीच्या रोजच्या कटकटींनी ग्रस्त असतात, हेही तितकंच वास्तव आहे. पुरुषांवर होणारे स्त्रीअत्याचार, ही गोष्ट समजून घेणे, यावर बोलणे तर दूरच पण “ह्या प्रकारच्या समस्यांचं प्रमाण असून असून तरी किती असणार आहे?” असे प्रश्न उपस्थित करून गोल गोल फिरवलं जातं, किंवा स्त्रियांवरच्या अत्याचाराची डोंगराएवढी उदाहरणे दिली जातात. त्यात एखादी फेमीनाझी ताई आपल्या स्वानुभवातली विशिष्ट मळमळ कुजकट कॉमेंट मधून व्यक्त करते, मग बाकीचे/बाकीच्या तिची री ओढत मूळ मुद्द्याला फाटे फोडत नेतात. हे चूक आहे. कारण, आपण एखादी परिस्थिती आपण पाहिली नाही, किंवा अशी परिस्थिती आपल्यावर नाहीये, म्हणजे ते दुःख अस्तित्वातच नाहीये असं नसतं.
दुसरी गोष्ट म्हणजे, आपण आपल्या आजूबाजूच्या पुरुषांवर अन्याय करत नाहीये, किंवा आपला दुसऱ्याला काहीच त्रास होत नाहीये, हे आपणच एकतर्फी कसं ठरवायचं?
कुठलाही प्रॉब्लेम हा फक्त पाच टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे, असं जरी म्हणलं तरी, दिडशे कोटींच्या या देशात तब्बल पंचाहत्तर लाख लोक त्याचे sufferer असतात.
मग त्याचं प्रमाण कमी आहे वगैरे स्वतःच मनातल्या मनात मानून त्याबद्दल तुम्ही बोलूच नका, त्याला इतकं महत्त्व देऊ नका, किंवा त्याबद्दल लिहिताना दर वेळी अन्यायी पुरुषांबद्दल पण लिहा, नाहीतर तुमच्यावर पक्षपातीपणाचा शिक्का आम्ही मारू, याला काही अर्थ आहे का?
कधीही आणि कुठेही पुरुषांच्या समस्यांबद्दल बोलायचे लिहायचे म्हणले की, ‘ स्त्रियांच्या प्रश्र्नांबद्दल मी किती सजग आणि संवेदनशील आहे’ याची उदाहरणे देऊन किंवा तसा डिस्क्लेमर देऊनच सुरुवात करावी लागते.. स्त्री असो की पुरुष, दोन्हींच्या प्रश्नांकडे वेगवेगळे पाहताना, तो “स्त्रिद्वेष्टा” आहे, किंवा ती “पुरुषद्वेष्टी” आहे, असं लेबल लावण्याची घाई न करता, लिखाण समजून घेतले पाहिजे. कारण कुठलंही एक मत हे काटेकोर नियम किंवा शंभर टक्के वगैरे नसतं. अपवाद प्रत्येकालाच असतात, आणि एकाच गोष्टीला अनेक कंगोरे देखील असतात.
कोणत्याही गोष्टीच्या जनरलायझेशन पासून दूर जाण्यासाठी आणि कोणी माझ्यावर कोणतेही लेबल लावण्यापासून वाचण्यासाठी एवढी मोठी प्रस्तावना करून लिहिणे सुरू करत आहे..
टीप – या लेखातील उदाहरणे आणि अनुभव हे मी सामाजिक निरीक्षणावरून, मित्र-मैत्रिणींशी, पेशंट्सशी झालेल्या चर्चांवरून घेतलेली आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्यात सांसारिक वितंडवादाची कोणतीही परिस्थिती नाही. उलट मला जे जवळून ओळखतात त्यांना आम्हा नवराबायकोत असलेल्या छान harmony ची माहिती आहे.
**
लग्न हा जसा स्त्रीच्या आयुष्यातला खूप मोठा टप्पा आहे, तसं पुरुषाच्या आयुष्यातली देखील ती खूप मोठी गोष्ट आहे. चांगला नवरा मिळणे, चांगलं सासर मिळणे हे एखाद्या स्त्री साठी जितकी महत्त्वाची गोष्ट होती/असते, तितकीच महत्त्वाची गोष्ट चांगली समजूतदार आणि व्यवहारी बायको मिळणे, मिळणे हे देखील आहे.
बायको ही जरी एक ‘अबला स्त्री’ असली, तरी प्रत्येकवेळी ती तशी नसते आणि नवऱ्याच्या बाबतीत तर ती दरवेळी अबला असेलच असे नाही.. माणुसपणाचे सगळे गुणदोष तिच्यात पण असतात.. सतत किरकिर, टोमणे, आदळआपट, भांडणं यांनी नवऱ्याचं जगणं नकोसं केलेल्या कितीतरी बायका आजूबाजूला आहेत.. बायकोकडून छळल्या जाणाऱ्या पुरुषांचा प्रश्नही ‘नाजूक’ असू शकतो, यावर अजून आपल्या समाजाचा विश्वासच् नाहीये.
पुरुष अत्याचार हे जास्त करून violent किंवा शारीरिक प्रकारचे जास्त असतात, तर स्त्री अत्याचार हे मानसिक प्रकारचे असतात. स्त्रियांकडून होणाऱ्या अत्याचारात शारीरिक पातळीवरची हिंसा नाहीये, म्हणून ते “कमी हिंसक” असतात असं उगीचच समजलं जातं. पण तसं नाहीये.
“शरीरावरचे घाव एकवेळ लवकर भरतील, पण मनावरचे घाव लवकर भरत नसतात”, असले व्हॉट्सॲप फॉरवर्ड आपण एकमेकांना सहज पाठवतो, पण कौटुंबिक हिंसेच्या बाबतीत मात्र केवळ शारिरीक अत्याचारालाच आपण आणि आपला कायदा ‘हिंसा’ समजतो, हे अनाकलनीय आहे.
असो.
१. मानसिक हिंसेच्या प्रकारातलं “अश्रू आणि अबोला” ही खूप मोठी हत्यारं स्त्री कडे असतात. आणि प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यात कधीना कधी हे हत्यार वापरतेच वापरते. (पटत नसेल तर आपापल्या नवऱ्याला विचारून पहा).
