Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

अडचणीचे दहा प्रश्न..

– डॉ सचिन लांडगे.

 

१. तुम्ही एखाद्या धर्माला मानता त्याच्या देवाला मानता, म्हणजे तुम्ही इतर धर्माचे नास्तिक असता, हे तुम्हाला माहिती आहे का?.. आणि त्या इतर धर्मात नास्तिकांना नरकात ज्या शिक्षा लागू आहेत त्या तुम्हाला पण लागू आहेत, याबाबत तुमचं मत काय आहे?

 

२. “ला इलाहा इल्लल्लाह” याचा अर्थ ‘अल्लाह एकच ईश्वर आहे, अल्लाह सोडून दुसरं कोणीच महान नाही’ असा आहे. म्हणजे जर कोणी “ला इलाहा इलल्लाह” म्हणत असेल तर इतर धर्मियांच्या भावना ती व्यक्ती डायरेक्ट दुखावत असते असं नाही का?

 

३. परमेश्वर हाच सर्वशक्तिमान आणि अनादि-अनंत आहे, इथं सगळं काही त्याच्याच इच्छेनं चालतं, असं जर हिंदू लोक मानत असतील, तर इतर धर्मियांच्या देवाला काही अर्थ उरतो का?

 

४. आणि जर, वरचे दोन प्रश्न नाकारून जर तुम्हाला वाटत असेल की, सगळेच धर्म सलोख्याने नांदावेत, आणि ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने धर्माचरण करावे, वगैरे.. तर याचा अर्थ सगळेच ‘ईश्वर’ खरे (वास्तवात) आहेत/असतील याला तुम्ही अप्रत्यक्ष मान्यताच देत असता, हे तुम्हाला कळतंय का? मग ‘आमचाच देव/धर्म श्रेष्ठ’ या अभिमानाचा काही अर्थ उरतो का? जगात तब्बल 4200 निरनिराळे धर्म आणि पंथ आहेत, त्या सगळ्यांच्या नाजूक भावना आंटीला जपत राहणे किती अवघड आहे, याची तुम्हाला जाणीव आहे का? असो..

 

५. जर समजा, वरचा प्रश्न जर खरा मानला तर, देव/अल्लाह/जिझस अशा सगळ्या धर्मांच्या देवांनी आपापल्या धर्माच्या लोकांची वर आकाशात विभागणी करून घेतली असेल का? म्हणजे एखादी हिंदू व्यक्ती मेली तर तिच्या पापपुण्यानुसार ती स्वर्ग किंवा नरकात जाणार, आणि मुस्लिम व्यक्ती मेली तर ती जन्नत किंवा जहाँन्नुम मध्ये जाणार.. असं असेल असं तुम्हाला वाटतं का? आणि नसेल वाटत, तर याबद्दल नेमका तुम्ही काय विचार केला आहे?

 

६. पाप-पुण्य या सापेक्ष गोष्टी आहेत, पण धर्मग्रंथांच्यानुसार मान्यतांनुसार जर बघितलं तर, सध्याच्या काळात कुठलंच पाप न करता जगता येणं केवळ अशक्य आहे.. मग जर पापी हिंदू व्यक्ती नरकात जाते, पापी ख्रिश्चन व्यक्ती Hell मध्ये जाते, तर मग ज्याला कोणताच देव/धर्म नाही असा नास्तिक माणूस कुठेच जात नसेल ना? मग जर नास्तिक व्यक्तीला जहाँन्नुम, नरक, चौऱ्याऐंशी लक्ष योनी, ‘कयामत का दिन’, ‘जजमेंट डे’ असल्या काहीच भानगडी नसतील तर नास्तिक होणं फायद्याचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का?

 

७. प्रत्येक धर्म त्याच्या धर्मग्रंथात हेच सांगतो की आमच्या धर्मग्रंथात सांगितलेल्या नियमांनुसार जी व्यक्ती आचरण करत नाही, ती पाखंडी/काफिर आहे. ती नरकात जाईल.. वगैरे.. काही धर्मांत तर अशा व्यक्तींचे जगण्याचे अधिकार देखील नाकारलेले आहेत, अशा धर्मांना ‘अमानवीय’ म्हणू नये का? आणि बावीस लाख वर्षांचा मानवाचा इतिहास असताना केवळ बावीसशे वर्षांपासून आलेल्या धर्मांचे म्हणणे कोणी का आणि कितपत सिरियसली घ्यावे?

 

८. निरंकार उपवास, कडक सोवळे आणि वेळेवर पूजाअर्चा लागणाऱ्या देवाला भारताबाहेर काहीही किंमत नाही, आणि ‘ब्रह्मांडनायक’ वगैरे बिरुदावली लावणाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर देखील कोणी ओळखत नाही, असं कसं शक्य आहे, यावर तुम्ही कधी विचार केलाय का? ऐकीव चमत्कारांच्या जोरावर आपण कोणावर आपली मति गहाण ठेवून विश्वास कसा काय ठेऊ शकतो? आणि वर त्यांच्याबाबत हळवे देखील राहू शकतो?

 

९. ‘पृथ्वी सपाट आहे’, किंवा ‘सारे ग्रहतारे पृथ्वीभोवती फिरतात’ अशा अनेक असत्यांनी भरलेल्या धर्मग्रंथांना, व ‘उडते गाढव’, ‘उडता मानव’, बोलका साप, कुमारी माता’ असल्या काहीच्या काही अख्यायिकांनी भरलेल्या पुराणकथांना आपण “दैवी” कधीपर्यंत म्हणणार आहोत?

मग “आमच्या पद्धतीने धर्माचरण करा, नाहीतर तुमचं काही खरं नाही” या दुसऱ्या धर्मांच्या धार्मिक दहशतीला आपण हसतो, उडवून लावतो, पण आपल्या धर्माच्या बाबतीत याच दहशतीला प्रत्यक्ष किंवा आडूनआडून बळी पडतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

 

१०. फक्त माणसांचीच विभागणी धर्मांत झालीये का? आणि देव फक्त माणसांवरच लक्ष ठेऊन असतात का? तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या गावाची लोकसंख्या असते तेवढ्या तर मुंग्यांच्या प्रजाती आहेत आणि त्या प्रत्येक प्रजातीच्या करोडो मुंग्या आहेत, मग त्यांच्या पापपुण्याचा हिशोब कोण ठेवतं? त्यासाठी वेगळे ‘मुंगीदेव’ असतात का? करोडो वनस्पती, प्राणी, आल्गी, फंगस, जिवाणू, विषाणू यांची विभागणी मानवी धर्मांनुसारच असते का? असो…

 

आजच्यापुरतं एवढंच बस्स..

 

– डॉ सचिन लांडगे.

 

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *