– डॉ सचिन लांडगे.
पुरुषदिनानिमित्त “पुरुषांचा विचार करताना” या सदराखाली लिहिलेल्या तीन भागाच्या मालिकेतील हा शेवटचा भाग. पहिल्या भागात पुरुष असण्याचे काय काय त्रास असतात याबद्दल लिहिले आहे. दुसऱ्या भागात पुरुषाला त्याच्या बायकोकडून होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा केली आहे.
तर या तिसऱ्या भागात पुरुषांना इतर स्त्रियांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रासाबद्दल किंवा त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाबद्दल लिहिले आहे.
लेखाचा स्कोप तेवढाच आहे.
– – –
* मनुष्य स्वभावाचे सगळे दुर्गुण जसे पुरुषात असतात तसे ते स्त्रियांत देखील असतात. दरवेळेस स्त्री ही अबला नारीच असते, आणि पुरुष हा टपून बसलेला पशुच असतो असं नाही..
शारीरिक गरजेसाठी पुरुषाला वापरून घेणाऱ्या स्त्रिया तर असतातच, पण त्याच्या शारीरिक गरजेसाठी स्वतःला स्वखुशीने वापरू देणाऱ्या देखील स्त्रिया असतात.
एकदा संबंध प्रस्थापित झाल्यावर नंतर नव्या नवलाईचे दिवस संपले की आपला संसार, आपली परिस्थिती आठवायला लागते. दोघेही समजूतदार अन् जबाबदार असतील तर प्रकरण व्यवस्थित मिटते. पण त्यातल्या एकाला (बहुतेक वेळा पुरुषाला) तसं नको असेल, तर मग दुसऱ्याची कुचंबणा होते. भावनिक/मानसिक/कौटुंबिक/ सामाजिक/आर्थिक सगळीच फरफट होते.
हे सुरू होताना जरी समन्वयाने झाले असले, तरी दोष आणि आरोप पुरुषांवर जास्त होतात. विवाहबाह्य संबंधात तर सरसकट पुरुषालाच दोष देण्याची पद्धत आहे. समजा, अशा उदाहरणात जर पुरुष विवाहित असेल तर आपण आपल्यासारख्याच आणखी एका स्त्रीच्या संसाराला आपण काडी लावतोय, तिच्या दुःखाचे कारण बनतोय, हे देखील अशा संबंधातली स्त्री नजरेआड करते.
बळजबरी आणि अत्याचार हे पुरुषांकडूनच जास्त केले जातात हे अगदी स्वच्छ आहे. पण दरवेळी ते तसंच असेल असं नाही.
पकडलं गेलं किंवा पकडलं जाण्याची शक्यता निर्माण झाली की 180° मध्ये ‘यु टर्न ‘ घेणाऱ्या मुली/स्त्रिया देखील खूप आहेत. त्यानेच मला भरीस घातलं.. त्याने मला इमोशनल केलं, मी फक्त मदत करायला गेले.. भलाईचा जमानाच नाही राहिला.. त्याचे इरादे मला कळलेच नाहीत.. तो इतका नीच असेल असं वाटलंच नव्हतं मला.. अशा प्रकारचे आरोप करण्याची, excuses देण्याची धडपड सुरू होते.
काही प्रकरणांत तर स्वतःची इज्जत वाचविण्यासाठी नातेवाईकांच्या प्रेशरखाली त्या मुलावर/पुरुषावर बलात्काराची केस करायला मागं पुढं न पाहणाऱ्या मुली देखील आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बहुतांश बलात्काराच्या केसेस ह्या अशा प्रकरणांतूनच केल्या गेलेल्या असतात. पोलिस किंवा न्याय खात्याशी कोणी ओळखीचे किंवा संबंधित असतील तर त्यांना विचारून पहा.
अशा प्रकारात जर समजा, हॉर्मोन्स उतू जाणारे कमी वयाचे, बेअक्कल मुलंमुली involve असतील तर मुलगाच पॉक्सो मध्ये अडकतो. नाहीतर मग बळजबरीने त्याचे लग्न लावून दिले जाते, किंवा मग पैशावर सेटलमेंट होते.
