जळगाव जिल्ह्यातील जामनेर प्रकरण.
यात मारणारा जोशी म्हणजे “ब्राह्मण” असे समजून आधी आलेल्या प्रतिक्रिया आणि तो ब्राह्मण नव्हे, तर भटक्या-विमुक्त समाजातलाच होता हे समजल्यावर आलेल्या प्रतिक्रिया, या दोन्ही प्रतिक्रिया विकृत आहेत..
प्रत्यक्ष घटनेपेक्षा या विकृत प्रतिक्रिया जास्त विखारी आणि संतापजनक आहेत.
समाजाची जातीयवादी कीड किती खोलवर आहे ते दाखविणाऱ्या आहेत..
पोहायला गेलेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांना ते विवस्त्रावस्थेतच विहिरीबाहेर आले असता, त्यांच्याच काठावर ठेवलेल्या कपड्यांतुन बेल्ट काढुन त्यांना मारहाण करण्यात आली, असे पोलिस म्हणतात.
त्यांना तसेच मारत मारत नेण्यात आले, बहुधा याला काहीजण ‘धिंड’ म्हणत असावेत.. कारण धिंड काढली गेली की नाही याबाबत पोलीस मौनात आहेत.
ज्याच्या मालकीची विहिर होती त्याने मारहाण केली आंणि त्याच्या एका कामगाराने व्हिडियो काढला.. सोशल मीडियावरही टाकला. ही मारहाण करणाऱ्याची अमानुषगिरी आहे आणि त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी यात शंका असायचे कारण नाही..
विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असेल तर मालकाचे चिडणे “स्वाभाविक” आहे . म्हणून ही मारहाण जातीय दृष्टीकोनातून झालेली नाही . इथे कुठे येतो जातीयवाद? असा दुसरा प्रवाद आहे..
विहीर मालकाच्या खाजगी विहिरीत पोहणे ही घुसखोरी आहे हे मला मान्य आहे, आणि विहीर मालकाचा खाजगी मालमत्ता रक्षणाचा हक्कही मला मान्य आहे, पण म्हणून अमानुष मारहाणीचे समर्थन मी कसे करु? आणि अशी अमानुष मारहाण करू धजावण्यातून जी पोहणाऱ्या मुलांची सोशल इन्फेरिओरिटी उघडी पडते तीला नजरंदाज कसे करू?
“यात जातीयवाद नाही” म्हणणाऱ्याने मला एका प्रश्नाचे उत्तर द्यावे.. त्या विहीर मालकाने (मग तो कोणत्याही जातीचा असो), जर पोहणारा मुलगा संग्रामसिंह पाटील असता, किंवा विवेक कुलकर्णी असता, तर अशीच नग्न आणि अमानुष मारहाण केली असती का??..
एखाद्याला शिक्षा देणे हे जर त्याच्या जातीवर किंवा गावातल्या ‘सोशल स्टेटस’वर ठरत असेल तर तो जातीयवाद नाही असं कसे म्हणायचे?
जेंव्हा समोरचा केवळ ‘माणूस’ असणं पुरेसं असताना जर समोरच्याची ‘जात’ विचारात घेऊन आपली त्याच्याशी वागण्याची पद्धत बदलत असेल, तर आपण जातीयवादी असतो.. इतकी सरळ सोपी व्याख्या आहे जातीयवादाची..
आणि फक्त ब्राह्मण किंवा मराठेच (सवर्ण) जातीयवादी असतात असं कोण म्हणलं..? वरच्या व्याख्येप्रमाणे, स्वतःसोबत जात बाळगणारा प्रत्येकजण जातीयवादी असतो..
एक उदाहरण सांगतो..
मला सातवीत मराठी शिकवायला चव्हाण सर होते.. ते महार होते.. (खेड्यात माणूस भेटण्याआधी त्याची जात कळते.. त्यात काही विशेष नाही) असो.. सरांनी “जमाखर्च स्वातंत्र्याचा मांडणार केंव्हा?” ही कविता शिकवलेली मला अजून लक्षात आहे.. “प्राक्तनात अस्पृश्यांच्या छळाचीच गाथा..” या ओळी शिकवताना त्यांनी अस्पृश्यांची मांडलेली कैफियत माझे छोटे हृदय पिळवटून गेली.. त्या दिवशी मी खेळायला नाही गेलो..
एकदोन वर्षांनंतर सरांच्या गल्लीत डोंबाऱ्यांचा खेळ झाला.. खेळानंतर त्या छोट्या मुलींनी चव्हाण सरांच्या घरी पाणी प्यायला मागितले.. सरांनी बाहेरच्या रांजणातले वापरायचे पाणी, कपडे धुण्याच्या पातेल्यातून त्यांना लांबूनच प्यायला दिलेले बघून माझ्या मनावर एक ओरखडा उमटला.. ती कविता शिकवताना सरांच्या डोळ्यात तराळलेले पाणी, आताच्या प्रसंगाशी कुठेच मेळ खात नव्हते.. त्यादिवशी मी पूर्वीपेक्षा जास्त अंतर्मुख झालो..
कालांतराने जास्त समज आल्यावर, जातीवादाच्या भयाण वास्तवतेतली खरी मेख त्या छोटयाशा प्रसंगाच्या अनुषंगाने मला जोखता आली.. जो व्यक्ती स्वतः अस्पृश्यपण भोगतोय, तो खालच्या दुसऱ्यालाही जर ‘माणूस’ म्हणून वागवू शकत नसेल, तर.. जातीय उतरंडीच्या वरच्या भागात असलेल्या, भेदभावाची कसलीही झळ न सोसलेल्या, सोशल सुपिरिओरिटीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळालेल्या, आणि वंशवादाचे सळसळते रक्त तापवत ठेवणाऱ्या जातसमूहांकडून ही अपेक्षा ठेवणं किती दुरापास्त आहे, याची जाणीव मला खिन्न करून गेली..
माणूस हा जरी सामाजिक प्राणी असला तरी तो गटागटाने राहण्याकडे त्याचा जास्त कल असतो, असं मानववंशशास्त्र सांगतं.. म्हणजे, “एकसंध समाज” (Homogeneous society) हा केवळ कल्पनाविलासच आहे की काय.! उत्क्रांतीच्या टप्प्यातून प्रगल्भ ‘माणूस’ बनण्याची ती शेवटची पायरी असेल कदाचित.. पण ती अजून आपण भारतीय गाठू शकलो नाहीयेत.. आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता ती पायरी आपण गाठू की नाही अशीच शंका जास्त येते.. खरंच, डिकास्ट आणि डिक्लास होऊन जगणं एवढं अवघड असावं?!!
समजा, एका गावात एकाच जातीचे लोक जरी आपण ठेवले तरी ते गुण्यागोविंदाने राहणार नाहीत.. त्यांच्यातही ‘उप-जाती’ वरून गट असतील.. गरीबी-श्रीमंती वरून गट असतील.. व्यवसायावरून गट असतील.. राजकारणावरून गट-तट असतील.. आणि हे गटतट सदैव एकमेकांना पाण्यात पाहत असतात, एकमेकांना ‘खाली’ दाखवत असतात, हे इथले वास्तव आहे..
माळी, धनगर यांचं प्राबल्य असणारी काही गावं आहेत, जिथं मोजक्या असणाऱ्या मराठा घरांनाही जरा दबून राहावं लागत असल्याचं मी पाहिलं आहे.. प्रश्न संख्याबळाचाही असतो.. जरी अशी उदाहरणे अगदीच तुरळक असली, तरी बोलकी आहेत.. म्हणून विहिरमालक ‘जोशी’ हा ब्राह्मण असो की भटका विमुक्त असो, गावातली त्याची सामाजिक पत महत्वाची भूमिका बजावत असते.. आणि ही सामाजिक पत (गावातली इज्जत) पैशामुळे, दहशतीमुळे आणि जातीमुळे मिळत असते..
जगातल्या धर्मवाद, वर्णवाद आणि वंशवादाच्या जोडीला भारतात अजून एक गोष्ट जास्त आहे.. ती म्हणजे जातीवाद!!.. “दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखणे” या मनुष्याच्या किडक्या काळ्या बाजूचेच ते उदाहरण आहे.. आणि हे जातिवादाचे बाळकडू अगदी लहानपणापासून प्रत्येकाला आपल्याच घरातून, सभोवतीच्या समाजातून रोज देण्यात येतं.. अरे, तो अमुक जातीचा आहे, त्याला आपल्या घरी नको आणत जाऊ.. तो तमुक धर्माचा आहे, त्याच्याशी मैत्री नको करू.. तो घाणेरड्या गल्लीत राहतो, त्याच्यासोबत नको खेळू, त्याचे वडील शिपाई आहेत, त्याच्याशी जास्त संबंध नको ठेऊ.. असं एक ना अनेक..
दुसऱ्या व्यक्तीला आपल्यासारखाच एक ‘माणूस’ म्हणून न पाहता, जर आपल्या मनात त्याची ‘जात’ येत असेल, तर आपण जातीयवादी आहोत.. आणि आपल्या प्रत्येक वागण्याबोलण्यातून हे ‘जातीय’पण दिसत असतं.. आपल्या घरी समारंभाला बोलावण्यातून, घरातल्या भिंतींवर फोटो लावण्यातून, हळदीकुंकूला बोलावण्यातून, घरगुती संबंध ठेवण्यातून, मैत्री करण्यातून, प्रेम करण्यातून, गाडीच्या काचेवर फोटो लावण्यातून, नंबरप्लेटवर लिहिन्यातून, पुस्तके वाचण्यातून, फेसबुकवर एखाद्याची पोस्ट लाईक/शेअर करण्यातून, व्हाट्सएप ग्रुप करण्यातून, डीपी ठेवण्यातून, स्टेटस ठेवण्यातून, रिंगटोन ठेवण्यातून, प्रत्येक प्रत्येक अगदी प्रत्येक गोष्टीतून आपली जातीयता बाहेर पडत असते.. “क्रिया म्हणून किंवा क्रियेची प्रतिक्रिया म्हणून” प्रत्येक प्रकारची जातीयता आपण पाहत असतो, अनुभवत असतो.. आणि त्याच्या अनामिक असुरक्षितेतून मग आपण आपल्या स्वजातीच्या कळपात ओढला जातो.. जात ही माणसाला सुरक्षा कवचासारखी भासत असते..
भित्र्या आणि (आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या) कमकुवत माणसाला तर जास्तच!!
दरवेळी शारीरिक मारहाणच व्हावी असे काही नाही.. कधी कामावरून काढलं जातं, कधी पोटावर पाय दिला जातो, कधी आर्थिक कोंडी केली जाते, कधी टोमणे मारले जातात, कधी मानसिक त्रास दिला जातो, कधी वेगळ्या मार्गाने जीवन संपवलं जातं.. कधी हक्क नाकारले जातात , तर कधी संधी डावलल्या जातात.. शारीरिक मारहाण तर जातीयवादाच्या हिमनगाचे केवळ टोक आहे.. आर्थिक, सामाजिक आणि मानसिक मारहाण अदृश्य असते आणि मोठा भाग व्यापून असते..
तरी ‘जातीयवादाचा राजकारण्यांकडून होणारा दुरुपयोग’ हा या लेखाचा विषय नाही.. नाहीतर त्यावर अख्खा एक ग्रंथ लिहिता येईल.. असो..
अलीकडे जातीअंतावर बोलणे ही फॅशन आहे.. पण जातीअंत होणारच नाही.. कारण एक गट आरक्षणातून मिळणाऱ्या फायद्यांमुळे जात सोडत नाही, तर दुसरा गट आपसूकच मिळणाऱ्या सामाजिक फायद्यांमुळे जात सोडत नाही..
“अलीकडे कुठं राहिलीय जातीयता?” असं म्हणणाऱ्यांनी अंतर्मुख व्हावे..
आपल्यातला प्रत्येकजण कमीजास्त प्रमाणात (किंवा काहीवेळेस तरी) जातीयवादी असतो..
– एखाद्याला प्रमोट करताना किंवा एखाद्याला डावलताना त्याच्या अंगभूत गुणांऐवजी आपण त्याची जात विचारात घेत असू, तर आपण जातीयवादी आहोत..
– आपल्या मुलांच्या किंवा बहिणीच्या लग्नासाठी आपण समोरचा मुलगा किंवा मुलगी आपल्या (किंवा आपल्यापेक्षा सवर्ण) जातीचा/जातीची नाही म्हणून नकार देत असू, तर आपण जातीयवादी आहोत..
– एखाद्याला काम देताना, धंद्याची ऑर्डर देताना, किंवा एखाद्याच्या दुकानातून विकत घेताना, जर आपण जातीचा विचार करत असू, तर आपण जातीयवादी आहोत..
– अगदी सामाजिक काम करताना देखील जर स्वजातीहीत आपल्या प्रधान्यक्रमावर असेल, तरी आपण जातीयवादी आहोत..
– एखाद्याशी बोलताना, भांडणे मिटवताना, अथवा घटना ऐकून त्यावर मत बनवताना, आपली मते समोरच्याच्या जातीनुसार बदलत असतील तर आपण जातीयवादी आहोत..
म्हणूनच,
जामनेर मधली विहीर जोशी आडनावाच्या व्यक्तीची आहे म्हणून तुटून पडलेले पण नंतर तो जोशी भटक्या विमुक्त जातीचा आहे हे समजल्यावर आपल्या तलवारी म्यान करणारे.. पोहणारी मुलं खालच्या जातीची आहेत, त्यांची गावात अजिबात पत नाही, हे जाणून असल्याने त्यांना अमानुष मारहाण करणारे.. आणि विहिरमालकाच्या हक्काआडून त्याच्या कृत्याचे ‘तात्विक’ समर्थन करणारे.. हे तिघेही तितकेच जातीयवादी आहेत..
झालेल्या अमानुष मारहाणीचा केवळ ‘माणूस’ म्हणून स्वच्छ निषेध कुठेच नाही..
कारण ‘माणूस’पणापेक्षा इथे जातीला टीआरपी जास्त आहे..
इतकेच..
– डॉ सचिन लांडगे.
अहमदनगर.