Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

तुमची मुलगी कोणा ऐऱ्यागैऱ्या सोबत पळून गेली तर चालेल का?

– डॉ सचिन लांडगे.

 

वैजापूर ला घडलेल्या घटनेच्या बातमीच्या पोस्टखालच्या कॉमेंट्स वाचत होतो.. त्यात एक कॉमेंट होती, –
“तुम्ही लाडाकोडात वाढवलेली तुमची मुलगी तुमच्या मर्जीविरुद्ध एखाद्या रिक्षावाल्या सोबत पळून गेली तर तुम्हाला चालेल का? तुमचं प्रेम , पद आणि समाजातली प्रतिष्ठा अशी एका क्षणात धुळीत मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल?” असा प्रश्न एकाने उपस्थित केला होता..


ही एकच कॉमेंट नव्हे, तर असा सूर असलेल्या अनेक कॉमेंट्स तिथं होत्या.. याचं उत्तर खूप सोप्प आहे, पण समजल्या नंतरची जबाबदारी मात्र खूप मोठी आहे.. आणि हे सारं समजून घ्यायचं असेल तर या प्रश्नाच्या मुळात जायला हवे..
मला सांगा, मुलांना घरातून पळून जाऊन लग्न का करावं लागतं किंवा वाटतं?


एक म्हणजे, आईवडील ऐकणारच नाहीत आपल्याला समजून घेणारच नाहीत अशी मुलामुलींची खात्री असते तेव्हा..
आणि दुसरं म्हणजे, मुलांना घरात वैचारिक मोकळीक नसते तेंव्हा..
बऱ्याच घरात मुलांना लाडाकोडात वाढवलंय म्हणतात म्हणजे केवळ पैसा आणि वस्तू देतात.. त्यातले किती जण त्यांना वैचारिक मोकळीकही देतात? मुलांनाही वेगळी मतं असू शकतात, त्यांच्या भावनांना पण आदर द्यायचा असतो, याचं भान/ज्ञान बऱ्याच कुटुंबात नसतं.. मुलं सज्ञान झाल्यावर त्यांच्याही भावना विचारात घ्याव्यात अशी काही पद्धतच नसते.. मुलं ही आपली प्रॉपर्टीच असतात असं मानायची सवय आपल्या संस्कृतीत खोलवर मुरलेली आहे.. इतकी की त्यात आपल्याला वावगं असं काही वाटतच नाही..


“स्वतःचं भलंबुरं कशात आहे हे कळण्याची त्याची/तिची अक्कलच नाही, त्यामुळं त्यांचे निर्णय आम्हीच व्यवस्थित घेऊ शकतो”, असा विचार करणाऱ्या पालकांना जराही वाटत नाही की वयाच्या विशीपर्यंत जर आपल्या मुलांना सो कॉल्ड ‘अक्कल’ येत नसेल, तर वीस वर्षे आपण काय झोपा काढल्या का? आपल्या आतापर्यंतच्या प्रेमापेक्षा काल-परवा पासून प्रेम करणारा एखादा मुलगा तिला जास्त महत्वाचा वाटत असेल, तर आपल्यात देखील ‘खोट’ असू शकते, हा विचार थोडातरी नको का करायला? अशा वेळी आपल्यातील पालकत्व कमी पडलं असं वाटत नाही का वाटत आपल्याला?
म्हणून मग मुलं सज्ञान झाल्यावर ‘तू तुझं तुझं बघ’ म्हणण्यापेक्षा त्यांचे सगळे निर्णय पालकच घेत असतात.. आणि निसर्गात असं फक्त मानव प्रजातीतच होतं बरका!
आता दुसरा प्रश्न.. मला सांगा, मुलांनी केलेल्या निवडीला पालक ‘पसंती’ का देऊ शकत नाहीत?
याची तीन कारणं आहेत..


एक म्हणजे, मुलांच्या प्रेमाधारीत निवडीपेक्षा पालकांचे निवड क्रायटेरिया वेगळे असतात.. त्यांना जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा या गोष्टी जास्त महत्त्व देण्यासारख्या वाटत असतात..
दुसरं म्हणजे, आपल्या पाल्याची निवड चुकीची आहे, अथवा ती चुकीच्या क्रायटेरियांवर बेतलेली आहे, असं वाटत असतं किंवा हे स्पष्ट दिसत असतं तेव्हा..
आणि तिसरं कारण म्हणजे, आपला मुलगा/मुलगी आवडीनिवडीच्या अथवा निर्णयक्षमतेच्या बाबतीत अजिबात सक्षम नाही असं वाटत असतं तेव्हा, पालक मुलांनी केलेल्या निवडीला पसंती देऊ शकत नाहीत..


आता येऊ, माझी मुलगी रिक्षावाल्या सोबत पळून जाण्यावर..

इथे दोनच गोष्टी पालक म्हणून मला करायचेत-
पहिली म्हणजे, काहीही इश्यू काहीही असो, आपल्या आई-वडिलांसोबत आपण freely बोलू शकतो, शेअर करू शकतो, आणि सारे मिळून चर्चेने तोडगा काढू शकतो, हा विश्वास मला तिच्या मनात निर्माण करायचाय.. (आणि असा विश्वास निर्माण करायची सुरुवात ही लहानपणापासूनच होत असते, आणि लहानसहान गोष्टीतून होत असते).. आपल्या पाल्याला जेव्हा भावनिक शेअरिंग साठी आईवडिलांपेक्षा काका/मामा/मावशी/आत्या असे इतर नातेवाईकच भरवशाचे वाटत असतात, तीच ‘पालक’ म्हणून आपली हार असते! आपलं काहीतरी चुकलेलं असतं..


जेव्हा माझ्या आणि माझ्या मुलीत भावनिक मोकळीक आणि विश्वास असेल तेव्हाच आयुष्याचा असा काही निर्णय घेण्याआधी ती मला नक्की सांगेल की, अमुक एक रिक्षावाला मला आवडू लागला आहे.. ती डायरेक्ट त्याच्यासोबत पळून जाणार नाही..
आता दुसरी गोष्ट मला ही करायचीय की, तिच्या निवडीबाबत मला तिला ‘सक्षम’ बनवावं लागेल.. आणि ही मात्र खूपच जबाबदारीची गोष्ट आहे..


वयात येतानाच ‘लग्न म्हणजे काय असतं?’,
संसारासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात?,
प्रेम आणि लग्न यात संबंध काय असतो?,
अशा अनेक प्रश्नांची मला तिला ओळख करून द्यावी लागेल..
दोन भिन्न सामाजिक/आर्थिक परिस्थितीतली आणि भिन्न मतांची माणसं एकत्र राहणं, ही साधी गोष्ट नसते, हे तिला आजूबाजूच्या उदाहरणांतून दाखवावं लागेल..
शारीरिक आकर्षण आणि लैंगिक उर्मी या गोष्टी व्यवहाराच्या पातळीवर ‘लॉंग टर्म’ राहण्यासाठी भावनिक गुंतवणूक होणं, आणि भावनिक गुंतवणूक होण्यासाठी विचार जुळणं किती महत्वाचं असतं, ते चर्चांतून आणि उदाहरणांतून दाखवून द्यावं लागेल..


अरेंज मॅरेजला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला ‘मग तुमची मुलगी कोणा ऐऱ्यागैऱ्या बरोबर पळून गेली तर तुम्हाला चालेल का?’ असा प्रश्न विचारून नामोहरम करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो.. पण त्यासोबतच तिनं ‘तसं’ करू नये म्हणून, पालक म्हणून प्रत्येकानं करावयाच्या संस्कारांच्या बाबतीतली जबाबदारी मात्र झटकली जाते..