नाराज नाराज राहणे, सुतकी चेहऱ्याने वावरणे, जीवावर आल्यासारखा रोजच्या गोष्टी करणे, धुसफूस, आदळआपट करणे.. आणि नवऱ्याने ‘काय झालंय?’ विचारल्यावर , ‘काही नाही, मला कुठं काय झालंय’ असं उपहासाने म्हणणे, आणि मग आपल्याला खटकलेल्या गोष्टीशी सूचक एखादा टोमणा मारणे. अशी त्यामागची modus operandi असते. त्यावरून नवऱ्याने त्याची चूक(?) ओळखून ती दुरुस्त केली तर ठीक, नाहीतर मग अश्रुपात आणि Emotional blackmailing चे पुढचे टप्पे आहेतच. कित्येक नवरे देखील ‘नको उगीच तमाशा!’ म्हणून बायकोच्या कलाकलाने घेतात. (मी पुन्हा सांगतो, हे emotional blackmailing एकतर्फीच होतं असं माझं अजिबात म्हणणं नाही. उलट सेन्सिबल व्यक्तींच्या बाबतीतच हा प्रकार दुसऱ्या पार्टनरकडून जास्त अवलंबिला जातो).
ह्या अबोला प्रकारात तर नवरे लोकांना बहुतेक वेळा काय झालंय, किंवा आपलं काय चुकलंय तेच माहिती नसतं.
कुठल्याही मतभेदानंतर अबोला धरणं ही एकदम चुकीची पद्धत आहे. ‘आता येईल तो/ती ताळ्यावर’ ह्या भाबड्या समजुतीवर ती आधारलेली असते. पण तसं कधी होत नाही. बायको अबोला धरते म्हणून बदललेला एकही पुरुष माझ्या पाहण्यात नाही. फार तर तो त्याची modus operandi बदलतो. वादाचे प्रसंग टाळण्याच्या आणि खोटं बोलण्याच्या नवनवीन क्लुप्त्या शोधतो. नंतर तो तुम्हाला इग्नोर करायला शिकतो, आणि पुढं पुढं तर तो तुमचा अबोलाही एन्जॉय करायला शिकतो.
भांडणावर किंवा मतभेदांवर अबोला हा उपायच नाहीये. भांडण झाल्यास वादाचा मुद्दा टाळून रोजच्या इतर सांसारिक गोष्टी करत राहणे. राग शांत झाल्यावर नंतर (पटेलच अशी अपेक्षा न ठेवता) आपला मुद्दा सांगणे, त्यावर दोघांनीही न चिडता, न आवाज वाढवता, अन् मागचं उकरून न काढता चर्चा करणे. या गोष्टी करायला हव्यात.
काही गोष्टी समोरच्याला समजण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो याची जाणीव ठेवायला हवी. तर काही गोष्टी अनंत काळासाठी काळावर सोडून द्याव्या लागतात, याची तयारी असायला हवी.
समोरच्यानं आत्ताच माझं ऐकलं पाहिजे, लवकरात लवकर स्वतःला बदललं पाहिजे, त्याला शिकविण्याचा मक्ता मलाच मिळालाय, मी त्याला चांगलंच ओळखलंय, म्हणून माझ्याशिवाय त्याला/तिला दुसरं कोणीच नाही सुधारू शकत, वगैरे अशा अपेक्षाच अवास्तव, बालिश आणि क्रूर आहेत. असो..
२. “टोमणे मारणे” हे बहुतांश बायकांच्या हातातलं मुख्य हत्यार असतं. आणि तिऱ्हाईत व्यक्तिंसमोर तर या हत्याराला जास्तच धार चढते.
या टोमण्यांनी जितकं damage होतं, किंवा जितकी मने कलुषित होतात, तितकी क्वचितच इतर कुठल्या गोष्टींनी होतात. नवऱ्याचे आईवडील, नवऱ्याचे नातेवाईक, शेजारीपाजारी, नवऱ्याचे मित्र यांच्यासमोर हळूच एखादा तरी टोमणा पास केल्याशिवाय कित्येक स्त्रियांना राहवतच नाही. स्वतःच्या नातेवाईकांच्या समोर तर कित्येक स्त्रियांच्या जिभेला एक वेगळीच चकाकी येते.
बऱ्याच स्त्रिया Sympathy मिळविण्यासाठी असं करतात, पण बऱ्याचदा ते साध्य होत नाही. समोरचे काही बोलत नाहीत, पण त्या स्त्रीची sympathy gaining साठी चाललेली ती केविलवाणी धडपड त्यांना जाणवलेली असते. त्यातला तेचतेचपणा ऐकणाराला irritate करू लागतो. अशा स्त्रिया इतरांच्या गॉसिपचा विषय जास्त होतात. या टोमण्यांमुळे आणि सततच्या सांसारिक तक्रारी “पब्लिक” करण्याच्या स्वभावामुळे स्त्रिया त्यांच्या भोवतालच्या कौटुंबिक आणि सामाजिक वर्तुळात स्वतःची digniti घालवून बसतात. टाईमपासचा किंवा चेष्टेचा विषय बनतात.
अशाच स्त्रिया मग, मदतीसाठी हात अन् रडण्यासाठी खांदा देण्याच्या बहाण्याने कुशीत घ्यायला टपून बसलेल्या पुरुषांच्या तावडीत अलगद सापडतात.
ज्या व्यक्ती आपल्या संसाराच्या बाबतीत फार काही करू शकत नाहीत, आपल्या प्रॉब्लेम्स वर सोल्युशन देऊ शकत नाहीत, त्यांच्यासमोरच आपल्यातल्या बेबनावाचे प्रदर्शन मांडण्याची काहीच गरज नाही, कारण त्याचा फायदा तर काहीच होत नाही, उलट त्या गोष्टी केल्याने आपण आपल्या जोडीदाराचे मन जास्तच कलुषीत करतोय, हे बहुतांश स्त्रीपुरुषांना समजतच नाही. (पुन्हा वाचा).
कौटुंबिक कलहातून way out काढण्यासाठी कामात किंवा व्यवसायात गुंतवून घेणे पुरुषासाठी सोपे आहे, पण बहुतांश स्त्रिया तसं करत नाहीत. शेजारणीपाजारणी, मैत्रिणी यांचा सहारा आपलं मन मोकळं करण्यासाठी घेतला जातो. पण हे मन मोकळं करणं कधी attention seeking कडे चाललंय, आणि Sympathy gaining साठी आपण किती गोष्टी आपल्याही नकळत manipulate करून समोरच्याला सांगतोय, हे त्या स्त्रीला कळत नाही. जितकं आपण रडू रडू सांगू, तितकं समोरच्याला ते जास्त पटेल, जास्त feel होईल असं त्यांना वाटत असतं, त्यामुळं “मी कसं सहन करतेय माझी मलाच माहिती आहे” अशा आविर्भावात सांगितलं जातं. आपली बाजू सांगताना आपला नवरा म्हणजे जगातला सगळ्यात नालायक अन् दुष्ट व्यक्ति आहे, असं present केलं जातं. “मी आहे म्हणून राहिलेय, दुसरी असती तर कधीच निघून गेली असती”, असं नवऱ्यासमोरच बोलणाऱ्या कित्येक स्त्रिया आहेत.
आता हाताशी फोन आल्यापासून तर आईचीही यात भर पडलीये. अगदी हागलं-मुतलं आईला सांगणाऱ्या असंख्य स्त्रिया आहेत. हे असं व्हिक्टिम कार्ड खेळायची सवय जितकी जास्त, तितकी नवऱ्यासोबत कनेक्ट व्हायची शक्यता कमी कमी होत जाते.
३. ‘सेक्ससाठी अडवणूक’ हे तर बायकांचे हुकमी हत्यार असते.. बहुतांश बायका हे हत्यार सर्रास वापरतात..
बऱ्याच स्त्रिया उद्वेगाने किंवा भांडण वगैरे झाल्यास पतीबरोबरच्या संभोग क्रियेलाच विरोध करतात, कारण संभोगातून ‘फक्त पतीला सुख मिळते’, असं मानण्याचा आपल्याकडे पारंपरिक प्रघात आहे. स्त्रीने देणे आणि पुरुषाने घेणे असंच त्याचं स्वरूप कल्पिले जाते. पण ‘आपल्यालाच त्यातून सुख घेता येत नाही’ (किंवा ‘मिळू शकत नाही’), हे मात्र कित्येक स्त्रियांच्या गावीही नसते.. पतीला ‘धडा’ वगैरे शिकवायच्या नादात आपण आपल्याही मानसिक तणावाचे कारण निर्माण करत आहोत, हे त्यांना कळतच नसते.. त्यामुळे पती-पत्नी संबंध आणखीच तणावपूर्ण बनतात. असे वारंवार होऊ लागल्यास त्या जोडप्यांना समुपदेशनाची गरज असते, पण त्याऐवजी मग एकमेकांवर अनेक व्यक्तिगत चुकीचे आरोप करणे/संशय घेणे वगैरे सुरू होते.. आणि कालांतराने त्यात इतरही वाद मिसळून अशा जोडप्यांचे घटस्फोट अथवा Mental separation घडून आलेले पाहावे लागतात. एकमेकांबद्दल मनात फक्त कोरडेपणा उरतो.. एकमेकांच्या ओढीऐवजी संसार हा ‘kids oriented’ सुरू होतो.. अशांनी कौन्सिलरकडे जाऊन Long term समुपदेशन करून घेण्याची गरज असते..
संसारामध्ये Partner with Low desire, controls their sex life असं असतं. ज्या पार्टनरची desire किंवा libido जास्त आहे, तो आपोआपच victim बनतो. असे victim जर पुरुष असतील तर मग ते अस्वस्थ, चिडचिडे, असमाधानी किंवा नंतरनंतर विक्षिप्त आणि कालांतराने Antisocial बनत जातात.. म्हणजे पत्नीच्या अडवणुकीमुळे पतीची चिडचिड आणि कटकटी, आणि पुन्हा त्या कटकटींना वैतागून पत्नीकडून पतीची परत सेक्ससाठी अडवणूक.!! असे ते vicious cycle बनत जाते..
बहुतांश वैवाहिक तक्रारींचे (Marital disharmony चे) मूळ हे कुठेतरी sexual dissatisfaction मध्ये देखील दडलेले असते.. विवाहबाह्य संबंध किंवा लैंगिक अत्याचार ही त्याचीच पुढची पायरी आहेत, पण ते ज्याच्या त्याच्या संस्कारावर (moral values) ठरते.. विवाहबाह्य संबंध हे नेहमी शारीरिकच असतात असे नाही, मानसिक आणि भावनिक कुचंबणा हे त्याचे मोठे मूळ आहे..
असंख्य विवाहित स्त्रिया Orgasm पर्यंत पोहोचतच नाहीत. किंवा Sex desire च्या बाबतीत त्या victim असतात. अशा स्त्रिया त्यामुळे अस्वस्थ आणि नैराश्यग्रस्त राहू शकतात. त्यांच्यासाठी सेक्स ही फारशी “आनंददायी कृती” रहात नाही.. (सेक्समध्ये ती ऍक्टिव्ह नसणे किंवा तिला त्याचा आनंद घेता न येणे, यासाठी तिच्यावरचा पारंपरिक विचारांचा नैतिक पगडा आणि धार्मिक समजुती ही कारणे देखील आहेत, पण त्याचा विचार आपण इथे करणार नाहीत). अशावेळी मग स्त्रिया यासाठी फारशा उत्सुक नसतात किंवा मग डोकेदुखी, कंबरदुखी वगैरे कारणे देतात.. (नंतर नंतर त्यांचे हे Psychosomatic आजार बळावतात). पण आपण नेमके कशामुळे असमाधानी (dissatisfied) आहोत, हे स्त्रियांना कळत नसल्यामुळे, पत्नी-पत्नीच्या संसारात हे असमाधान ‘धुसफूस’ या स्वरूपात पत्नीकडून बाहेर पडत राहते. काही वेळेला याबाबत मन:शांती मिळविण्यासाठी स्त्रिया देव-धर्मात स्वत:ला बुडवून टाकतात, तर अनेक स्त्रिया बुवाबाजीच्या नादी लागतात. तर अत्यल्प स्त्रिया विवाहबाह्य संबंधात याचं उत्तर शोधतात.. पण बहुतांश स्त्री-पुरुष आध्यात्मिक प्रवचनांतून या असमाधानाचे, बेचैनीचे उत्तर शोधू पाहतात.. पण उत्तर दुसरीकडेच असते..
