Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

आयुर्वेद आणि त्याचे भवितव्य…

 

– डॉ सचिन लांडगे.

जेंव्हापासून मानव विचार करू लागला तेंव्हापासून निरीक्षणातून तो शिकत गेला. आयुर्वेदाला माणूस विचार करू लागल्यापासूनची परंपरा आहे.. आपल्या थोर ऋषी मुनींनी हजारों वर्षांपासून वनस्पतींच्या गुणधर्मांचा अभ्यास करून, त्या काढे भस्मे चूर्ण या व अशा अनेक स्वरुपात औषधे म्हणून वापरायला सुरुवात केली
कालांतराने अनेकानेक वनस्पतींचा वापर व त्यांची मिश्रणे त्यांचे जास्तीतजास्त अचूक प्रमाण यातून आयुर्वेदाने उपचार पद्धती शोधल्या..

खुद्द वाग्भटानं असं नमूद केलं आहे की “आयुर्वेद हे परिवर्तनशील शास्त्र आहे व क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे, हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे आद्य कर्तव्य आहे”. क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे म्हणजे- नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा, सतत पुढे जाणं, अचूकतेकडं प्रवास करणं..

त्याकाळी आपल्या आयुर्वेदाचार्यांना उपलब्ध असलेली उपकरणे आणि साधने यावर बर्याच गोष्टी अवलंबून होत्या. सूक्ष्मदर्शक यंत्रे नव्हती, Micro-organisms च्या अभ्यासाला limitations होती. एखाद्या वनस्पतीचा नेमका (रोगावर परिणामकारक) घटक, नेमक्या स्वरुपात वेगळा काढण्याच्या chemical reactions च्या पद्धतीना मर्यादा होत्या.. तरीपण जास्तीत जास्त result oriented होण्याचा आयुर्वेदाने प्रयत्न केला.. पूर्णपणे trial and error पद्धती वापरत वापरत आयुर्वेदाचार्यांनी आपले ज्ञान वाढवण्याचा सतत प्रयत्न केला..

आधुनिक वैद्यक हे फार तर फार १५०-२०० वर्षांपासून आपली पाळेमुळे घट्ट करत आले आहे.. ते काही आकाशातून पडलेले नाही..!! वनस्पती व इतर अनेक नैसर्गिक स्त्रोतांपासून रोगावर नेमका परिणाम करणारा molecule किंवा compound आधुनिक पद्धतीने वेगळे केले. जसे जसे विज्ञानात निरनिराळे शोध लागत गेले तसे त्यांचा वापर आधुनिक वैद्यकाने करून घेतला आणि अनेक रोगांवर नैसर्गिक molecule, सेमी सिंथेटिक आणि पूर्णपणे सिंथेटिक molecule शोधले.. Clinical trials वापरून आणि Evidence based study करून जास्तीत जास्त परीणामकतेच्या जवळ जायचा प्रयत्न केला.. Side effects कमी कसे होतील हे ही पाहिले.. निरनिराळ्या viruses आणि bacteria चा अभ्यास (pathogenesis) करून त्यांच्या जीवनचक्रात नेमका कुठे व कसा आपण औषधांचा वापर करू शकतो हे शोधले.. त्यांच्यावर लसी (vaccines) शोधल्या..

“हे सगळे होत असताना आयुर्वेद काय करत होते?” हा प्रश्नच मला अप्रस्तुत वाटतो..
तसे पाहिले तर आयुर्वेद (म्हणजेच निसर्ग) च आधुनिक वैद्यकाची जननी आहे.. आयुर्वेदातल्याच ज्ञानाच्या पायावर आधुनिक वैद्यकाची गुढी उभा आहे, वाढत आहे, आणि ती दिवसेंदिवस update होत होत जास्तीत जास्त परीणामकतेच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहे..

आता आजारांचे स्वरूप, प्रकार, आणि complexity खूप बदललेली आहे.. अशा परिस्थितीत आपण जुनाट उपचार पद्धतीवर कसं काय १००% विश्वास ठेवू शकतो..?
एकमेकांच्या उपचार पद्धतींना नावे ठेवून भांडत बसल्याने ‘सत्य’ बदलणार आहे का..?

मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो – आयुर्वेदाबद्दल कितीही अभिमान असला तरी, तुमच्यापैकी किती जण आपले तान्हे मुल आजारी पडल्यावर Pediatrician कडे न जाता आयुर्वेदिक उपचारासाठी घेवून गेले आहेत..? किंवा पत्नीच्या सीजरच्या ऑपरेशनसाठी किती जणांनी आयुर्वेदिक तज्ञाकडे जावून सुश्रुत संहितेत सांगितल्याप्रमाणेच शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरला आहे..?
वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे “नाही” अशीच असतील..!

