– डॉ सचिन लांडगे.
अंजना कश्यपचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो मी पाहिला पण मला अजिबातच आश्चर्य वाटलं नाही. कारण कुठलीही दुर्घटना होऊ द्या, नैसर्गिक आपत्ती येऊ द्या किंवा कुठलाही दहशतवादी हल्ला होऊ द्या, मी आतापर्यंत बहुतांश वेळा अशीच पत्रकारिता किंवा रिपोर्टिंग पाहत आलोय.. 26/11 च्या हल्ल्यापासून ते काल अभिनंदन पाकिस्तान कडून पकडला गेल्याच्या वेळेपर्यंतचा यांचा धुडगूस पाहिला तर या अंजना कश्यप बद्दल इतकं आश्चर्य वाटून घ्यायची आपल्याला गरजच नाहीये!!
आपला समाज कुठल्या क्षेत्राच्या बाबतीत पूर्णपणे अज्ञानी असेल तर ते आहे वैद्यकीय क्षेत्र..!!
मागे एकदा साधारण तीन वर्षांपूर्वी एका नॅशनल न्यूजपेपरमध्ये बातमी होती – “किडनी स्टोन के ऑपरेशन के बाद डॉक्टरने मरीज के पेट में छोडा मेटल का तार, डॉक्टर की लापरवाही..”
एकदम सनसनाटी!!
पण, त्या पत्रकाराने बातमी देण्याआधी एखाद्या तरी मूत्ररोगतज्ञाला विचारलं असतं, तर कळलं असतं की, अशा ऑपरेशननंतर मूत्रमार्गात ‘डिजे स्टेंट’ ठराविक दिवसांसाठी ठेवावा लागतो, तो साधारण 21 दिवसांनंतर सहा महिन्यांपर्यंत काढतात.. (इतकी अनपढ आणि ठरकी पत्रकारिता आहे आपल्याकडं!!)
एकतर मूलभूत वाचन नसतं, ज्या विषयावर टीव्ही शो करायचाय त्यावर होमवर्क केलेला नसतो, दोन्ही बाजू ऐकून घ्यायची तयारी नसते, दुसऱ्याच्या मतांना काडीचीही किंमत द्यायची सवय नसते, आणि निष्पक्षता कशाशी खातात याचा थांगपत्ता नसतो.. फक्त हातात माईक असतो, समोर टार्गेट असतं, डोक्यात अहंगंड असतो आणि अंगात सनसनाटी तयार करायची खुमखुमी असते.. मग तोंडातून अज्ञान बाहेर पडतं, आणि ही असली ठरकी पत्रकारिता तयार होते!!
दुसऱ्याला संवेदशीलता शिकवणारे स्वतः कधी बीबीसी वगैरे जागतिक वाहिन्या बघत नसतील का बरं.? की गांभीर्य, शुचिता, संवेदनशीलता वगैरे प्रकारांशी यांचा काहीही संबंध नसतो का.? फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला झाला. मी एकही मृतदेह माझ्या टीव्हीच्या पडद्यावर पहिला नाही, रक्त नाही की झीट आणणारा धुडगूस नाही. तो मला 9/11लाही दिसला नव्हता. आणि आपल्याकडे काय परिस्थिती असते?
अभीअभी हम अभिनंदन के घर के बाहर खड़े हैं। यही है वो रास्ता जहाँ से अभिनंदन गुजरते थे। यही है वो सब्जी मंडी जहाँ से अभिनंदन की बीबी सब्जी खरीदती थी। अब इस वक्त वो हमारे साथ है। मैडमजी, इस वक्त आपको कैसा लग रहा है?
ती पत्नी बिचारी धाय मोकलून रडतेय, तिच्यावर काय परिस्थिती आलीये तीचं तिलाच माहीत.. आणि तुम्ही तिला प्रश्न विचारताय, ‘इस वक्त आपको कैसा लग रहा हैं?’
हा काय प्रश्न आहे?!!
‘सबसे तेज’ बनायच्या प्रयत्नात तुम्ही आता नागडे होऊन नाचायलाही कमी करणार नाहीयेत का..?
“यांना शिक्षा करा,” “यांना फासावर लटकवा,” “यांची चामडी सोला,” “यांचे राजीनामे घ्या” हे असले तुमचे मथळे.! तुम्ही पत्रकार आहात की न्यायाधीश??
तो डॉक्टर सांगतोय, की आमच्याकडे जितके आयसीयू आहेत तितके फुल्ल आहेत, म्हणून एका बेडवर दोन/तीन पेशंट्स ठेवावे लागत आहेत, स्टाफ अपुरा असतानाही सगळे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.. एका पेशंटची ट्रीटमेंट करत असताना नवीन आलेल्या पेशंट्सना नीट अटेंडही करता येत नाहीये, तरी डॉक्टरच्या कामात व्यत्यय आणून हंगामा करते आहे ती अंजना.. डॉक्टरला बोलूही देत नाहीये, त्याचं नीट ऐकूनही घेत नाहीये, आणि मुख्य म्हणजे जे प्रश्न प्रशासनाला विचारायला हवेत त्यासाठी डॉक्टरला धारेवर धरत आहे.. आणि शेवटी शेवटी तर चक्क कांगावा करत आहे..
तिथं बेड्स का कमी आहेत?, डॉक्टर एकच का आहे?, अशी परिस्थिती उदभवण्यापूर्वी प्रशासन झोपले होते का? हे प्रश्न तिनं नुकत्याच येऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांना विचारायला हवे होते खरंतर.. डॉक्टरला घेरून काय होणार आहे? फक्त सनसनाटी माजवता येईल आणि लोकांच्या नजरेत हिरॉईन बनता येईल!!
खरंच आपली कार्यतत्परता आणि संवेदनशीलता दाखवायची इतकी खुमखुमी असेल तर प्रशासनाशी भिडायची आहे का हिम्मत? झालाय का एखाद्या मुख्यमंत्र्याला किंवा एखाद्या आमदार खासदाराला प्रश्न विचारून भंडावून सोडल्याचा एखादा व्हिडीओ व्हायरल? की त्यांच्यासमोर तोंड उघडलं जात नाही तुमचं? अशावेळी कुठे जातो तुमचा ‘ताठ कणा अन कणखर बाणा’!!
‘उघडा डोळे बघा नीट’ हे दुसऱ्याला शिकवता ना तुम्ही, पण ते तुम्हालाच आधी शिकायची जास्त गरज आहे..
**