– डॉ सचिन लांडगे.
या सोबत दिलेल्या व्हिडीओ मध्ये किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला, एका स्वयंघोषित (non degree holder) वैद्याने औषध दिले आणि त्या बाईंच्या भावाच्या (पेशंटच्या) सगळ्या व्यथा दूर झाल्या.. असा हा व्हिडीओ आहे.. यात त्या बाईंनी आणि त्या वैद्याने स्वतःचा मोबाईल नंबर दिला आहे, आणि किडनी विकारापासून ते कॅन्सर पर्यंत सगळे आजार विनामूल्य बरे करत असल्याचा दावाही केला आहे.. याचे आवर्जून व्हिडीओ शूटिंग केले आहे.. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचावी.. असो..
पण माझा मुद्दा तो नाही..
एक जुना किस्सा सांगतो..
माझ्या जवळच्या एका नातेवाईकाला वयाच्या वीस वर्षांपासूनच डायबेटीस आहे.. डॉक्टरांनी तो Type 1 IDDM असल्याचे त्याला सांगितले होते.. रोज इन्सुलिन चे इंजेक्शन घ्यावेच लागणार आहेत हेही सांगितलं होतं.. आणि विशेष म्हणजे हा डायबेटीस कधीच बरा होणार नाहीये हेही निक्षून सांगितलं होतं..
पण, त्याच्या मनातली आशा काही संपली नव्हती.. तो कुणाचंतरी ऐकायचा “इकडं कोणीतरी डायबेटीस वरचं औषध देतं, तिकडं कोणीतरी जडिबुटी देतं”, लगेच तो पैसे खर्चून रजा टाकून तिकडं जायचा, दोन चार महिने दिलेली औषधं खायचा.. पण फारसा फरक पडायचा नाही.. कोणी जडिबुटी द्यायचं, कोणी झाडपाला द्यायचं, कोणी जांभूळ खा, कारलं खा, आणखी काही काही खा, असं सांगायचं.. तात्पुरता फरक पडायचा, इन्सुलिनचा डोस ही कमी व्हायचा, पण पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न..
एकदा , जालन्याला एक खूप पॉवरफुल्ल माणूस, खूप जालीम औषध देतो असं त्यानं ऐकलं.. खूपच ख्याती होती त्या औषध देणाऱ्याची ..
मग काय परवडत नसताना उधारीपाधारी करून त्याने जालन्याला जाऊन त्या माणसाकडून औषध आणले.. कडक पथ्यपाणी पाळत ते औषध सुरू केलं.. आणि चमत्कार झाला.. त्याचं इन्सुलिन पूर्ण सुटलं.. डायबेटीस बरा झाला.. डायबेटीस बरा झाला..
त्याच्या घरी त्याचे अनुभव ऐकायला लोक येऊ लागले.. कचऱ्यात टाकलेली इन्सुलिनची इंजेक्शन्स तो अभिमानाने दाखवायचा.. सगळीकडे आनंदीआनंद.. शेजारच्या गावातल्या एक दोन गरजू डायबेटीक लोकांनी सुद्धा औषध आणलेय वगैरे अशी तो त्या औषध देणाऱ्याची फुकटात खूप जाहिरात करू लागला..
पण महिना दीडमहिन्यात त्याला त्रास सुरू झाला, तो सगळा त्रास अंगावर काढल्याने शेवटी तो कोमात गेला (त्याला डायबेटीक कोमा म्हणतात).. पंधरा दिवस हॉस्पिटल, आयसीयु असं करून तो बरा झाला.. पण त्याला आलेला वाईट अनुभव मात्र त्याने कोणाबरोबरही शेअर नाही केला.. आपण “फसलो” हे सांगायची त्याला लाज वाटायची.. लोक औषधाच्या अनुभवाबद्दल विचारायला यायचे शेजारीपाजारी विचारायचे, तेंव्हा तो एक तर वेळ मारून न्यायचा, किंवा मग “काही काहींना सूट होते ते औषध, तर काहिकाहींना नाही”, असं सांगायचा..
आणि .. त्या औषधविक्याचा धंदा पीडित लोकांच्या आशेवर आणि अनुभव घेऊन फसलेल्या लोकांच्या गप्प बसण्यावर अव्याहतपणे चालूच राहिला..
पण माझा मुद्दा हाही नाही..
या असल्या औषधांमुळे लोक वैद्यकीय ट्रीटमेंट घ्यायचं सोडतात आणि मग अत्यंत वाईट पद्धतीने कॉम्प्लिकेट होतात.. अनेकदा भोंदूच्या धंदेवाईक भिकारचोटपणापायी लोकांचे आजार बळावतात आणि ह्यांच्या नादी लागून सुरुवातीचा महत्वाचा वेळ घालवल्याने कॅन्सर पुढच्या स्टेज मध्ये जातात.. मग येतात डॉक्टरच्या दारात..
पॅरॅलीसिस पासून कॅन्सर पर्यंत सगळं बरं करणारा सॅबिस्टीन असो, किंवा होली वॉटर पाजणारे भोंदू असो.. उलेमा सुलेमा असोत किंवा कोणी दळभद्री बाबा बुवा असो.. कोणी का असेना, माझं म्हणणं आहे, यांनी काहीपण गंडे दोरे बांधावे, कसलंही मंतरलेलं पाणी पाजावे, पण लोकांना मेडिकल ट्रीटमेंट बंद करायला मात्र सांगू नये, हा माझा मुख्य मुद्दा आहे..
अनेक डॉक्टर्स पेशंट्सना कळवळून सांगत असतात, तुम्ही काहीही झाडपाला खा, जडिबुटी खा, किंवा तुमचे इतर काहीही प्रयत्न करा.. पण डॉक्टरांना वेळोवेळी दाखवणं आणि त्यांची मेडिकल ट्रीटमेंट घेणं बंद करू नका, पण तरीही लोकं काही सुधरत नाहीत..
जितकी मार्केटिंग हे लोक स्वतःच्या औषधांची करतात, जितकी प्रसिद्धी ते स्वतःच्या तात्पुरत्या रिझल्टस् ला देतात, तितकी प्रसिद्धी त्यांच्या फेल्युअर ची मात्र होत नाही.. फसलेले लोक ‘आपल्यालाच पथ्यपाणी सांभाळणं झालं नाही’ वगैरे, अशा प्रकारच्या काहीतरी समजूती करून घेऊन गप्प बसतात, आणि नवीन लोक फसतच जातात..
फसवणारे असतात म्हणून लोक फसतात, आणि फसणारे असतात म्हणून काही जण फसवतात..
अवघड आहे..
**