मला काही जणांनी सांगितले कि Allopathy मध्ये बऱ्याचशा गोष्टी आयुर्वेदामधीलच आहेत..
हो, हे अगदी बरोबर आहे, आणि त्यातच Allopathy चे यश आहे.
उदाहरण सांगतो, सर्पगंधा या आयुर्वेदातील वनस्पती पासूनच Reserpin हे Anti-Hypertensive औषध बनवले. सर्पगंधा वनस्पतीतील जो घटक Hypertension वर उपयुक्त आहे, तो वेगळा काढला जातो. त्याची Molecular study करून, त्या रेणूचा (Molecule चा) अभ्यास केला जातो. मग तो Molecule बऱ्याच Clinical trials नंतर योग्य त्या प्रमाणात उपचारासाठी वापरला जातो. नंतर त्याच्या मूळ रेणूत बदल करून किंवा इतर रेणूंशी संयोग करून नवीनच रेणू (तेच गुणधर्म असलेला, पण, अधिक सक्षम) शोधला जातो. Semi synthetic आणि synthetic..
(सध्या depression मुळे Reserpine बंद केले आहे)
वेगवेगळ्या Trials, वेगवेगळ्या तपासण्या, Evidence based studies अशा कितीतरी गोष्टी मधून हि उपचार पद्धती विश्वासाहर्ता मिळविते.. आणि परिणामकारकतेच्या (Effectivenessच्या) जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करते..
*’पारंपारिक’तेच्या नव्हे तर ‘परिणामकारक’तेच्या जास्तीत जास्त जवळ जाणारी उपचार पद्धती आपल्याला हवी आहे…*

“आयुर्वेद श्रेष्ठ कि Allopathy?” हा प्रश्न पण मला गमतीचाच वाटतो… उपचार पद्धती कोणती का असेना, ती जास्तीत जास्त परीणामकतेच्या जवळ जाणारी हवी…
अजूनही आयुर्वेदात काही औषधे आणि उपचार पद्धती विशिष्ट रोगांवर चांगले results देतात म्हणून आयुर्वेद महान होत नाही किंवा काही रोगांवर आयुर्वेदात उपचारच नाहीत म्हणून Allopathy श्रेष्ठ ठरत नाही…

आयुर्वेद किंवा Allopathy विषयी बोलले कि त्या त्या विषयाची मंडळी चिडणारच आहेत..!!
नेमकं हेच व्हायला नको आहे… दुराभिमान हा घातकच….

आपल्याला घाण दिसली कि आपण ती लगेच गालिच्याखाली सरकावायचा प्रयत्न करतो, किंवा ती घाण हि घाण नव्हेच, असे हिरीरीने एकमेकांवर ठसवायचा प्रयत्न करतो..!! (येथे घाण या शब्दाचा अर्थ सुज्ञांनी Negative points (Demerits) किंवा Limitations असा घ्यावा)

परंपरांच्या पलीकडे जाऊन काळानुरूप बदलत असलेली आणि प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त सक्षम असलेली उपचार पद्धती आपण स्वीकारलीच पाहिजे आणि त्याच बरोबर, *आयुर्वेदालाही Update केलं पाहिजे,* त्यातल्या बऱ्याच *अनावश्यक, खुळचट आणि कालबाह्य गोष्टी त्यातून चक्क फेकून दिल्या पाहिजेत..* (….खरंतर हे आधीच व्हायला पाहिजे होतं.) नाहीतर आयुर्वेदिक ग्रॅज्युएट वर शिक्षण एका उपचार पद्धतीचे घेवून, दुसऱ्याच उपचार पद्धतीची Practice करायची वेळ आली नसती….

आयुर्वेद ग्रंथांच्या Updated पुनर्लेखनासाठी, आयुर्वेद तज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे.. आयुर्वेद शिकवणाऱ्या महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी, आवाज उठवला पाहिजे.. आयुर्वेदाबद्दल समाजात आपुलकी आणि विश्वासाहर्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे..
(नाहीतर एके दिवशी खरोखरच आयुर्वेद हा इतिहासाच्या कला शाखेत शिकवावा लागेल)…

….पण दुर्दैवाने आपल्याला यातले काहीही करायची इच्छा नाही. उलट सरळ परिस्थितीला शरण जात आणि शॉर्टकट शोधत Allopathy practice च्या परवानगी साठीच आपण आग्रही राहिलो तर कसे होणार..?

एकीकडे आयुर्वेदाचा उदोउदो करायचा, आणि दुसरीकडे त्यालाच खड्ड्यात घालणारी धोरणे ठेवायची… आपल्या अशा या दुटप्पी वागण्याने आयुर्वेदाचे खरे “मारेकरी” आपणच ठरत आहोत…

– डॉ सचिन लांडगे.

 

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *