– डॉ सचिन लांडगे.
या बाबतीत जगात लोकांचे पाच प्रकार असतात...
१. या पहिल्या प्रकारातल्या लोकांना स्वतःला काही करायचं नसतं, पण दुसऱ्याने करायला घेतलं की त्यात लुडबुड करायची सवय असते..
२. या प्रकारातल्या लोकांना सगळं स्वतःच करायची हौस तर असते. पण, त्यांना नीट येतही नसतं, अन् दुसऱ्याचं ऐकून घ्यायची तयारीही नसते.. फक्त केल्यासारखं करायचं/दाखवायचं अन् क्रेडिट घ्यायचं.. नुसतं “झगा मगा, अन् मला बघा”..
३. काही लोकांना स्वतः काम करताना, त्याच कामासाठी, गरज नसतानाही, सोबत दुसऱ्याला पण राबवून घ्यायची सवय असते. आपण काम करतोय तर जणू दुसऱ्यावर (किंवा जगावर) उपकारच करतोय असा आविर्भाव असतो.
४. ह्या प्रकारच्या लोकांना काहीच करायचं नसतं. मग दुसरा ते कसंही करो, त्यांना ते चालतं. कुठली अन् कसली जबाबदारीच नसते घ्यायची.. अन् चुकून जबाबदारी पडलीच तर ते अत्यंत जीवावर आल्यासारखं, मजबुरी म्हणून काम करतात.
५. या प्रकारातली लोकं स्वतःहून प्रामाणिक जबाबदारी घेणारे असतात, किंवा पडलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणारे असतात..
जबाबदारी ही अशी गोष्ट आहे की, जी ती घेणाऱ्यावरच जास्त पडते.. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, जबाबदारी ही ज्याला वाटते त्याचीच असते.. जबाबदारी घेण्याची सुरुवात ही “आपलं मानण्या” पासून होते. ऑफिस असो, संसार असो, व्यक्ती असो, देश असो, किंवा कोणत्याही गोष्टी असो, जेंव्हा त्या गोष्टी आपल्या वाटू लागतात, तेंव्हाच माणूस त्याबद्दलची जबाबदारी स्वतःहून घेतो..
ऑफिस मधलं काम हे आपलं काम आहे, ते आपल्याला रोजीरोटी देतं, ते करणं आपलं कर्तव्य आहे, असं वाटतं तेंव्हाच माणूस ते काम जबाबदारीनं अन् निष्ठेनं करतो.. मग वाहवा करायला समोर ऑडियन्स असो वा नसो.. (कोणी वाहवा केली किंवा कामाचं चीज होत असेल, तर मूठभर मांस अंगावर चढतं, पण ते मुख्य उद्दीष्ट नसतं)..
संसारात पण असंच असतं. जितकं “आपलं” वाटणं, अन् महत्त्वाचं वाटणं कमी असेल, तितकं जबाबदारी टाळण्याकडं कल जास्त असतो.
“जबाबदारी वाटणं, आणि ती घेणं” हे माणसाच्या मूलभूत स्वभावातच असायला हवं असतं.. ते सदासर्वकाळ लादता येत नाही.. समजा, एखाद्या व्यक्तीला नसेलच वाटून घ्यायची कामाची जबाबदारी, तर आपण त्याच्यावर ती फार काळ ती लादू शकत नाही. जरा आपलं दुर्लक्ष झालं, किंवा परिस्थिती बदलली, की ते काम टाळतात..
जसं कामाची जबाबदारी असते, तसं एखाद्याला आधार देण्याची जबाबदारी असते, प्रेम देण्याची जबाबदारी असते, मदत करण्याची, संरक्षण देण्याची, सांभाळ करण्याची जबाबदारी असते, आर्थिक नियोजनाची जबाबदारी असते, सामाजिक, सांसारिक जबाबदारी असते.
मला ही जबाबदारी घेणारी माणसं फार आवडतात. ती वरून कठोर भासली तरी मनाने मऊसर असतात. कोण काय म्हणेल, या फंदात न पडता ती जबाबदाऱ्या पार पाडत राहतात. स्वभावाचा भाग असतो तो त्यांच्या. ती कधी चिडचिड करतील, त्रागा करतील, कधी स्वतःला हजारदा बजावतील, पण जबाबदारी पेलण्याची वेळ आली की पुन्हा पुढे सरसावतील. त्यांचा आक्रमकपणा, त्यांची होणारी चिडचिड, आणि प्रत्येक बाबतीतला त्यांचा आग्रही स्वभाव, हाच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून सारखा सारखा दोष म्हणून अधोरेखित केला जातो, पण त्यामागे असलेली त्यांची तळमळ, आपलेपणा, आणि कामाप्रतीची निष्ठा, ही बऱ्याचदा दुर्लक्षिली जाते..
जबाबदारी घेणाऱ्याला घेईल ती जबाबदारी कमीच पडते. आणि , इतरांकडूनही त्यांच्याकडेच जबाबदारी जास्त दिली जाते.. जे चांगलं काम करतात, त्यांच्यावरच जास्त काम पडतं, त्यांनाच महत्त्वाचं काम दिलं जातं..
मग आळशी आणि ऐदी लोकं यांच्या जीवावर जगतात. ऐश करतात. ऐट करतात.. कधी कधी तर शोषण देखील करतात. अशी भावनिक /मानसिक /आर्थिक परपोषी (पॅरासाईट) स्त्री पुरुष आपल्या आजूबाजूला ढिगानं असतात.. असो..
पण गंमत अशी की, प्रत्येक जण दुसऱ्या व्यक्तीला वरच्या पहिल्या चार पैकी एका प्रकारात बसवतो, अन् स्वतः मात्र पाचव्या प्रकारात असल्याचं भासवतो..
तुम्ही कोणत्या प्रकारात येता?
– डॉ सचिन लांडगे.
भुलतज्ञ, अहमदनगर.
**