– डॉ सचिन लांडगे.
सध्याचे बहुतांश पुरोगामी हे स्वयंभू पुरोगामी नाहीत. ते स्वतःला पुरोगामी समजताहेत तर खरं, पण ते केवळ गेल्या शतकातल्या पुरोगामी समाजसुधारकांचे अनुयायी आहेत.
आजच्या प्रश्नांची उत्तरे जुन्या पुस्तकांत शोधणे म्हणजे प्रतिगामीपणा. पुरोगामीपणा म्हणजे कालसुसंगतपणा. आजच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या संदर्भाने (context) पुढचा विचार करून शोधणे म्हणजे पुरोगामीपणा..
पुरोगामीपणा म्हणजे काळाच्या बरोबरीने पुढं जाण्याची वृत्ती.. या न्यायाने विचारात बदल नाही केला, नवीन मांडणी नाही केली, तर कालचा पुरोगामी देखील आजचा प्रतिगामी ठरतो.
मान्य आहे की, पूर्वीच्या समाजसुधाकांचे काही विचार कालातीत आहेत, पण म्हणून त्यांचे विचार हे पूजनीय वगैरे आहेत का? किंवा सर्वच विचार सर्वकाळ कवटाळून बसण्यासारखे आहेत का? की आपण त्या आडून आपण नव्या संशोधनांना आपलसं करायचा प्रयत्नच करत नाही आहोत. हे पाहणंही गरजेचं आहे. (कालातीत आहेत, म्हणजे माझ्या लेखी त्यांची expiry date जरा जास्त असते, इतकंच! बाकी, “त्रिकालाबाधित” वगैरे फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत).
गेल्या दोन शतकात महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी त्यांच्या काळाच्या पुढचा विचार केला, आणि त्याकाळी अप्रिय असलेला पण नवा प्रागतिक विचार मांडत आपल्या समाजात खुप व्यक्तीमुल्यं आणि समाजमुल्यं रुजवली. आताचे खूप सारे लोक स्वतःला त्या विविध समाजसुधारकांचे अनुयायी मानतात.
पण होता होता, त्या समाजसुधारकांचं अनुयायी असणं म्हणजेच पुरोगामीपणा, हे तयार झालेलं समीकरण आता इतकं घट्ट झालंय की बरेच चांगले चांगले लोक पण यात फसताहेत. ते हेच विसरताहेत की काळ प्रवाही असतो. नवीन काळाचे नवीन पिढीचे, नवीन संदर्भ असतात. त्यावर चर्चा करून, त्यावर वैचारिक घुसळण करून, नव्या विचारांची प्रगत मांडणी, आणि जुन्या विचारांची फेरमांडणी करायला हवी. भलेही ते आपल्याला कितीही अप्रिय वाटत असले तरीही.. तरच आपल्याला पुरोगामी शब्दाचा खरा अर्थ समजला आहे असं म्हणता येईल. कितीही लोकप्रिय ज्ञान असो, काही काळानंतर ते पठडीबाज पठडीबाज होतेच.
तुकाराम महाराज पुरोगामी होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या काळी progressive विचार केला, काळाच्या पुढचा विचार केला होता. पण नंतर काळ खूप पुढं निघून गेला. आता त्यांचं निवडक साहित्य वाचून त्यांची प्रतिगामी म्हणून हेटाळणी करणारा देखील चूक आहे, आणि ते पुरोगामी होते एवढ्या भांडवलावर प्रत्येक गोष्टीत त्यांचा अंधानुयय करणारा देखील चूक आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, पुरोगामीपणालाच Absolute idealism (निरपेक्ष आदर्शवाद) समजण्याची गफलत खूप जण करतात. पण पुरोगामीपणा म्हणजे असा आदर्शवाद नाही, तो केवळ त्या त्या काळच्या आदर्शांकडे जाणारा मार्ग आहे. कारण प्रत्येक काळाचा आदर्शवाद वेगळा असतो, पुरोगामी विचारांनी त्यापर्यंत पोहोचता येते. तसंही समाजशास्त्रात आदर्श किंवा परफेक्ट असं काही नसतं, आणि ते “निरपेक्ष”ही नसतं. माणसांची मशिन्स झाल्याशिवाय Utopia शक्य नाही.
असो..
तिसरा मुद्दा म्हणजे, प्रतिगामी विचारांची व्यक्ती अथवा संघटना ही जास्त करून माणसं जोडायचं काम करते. समोरच्या व्यक्तीची पार्श्वभूमी, शिक्षण, पद आणि इतर विषयांवरील मतं काहीही असोत, त्या व्यक्तीत जराशीही आपल्या बाजूंच्या विचारांची चुणूक दिसली की ते लगेच अशा व्यक्तीला आपलं लेबल द्यायला उत्सुक असतात. पण सध्याच्या पुरोगामी वर्तुळात बरोब्बर या उलट असतं. एखाद्या पुरोगामी विचारांच्या व्यक्तीत इतर काही मुद्द्यांवर जराशीही प्रतिगामी विचारांची चुणूक दिसली की ते लगेच अख्खी व्यक्ती वजा करून टाकतात. त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, वैचारिक कुवत, सद्य परिस्थिती अशा गोष्टींचा सकल विचार करण्यापेक्षा , त्यांना तो माणूस आपल्या कळपातून बहिष्कृत करणं जास्त आवडतं. अमुक व्यक्तीनं अमुक प्रकरणात तमुक पद्धतीचं प्रतिगामी मत मांडलं होतं तेंव्हापासून आम्ही त्यांना Unfriend केलंय, ह्यातच ते आपले सौख्य सामावून घेत असतात. याला “वैचारिक अस्पृश्यता” म्हणतात. आणि बहुतांश तथाकथित पुरोगामींना त्याचा अभिमान देखील असतो.
इथे फेसबुकवरचे पुरोगामित्व तर केवळ एक मजाक बनून राहिले आहे. ठराविक पक्षाचा विरोध करणे, एखाद्या नेत्याला शिव्या घालणे, इतिहासातील ठराविक महापुरुषांचा अन् समाजसुधारकांचा उदोउदो करणे, मनोमन त्यांना देवत्व बहाल करणे, अन् त्यांच्या विचारांचे पुजारी बनणे आणि मग उरलेल्या वेळात एकमेकांत पुरोगामित्वाची सर्टिफिकेट्स वाटणे, ह्याच्या पलीकडे नवीन मांडणी, चर्चा, वैचारिक घुसळण कोणाला नको आहे.
कोणत्याही काळात लैंगिक विषयावर लिहिणारे लोक समाजाला निषिद्ध असलेले आपण पाहिले आहेत. Unpopular essays लिहिणारे बर्ट्रांड रसेल असोत, रधों कर्वे असोत, की काळाच्या पुढची मांडणी करण्याचं धैर्य दाखविणारे ओशो असोत, यांनी त्या त्या काळच्या प्रतिगामी लोकांची भरपूर टीका सहन केलेली आहे. त्यावेळी काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनीच त्यांची पाठराखण केली होती. मग जर आज कोणत्याही विषयावरच्या नव्या मांडणीवर सहमती-असहमती, विविध अस्पेक्ट्सनी केलेल्या चर्चा, वादसंवाद असे मार्ग सोडून डायरेक्ट एकतर्फी conclusion काढायचे, किंवा शिव्यागाळीवर यायचे असे प्रकार आपण स्वतःला पुरोगामी म्हणवताना करणार असू, तर कसले आपण डोंबलाचे पुरोगामी?
लिव्ह इन रिलेशन, मॅरेज, डिव्होर्स, Molestation acts, Alimony act, Prostitution, Consensual sex, Pragnancy termination, Surrogacy, Adoptation, Sperm selection, Organ donation, Alcohol & substance abuse, Euthenesia असे कितीतरी प्रश्न आहेत, ज्याचा भविष्यकाळाच्या दृष्टीकोनातून विचार करावा लागेल. कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला सध्याच्या मतांनुसार आदर्श/योग्य वाटत असतील, पण मानसशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र अन् मनोविकारशास्त्र वेगळंच सांगताहेत, ते वेळीच ऐकावं लागेल.
गेल्या काही वर्षांत खूपच प्रगत झालेले मानसशास्त्र आणि मनोविकारशास्त्र , नवनवीन कल्पना घेऊन येणारे समाजशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र आणि मानववंशशास्त्र अशा शास्त्रांच्या मदतीने माणसाच्या, त्याच्या परस्पर संबंधांच्या आणि एकूणच समाजाच्या वागणुकीची कालसुसंगत मांडणी जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या विस्फोटामुळं उद्भवलेल्या आताच्या पिढीच्या प्रश्नांशी भिडण्यात यश येणार नाही.
पुरोगामी लोक देखील भूतकाळाच्या चष्म्यातून किंवा आपल्या पारंपरिक पद्धतीने या प्रश्नांची सोडवणूक करू पहात असतील तर ते नवे “पंतोजी” बनल्याशिवाय राहणार नाहीत.
धन्यवाद..
डॉ सचिन लांडगे.
भूलतज्ञ, अहमदनगर.
**