अशा लोकांची प्रत्येक रात्र कूस बदलत, तळमळत जाते. उलटसुलट विचार, संशय, शक्यता त्याला झोपू देत नाहीत… या वातावरणाचा दुष्परिणाम तब्येतीवर होतो. आवडनिवड, छंद हरवत जातात आणि मनाचा, मेंदूचा ताबा वैफल्यग्रस्ततेकडे कधी जातो, थांगपत्ताही लागत नाही.. कधी व्यसनाच्या आहारी जातो, कधी विवाहबाह्य संबंध तर कधी बाबा-बुवाच्या नादी लागतो.. नोकरी व्यवसायावर याचा खूप परिणाम होतो..
४. काही बायका आपल्या नवऱ्याला सतत दबावाखाली किंवा नजरेखाली ठेवू पाहतात. किचन पॉलिटिक्स खेळणाऱ्या सासू सूनांबद्दल तर बोलायलाच नको, एका लेखात मावणार नाही ते. त्यासाठी एखादा ग्रंथच लिहावा लागेल. सुरुवातीला तर काय चाललंय, आणि हे का चाललंय तेच कळत नाही. कोण चूक अन् कोण बरोबर सांगणंच अवघड होऊन बसतं, दोघीही तीच तीच गाऱ्हाणी गात असतात. बायकोचं ऐकावं तर आई ‘बायकोचा बैल ‘ म्हणते, अन् आईचं ऐकावं तर बायको ‘ कुक्कुलं बाळ ‘ म्हणते! नवऱ्याची ताक घुसळायची रवी करून टाकतात नुसती. अशा वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं करण्यासाठी बायको अबोला, धुसफूस, रडणं, सेक्ससाठीची अडवणूक हे आणि असे अनेक हत्यारं यथेच्छ वापरते. तर आई फुल्ल इमोशनल ब्लॅकमेल करते.
एकीकडे आपल्याला लहानाचं मोठं केलेली पंचवीस वर्षे फुलासारखं सांभाळलेली स्त्री असते, तर दुसरीकडं आयुष्यभर साथ देण्याचं वचन देत त्याच्यासाठी सगळं सोडून आलेली स्त्री असते. दोघींनाही जिंकायचं असतं. त्यात पुरुषाचा विचार कुठेच नसतो.
लग्न टिकण्याच्या बाबतीतली Insecurity बायकांच्या जीन्स मध्ये अजूनही आहे, त्यामुळे नवरा ताब्यात ठेवण्यासाठी त्यांच्याकडून हरतऱ्हेचे मार्ग त्यांच्याही नकळत अवलंबिले जातात. सतत पाळत ठेवणे, फोन करत राहणे.. कुठंय? काय करतोय? जेवला का? झोपला का? कोण आहे बरोबर? काय करणार आहे आता? फोन engage का लागला? फोन स्विच ऑफ का केला? मला मिस करतोय का? माझी आठवण येतीय का? व्हिडिओ कॉल करतो का? कधी येणार आहे? लवकर ये ना.. प्रश्नच संपत नाहीत. नवीन नवीन लग्न झाल्यावर हे भारी वाटतं, पण सारखंच असं होऊ लागलं तर मात्र ते irritating level ला जातं. कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होतेच. ह्या सगळ्याला कितीही व्यवस्थित हाताळा, “तू आता बदललाय” हे जवळपास प्रत्येक पुरुषाला ऐकावं लागतं. पण अगं बाई, तूच त्याला बदलायला भाग पाडलेलं असू शकतं, याचा एकदातरी विचार करशील की नाही? किती दिवस त्यानं तुला बाबू शोना पिलू करत बसायचं?!
प्रेमात पझेसिव्हनेस दाखवलाच पाहिजे असं वाटणाऱ्या, अन् म्हणून पझेसिव्हनेसलाच प्रेम समजण्याची गफलत करून बसलेल्या कित्येक स्त्रीपुरूष असतात.
त्याला त्याच्या आईवडील अन् इतर नातेवाईकांपासून तोडणे, आपल्या गैरसोईचे सल्ले देणाऱ्या मित्रांपासून तोडणे.. त्याच्या व्यवसाय नोकरीच्या बाबतीत पण आपल्या पथ्यावर पडणारेच निर्णय त्याला घ्यायला लावणे.. आणि समजा, आपण मनाई केलेली कोणती गोष्ट त्याने केलीच तर एवढं रिऍक्ट करणे, एवढा तमाशा करणे, की त्याची पुन्हा हिम्मत नाही झाली पाहिजे आपल्या शब्दाबाहेर जायची. त्यासोबतच कधी कुटुंबात तर कधी गल्लीत तमाशा करायच्या धमक्या देणे, कधी जीव द्यायच्या धमक्या देणे, प्रचंड रडारड करणे, असे प्रकार केले जातात. तिच्या आईवडिलांचा अशा वेळी तिलाच सपोर्ट असेल तर परिस्थितीला आणखीच धार चढते ..
यात प्रोसेस मध्ये कुठेही जर त्याचाही पुरूषी अहंकार उफाळून आला, आणि त्याने शिवीगाळ मारहाण केली तर मग उलट ते अशा स्त्रीच्याच पथ्यावर जास्त पडते. तिथून पुढे त्याचेच मोठे भांडवल केले जाते.
खूपच थोडे पुरुष असतात जे शिवीगाळ करण्याचा, किंवा मारहाण करण्याचा पर्याय निवडत नाहीत. बहुतांश जण कमीअधिक प्रमाणात हिंसक होतातच. पण त्यातल्या काही जणांना एखाददुसऱ्या वेळा हिंसक होऊन समजतं की याचा काहीही उपयोग नाहीये, उलट फायदा तिलाच मिळतोय.. मग ते त्यांच्याकडं असणारी इतर हत्यारं वापरू पाहतात. त्यांचं तिला इग्नोर करणं, खोटं बोलणं, टाळणं, वाढत जातं.. अन् मग हे चक्र अव्याहत चालूच राहतं..
५. काही स्त्रिया खूपच अक्कलशून्य असतात. सतत दुसऱ्याच्या संसाराशी तुलना चालू असते, किंवा मग सगळं पिक्चर मधल्यासारखं आयडियल हवं असतं.. पेशन्स नावाची गोष्टच नसते, आणि आपल्या सांसारिक परिस्थितीचा acceptance ही नसतो. मग सतत कुठल्याही गोष्टीसाठी तगादा लावणं किंवा वस्तू मिळविण्यासाठी पिच्छा पुरवणं सुरू राहतं. अशा प्रायोरिटीज चे तारतम्य किंवा अकलेचा भाग नसलेल्या असंख्य स्त्रिया नवऱ्याच्या डोक्याला शॉट देत असतात.
बहुतांश मुलींना आईवडील आपल्या घरातल्या आर्थिक नियोजनात समाविष्ट करून घेत नाहीत, घरातलं बजेटिंग, मार्केटिंग, बँकिंग, यातल्या कशालाच तिला expose करत नाहीत. नुसतं अभ्यास अन् लाड चालू असतात. तिच्या वतीने तिचे सगळे निर्णय तेच घेत असतात. अशा मुलींना लग्न झाल्यावर स्वतःला तर अवघड जातंच पण त्यांच्या अवास्तव मागण्या अन् अपेक्षा नवऱ्याला देखील त्रासदायक ठरतात.
त्यातच तिच्या आईवडिलांची मुलीच्या संसारातली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लुडबुड, त्यांचे अनाहुत सल्ले, त्यांच्या अपेक्षा ह्या बऱ्याच वेळा अवास्तव आणि कधी कधी तर खूपच जाचक बनतात. बहुतांश वेळा आईवडील आपली मुलगी आपल्याला सांगतेय ते सगळं खरं मानतात, तेवढ्यावरच अनालिसिस करून आपलं मत बनवितात. आणि ‘त्याला असं करायला लाव, त्याला तसं करू देऊ नको, काहीही झालं तरी तू अमुक ऐकू नको, तमुक करू नको’, असले उंटावरून शेळ्या हाकणारे बरेच सल्ले आपल्या मुलीला देत असतात.
मुली देखील आपल्या नवऱ्याला सतत आपल्या वडिलांशी compare करत असतात. किंवा भावाच्या संसारातली उदाहरणे देत असतात. मुलांचं जसं सारखं “माझी आई अमुक, माझी बहिण तमुक”, असं करणं चूक आहे, तसच मुलींचं देखील “माझे वडील असे, माझा भाऊ तसा” हे करणं चूक आहे.
मुलाच्या आईवडीलाची असो किंवा मुलीच्या आईवडीलाची असो, कोणाचीही संसारातील अतिरिक्त लुडबुड त्रासदायक असते. मात्र आपल्या आईवडिलांचे ते मोलाचे सल्ले, आणि दुसऱ्याच्या आईवडिलांची ती लुडबुड, असं सिलेक्टिव मत बरोबर नाही.
६. स्वातंत्र्य कोणाला नको असतं बरं? स्त्रियांना जसं स्वातंत्र्य हवं असतं, तसं पुरुषांनाही स्वातंत्र्य हवं असतंच की! (खरंतर स्वातंत्र्य ही अशी द्यायची वगैरे गोष्ट नसते). पण काही स्त्रिया नवऱ्याला सतत टोकत असतात. सारखं संशय घेत असतात. गुपचूप मोबाईल चेक करत असतात. कधी डायरेक्ट विचारून तर कधी फिरवून फिरवून चौकशा करतात. पाळत ठेवतात. त्यांना objectionable काही वाटलं तर खूपच तमाशा करतात. ह्याच्या सोबत नको फिरू, त्याच्या सोबत नको मैत्री ठेऊ, हे नको करू, तिथं नको जाऊ, सोलो ट्रीप्सला नको जाऊ.. मला इथं घेऊन चल, मला तिथं घेऊन चल नाहीतर तू पण नको जाऊ.. तू तिच्याशी का बोलला.. तू इतक्या वाजता कुठं होता, करू का तुझ्या मित्रांना फोन.. तू गेल्या महिन्यात 20 तारखेला दुपारी दोन वाजता कुठं होता आत्ताच्या आत्ता सांग मला..
अरे, काय चाललंय हे!
बरेच पुरुष देखील खूप संशयी असतात अन् ते बायकोला खूप restrict करतात, पण बऱ्याच स्त्रियाही काही कमी नाहीत. अशा प्रकारे जर कोणाचं वागणं असेल तर समोरची व्यक्ती मग त्या व्यक्तीला टाळू लागते, ते प्रसंग टाळू लागते, किंवा मग खोटं बोलू लागते. व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर डिनर करून घरी आलेल्या पतीला पत्नी म्हणाली, ‘आले का मजा करून!’.. त्यानंतर तो नवविवाहित पती सावध झाला, आणि तिथून पुढे बाहेर जेवायचा प्लॅन असेल तर, ऑफिसमध्ये ओव्हरटाईम आहे, महत्त्वाची मीटिंग आहे, मला ॲसिडीटी झाली आहे, अचानक प्लॅन ठरला, मला सगळ्यांनी बळजबरी केली म्हणून नाईलाजाने जावं लागलं, अशी दरवेळी वेगवेगळी कारणं देऊ लागला.
स्त्री असो की पुरुष, माणूस तेंव्हाच खोटं बोलतो जेंव्हा त्याला समोरच्याकडे कडून होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष Judging टाळायचं असतं, किंवा समोरच्या व्यक्तीच्या वादाला तोंड फोडणाऱ्या bothering reactions नको असतात. (पुन्हा वाचा)
त्यामुळं आपला पार्टनर असो की आपली मुलं, कोणी सारखं खोटं बोलत असेल, तर आपण त्याच्या कुठल्या गोष्टींना कसं कसं रिॲक्ट करतोय ते एकदातरी जरूर तपासून पाहायला हवं. त्यासाठी तज्ञांची मदत घ्यायला हवी. पतीपत्नीच्या नात्यात तर एकमेकांचं हे unnecessary react करणंच खूप घोळ करत असतं. दरवेळी प्रत्यक्षात काही बोलावंच असं नाही, समोरच्याची बदललेली बॉडी लँग्वेज खूप काही बोलून जात असते.
७. स्त्रियांना हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस खूप असतात, त्यामुळे त्यांचे mood swings ही खूप होतात, त्याबद्दल प्रत्येक पुरुषानं संवेदनशील असायलाच हवं. याबद्दल दुमत नाहीच. पण नवऱ्याचेही मूड स्विंग होऊ शकतात, त्याचं ऑफिस मधे कोणाशी बिनसलेलं असू शकतं, व्यवसायात एखादी ऑर्डर हातातून गेलेली असू शकते, कोणाशी खटका उडालेला असू शकतो, ऑफिस पॉलिटिक्सचा विचार सतावत असू शकतो, कामाचा ताण असू शकतो, अशा एक ना अनेक समस्या असू शकतात. बाहेरच्या जगातल्या cut throat compitition च्या प्रेशरमुळे किंवा सतावणाऱ्या insecurities च्या प्रभावामुळे त्याने काहीवेळा बायकोला नाही योग्य रिस्पॉन्स दिला, किंवा दुर्लक्ष झालं, तर लगेच बायकांनीही फणा काढायची किंवा व्हिक्टीम कार्ड खेळायची काहीच गरज नसते. याचा अर्थ असा नाही की मी नवऱ्याचं वागणं जस्टीफाय करतोय. पण कुठल्याही समस्या ह्या चर्चेतून सोडवाव्यात, योग्य वेळी योग्य तेवढी संवेदनशीलता दाखवावी, ह्या मताचा मी आहे.
पेशन्स ठेवावा, छोट्या आणि insignificant गोष्टी सोडून द्याव्या, नवऱ्यावर खूप आणि सतत ताण येत असेल तर इतर व्यक्तींची किंवा तज्ञांची मदत घ्यावी. आपल्या मूड स्विंग मध्ये त्याने आपल्याला समजून घ्यावे अशी आपण अपेक्षा ठेवतो, तसं त्याच्या मानसिक खडतर काळात त्याला भावनिक आधार द्यावा, तेवढं नसेल जमत तर निदान आपले अतिरिक्त प्रेशर तरी नाही द्यावे.
कमी शिकलेल्या, कमी स्किल्स असणाऱ्या, व्यवसाय कमी चालणाऱ्या, कमी कमावणाऱ्या किंवा unprivileged असणाऱ्या पुरुषांसाठी हे जग क्रूर आहे. अलीकडच्या स्पर्धात्मक जगात तर आयुष्य हे “ट्रेडमिल” सारखं झालंय. स्वतःचा धंदा असो वा नोकरी, इथं स्टेबल टिकुन राहण्यासाठी देखील रोज धावावं लागतं.. घराबाहेर जीणं हराम करणाऱ्या किती समस्या असतात याची बऱ्याच स्त्रियांना तितकीशी कल्पनाच येऊ शकत नाही, आणि बऱ्याचदा ती देताही येत नाही.
‘टाळी एका हाताने वाजत नाही’ हे मला मान्य आहे, तरीपण किती आणि कुठवर ताणावं, हे बऱ्याच बायकांना अजिबात समजत नाही.. गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायला जमत नाहीत.. असंवेदनशीलतेचा कळस गाठला जातो बऱ्याचदा..
८. कधी कधी काय होतं, सुरुवातीला भांडणं छोटीच असतात. पण आईवडिलांच्या immaturity मुळं , किंवा एखाद्या अतिशहाण्या नातेवाईकांच्या सल्ल्यानं भांडणं कोर्टात जातात. “ह्यांना आपण धडाच शिकवू, आपण काय कमी आहोत का?, ह्यांना दाखवून देऊ आपण काय करू शकतो ते!” असा अततायीपणा केला जातो. आणि एकदा कोर्टात गेलं की, अधिकच फाटत जातं. वकीलच सांगतात, “आपली केस स्ट्राँग व्हायची असेल तर अमुक आरोप पण आपण करू, तमुक कहाण्या बनवून जोडू, 498 करू, अमुक करू तमुक करू”… मग आरोप प्रत्यारोप वाढतच जातात. तारीख पे तारीख पडते. एकमेकांना जास्तीत जास्त कसा त्रास होईल, अन् जास्तीत जास्त पैसे कसे हडपता येतील हेच पाहिलं जातं. आपल्या न्यायव्यवस्थेत त्रास बेअब्रू कटकटी मनस्ताप असं सगळं मिळतं, फक्त न्यायच मिळत नाही.
मुलांची कस्टडी बहुधा स्त्रीकडेच दिली जाते. मुलांचा विरह पुरुषांसाठी देखील खूपच अवघड असतो. कितीही कणखर मनाचा पुरुष असला, तरी आपल्या मुलीच्या एका आर्त हाकेने लगेच पाघळतो. असं असलं तरी मुलांच्या बाबतीतली सगळी सहानुभूती स्त्रीकडेच जाते, पुरुषांच्या बाजूने कोणी फारसं बोलत नाही, कोणी लिहीत नाही. यावर समाजात, साहित्यात, बातम्यात, सोशल मीडियात चर्चा देखील जास्त होत नाही.
जशा मुलाबाळांसाठी संसार ओढणाऱ्या स्त्रिया आहेत, तसं आपल्याला मुलांचा विरह सहन होणार नाही म्हणून अवास्तव त्या तडजोडी करून , मन मारून संसारात तगून राहणारे देखील पुरुष आहेत.
९. आर्थिक परावलंबित्व ही खूप वाईट गोष्ट आहे. स्त्रियांसाठी असो की पुरुषांसाठी.. म्हणून स्त्रीने देखील आर्थिक सक्षम असलंच पाहिजे, संसाराला दोघांनीही आपापल्या परीने आर्थिक हातभार लावावा असं माझं मत आहे.
जसं मी कमावतोय म्हणून पुरुष रुबाब करतात, तसं ‘घरचं सगळं मलाच बघावं लागतं’ म्हणून स्त्रिया ओरड करतात. याबाबतीत नवरा जितकी असंवेदशीलता दाखवेल, तितकी तिची ही ओरड जास्त असते, हा dictum आहे. पुरुषांना ती ओरड खूपच loud वाटते, पण पुरेशी संवेदशीलता दाखून सामोपचारानेच हा मुद्दा हाताळला पाहिजे.
घरकाम आणि प्रेग्नन्सी या दोन बाबतीतलं स्त्रियांचं contribution खरंच खूप मोठं आहे. स्त्री कमवत असली तरी घरकाम करण्यात तिची मदत केली जात नाही, हे निर्दयी आहे.
पण काही स्त्रिया स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ही दोन कार्ड सारखंसारखं खेळत असतात. माझ्या माहितीतलं एक उदाहरण सांगतो.
एक डॉक्टर मुलगी, पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्यांचं लग्न झालं. मग मुल झालं. नवऱ्याचं हॉस्पिटलसाठी जागा बघणं, बांधकाम, तोपर्यंत भाड्याच्या जागेत मॅनेज करणं, व्हिजिट मॅनेज करणं, स्वतःची प्रॅक्टिस, असं सगळं चालू असताना, ती घरीच होती. मुलाचं बघायला सासू किंवा आईचा ऑप्शन असताना तिने तो नाही घेतला (असो.. तो तिचा चॉईस). पण मुलगा पाच वर्षाचा झाल्यावर मग मात्र नवऱ्याने तिची प्रॅक्टिस सेट करून देण्याचा प्रयत्न सुरू केला. ती रोज हॉस्पिटलला येऊ लागली. तिथं स्टाफ मध्ये रोज याला झाप, त्याला खवळ, याला कामावरून काढून टाक, त्याचा पगार कट कर , असं करू लागली. मला पेशंटच नाहीयेत, माझा वेळच जात नाही, अशा कटकटी सुरू झाल्या. नवऱ्यानं सुरुवातीला समजावलं, पेशंट काय असं येत नसतात, थोडा पेशन्स ठेवला पाहिजे, बाहेर व्हिजिट सुरू केल्या पाहिजेत वगैरे वगैरे.. पण कटकटी जशा जास्तच वाढल्या, तसं त्यानं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिला जॉबला लावून दिलं. तिथंही तक्रारी, सतत गाऱ्हाणी.. मग वैतागून नवरा म्हणला, घर सांभाळ, मुलाचा अभ्यास घे..
आता ती त्याही गोष्टी नीट करत नाहीये.
पण जिथं जाईल तिथं, ” प्रेग्नन्सी मुळं आणि मुलाच्या संगोपनामुळं मी माझ्या करियर वर पाणी सोडलं, असं सांगत बसते. भिशी, किटी पार्टी, फेसबुक जिथं तिथं ती ‘बाईचा जन्मच वाईट असतो, बाईला संसारासाठी करियरचा त्याग करावा लागतो, अशा अनेक मतांच्या पिंका टाकत त्यावर लाईक आणि सहानुभूती मिळवत असते.
शॉपिंग, हॉटेलिंग, पिकनिक सगळं व्यवस्थित उकळते, पण आर्थिकस्वातंत्र्य पीडित लोकांची ब्रँड ॲम्बेसेडर असल्यासारखं फेसबुक वर स्युडोफेमिनिझम मिरवते.
हा पूर्णपणे तिच्यातला स्वभावदोष आहे खरंतर.. पण याची शहानिशा कोण करणार? फेसबुकवरच्या तिच्या पोस्ट्स आणि कॉमेंट्स वरून तिला सिंपथी देत, पुरुषांविषयीचा दृष्टिकोन अजूनच कलूषित होतो अशानं..
असं घरकाम आणि प्रेग्नन्सी यातून स्त्रीपणाचं कार्ड खेळत स्वतःचा नाकर्तेपणा झाकणाऱ्या खूप आहेत.
तसेच, स्वतःच्या नवऱ्याकडून आलेल्या अनुभवाने दूषित होत, जिथं तिथं समस्त पुरुष जातीवर आपल्या कडवट मतांची गरळ ओकत इतरांची मनं कलूषित करणाऱ्या देखील खूप आहेत.
पण काही स्त्रिया मात्र सगळ्या समस्यांवर मात करून आपलं करियर करतात, आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात. कारण जिला करायचंच आहे तिला आपोआप मार्ग दिसतो, आणि जिला मनातूनच काही करायचं नाहीये तिला सबबी दिसतात..
असो..
१०. “माझ्या कष्टाचं चीज होत नाहीये, माझ्याकडं कुणी लक्षच देत नाहीये, सगळ्यांना आपापलंच पडलंय, कुणासाठी करतेय मी हे सगळं, मी मेले तरी कुणाला फरक पडणार नाही, माझं इथं कुणीच नाही”, ही अत्यंत मोघम वाक्ये आहेत.. प्रत्येक स्त्रीला हे वाटत असतं. पूर्वी नंदीबैलवाले जोतिषी आमच्या गल्लीत यायचे, ते सगळ्या स्त्रियांना आलटून पालटून हीच वाक्ये सांगायचे, मग त्या खुश व्हायच्या अन् पसाभर धान्य देऊन मोकळं व्हायच्या..
बहुतांश पुरुषांच्या देखील ह्याच भावना असतात. प्रत्येकाला संसारातले आपलेच कष्ट आणि आपलाच त्याग मोठा वाटत असतो. कुटुंबात नवरा एकटाच कमवत असेल तर त्याची अवस्था वाल्याकोळ्या सारखी होते. ज्यांच्यासाठी मी हे सगळं करतोय, तेच मला थोडंही सुख लाभू देत नाहीत अशी त्याची भावना बनते. काहीजण बोलून दाखवतात, मनातला हा राग या ना त्या कारणाने बाहेर काढतात, तर काहीजण मनातच कुढत राहतात.
मग ह्या अशा आणि इतरही अनेक पूर्वग्रहांमुळे अन् सांसारिक कटकटिंमुळे नंतर नंतर संसाराप्रतीची त्याची आसक्तीच संपून जाते. संसार वाऱ्यावर सोडून दिला जातो.
Lower Socio-economic strata मध्ये हे संसार वाऱ्यावर सोडून देऊन बहकण्याचं चित्र जास्त ठळक दिसतं, बायका चार घरची धुणभांडी करत असतात, अन् नवरा दारू पिऊन मोकट फिरतो.. पण सामाजिक परिस्थितीमुळे स्त्री मात्र असं करू शकत नाही. संसाराचा गाडा ओढत राहण्याशिवाय तिच्याकडं पर्यायच नसतो.. इतर Socio-economic strata मध्ये मात्र संसार वाऱ्यावर सोडायचे इतर सोफिस्टिकेटेड मार्ग अवलंबिले जातात. कुणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दूर जातं, कुणी देवाधर्माच्या अतिरिक्त नादी लागतं, तर कुणी दिवसभर घराबाहेर राहण्याची इतर कारणं शोधतं.
संसार वाऱ्यावर सोडून देण्याचा सगळा दोष अर्थातच पुरुषाकडेच येतो. पण “हे असं का होतंय?, आणि हे असंच का होत आलंय?” याचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून कोणीच विचार करत नाही.
कुठलाही पुरुष मुलगा म्हणून चांगला असतो, मित्र म्हणून चांगला असतो, बाप म्हणून चांगला असतो, भाऊ म्हणून चांगला असतो, मग नवरा म्हणूनच त्याला का धाड भरत असावी? याच्यावर शास्त्रशुद्ध विचार करण्यापेक्षा Men will be Men म्हणून सोडून देणं फार सोपं आहे..
केवळ मोठे उद्योग, उड्डाणपूल आणि फोर लेन रस्ते या विकासाबद्दलच चर्चा होतात, पन्नास वर्षे पुढचं नियोजन म्हणून समृध्दी महामार्गाचा विचार होतो, पण नात्या-नात्यातल्या भावनिक समृद्धीचा विचार कधी होणार? लोकांच्या मानसिक विकासाबद्दल चर्चा कधी होणार?
आपल्याकडं यावर काम करणारी शास्त्रशुद्ध सोल्यूशन सिस्टीमच नाही. एकीकडे, यावर पूर्वीचे पारंपरिक मार्ग आता तोकडे पडताहेत, कालबाह्य होताहेत, आणि बाबा बुवा सत्संग बैठका ह्या केवळ तात्पुरती वेदनाशामक अध्यात्मिक अफू वाटायचं काम करताहेत. तर दुसरीकडे, ह्या प्रश्नांवर शास्त्रशुद्ध उत्तर देणारे विवाहपूर्व समुपदेशन आणि Marital dispute councilling याविषयी जनजागृती (awareness) आणि acceptance दोन्हीही आपल्याकडे नाही. अशा कात्रीत सापडल्यामुळे Happiness index च्या बाबतीत आपण कोसो दूर आहोत. यावर लवकरात लवकर आणि widespread काम नाही केलं तर भविष्यात आपल्याकडे भौतिक विकास तर भरपूर असेल, पण मानसिक आरोग्याच्या पातळीवर आपण खूप मोठे फेल्युअर ठरू..
*समारोप* –
खरंतर, लग्नं ही “मेड फॉर इच अदर” च्या ऐवजी “मोल्ड फॉर इच अदर” च्या शक्यता किती आहेत, ते पाहूनच ठरवली जायला हवीत.. पण तसं होत नाही.. शेवटी तो एक आयुष्यातला सगळ्यात मोठा जुगार ठरतो..
अरेंजमॅरेज असो की लव्हमॅरेज सततच्या कुरबुरींमुळे आणि एकमेकांबद्दल असंवेदशीलता दाखविल्याने लवकरच आपुलकीची किंवा परस्पर आदराची भावना जाऊन नात्याचा त्रास व्हायला लागतो.. मग तिथून घर विस्कटायला सुरूवात होते.. संवाद तुटतो.. दुरावा निर्माण होतो.. अंतर वाढतं.. अशा परिस्थितीत बहुतांश मित्रमंडळी मध्यस्थी करण्यासाठी असफल ठरतात, ते केवळ त्याची एकतर्फी समजूत काढण्याशिवाय किंवा त्याला प्यायला नेण्याशिवाय फार काही करू शकत नाहीत..
अशावेळी लग्न ही ज्यांच्यासाठी नजरकैद आहे, पारतंत्र्य आहे, अशा “टॉक्सिक रिलेशनशीप” मधून लवकरात लवकर बाहेर पडलेलं बरं.. घटस्फोट घेणं हा शेवटचा पर्याय झाला. पण त्याआधी Counselling ची मदत घेणे, काही दिवस Long distance relationship मध्ये राहून बघणे, ते शक्य नसेल तर घरात राहूनच minimum common program वरच लक्ष केंद्रित करणे, वादाचे प्रसंग कमीत कमी होतील इतपतच आणि तितक्याच मुद्द्यांवर interactions ठेवणे, असे अनेक प्रयत्न जोडपी करू शकतात..
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, घटस्फोट हा पहिलाच पर्याय जरी नसला, तरी नातं सुधारण्याची शक्यता किती टक्के आहे, हे वेळीच ओळखता आलं पाहिजे. विचित्र आणि सायको पार्टनर वर स्वतःची शक्ती आणि वेळ कितपत खर्च करायचा याचा विचार देखील केला पाहिजे.
लग्नानंतर किमान पाहिले दोन वर्षे तरी मुल होऊ न देणे, आणि “एखादं मुल होऊ द्या, मग आपोआपच तो/ती सुधारेल”, अशा फालतू सल्ल्यांना भिक न घालणं, या दोन गोष्टी प्रत्येकाने प्रथमदर्शनी तरी केल्याच पाहिजेत.
जसं पुरुषांच्या स्वभाववैचित्र्याचा स्त्रियांना खूपच जाच सहन करावा लागतो, तसं पुरुषांच्या बाबतीत पण होतं. पण पीडित स्त्री बद्दल जेवढी कळकळ समाजात असते, पीडित स्त्रीला जेवढी सहानुभूती मिळते, तेवढी पुरुषांच्या वाट्याला अजिबातच येत नाही. कुणाला सांगायची कोणासोबत शेअर करायची देखील चोरी असते. झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी लागते. असो..
लग्न जितकं सोपं आहे, तितकाच् घटस्फोटाचा कायदाही सोपा असला पाहिजे.. त्याचा सोशल ऍक्सेप्टन्सही तितका असला पाहिजे.. जुगारातून क्वीट करण्याचा पर्याय दोघांसाठीही सोपा हवा, नाहीतर मग आयुष्यातून लवकर क्वीट करायची वेळ येते..
– डॉ सचिन लांडगे.
भुलतज्ञ, अहमदनगर.
**