आपल्या मुलीला ‘मवाली टाईप’ मुलं आवडताहेत का? सिनेमातल्या मवाली हिरोंचं आपण आपल्या घरात नको तितकं उदात्तीकरण करतोय का?
सणांच्या किंवा कुठल्याही कारणाखाली चाललेल्या गल्लीतल्या टगेगिरीवर आपण पांघरून घालतोय का, हे बघायला नको का?
मुलीपुढं बेदरकारपणा, टपोरीगिरी, आणि डॅशिंगपणा याऐवजी ‘जबाबदारी’ अन ‘समंजसपणा’ हे गुण संसारासाठी जास्त महत्त्वाचे असल्याचं ठसवणे, हे आपलं काम नाही का?
समजा इतकं करून देखील जर ती ऐकतच नसेल, तर “भावनेच्या भरात लग्नाचा निर्णय घेण्याआधी तुम्ही काही काळ एकमेकांसोबत घालवा, एकमेकांना पूर्ण समजून घ्या, मग वर्ष दोन वर्षे गेल्यानंतर देखील तुमची एकमेकांबद्दलची ओढ अजूनही टिकून असेल, तर मग एकमेकांबरोबर आयुष्य घालवायला हरकत नाही”, असा सल्ला मी देईन.. प्रत्येक पालकाला हेच वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी सुखात राहावी.. पण म्हणून आपण त्यांच्यासाठी निवडलेल्या सुखाच्या व्याख्येत ते ‘समाधानी’ राहणार नसतील, तर मग त्या सुखाला तरी काय अर्थ आहे?


रिक्षावाला असो किंवा तथाकथित खालच्या जातीचा, दुसऱ्या धर्माचा असो, हे विषय गौण आहेत (निदान माझ्यासाठी तरी!).. त्याच्या आतला ‘माणूस’ महत्त्वाचा आहे..


आपलं कोणाचंही आजचं “सोशल स्टेटस” हे आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळंच असतं.. समजा, उद्या जर काही कारणाने मी रस्त्यावर आलो, तर माझ्यावर कोणी प्रेमच करू नये का? पिक्चरमधल्या गरीब हिरो ने श्रीमंत खानदानातली मुलगी पटवली अन मुलीचा बाप त्याला विरोध करत असेल तर आपण आपसूकच त्या प्रेमी युगुलाच्या बाजूने असतो, आणि मनातल्या मनात त्या बापाला व्हिलन देखील करून टाकतो.. आपल्यालातल्या कित्येकांना श्रीमंताची मुलगी किंवा एखादी हायफाय मुलगी पटवल्याची कल्पना करकरून देखील शहारून येते.. तर मग प्रश्न जेंव्हा आपल्याच मुलीचा/बहिणीचा येतो, तेंव्हा मात्र आपण वेगळी भूमिका का घेतो?! याला दुटप्पीपणा नाही तर मग काय म्हणणार?


प्रेम, लफडी, विवाहबाह्य संबंध, आरक्षण, वशिलेबाजी, लाचखोरी, श्रीमंती अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ज्याचा आपण विरोध करत असतो किंवा त्याविरुद्ध तावातावाने बोलत असतो, पण त्या गोष्टी आपल्याला मिळत असल्या तर मात्र आपल्याला त्या हव्याच असतात.. (पुन्हा वाचा!)..


म्हणजे आपण ‘श्रीमंती’वर जळत नसतो, आपण श्रीमंतांवर जळत असतो, आपण श्रीमंत झालो, तर ते आपल्यालाही हवेच असते! दुसऱ्याने वशिला लावला तर आपल्याला राग येतो, पण आयुष्यभरात कित्ती काम आपण ओळखी वापरून केलीत किंवा ओळखीच्यांची केलीयेत हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून जातो..


आपल्याला मिळत नाही तर ते दुसऱ्याला मिळणं अनैतिक किंवा गैरच असतं, असं वाटणं हा उच्च कोटीचा दुटप्पीपणा झाला.. असो..
म्हणून माझ्याबाबतीत प्रश्न रिक्षावाल्याचा किंवा तथाकथित खालच्या जातीचा असण्याचा नाहीच आहे, मुद्दा फक्त १. तुम्ही तुमच्या मुलीला निवड आणि निर्णयात किती सक्षम बनवताय आणि २. निवड केलीयेच / निर्णय घेतलायच तर आता त्याच्या परिणामांची कल्पना देऊनही पुढची जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही तिला किती निश्चयी बनविता याचा आहे..


आता पूर्वीच्या विषयाकडे येऊ..