* बऱ्याचदा, केवळ थ्रिल म्हणून (किंवा स्वतःची शारीरिक गरज म्हणून) मुली या फिजिकल रिलेशनना मान्यता तर देतात, पण नंतर त्यांना या संबंधांत आपल्याला “खूप काही” मिळू शकतं याची जाणीव होते.. यात तिला भरीस घालणारे इतर लोक पण असतात.. मग पद्धतशीरपणे पुरुषाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात.. अन् मग त्यायोगे, “हे आणून दे, ते गिफ्ट दे, अमुक बिल भर, तमुक ठिकाणी घेऊन चल”.. अशा मागण्या करणाऱ्या, आणि त्यातून त्याची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या देखील मुली/स्त्रिया आहेत. आपल्या गरजेसाठी किंवा गरजेपुरतंच पुरुषांच्या भावनांशी त्या खेळतात. हे ब्लॅकमेलींग कधी इमोशनल लेव्हल पर्यंत असतं, तर कधी ते धमक्यांपर्यंत जातं.
‘पुरुष मजा मारतोय तर त्यानं भोगलंच पाहिजे ‘ असा सरसकट सूर दिसतो.. पण स्त्री पण मजा मारत नसेल कशावरून? नेहमी पुरुषानंच स्त्रीला अडकवलंय, किंवा पिळवणूक एकतर्फीच चालू आहे, असं चित्र नसतं.
अशी सगळीच प्रकरणं काय समाजात उघड होण्यापर्यंत जात नाहीत, पण या प्रकरणांचं प्रमाण आपण विश्वास ठेवू शकणार नाही इतकं मोठं आहे..
* ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी सॉफ्ट फ्लर्टिंग करत (किंवा समोरच्याच्या सॉफ्ट फ्लर्टिंगला बऱ्यापैकी रिस्पॉन्सीव्ह राहत) कितीतरी स्त्रिया छोटेमोठे प्रिव्हिलेजेस घेत असतात, “गुड बुक” मध्ये रहात असतात किंवा डायरेक्ट इन-डायरेक्ट फायदे उकळत असतात.. याचा तोटा त्यांचे कलीग असलेल्या पुरुषांना तर होतोच, पण अशा पद्धतीचा अवलंब न करणाऱ्या कलीग स्त्रियांना देखील याचा तोटा होतो.
सुट्टी पाहिजे असेल तर मुद्दाम तोकडे कपडे घालून येणं, बोलताना आवाज नको तितका मधाळ करणं, गरज नसताना समोर वाकणं, असे टॅक्टिक्स वापरले जातात की जे otherwise objectionable नसतात.. त्यातून काही वेगळा अर्थ काढला तर पुरुषच नालायक ठरवले जातात..
स्वतः काहीतरी indicative वागायचं /बोलायचं/ करायचं, आणि समोरच्याने तो धागा पकडून काही बोलला/केले , तर मग ‘अन्यायग्रस्त अबला नारी’ असल्यासारखं सिपंथी मिळवायची, किंवा व्हिक्टीम कार्ड खेळायचं, असं देखील केलं जातं..
म्हणजे काय स्त्रियांनी मोकळं बोलू वागूच नये का?
आणि ही जबाबदारी किंवा बंधनं स्त्रियांवरच का?
मुख्य म्हणजे, आपण ज्यांच्यासोबत राहतो /वावरतो/ काम करतो, त्यांच्या सामाजिक मान्यता काय आहेत, समोरच्याची बौद्धिक कुवत काय आहे, आणि आपल्या कुठल्या बोलण्या/वागण्याचे त्यांच्याकडून कायकाय अर्थ घेतले जाऊ शकतात, याची किमान समज स्त्रियांना असायलाच हवी.
.. आणि पूरुषांना देखील, कोणतीही मोकळं वागणारी बोलणारी स्त्री ही available असते असं बिलकुल नाही, याची समज असायला हवी. आणि त्याच्या आईबापाने ती नसेल करून दिली, तर मुलींनी आपल्या शाब्दिक फटकऱ्याने ती करून दिली पाहिजे. यात कोणाची भिडभाड बाळगायची अजिबात गरज नाही.
कधी कधी पुरुषांना काहीतरी माहिती मिळालेली असू शकते, मग ते “आपली पण” शक्यता आहे का ते तपासून पाहतात. त्यांना हे नाही कळत की एखादी स्त्री एखाद्याला रिस्पॉन्स देतेय/ मैत्री करतेय/ संबंधांसाठी होकार देतेय, म्हणजे तीने आपल्यासोबत पण तसंच करायला पाहिजे असं नाही, किंवा लगेच ती available वगैरे आहे असं नाही..
बरेच पुरुष otherwise सभ्य असतात. पण कधी कधी एखाद्या वेळी खडा टाकून बघण्याचा किंवा चाचपणी करण्याचा त्यांना मोह होतो. अशावेळी त्यांचा काहीतरी गैरसमज (mis-conception) झालेला असू शकतो. एकतर त्यांना काहीतरी चुकीचा सिग्नल मिळालेला असतो किंवा त्यांनी समोरच्या स्त्रीचं काहीतरी mis-interpret केलेलं असू शकतं. अशा वेळी “सगळे पुरुष सारखेच असतात”, असा शेरा मारून त्याची बदनामी करणं किंवा आकांडतांडव करणे याऐवजी त्या व्यक्तीसोबत समोरासमोर बोललेलं योग्य राहतं.
कित्येक पाश्चात्य देशात ‘ Date ‘ साठी सरळसरळ विचारलं जातं. एकतर त्याला ‘हो ‘ किंवा ‘नाही ‘ म्हणलं जातं, पण विचारल्याचा बाऊ केला जात नाही. किंवा आपल्या आवडत्या प्रकारातल्या व्यक्तींनी विचारलं तर खुश व्हायचं, अन् अशातशा कुणी विचारलं तर आकांडतांडव करायचा असला दुटप्पीपणा नसतो तिथं..
असो..
* लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, प्रमोशनचे आमिष दाखवून बलात्कार, असे आरोप आपण सर्रास पाहतो. पण अमिष दाखवणं म्हणजे लहानपणीच्या चॉकलेट देण्यासारखं असतं का?
मान्य आहे की, बऱ्याचदा परिस्थितीमुळं खूप साऱ्या स्त्रिया तोंड उघडू शकत नसतात, निषेध करू शकत नसतात, अन् त्यामुळं अन्याय करणाराची भीड अधिकच चेपत जाते. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, वेळीच आणि योग्य मदत घेतली पाहिजे, आणि मुख्य म्हणजे कोणत्याही आमिषामागचे “इरादे” ओळखता आले पाहिजेत.. आपण त्या व्यक्तीला कितपत ओळखतो, आपण कितपत शेअरिंग करावं, किती जवळ येऊ द्यावं, कोणत्या प्रकारची मदत किंवा प्रिव्हीलेजेस घ्यावेत अन् कोणते नाकारावेत, काही अघटीत झालं तर आपली rescue system तयार आहे का? अशा सगळ्या शक्यतांचा विचार केलाच पाहिजे.
* एखाद्याने सहज मैत्री भावनेतून किंवा केअरिंग मधून जरी एखाद्या स्त्रीला मेसेज केले, बोलला, तरी त्याचे ठराविक स्क्रीनशॉट काढून आपल्या मित्रवर्तुळात आपला भाव वाढविण्यासाठी वापर केला जातो.. किंवा त्याची निव्वळ मजा तरी घेतली जाते..
‘सर, आज खूप थकलेले दिसत होता तुम्ही’ , ‘सर नाराज आहात का?, माझं काय चुकतंय ते तरी सांगा’, असं म्हणत चॅटिंग ची सुरुवात केली जाते, आणि त्यातले काही मेसेजेस डिलीट करून ठराविक मेसेज असलेले स्क्रीनशॉट काढून ते आपल्या फायद्यासाठी किंवा बदनामीसाठी वापरले जातात..
अशा स्त्रिया attention seeking disorder नं ग्रस्त असतात.
* अलीकडच्या काळात खूप मुलंमुली लग्नाआधी परस्पर सहमतीने शरीरसंबंध ठेवताहेत. बऱ्याच वेळा लग्नाबद्दल त्यांच्यात काहीच ठरलेलं नसतं.. त्यांना सुरुवातीला फक्त ‘फिजिकल रिलेशन’ हवे असतात.. मग त्यांच्यात काही अश्लील मेसेजेसची देवाणघेवाण होते, एकत्र फोटो काढले जातात, काही काळ एकत्र घालवला की intimate क्षणांचे व्हिडीओ पण काढले जातात.. मग त्या मुलीला कालांतराने समजा वाटलं, की लग्न करण्यासाठी हाच ‘बकरा’ योग्य आहे, (किंवा कालांतराने त्यांचे संबंध जगजाहीर झाले), आणि ती मुलगी त्याला समाजलज्जेस्तव लग्नासाठी फोर्स करायला लागली, तर मग त्या मुलाने काय करायचे?.. मग ती स्त्रीच्या बाजूने असलेल्या कायद्यांचा आधार घेत, ‘बलात्काराची केस करेन’ म्हणत पुरुषाचे ब्लॅकमेलिंग पण करू शकते..
(अशा प्रकरणात मुलंच जास्त करून मुलींचं ब्लॅकमेलिंग करतात हे मला नजरंदाज करायचं नाहीये).
* स्त्रियांच्या बाजूच्या असलेल्या कायद्यांचा आधार घेत विनयभंगाच्या तक्रारी दाखल केल्या जातात. आवडत्या पुरुषाने नकार दिल्याने, योग्य ती दखल न घेतल्याने, किंवा दुर्लक्ष केल्याने इगो दुखावलेल्या कजाग स्त्रिया या गोष्टी खूपदा करतात. प्रत्यक्ष तक्रार दाखल करण्यापर्यंत प्रकरण बहुधा नाही नेत, पण धडा शिकविण्यासाठी, इगो satisfy करण्यासाठी, किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी हे प्रकार केले जातात.
भावनिक वैफल्यग्रस्त असलेल्या किंवा लैंगिक कुपोषित असलेल्या काही स्त्रिया जगावर सुड उगवायची सुप्त मानसिकता बाळगून असतात. कोणाकडून तरी जबर फसवल्या गेलेल्या स्त्रिया देखील छोट्या छोट्या गोष्टींचा खूपच मोठा इश्यू करतात. बस मध्ये (सॅक चा) धक्का लागल्याने एका मुलाला अतिशय अद्वातद्वा भांडलेली स्त्री मी पाहिली आहे. ती इतकी कजाग होती की इतर कोणाही पुरुषाची मध्ये पडायची हिम्मत नाही झाली. बिचाऱ्या त्या मुलाला मध्येच उतरावे लागले.. असो..
बहुतांश वेळा स्त्रियांना मोहरा बनवून पुरुष या गोष्टी करतात.. राजकीय किंवा व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी, एखाद्याला धडा शिकविण्यासाठी, कोणाला मुद्दाम अडकविण्यासाठी स्त्रियांचा “वेपन” म्हणून वापर केला जातो. अशा वेळी सामान्य माणसाचा स्त्री जातीवरचा विश्वास उडतो. मदत करायला बाजू घ्यायला उघडपणे कोणी धजावत नाही. स्त्रियांचा असा हत्यार म्हणून वापर करण्याचे प्रमाण देखील समाजात खूप आहे.
* दोघांत शारीरिक संबंध असतील तर केवळ त्या मुलालाच कंड असेल म्हणून त्याने हे केलं, किंवा फक्त त्यालाच मजा घ्यायची असेल म्हणून त्याने मुलीला जाळ्यात ओढलं असणार, अशी आपली पारंपरिक समजूत आहे, ती पहिल्यांदा आपल्याला बदलावी लागेल..
अलीकडं खूप मुलींना “बिनधास्त लाइफस्टाइल” अनुभवायची असते, बियर प्यायची असते, पब मध्ये जायचं असतं, मॅकडी सीसीडी हॉटेलिंग त्यांना खुणावत असतं, नाईटआऊट मुव्ही ट्रिप हे सारं हवं असतं.. पण घरून पैसे कमी मिळत असतात, किंवा सोबत (संरक्षण) तरी हवी असते, म्हणून त्या एक बॉयफ्रेंड ‘पाळतात’.. पिअर ग्रुप्समुळं ‘बॉयफ्रेंड असणं’ यालाही एक प्रेस्टीज असते.. त्यांच्यात फक्त “एन्जॉयमेन्ट” हाच एक मोटिव्ह असतो.. पण मग कालांतराने ती मुलगी भावनिक व्हायला लागते.. आणि त्या मुलाचे इमोशनल ब्लॅकमेलिंग करू लागते.. अशा घटनांचं प्रमाण देखील अलीकडे मेट्रो सिटी आणि शहरांत वाढत आहे.
* एखादं चांगलं स्थळ आलं, किंवा एखादा अजून चांगलं भविष्य असलेला बॉयफ्रेंड मिळाला तर आपल्या प्रियकराच्या आपल्यात असलेल्या भावनिक गुंतवणुकीचा जराही विचार न करता त्याला सोडून दुसरा बॉयफ्रेंड पकडणाऱ्या किंवा अरेंज मॅरेज मधून आलेल्या मोठ्या स्थळाशी लग्न करणाऱ्या मुली देखील आहेत. मुलींच्या ब्रेकअपला खूप सहानुभूती मिळते पण असे ब्रेकअप face करणारी मुलं देखील आतून अक्षरशः खूप तुटून गेलेली मी पाहिली आहेत..
स्वतःचा एकाकिपणा घालविण्यासाठी किंवा भावनिक शेअरिंग साठी म्हणून, किंवा नाहीच कोणी चांगला मिळाला तर एक ऑप्शन हाताशी असावा म्हणून काही वेळा मुली एखादा मुलगा “बेस्ट फ्रेंड कॅटेगरीत” ठेवतात.. कधी कधी अक्षरशः त्याला शक्यतांच्या भावनिक हिंदोळ्यावर झुलवत ठेवतात.. आणि त्यांना better option मिळाले की, “आपली जात वेगळी आहे रे”, “घरचे नाही म्हणताहेत रे”, मी कधी तसा विचारच केला नाही रे, अशी काहीतरी थातूरमातूर कारणं देत स्वार्थ साधण्यासाठी त्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या देखील खूप मुली आहेत..
समारोप –
मनुष्य स्वभावाचे सगळे दुर्गुण जसे पुरुषात असतात, तसे ते स्त्रियांत देखील असतात. प्रमाण कमी जास्त असू शकते, पण दरवेळेसच मुलगी असहाय्य असते, आणि मुलं हे अत्याचारीच असतात असं नाही.. स्त्रीवरच्या अत्याचाराच्या बाबतीत स्त्रीला पूर्ण सहानुभूती असते, तिला मदत करणाऱ्या संस्था, कायदे, आणि सपोर्ट सिस्टीम असते. पण स्त्रीने पुरुषावर काही आरोप केले, तर ते खोटे आहेत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी देखील पुरुषावरच येते. पुरुष कोणाशी बोलू शकत नाहीत. आपली बाजू मांडली तरी किती जण विश्वास ठेवतील हा देखील प्रश्न असतो.
म्हणून समाजात स्त्रियांच्या बाबतीत आपल्या बोलण्याचा अर्थ काय घेतला जाईल, आपल्या मदतीचा अर्थ काय घेतला जाईल, अशी भीती बऱ्याच पुरुषांना असते. कामाच्या ठिकाणी, किंवा ओळखीच्या वर्तुळात स्त्रीशी बोलताना वागताना संवेदनशील पुरुषांना खूपच खबरदारी घ्यावी लागते. आणि कारण नसताना “आपला काही तसा इरादा नाही” याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष डिस्क्लेमर द्यावे लागतात. म्हणून बऱ्याच पुरुषांना इच्छा असूनही समाजभयास्तव इतर स्त्रियांना मदत करता येत नाही. अगदी लिफ्ट देण्यापासून ते आर्थिक मदत मिळवून देणे, रोजगार उपलब्ध करून देणे, गरजेला मदत करणे, अशा छोट्या छोट्या मदती देखील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला मध्यस्ती घातल्याशिवाय करता येत नाहीत.
कारण, नुसतं आरोप करणं देखील एखाद्या संवेदनशील पुरुषाला आयुष्यातून उठवू शकतं.. खूप खचून जाऊन आत्महत्या केल्याची देखील उदाहरणे आहेत. बऱ्याच प्रकरणांत आरोप खरे आहेत की खोटे आहेत, हे देखील ठरविता येण्याजोगी परिस्थिती नसते. कालांतराने आरोप खोटे ठरले तरीही, “टाळी काय एका हाताने वाजली असेल काय?” म्हणत पुन्हा पुरुषालाच दोषी ठरविण्याची मानसिकता पण बऱ्याच जणांची असते..
जसं वाईट स्त्रियांच्या वागणुकीची फळे सगळ्या स्त्रिजातीला चुकवावी लागतात, तसं बदमाश पुरुषांच्या कर्तृत्वामुळे सगळी पुरुषजातच संशयाच्या कटघऱ्यात उभी केली जाते. त्यामुळं बाहेरच्या जगात स्त्रीपुरूषात चांगलं नातं निर्माण होण्याच्या, छान मैत्री होण्याच्या, चांगलं work environment निर्माण होण्याच्या शक्यता कमी होतात.
समाप्त.
**
टीप – ‘पुरुष अत्याचारी असतात’, याला प्रतिवाद म्हणून हा लेख अजिबात लिहिलेला नाही. त्याचा तसा अर्थही काढू नये. कारण जळी स्थळी काष्ठी पाषाणी स्त्रियांना पुरुषांच्या नजरांना, शेऱ्यांना आणि अत्याचाराला सामोरं जावं लागतं, ही वस्तुस्थिती स्त्रियांकडून पुरुषांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारापेक्षा कितीतरी जास्त गडद आहे.
धन्यवाद..
– डॉ सचिन लांडगे.
अहमदनगर.
**