मला तर वाटतं, अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज हा एकदम मोघम प्रकार आहे.. लग्न ठरवण्याचा (निवडीचा) ॲक्सिस आई-वडिलांच्या हातातून “मुलांच्या हातात” शिफ्ट होऊ लागलाय, हेच खरं आहे.. हा ॲक्सिस शिफ्ट होताना जे क्रायटेरिया आई-वडिलांचे होते (म्हणजे जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा) यात निवड मुलांच्या हातात गेल्यामुळे आणखी एका क्रायटेरियाची भर पडलीये, तो म्हणजे ‘प्रेम’.. इतकंच..


मग या संक्रमणाच्या (शिफ्टिंग च्या) काळातली मुलं स्वतः देखील अरेंज मॅरेज जुळवताहेतच की.. म्हणजे (जातीतलीच) मुलगी पाहून आपोआपच प्रेम झाल्याचं नाटक बऱ्याच जणांनी केलंयच की! किंवा मुलाचा शिक्षण पैसा बघून कितीतरी मुलींनी स्वप्नातला राजकुमार मिळाल्याचं नाटक वठवलंयच की!
तसंच दुसरीकडे, आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी/मुलाशी लग्न होईपर्यंतच्या ( courtship period) काळात यांना प्रेम वगैरे झालेयच की!
असो..


पण हा संक्रमणाचा काळ लवकरच निघून जाईल अशी परिस्थिती आहे सध्या..
जागतिकीकरण, आधुनिककरण, सोशल मीडिया, बदलती सामाजिक परिस्थिती, यामुळे पूर्वीच्या जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा या क्रायटेरिया पेक्षा ‘प्रेम’ होण्याला, विचार आणि मनं जुळण्याला अधिक प्राधान्य दिले जाईल.. या क्रायटेरिया मुळंच लग्न जुळतील, आणि प्रेम संपलं, मनभेद झाले तर ती मोडतीलही.. बहुतांश विकसित जगात सध्या हीच परिस्थिती आहे.. लग्न करून बंधनात अडकण्यापेक्षा ‘लिव्ह इन’ राहण्यालाच पसंती वाढत आहे..


आपल्याला आवडो अथवा न आवडो, हे होणे क्रमप्राप्तच आहे..
बदलत्या काळात, या लग्नाने आपल्याला काय दिलं आणि काय हिरावून घेतलं हे एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात या नात्यातून बाहेर पडल्यावर मुलाबाळांची आणि स्वतःची होणारी परिस्थिती या दोन गोष्टींची तुलना होणं स्वाभाविक ठरणार आहे..


सामाजिक प्रभाव आणि घराण्याची इज्जत यांच्या दबावाखाली रडतखडत संसार रेटण्यापेक्षा, आणि भावनिक कुचंबणेत आख्खं आयुष्य घालवण्यापेक्षा ज्या नात्यात आता आदर/प्रेम आणि मोकळीक राहिली नाही, त्या नात्याचा (मुलाबाळांचा आणि भविष्याचा विचार करून) पुनर्विचार करणे नक्कीच चुकीचे नाही..


पूर्णतः वेगवेगळ्या परिस्थितीत लहाणाचं मोठं झालेले दोघे सहजीवन सुरू करणार आहेत, पुढची पिढी घडवणार आहेत आणि जबाबदार नागरिक म्हणून कुटुंबाच्या आणि समाजाच्या उन्नतीस हातभार लावणार आहेत, तर त्यांचे सहजीवन आनंदाचे आणि उत्कर्षाचे होण्यासाठी त्या दोघांच्यात प्रेम, मोकळीक आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती हेच क्रायटेरिया हवेत हे तर कोणीही सांगेल.. आणि मग लग्नासाठी जुळवलेल्या जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा या गोष्टींपेक्षा लग्नानंतरचं दोघांचं ‘मानसिक समाधानी असणं’ हेच जास्त मॅटर करतं, असं नाही का?
म्हणून मॅरेज कसंही असो, त्यातून आयुष्यातले इप्सित काय साध्य करायचेय हे समजलं पाहिजे.. हो की नाही?
आपणही याबाबतीतली आणि लेखाबद्दलची आपली मते जरूर नोंदवा..

 

धन्यवाद ।

 

– डॉ सचिन लांडगे.

 

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *